मनोज वाजपेयी: भूमिकेचं सोनं करणारा कलाकार

२३ एप्रिल २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


आज अभिनेता मनोज वाजपेयीचा वाढदिवस. ‘सत्या’ सिनेमा नंतर मनोज सर्वात जास्त कशात आवडला असेल तर तो २०१२ला आलेल्या ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ मधे. अनुरागच्या या फिल्ममधे तो टक्कल करून ‘सरदार खान’ बनून आला. या फिल्मने एक नवा माईलस्टोन सेट करत सबकी कह के ली.

'जर ‘सत्या’मधला मनोजचा परफॉर्मन्स हिट झाला नसता, तर मी आणि इरफान खान सारखे कैक अभिनेते अजूनही ह्या इंडस्ट्रीत उपेक्षितच राहिलो असतो.'

- के के मेनन.

बिहारमधल्या बेलवा गावात राधाकांत वाजपेयी या ब्राम्हण शेतकऱ्याच्या घरात दुसरं अपत्य जन्माला आलं. फिल्मस्टार मनोजकुमारच्या नावावरून या पुत्ररत्नाचं नावही मनोजच ठेवलं गेलं. शेतकऱ्याचा पोर असल्यानं त्याच्या लहानपणीच्या बऱ्याच सुट्ट्या शेती करत करत गेल्या. बारावीपर्यंतचं शिक्षण बिहारमधे पूर्ण केल्यावर मनोज दिल्लीला आला. ओम पुरी, नसरुद्दिन शाहसारख्यांकडून त्याला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा म्हणजेच एनएसडीबद्दल कळालं.

स्टार मनोज वाजपेयी

लहानपणापासूनच अभिनयाचा किडा त्याच्या मेंदूत वळवळ करत असल्यानं त्यानं तिथं अॅप्लाय केलं पण तिन्ही वेळेला सपशेल अपयशी ठरला. त्यामुळे तो अधिकच खचला. आत्महत्येचे विचार मनात येऊ लागले. 'चाचा चौधरी'फेम रघुबीर यादव यांनी सुचवलेल्या बॅरी जॉनच्या कार्यशाळेत त्याने भाग घेतला. जॉन त्याच्यावर इतका खुश झाला की त्याला सहाय्यक शिक्षक बनवून टाकलं. त्यानंतर त्याने चौथ्यांदा एनएसडीला प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला आणि विद्यार्थी बनण्याऐवजी डायरेक्ट शिक्षक म्हणूनच रुजू झाला.

रुपेरी पडद्यावर गोविंद निहलानींच्या ‘द्रोहकाल’मधे आनंदच्या भूमिकेत मिनिटभरासाठी तो झळकला. त्यानंतर त्याला शेखर कपूरच्या ‘बँडीट क्वीन’मधे डाकू मान सिंगचा रोल मिळाला. दरम्यान टीवीवर त्याच्यातल्या ‘कलाकार’चं ‘इम्तिहान’ चालूच होतं. पुढल्याच वर्षी त्याला महेश भट्टच्या ‘स्वाभिमान’मधे काम करायची संधी मिळाली.

कमी मानधन असलेल्या या मालिकेत मनोजबरोबर आशुतोष राणा आणि रोहित रॉयसुद्धा होते. त्यानंतर मनोज ‘दस्तक’ आणि ‘तमन्ना’मधे दिसला. त्याचवर्षी राम गोपाल वर्माच्या ‘दौड’मधेही तो झळकला. दौड करत असतानाच रामूला मनोजच्या खऱ्या टॅलेंटची जाणीव झाली आणि इतक्या गुणी कलाकाराला वाया घालवल्याचं वाईटही वाटलं. त्या पापाचं परिमार्जन रामूने त्याच्या पुढच्या फिल्ममधे केलं आणि मनोजला रातोरात स्टार बनवलं.

हेही वाचा: सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट?

पॉझिटिव, निगेटिव भूमिका

‘सत्या’. मुंबईच्या अंडरवर्ल्डचं दर्शन घडवणारी अनोखी फिल्म. यात मनोज बनला भिकू म्हात्रे. बाहेर आख्ख्या मुंबईचा बादशहा पण घरी बायकोचा मार खाणारा नवरा. मुंबईच्या झोपडपट्टीत शूट झालेला ‘सत्या’ त्यावर्षीच्या आयएफएफआयलाही मोठ्या दिमाखात झळकला. त्याबदल्यात मनोजच्या शिरपेचात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा नॅशनल फिल्म अॅवॉर्ड आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर क्रिटीक अॅवॉर्ड हे दोन मानाचे तुरे खोवले गेले.

आजही भारतीय सिनेसृष्टीतल्या काही खास सिनेमांमधे ‘सत्या’चं मानाचं स्थान आहे आणि विशेष मानकरी आहे मनोजचा ‘भिकू म्हात्रे’. ‘सत्या’नंतर अनुराग कश्यप, रामू आणि मनोज हे त्रिकुट पुन्हा एकदा ‘कौन’च्या निमित्ताने एकत्र आलं. फिल्म फ्लॉप होती पण मनोजचा बडबड्या समीर चांगला होता. त्यानंतर आलेल्या ‘शूल’मधे मनोजने एका प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली होती त्यात त्याची आणि रविनाची केमिस्ट्री लाजवाब.

या फिल्मसाठीही त्याला आणखी एक फिल्मफेअर क्रिटीक अॅवॉर्ड मिळाला. नंतर तब्बूसोबत केलेल्या ‘दिल पे मत ले यार’ आणि ‘घात’पाठोपाठ मनोज सिनियर बच्चनबरोबर राकेश मेहराच्या ‘अक्स’मधे राघवनच्या भूमिकेत झळकला आणि त्याच्या त्या निगेटिव भूमिकेसाठी त्याला पुन्हा एकदा फिल्मफेअर मिळाला. मनोजची ‘अक्स’मधली भूमिका मला ‘किक’साठी प्रेरणादायी असल्याचं नवाजुद्दिनने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

करिश्मा कपूर आणि रेखासोबत ‘झुबेदा’मधे झळकल्यानंतर मनोज ‘रोड’मधे सायको किलरच्या निगेटिव भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानंतर आलेली ‘पिंजर’ ही फिल्म फाळणीसारख्या संवेदनशील विषयाला हात घालणारी होती. मुख्य भूमिकेतला मनोजचा ‘रशीद’ कमाल जमलाय. २००५पर्यंत मनोज एलओसी कारगिल, जागो, हनन, इंतेकाम आणि वीर-झारा मधे झळकला. वीर-झारा वगळता नंतर आलेले बेवफा आणि फरेबही जास्त यश मिळवू शकले नाही.

टीकाकारांना करारा जवाब

२००६ला तो अल्लू अर्जुन - जेनेलियासोबत ‘हॅपी’मधे एका हलक्याफुलक्या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला. २००७चा १९७१, स्वामी, झहीर आणि दस कहानियाँ यथातथाच चालले. पुढेही २०१०पर्यंत मनी है तो हनी है, जुगाड, अॅसिड फॅक्टरी आणि ‘जेल’पर्यंत त्याच्या अपयशाची मालिका चालूच राहिली.

२०१० उजाडला आणि मनोजने ‘राजनीती’मधून पुन्हा एकदा दणदणीत करारा जवाब देऊन टीकाकारांची बोलती बंद केली. त्याचा वीरेंद्रप्रताप सिंग आणि ही फिल्म दोन्ही सुपरडुपर हिट ठरले. दरम्यान त्याचा मल्टीस्टारर तेलगु ‘वेदम’ आणि ‘पुली’ ही बऱ्यापैकी हिट झाला होता.

स्वतः शिवभक्त असलेल्या मनोजने त्याचवर्षी ‘रामायणा-द एपिक’मधे श्रीरामचंद्रांच्या भूमिकेसाठी आवाज दिला. २०११चा मल्टीस्टारर ‘आरक्षण’ वादाच्या भोवऱ्यात अडकून फ्लॉप गेला असला तरीही मनोजचा खलनायकी मिथिलेश भाव खाऊन गेला.

हेही वाचा: इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप

वेगळ्या धाटणीच्या भूमिका

‘सत्या’नंतर मनोज सर्वात जास्त कश्यात आवडला असेल तर तो २०१२ला आलेल्या ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ मधे. अनुरागच्या या फिल्ममधे तो टक्कल करून ‘सरदार खान’ बनून आला. या फिल्मने एक नवा माईलस्टोन सेट करत सबकी कह के ली. ‘चिट्टगाँग’ आणि ‘चक्रव्यूह’ फारसे चालले नाही पण मनोजच्या वेगळ्या अभिनयशैली पाहायला मिळाल्या.

नीरज पांडेच्या ‘स्पेशल २६’मधे मनोज सीबीआय ऑफिसर बनला. त्याची ‘शूटआउट अट वडाळा’मधली झुबेरची भूमिकाही अशीच विशेष आवडती. ‘सत्याग्रह’मधला बलराम सिंग ठीकठाकच होता पण सूर्याच्या तामिळ फिल्म ‘अंजान’मधला इम्रानभाई मात्र आवडला. त्यानंतरच्या त्याने गजेंदरसिंगची भूमिका केलेल्या ‘तेवर’नेही बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी गल्ला कमावला. ‘अलीगढ’मधला समलिंगी प्रोफेसर सिरस, ‘ट्रॅफिक’मधला हवालदार गोडबोले आणि ‘बुधिया सिंग’मधला बिरांची दास या तिन्ही वेगळ्या धाटणीच्या भूमिका.

२०१७ला आलेल्या ‘नाम शबाना’ आणि ‘सरकार ३’मधून मनोज पुन्हा लाईमलाईट मधे आला. त्याचा ‘ऐय्यारी’मधला कर्नल अभयसिंग, बाघी २ मधला अजय शेरगिल आणि सत्यमेव जयतेचा शिवांश राठोड त्याला प्रेक्षकांच्या नजरेत एकदम ‘ऑफिसर’ बनवून गेले. २०१९च्या ‘सोनचिरिया’मधला मान सिंग आणि ‘बँडीट क्वीन’ मधला त्याचा मान सिंग हे एक पूर्ण वर्तुळ पुरेसं होतं त्याला ‘पद्मश्री’ मिळवून द्यायला. ‘द फॅमिली मॅन’मधला श्रीकांत तिवारी हा भिकू म्हात्रे आणि सरदार खानइतकाच फेवरेट आहे.

अस्सल बिहारी अंदाज

'सात उचक्के' आणि 'सूरज पे मंगल भारी'मधल्या त्याच्या विनोदी भूमिकाही तितक्याच भारी झाल्यात, जितका 'भोसले'मधलं हवालदार गणपत भोसले! नुकताच त्याला 'भोसले'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालाय.

रियल लाईफमधे हिरोला नकोनकोश्या वाटणाऱ्या खलनायकी भूमिका करणारा मनोज रिअल लाईफमधे मात्र एक सुस्वभावी, मितभाषी आणि विनम्र हिरो आहे. त्याच्या अस्सल बिहारी अंदाजातल्या खेळकर स्वभावाने तो सेट जिवंत ठेवतो. याच बिहारच्या ‘लिट्टी चोखा’सारख्याच लोकप्रिय कलावंताचा आज वाढदिवस.

हेही वाचा: 

ऑस्करच्या आयचा घो!

ओटीटी प्लॅटफॉर्म थेटरचे बाप बनणार का?

सैरंध्री : पहिल्या मेड इन इंडिया सिनेमाची शंभरी

ओटीटीची मजल सुखवस्तू प्रेक्षकांपर्यंतच : नितीन वैद्य

हिंदूहृदयसम्राटांच्या भूमिकेत एक मुसलमान कसा स्वीकारला गेला?