टोकियो ऑलिम्पिकमधे भारतीय टीम १२६ खेळाडूंसह सहभागी होतेय. कधी काळी ऑलिम्पिकमधे हॉकी आणि कुस्ती यावर भारतीयांचं प्रभुत्व होतं. मात्र अलीकडच्या काळात जागतिक स्तरावर भारतीय खेळाडूंनी बॅडमिंटन, नेमबाजी, भालाफेक, तिरंदाजी, बॉक्सिंग या क्रीडा प्रकारांमधे लक्षणीय यश मिळवलंय. त्यामुळेच भारताच्या पदकांची संख्या वाढेल अशी अपेक्षा आहे.
गेल्यावर्षी लांबणीवर टाकण्यात आलेली टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा जपानमधे येत्या २३ जुलैपासून होतेय. कोरोना संकटामुळे जगातले सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. याचा फटका क्रीडा जगतालाही चांगलाच बसला. जगातला सर्वात मोठा क्रीडा महोत्सव अशी ओळख असलेली ऑलिम्पिक स्पर्धाही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलीय.
हळूहळू लोक न्यू नॉर्मलला जगू शकत लागलेत. क्रीडा विश्वही बायो बबलचा प्रयोग करून आपलं क्षेत्र खुलं करण्याचा प्रयत्न करत होतं. यूएईमधे झालेली आयपीएल स्पर्धा कोरोना काळातही यशस्वीरीत्या आयोजित करता येऊ शकते याचं उदाहरण बनली. आता अशाच मोठ्या बायो बबलमधे जगातला सर्वात मोठा क्रीडा महोत्सव टोकियो ऑलिम्पिक जपानमधे होतोय.
सर्व जगाबरोबरच भारत टोकियो ऑलिंम्पिकसाठी सज्ज झालाय. यंदाचं ऑलिम्पिक भारतीय टीमसाठी, देशवासीयांसाठी एक आशेचं किरण घेऊन आलंय. या ऑलिम्पिकमधे भारताला अनेक क्रीडा प्रकारांत सुवर्णपदकांची आशा आहे.
भारत आता हॉकी आणि कुस्ती या आपल्या पारंपरिक खेळ प्रकारांबरोबरच बॅडमिंटन, नेमबाजी, भालाफेक, बॉक्सिंग या क्रीडाप्रकारातही प्रावीण्य मिळवत आहे. या क्रीडा प्रकारात आपण जागतिक स्तरावर अव्वल दर्जाचा खेळ करत आहोत.
टोकियो ऑलिम्पिकमधे भारताच्या टीममधे १२६ खेळाडूंचा समावेश आहे. ऑलिम्पिकमधे इतका मोठा चमू घेऊन जाण्याची ही भारताची पहिलीच वेळ आहे. या ऑलिम्पिकमधे १८ खेळातल्या ६९ क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडू भाग घेणार आहेत. त्यामुळेच भारताच्या पदकांची संख्या वाढवण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: फूटबॉलपटूच्या किकने बदलला मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोन
भारताचा कुस्ती हा आवडता खेळ आहे. प्रत्येक ऑलिम्पिकमधे कुस्तीत भारताला पदकाची आशा असतेच. गेल्या रिओ ऑलिम्पिकमधे भारताच्या साक्षी मलिकने कांस्य पदक जिंकलं होतं. ती कुस्तीत भारताकडून ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली महिला ठरली होती. पण टोकियो ऑलिम्पिकमधे ती सहभागी होणार नाही.
साक्षी मलिकचा वारसा चालवण्याची जबाबदारी विनिश फोगाटवर आहे. याचबरोबर अंशू मलिक आणि सीमा बिसला यांच्याही कामगिरीकडे कुस्ती चाहत्यांचं लक्ष असणार आहे. पुरुषांच्या गटात बजरंग पुनिया, दीपक पुनिया आणि रवीकुमार दहिया हे पदकासाठी दावेदार असतील. या सर्वांनी जागतिक कुस्ती स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनमधे भारताचे चार खेळाडू पात्र ठरले आहेत. यात स्टार महिला बॅडमिंटनपटू पीवी सिंधू, बी साई प्रणीथ, सात्विकसाईराज रांकीरेड्डी, चिराग शेट्टी यांचा समावेश आहे. यातले सिंधू आणि प्रणीथ हे दोघे महिला आणि पुरुष एकेरीमधे पदकाचे दावेदार आहेत.
सिंधूने गेल्या ऑलिम्पिमधे रौप्य पदक जिंकलं होतं. यंदा तिचा डोळा सुवर्ण पदकावर असणार आहे. गेल्या काही स्पर्धांमधला तिचा फॉर्म पाहता ती सुवर्ण पदकाची दावेदार नक्की ठरू शकते. तिच्या जोडीला असलेल्या प्रणीथलाही एकेरीत चांगलं यश मिळण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा: कुणाच्या खिजगणतीतही नसणाऱ्या बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला कसं हरवलं?
क्रिकेट सोडून भारत सध्या कोणत्या क्रीडा प्रकारात सातत्याने चांगली कामगिरी करत असेल तर ते नेमबाजीत. टोकियो ऑलिम्पिकमधे तब्बल १५ नेमबाज देशाचं प्रतिनिधित्व करत आहेत. यात मनू भाकर, सौरभ चौधरी आणि राही सरनोबत यांसारख्या युवा नेमबाजांचा समावेश आहे.
अभिनव बिंद्राने २००८ ला बीजिंग ऑलिम्पिकमधे भारताला पहिलं वहिलं वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकून दिलं होतं. आता हाच वारसा या युवा नेमबाजांना पुढे न्यायचा आहे. तेजस्विनी सावंतसारख्या अनुभवी नेमबाजाकडूनही यंदा पदकाच्या अपेक्षा आहेत. नेमबाजीच्या जीवावरच आपण यंदा इतिहासातली सर्वात चांगली कामगिरी करू, असा विश्वास जाणकारांना वाटतोय.
अॅथलेटिक्समधे भारताची ऑलिम्पिकमधली कामगिरी फारशी चांगली नाही. पण नीरज चोप्राकडून भारताला मोठ्या आशा आहेत. त्याने २०१८ च्या आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णवेध घेतला होता. त्यामुळे त्याने टोकियो ऑलिम्पिकमधे पदकाची आशा निर्माण केली आहे. त्याच्या जोडीला शिवपाल सिंहही असणार आहे.
एकेकाळी ऑलिम्पिक हॉकी म्हटलं की भारताचं सुवर्णपदक निश्चित असायचं. पण काळ बदलला, खेळ बदलला आणि भारत त्याच्याच राष्ट्रीय खेळात मागे पडत गेला. पण, यंदाची हॉकी टीम मजबूत दावेदारी करेल असं जाणकार म्हणतायत. त्यामुळे हॉकीतलं बहुप्रतीक्षित नववं सुवर्ण टोकियो ऑलिम्पिकमधून येणार का याची उत्सुकता लागून राहिलीय.
भारताची पुरुष हॉकी टीम ऑलिम्पिक खेळण्याची ही २० वी वेळ आहे. तर महिला टीम ऑलिम्पिकमधे तिसर्यांदा भाग घेत आहेत. त्यांच्याकडूनही पदकाच्या अपेक्षा आहेत. पुरुष टीमचं मनप्रीत सिंह नेतृत्व करत आहे. तर महिला टीमचं नेतृत्व राणी रामपाल हिच्याकडे आहे.
हेही वाचा: वर्ल्डकपमधे तगड्या टीमला, लहान टीमने हरवण्याचा रेकॉर्ड भारताच्या नावावर
ऑलिम्पिकमधे भारत तिरंदाजीतही पदक मिळवू शकतो. आतापर्यंत तिरंदाजीत भारताला अजून पदक जिंकता आलेलं नाही. यंदाच्या ऑलिम्पिकमधे चार तिरंदाज पात्र ठरलेत. यात ३ पुरुष आणि एका महिला खेळाडूचा समावेश आहे. यात तरुणदीप राय, अतनू दास, प्रवीण जाधव या पुरुष तिरंदाजांचा समावेश आहे.
यातला तरुणदीप राय हा ३७ वर्षाचा तिरंदाज सर्वात अनुभवी असून त्याने २००४ आणि २०१२ च्या ऑलिम्पिक स्पर्धेतही सहभाग नोंदवला होता. त्याने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दोन रौप्य पदकं पटकावलीत. अतनू दासची भारतातल्या सर्वात अव्वल दर्जाच्या तिरंदाजांमधे गणना होते. त्याने २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमधेही भाग घेतला होता.
महिलांमधे दीपिका कुमारी ही एकटीच भारताची दावेदारी सादर करणार आहे. दीपिका कुमारी सध्या जागतिक तिरंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. तिचं हे तिसरं ऑलिम्पिक आहे. यापूर्वी तिने २०१२ आणि २०१६ च्या ऑलिम्पिकमधे सहभाग घेतला होता.
ऑलिम्पिकमधे भारताचे नऊ बॉक्सर सहभागी होतील. यात पाच पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे. पण सर्वांच्या नजरा या बॉक्सिंग क्वीन मेरी कोमवर असणार आहेत. २०१२ च्या ऑलिम्पिकमधे तिने कांस्य पदक जिंकलं होतं. आता तिच्याकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे. पुरुषांमधे विकास कृष्णन, अमित पांघल यांच्याकडून पदकाची अपेक्षा ठेवली जातेय.
या सर्व क्रीडा प्रकारात भारत पदकाची अपेक्षा करत आहे. पण, टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणार्या भारताच्या १२६ खेळाडूंचं एकच उद्दिष्ट असणार आहे, ते म्हणजे आपली सर्वोत्तम कामगिरी करणं आणि भारतासाठी पदक जिंकून आणणं. यंदा ऑलिम्पिकमधे भारताची टीम मोठी आहे. त्यामुळे पदकांची संख्याही वाढणार अशी आशा करायला हरकत नाही.
भारताने आतापर्यंत ९ सुवर्ण, ७ रौप्य आणि १२ कांस्य पदकं जिंकली आहेत. भारताची एकूण संख्या ही २८ आहे. यंदा भारत एकूण सुवर्ण पदकांचा आकडा दुहेरीत नेण्याचा आटोकाट प्रयत्न नक्की करेल.
हेही वाचा:
सचिन बाद झाल्यानंतर, युवराजने टीवी सुरु ठेवला
(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)