पाच सिनेमे येऊनही, शिवरायांचा तानाजी संपत नाही!

शिवचरित्र हेच मुळात अखंड प्रेरणादायी आहे. त्यातले शिवरायांना जिवाभावाची साथ देणारे आणि प्रसंगी प्राणचं बलिदान देणारे त्यांचे मावळे म्हणजे त्यातील स्फुर्तिगाथा आहेत. जगाच्या इतिहासात ‘गनिमी कावा’ अजरामर करणारे हे मावळे म्हणजे पराक्रमाचे आणि धाडसाचे एक एक सोनेरी पान. त्यातील एक लखलखतं नाव म्हणजे सुभेदार तान्हाजी मालुसरे.

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात राहणारा हा रांगडा तरुण शिवरायांच्या पदरी सामील होतो आणि त्यांच्या सैन्याचा महत्त्वाचा भाग ठरतो. महाराजांच्या ध्येयाशी तो इतका समरस होतो की, स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून सिंहगडाची मोहीम अंगावर घेतो. या मोहिमेच्या यशासाठी तो जे जे काही करतो ते अद्भूत आणि विलक्षण असतं. या सगळ्यातून गड येतो पण सिंह जातो. आपला अमोल देह स्वराज्यचरणी अर्पण करीत तानाजी धारातीर्थी पडतो.

ही गोष्ट मराठी म्हणवणाऱ्या सर्वांना तोंडपाठ असलेली ही गोष्ट. पण तरीही आजवर या कथेची भुरळ कलामहर्षी बाबुराव पेंटर, चित्रतपस्वी व्ही. शांताराम, ज्येष्ठ दिग्दर्शक राम गबाळे, ओम राऊत आणि आता दिग्पाल लांजेकर यांना पडलीय. प्रत्येकानं ही ही ऐतिहासिक कलाकृती भव्य स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केलाय. आजपर्यंत प्रदर्शित झालेल्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पाच चित्रपटांचा हा मागोवा.

कलामहर्षी बाबुराव पेंटर यांचा ‘ सिंहगड’ (१९२२)

चित्रमहर्षी दादासाहेब फाळकेंनी आपल्या देशात चित्रपट युगाला सुरुवात केली तेव्हा ते मुकपट होते. परंतु त्यांचा चेहरा प्रामुख्याने पौराणिक होता, तर कलामहर्षी बाबूराव पेंटरानी आपल्या सिंहगड चित्रपटाद्वारे १९२२ ला ऐतिहासिक चेहरा दिला. बाबूराव पेंटर यांना शिवचरित्रावरील चित्रपटांचे जनक म्हणावे लागेल.  शिवरायांवर नाटके खूप झाली पण चित्रपट करणारे पहिले बाबूराव पेंटरच. 

बाबूराव पेंटर यांनी १९२२ साली ‘सिंहगड’ हा पहिला शिवचरित्रपर चित्रपट बनवला. चित्रपट मूक असल्यामुळे कथाविषय सर्वाना माहिती असेल असाच हवा म्हणून कादंबरीकार ह. ना. आपटे यांची १९०३ साली लिहिलेली ‘गड आला पण सिंह गेला’ ही सुप्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरी निवडली. बाबुरावांच्या या चित्रपटाने लोकांच्या मनावर राज्य केले. 

हा चित्रपट अत्यंत लोकप्रिय ठरल्याने या चित्रपटाला तुफान गर्दी होऊ लागली. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची संख्या वाढवण्यात आली. चित्रपटाच्या उत्पन्नाचे आकडे प्रसिद्ध होत असल्यामुळे यावर सरकारचेही लक्ष गेले. त्यामुळे या चित्रपटाला पहिल्यांदा ‘करमणूक कर’ बसवला. त्यानंतर चित्रपटासाठी करमणूक कर लावण्याची पद्धत देशात रूढ झाली.

ऐतिहासिकतेसाठी सर्वकाही आणि लागलेली आग

या चित्रपटात छत्रपती शिवरायांची भूमिका बाबूराव पेंटर यांनी स्वतः केली. त्यांच्या बरोबर तानाजी मालुसरे यांची भूमिका बाळासाहेब यादव, उदयभानू म्हणून झुंजारराव पवार, तर शेलार मामा यांची भूमिका २३ वर्षाच्या व्ही. शांताराम यांनी केली होती. या सर्व भुमिका इतिहासाच्या पानातून बाहेर आल्यासारख्या वाटत. 

कल्ले, दाढ्या, पगडया, कमरची घोंगडी, मुंडासे, हातातल्या काठ्या, पहरेकऱ्यांच्या खाटा, पायातल्या जाड तळाच्या वहाणा, कानातले मोठे मोठे वाळे, हातातली कडी वैगरे सर्व अगदी हुबेहुब असे. हा चित्रपट सिंहगडावर चित्रित करण्याचा बाबुराव पेंटरांचा मानस होता पण पैशाअभावी तो फोल ठरला आणि पन्हाळगडावर चित्रीकरण करण्यात आले.

बाह्यचित्रीकरणाचा भारतातला हा पहिलाच प्रयत्न. ऐतिहासिक लढाया परिणामकारक दिसाव्यात यासाठी कोल्हापुरातील एक वस्ताद बाळासाहेब आणि झुंजारराव यांना शास्त्रोक्त शिक्षणासाठी दररोज बोलावलं जात असे. दांडपट्टा, घोडदौड, तलवार बाजींचा सराव चालू असताना एके दिवशी अचानक आग आग असा ओरडा ऐकू आला. 

शाहू महाराज, श्रीमंत नेसरीकर धावून आले

बाबुरावांच्या स्टुडिओला आग लागली होती आणि ती चहूबाजूला पसरत जाऊन स्टुडिओ खाक झाला. यापूर्वी प्रदर्शित केलेले सैरंध्री,  वत्सलाहरण, दामाजी या चित्रपटाच्या लोकमान्य टिळक आणि नटवर्य गणपतराव जोशी यांच्यावरील लघुपटाच्या निगेटिव्ह भक्ष्यस्थानी पडल्या. मात्र एका तगड्या तरुणानं धाडसानं त्या आगीत प्रवेश करीत मोठ्या कष्टानं बाबुरावांनी स्वतः बनविलेला देशी कॅमेरा वाचविला.

आगीची बातमी ऐकून छत्रपती शाहू महाराजही आपल्या खडखड्याचे घोडे दौडवत आले. तर कोल्हापूरचे श्रीमंत सरदार नेसरीकर यानी या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी भांडवल पुरवण्याचे कबूल केले. हे दु:ख विसरुन बाबुरावानी पन्हाळा किल्ल्यांवर बाह्यचित्रण सुरु केले. पन्हाळ्याच्या तीन दरवाज्यापाशी पाऊणशे मंडळींचा मुक्काम होता.

चित्रपटात काम करणाऱ्या स्त्रिया पहाटे उठून नास्ता-जेवण करीत तर चित्रपटातले नायक-खलनायक पाणी भरण्याचे तसेच प्रसंगी जेवण वाढप्याचे सुध्दा काम करीत. शुटींग दरम्यानच्या काळात एकदा घोड्याला टाच मारताना घोडे बेफाम झाले आणि बाबुराव घोड्यावरुन खाली पडले. तानाजी कोंढाण्याचा डोणगिरी कडा चढतो आहे अश्या प्रसंगासाठी आजूबाजूच्या गावात सनदी पाठवून पिळदार दोनशे मावळ्यांना हजर राहण्यास सांगितले. 

पहिल्यांदाच दिव्यांशिवाय झालं रात्रीचं शुटिंग

मोहिमेवर निघताना एक वृध्द बाई तानाजीला आशीर्वाद देते असा प्रसंग या सिनेमात आहे.  हा प्रसंग हुबेहुब दिसावा यासाठी कुशिरे गावातील एका स्त्रीची निवड केली होती. हातघाईच्या लढाईत तानाजी, सूर्याजी एकत्र दिसावेत यासाठी विशिष्ट् तंत्र वापरुन दिवाळीला लावण्यात येणाऱ्या चंद्राज्योतीच्या दारुचा उपयोग केला तसेच प्रथमच मस्किंगची पध्दत अमलात आणली. 

‘सिंहगड’ मधील शेवटचं लढाईचं दृश्य रात्रीच्या वेळी चित्रित करायचं होतं. तानाजी आणि शेलारमामा घोरपडीच्या आधाराने सिंहगडावर निवडक मावळ्यांसह चढून जातात. किल्ल्याचा दरवाजा उघडून मराठा सैन्याला आत घेताना रात्रीच्या गडद अंधारात लढाईची एकच धुमचक्री चालू होते. मशालीच्या उजेडात ही दृश्ये चित्रीत होऊ शकत नव्हती. 

शेवटी बाबुराव पेंटरानी एक युक्ती शोधून काढली, दिवाळीला चंद्रज्योत हा दारुकामाचा एक प्रकार पेटवण्यात येतो, या चंद्राज्योतीचा खुप लख्ख पांढरा प्रकाश पडतो. या चंद्रज्योतीतील दारु दृश्यांच्या आवश्यकतेप्रमाणे एका लांब रांगेत रांगोळी प्रमाणे ठेवून, ती मशालीने पेटवून त्या उजेडात लढाईची दृश्ये चित्रीत केली जात. 

चंद्रज्योतीचा बराचसा धुर वाऱ्याने वाहून जात असे आणि थोडाफार धूर दृश्यावर आला तरी तो मशालीचा धूर आहे असे वाटत असे. रात्रीच्या दृश्यांचे चित्रण विजेच्या दिव्याशिवाय आपल्या देशात पहिल्यांदा हे असं पार पडलं.  या सगळ्या भव्यदिव्य आणि अनोख्या गोष्टींमुळे पूर्वीच्या सर्व मुकपटापेक्षा ‘सिंहगड’ जास्त लोकप्रिय आणि बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. 

सर्वाधिक लाँग रन आणि लंडनचं कौतुक

चित्रपट पूर्ण झाल्यानंतर तो पाहण्यासाठी श्रीमंत नेसरीकर, श्रीमंत बापुसाहेब इंगळे, श्रीमंत कागलकर अशी राजघराण्यातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. तेव्हाच्या मुंबईतील नॉव्हेल्टी नाट्यगृहात बाबुरावानी स्वत: रेखाटलेली छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर तानाजी, उदयभानू, मावळे यांची भव्य पोस्टर्स लावली. 

गेटवर काही लाकडी ऐतिहासिक प्रसंग उभे केले. त्यामूळे ती पाहाण्यास लोकांची एकच गर्दी उसळली. मुंबईला नॉव्हेल्टी सिनेमागृहात हा चित्रपट सलग सोळा आठवडे चालला होता, तो पडद्यावर आला तेव्हा पावसाचे दिवस होते. भर पावसात या चित्रपटानं सोळा आठवड्याचा रन मिळवला होता हे या चित्रपटाच सर्वात मोठं यश होतं.

आपल्या देशात चित्रपटांची सुरुवात झाल्यावर इतका लॉंग रन मिळवणारा हा पहिलाच चित्रपट. संपूर्ण मुंबईचे वातावरण शिवकालीन झाले होते. त्यावेळी नुकतीच हिंदू-मुस्लिम दंगल शमली होती. त्या पार्श्वभूमीवर प्रख्यात मॅजेस्टिक टॉकिजने हा चित्रपट नाकारला होता. प्रचंड गर्दी पाहून पहिल्या खेळाला पोलिसांना पाचारण केले होते.

अखेर चित्रपट सुरु झाला, टायटल्स सुरु होत पडद्यांवर तानाजी आणि शिवाजी महाराजांचे दर्शन झाले, प्रेक्षकानी टाळ्या वाजवून हर हर महादेवसह दोघांच्या नावाच्या उस्फूर्त आरोळ्या सुरु झाल्या. उदयभानूच्या वाराने जेव्हा तानाजी कोसळतो तेव्हा प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आले. पुढे काही वर्षांनी लंडन येथे जागतिक प्रदर्शनात ‘सिंहगड’ हा चित्रपट दाखवला गेला, त्यावेळी परीक्षकांनी दिलेल्या प्रशस्तीपत्रावर पुढील वाक्य आहे- “This picture is an out standing example of sincerity of direction. 

प्रभातच्या चित्रपती व्ही शांताराम यांचा ‘सिंहगड ‘(१९३३)

१९३३ मधे इंग्रजांविरुद्ध वातावरण पेटलेलं होतं. त्यामुळे स्वातंत्र्याचा मंत्र देणारा ऐत्याहासिक ‘सिंहगड’ हा बोलपट काढण्याचे प्रभात फिल्म कंपनीने ठरवले. १९२२ च्या बाबुराव पेंटरांच्या चित्रपटात व्ही. शांताराम यांनी शेलारमामांची भूमिका केली होती. पण यावेळी त्यांनी स्वतःला पूर्णपणे पडद्याआड ठेवले. 

या नव्या सिनेमात शंकराराव भोसले यांनी या चित्रपटात तानाजी मालुसरे यांची भूमिका तर कमलकुमारी (लीला चंद्रगिरी), देवलदेवीची (प्रभावती), छत्रपती शिवाजी महाराज (गणपत शिंदे) उदयभानू ( बाबुराव पेंढारकर ), बुवासाहेब (घेरेसरनाईक) मा. विनायक (जगतसिंह) केशवराव धायबर (शेलारमामा) यांनी भूमिका अविस्मरणीय केल्या. 

या चित्रपटाचे दिग्दर्शन करताना शांताराम यांनी नेहमीच्या रुळलेल्या चाकोरीतून न जाता काहीतरी वेगळ्या पद्धतीने अनेक दृश्य चित्रित केली. रात्रीच्या लढाईचा प्रसंग चित्रित करताना त्यांनी अंधारात दोन्ही पक्षांचे तुंबळ युद्ध चालू असताना तोफा डागायचे ठरवले. तोफातून एका पाठोपाठ एक याप्रकारे गोळे बाहेर पडत असताना दारूचा जो प्रकाश पडेल, त्या प्रकाशात युद्धाचा प्रकाश आणि काळोख असा फार गमतीचा खेळ पडद्यावर दिसत होता. ही दृश्ये या चित्रपटाची प्रमुख आकर्षण ठरली. 

पोवाड्यातून दिला इंग्रजांना अप्रत्यक्ष इशारा

पोवाडा हा संगीतप्रकार या चित्रपटातून प्रथमच पडद्यावर आला. इंग्रजांच्या राजवटीविरुद्ध स्वातंत्र्याचा लढा जोरात सुरु होता. त्याचवेळी या चित्रपटातून लहरी हैदर यांनी रचलेला पोवाडा ‘चल उठ गड्या, चल वीर गड्या, घेऊन भाला, ढाल गड्या, शूर शिपाई शिवाजीचा तू, मर्द मराठा मावळचा’ या वीरश्रीयुक्त पोवाड्याने जनक्षोभ अधिक उसळत असे. 

गोविंदराव टेबे यांनी अत्यंत जोशपूर्ण संवाद लिहून अभिनय आणि संगीताप्रमाणे चित्रपटासाठी लेखणीचं  कसब सिद्ध केलं. जुन्या जमान्यातील हा चित्रपट, त्यावेळी विजेच्या दिव्यावर किंवा बंदिस्त साउंड प्रूफ स्टुडिओत चित्रीकरण होत नसे. चित्रपट म्हणावा तेव्हढा गतिमान झाला नव्हता तरीही त्याकाळी ‘सिंहगड’ प्रचंड गाजला आणि त्यातुन प्रभातच्या चालकांना पुढचे रंगीत चित्रपट निर्माण करण्याची उमेद मिळाली.

ज्येष्ठ दिग्दर्शक राम गबाले यांचा ‘ नरवीर तानाजी’ (१९५२)

मुंबईच्या कोहिनूर टॉकीजचे मालक श्री. कान्हेरे यांनी एक ऐतिहासिक चित्रपट करायचे ठरवले. साहजिकच शिवरायांचा पराक्रमी शिलेदार नरवीर तानाजी मालुसरे हा विषय त्यांनी निवडून बाबुराव पैलवान (तानाजी मालुसरे), मा. विठ्ठल (छत्रपती शिवाजी महाराज ), दुर्गाबाई खोटे (जिजामाता), रायबा (मदनमोहन ) शेलारमामा (केशवराव धायबर ) यांच्याबरोबर नायिका सुलोचना, वसंतराव पैलवान असा कलाकारांचा संच निवडला. 

बाबुरावांचे व्यक्तिमत्व रांगडे होते. त्यांची पैलवानी देहयष्टी तानाजीच्या भूमिकेला शोभून दिसणारी होती. पण मराठी संवाद बोलण्याची त्यांची बोंब होती. या चित्रपटातील त्यांचे सारे संवाद प्रख्यात गीतकार ग दि माडगूळकर यांच्या आवाजात डब केले गेले. दिग्दर्शक म्हणून राम गबाले यांनी ऐतिहासिक चित्रपट केला नव्हता. यात लढाया,  कुस्त्या, वाघाशी झुंज,  दांडपट्ट्याने हत्तीची सोंड छाटणे असे प्रसंग चित्रित करायचे होते. 

लढाईसाठी आणलेला हत्ती पिसाळला

भगवानदादा यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रीकरणाला सुरुवात झाली. हत्तीची सोंड कापण्याच्या प्रसंगासाठी हत्ती पाहिजे होता, ग दि माडगूळकर यांच्या ओळखीने औंध संस्थानाचा हत्ती मिळाला. हत्ती व्ही.आय.पी असल्याने त्याचं खाणं -पिणं, राहाणे आणि माहुताची बडदास्त ठेवली गेली होती. स्टुडिओमध्येच उदयभानूच्या वाड्याचा मोठा सेट उभारला होता. 

रात्रीचा सीन होता. लढाई चालू असताना तानाजी दांडपट्टा चालवीत सपासप शत्रूसैन्य कापत हटवत येतो. लढाई अगदी निकारावर आल्यावर उदयभानु हत्तीवर स्वार होऊन तानाजीच्या दिशेने अंगावर येत असताना तानाजी हत्तीची सोंड हातात धरून कापतो, खरे तर तो प्रसंग अवघड होता. त्या काळात आतासारखी स्पेशल इफेक्टची सोय नव्हती. त्यामुळे ट्रकच्या टायरची ट्यूब कापून सोंडेसारखी हत्तीच्या सोंडेला दुमडून बांधली होती. 

सर्व तयारी झाली. माहूत त्याच्या भाषेत हत्तीला चुचकारत होता. हत्तीनं पळत येणं आणि तानाजीने सुरक्षित अंतरापर्यंत दांडपट्टा फिरवीत जाणे एव्हढाच शॉट हवा होता. सर्व तयारी झाली, तानाजी ठरलेल्या अंतरापर्यंत आला आणि हत्तीने एकदम रागावून ‘ हे काय बांधलय’ या भावनेने पक्की बांधलेली इनर ट्यूब रागाने उडवून टाकली आणि नासधूस करू लागला. 

वाघाशी लढाईही अंगाशी आली

दुसरा प्रसंग तानाजी जंगलात वाघाशी सामना करतो असा सीन होता. त्यासाठी शिकाऊ वाघ कुठे मिळेल तिथे जायचं ठरलं. पंढरपूरच्या सर्कशीत असा वाघ आहे असे समजल्यानंतर चित्रपटाचा चमू तिकडे गेला. एका बंदिस्त धर्मशाळेत झाडांच्या फांद्या, मोठमोठे दगड लावून जंगलाचा देखावा उभा करून सेट उभारला. 

वाघाच्या रिंगमास्टरला तानाजी सारखे केस, भरदार मिश्या, कपडे, डोक्यावर मराठेशाही पगडी, वैगरे वेशभूषा करून तयार ठेवला. वाघाचे स्वतंत्र आणि एकत्र शॉट्स घ्यायची योजना पक्की केली. कॅमेराच्या लेन्सपुरती मोकळी जागा ठेऊन डुप्लिकेट तानाजी आत सोडला. वाघाने रिंगमास्टरला आवाजावरून ओळखले परंतु आपला हा रोजचा भिडू आज हे काय करून आलाय म्हणून वाघाने डरकाळी फोडत त्याची पगडी आणि केसांचा विग उडवून दिला. 

पुढे मात्र बाबुराव पेहेलवानांच्या सोबत हवे तसे शॉट्स चित्रित झाले. चित्रीकरण संपल्यानंतर सर्कशीच्या चमूला एक ग्रुप फोटो काढायचा होता, वाघ मध्ये आणि त्याच्या बाजूला तो रिंगमास्टर उभा राहिला. नेहमी फोटोमध्ये मध्यभागी महत्वाच्या जागी उभे राहणारे मान्यवर यावेळी मात्र फोटोत दूर दूर उभे राहिले. हा चित्रपट सुद्धा भरपूर चालला.

अजय देवगण-ओम राऊत यांचा ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ (२०२०)

‘हर मराठा पागल है शिवाजी महाराज का और भगवे का’ अशा दमदार डायलॉगसह ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ हा हिंदी बहुचरर्चित चित्रपट संपूर्ण देशभर प्रदर्शित करण्यात आला. लढवय्या तानाजींची ही वीरगाथा आधुनिक तंत्रज्ञान वापरुन बनवली होती. अंगावर शहारे आणणारी दृश्ये चित्रपटात साकारण्यात आली.

तानाजींचे जीवन आणि त्यांनी मुघलांवर मिळवलेला विजय थ्रीडी प्रसंगांतून ७० एमएम पडद्यावर जिवंत करण्याचा प्रयत्न केला होता. अभिनेत्री काजोलने तानाजीच्या पत्नीची सावित्रीबाई यांची भूमिका साकारताना कपाळी ठसठशीत कुंकू, नाकात नथ, डोक्यावर पदर आणि करारी नजर अशा तिच्या मराठमोळ्या लुकचं तुफान कौतुक झाले होते. 

अभिनेता शरद केळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली तर कोंढाण्याचा अधिकारी असणाऱ्या उदयभानू राठोडची भूमिका सैफ अली खान याने केली.  १५० कोटी रुपयांचा बजेट असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊतने केले होते. 

सिनेमाविषयी बोलताना अजय देवगन म्हणाले होते की, भारताच्या इतिहासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या तानाजीसारख्या शूरवीराची कहाणी सादर करताना मला अतिशय आनंद वाटतोय. मला ही कथा देशाच्या नव्हे तर जगाच्या काना-कोपऱ्यापर्यंत पोहोचलेली पहायचीय.” पुढं तसंच घडलं. देशभरात सर्वभाषिकांनी या चित्रपटाचं तुफान स्वागत केलं. त्यामुळे या चित्रपटानं ३०० करोडहून अधिक कमाई केली होती.

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा ‘सुभेदार’  (२०२३)

लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील पाचवा सिनेमा असलेला ‘सुभेदार’ चित्रपट २५ ऑगस्ट २०२३ ला चित्रपटगृहांत झळकला. या सिनेमानं गेल्या पाच दिवसांत जवळपास ६.४८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. मोजके शोज आणि बॉलिवूड चित्रपटांकडून तगडी टक्कर असतानाही ‘सुभेदार’ने केलेली कमाई कौतुकास्पद आहे.

यासंदर्भात लांजेकर यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितले, तानाजी मालुसरे यांच्या कथेशिवाय शिवचरित्र पूर्ण होऊच शकत नाही. पण तानाजी म्हणजे केवळ सिंहगडावरची लढाई नव्हे, तर ते छत्रपतींच्या स्वराज्याची पायाभरणी करणारे आघाडीचे शिलेदार होते. कोंढाणा जिंकण्याची घटना ही सर्वांत मोठी असली तरी त्यामागे असलेलं त्यांचं युद्धकौशल्य, शत्रूला पाहिलं नसतानाही त्याच्या सैन्याबद्दलचा अभ्यास यांसारख्या बारिकसारिक गोष्टींवर या चित्रपटात प्रकाश टाकला आहे. 

इतिहास मांडताना तो भव्यदिव्य तर दाखवायचा प्रेक्षकांच्या काळजालाही भिडवायचा होता. त्यादृष्टीने कथा, सादरीकरण, ऐतिहासिक संदर्भ, त्याकाळातील भाषा, शस्त्रास्त्रे, वेशभुषेपासून अगदी अजय पुरकर यांचा अभिनयापर्यंत,  मावळ प्रांतातील भाषा याचा वापर केलाय. 

प्रशासक तानाजी, सुभेदार तानाजी

योद्धा असण्याबरोबरच तानाजीराव प्रशासकीय कामातही खूप हुशार होते. कोकणात जाणाऱ्या अनेक रस्त्यांचे काम त्यांच्या देखरेखीखाली पूर्ण झालंय. सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकामात सुद्धा त्यांचा काही अंशी सहभाग होता. प्रशासक म्हणून ते महाराजांच्या आणि जिजाऊसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली कसे तयार झाले, त्यांनी स्वराज्यासाठी कसे काम केले हे दाखवण्याचा प्रयत्न ‘सुभेदार’मधून करण्यात आला आहे.

चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत, मृणाल कुलकर्णी जिजाऊसाहेब, स्वतः दिग्पाल बहिर्जी नाईक असे कलाकार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अजय पूरकर तानाजी मालुसरे शोभले आहेत. केवळ नजरेने एखाद्याला गारद करण्याची ताकद तानाजींमधे होती. या सगळ्या पात्रनिवडीतून इतिहास जिवंत करण्याचा प्रयत्न केला गेलाय.

या चित्रपटाचे नाव ‘सुभेदार’ असे ठेवण्यामागे खास कारण आहे. ते म्हणजे, ‘सुभेदार’ म्हणून ‘प्रशासकीय’ आणि ‘सैन्य’ अशी दुहेरी जबाबदारी तानाजी मालुसरे यांनी सांभाळली होती. अशा दोन्ही प्रकारचे किंवा विभागांचे ‘सुभेदार’ एकच व्यक्ती असणे हे इतिहासातील एकमेव उदाहरण आहे.’  तुम्ही नेहमी जसा बायोपिक पाहता तसा सुभेदार चित्रपट नाही. 

हे पाचही सिनेमा पाहिले, तरी एक गोष्ट सतत मनाला जाणवत राहते. हे शेवटी सिनेमे आहेत. तानाजी मालुसरे ही एक व्यक्ती नव्हती. तो एक जिवंत इतिहास होता. या इतिहासाकडे प्रत्येकजण आपपल्या चष्म्यातून पाहणार आहे. त्यामुळे तो प्रत्येकाला वेगळा दिसणार आहे. हा इतिहास जमेल तेवढा समजून घेऊनच, हे सिनेमे पाहायला हवेत. म्हणजे इतिहास आणि सिनेमा यातील गल्लत टाळता येईल.

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
संपूर्ण लेख

पर्यंटकांच्या गर्दीला युरोप नाही म्हणतंय, भारताचं काय?

कधी कधी स्वत:वर, तर कधी परिस्थितीवर रडावसं वाटतं. ज्या ठिकाणी आपण आनंद घेण्यासाठी जातो त्या सर्व ठिकाणांची आजची…
संपूर्ण लेख

शाहरुखचा ‘जवान’ हिट का झाला?

२०१७ मधे शाहरुखचा ‘रईस’ रिलीज झाला. एक चांगला ऍक्शन सिनेमा असूनही पायरसीचा फटका बसल्याने ‘रईस’ला म्हणावा तसा नफा…
संपूर्ण लेख

भारतांनं चंद्रमोहिमेतून नक्की काय साधलं?

भारताचं चांद्रयान-३ ठरलेल्या दिवशी, नियोजित वेळी आणि निश्चित केलेल्या जागी चंद्राच्या भूमीवर उतरलं आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं…
संपूर्ण लेख

आशा भोसले : फक्त ९० वर्षांचा हिरवागार स्वरऋतू!

कल्पना करा, तुम्ही कोणत्या तरी कारणानं अत्यंत अस्वस्थ आहात, बैचेन आहात. मन लागत नाही आणि तितक्यात एक गाणं…
संपूर्ण लेख

‘एआय’मुळे फेक कंटेंटवाल्यांचा बाजार जोरात!

जगभरातील माणसं काय विचार करतात हे त्यांना काय माहिती मिळते, त्यावर ठरतं. ते जो विचार करतात तशी खरेदी…
संपूर्ण लेख

गांधीजींच्या शेवटच्या माणसाचा शोध घेणारी दोन पुस्तकं!

१९४० च्या दशकात महात्मा गांधी यांनी वैयक्तिक सत्याग्रह मोहिमेसाठी विनोबा भावे यांची पहिला लढवय्या म्हणून निवड केली. दुसरे…