येत्या २१ जानेवारी २०२३ला पहिलं मृदगंध साहित्य संमेलन घटनांदूरला होतंय. या संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक, पत्रकार आणि कार्यकर्ते अमर हबीब यांची निवड झालीय. यानिमित्ताने त्यांनी केलेलं भाषण इतर अध्यक्षीय भाषणासारखं नाही. आपलं अध्यक्षीय भाषण करताना अमर हबीब यांनी काही नव्या आणि गंभीर मुद्द्यांवर प्रकाश टाकलाय. त्या भाषणाचा संपादित अंश इथं देत आहोत.
भावांनो आणि बहिणींनो,
आज आपण घटनांदूर इथं जमलोय. शिक्षण पंढरी मानल्या गेलेल्या सोमेश्वर विद्यालयाच्या परिसरात आहोत. परिसरातून शेतकरी आणि त्यांची मुलं म्हणजे किसानपुत्रही आले आहेत.
ग्रामीण भागात शिक्षणाची परंपरा अलीकडची आहे. त्यातही साहित्य कला क्षेत्रात रमणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याएवढी आहे. पण या मुलांचं कौतुक करण्याची मोठी दानत आपल्यात आहे. त्यासाठी आपण इथं जमलोय. ही मुलं काय लिहितायत? आपल्या जीवनाशी त्याचा काही संबंध आहे का? हे पाहण्यासाठीही आपण जमलोय.
ही साहित्य जत्रा नाही. हे साहित्य संमेलन आहे. आपल्या परिसरातल्या प्रतिभांचा आपण आस्वाद घेत लेखाजोखाही करणार आहोत. काय चाललंय आपल्या अवतीभोवती? त्यात नवं काय आहे? नवं म्हणजे काल नव्हतं आणि आज आहे, असं काय काय आहे? त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतोय? याचा आपल्याला विचार करायचाय. कारण सामान्यपणे हाच साहित्याचा विषय असतो.
पूर्वी कधीतरी कुणी आत्महत्या केल्याची खबर यायची. आज मात्र त्याचं प्रमाण इतकं वाढलंय की, अशी बातमी शिवेच्या आत घडू शकते. उद्या कदाचित उंबऱ्याच्या आतही. अशी भीती वाटावी असं झालंय. ‘शेती हे ज्याचं मुख्य उत्पन्नाचं साधन आहे ते शेतकरी’ अशी शेतकरी या शब्दाची व्याख्या आहे. शेतकरी हवालदिल आहे. आस्मानी संकट आहेच. पण सुलतानी संकट त्याहून जास्त भयंकर आहे.
स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात शेतकरी सुखी झाला नाही. दु:ख वाढतच गेलं. आज अनेक जण जीव देतायत आणि जे जीव देत नाहीत ते मरण जगतायत. अनेकांना वाटतं की, हे गरिबीमुळे घडतंय. वास्तविकता तशी नाही. भारतीय शेतकऱ्यांची दुर्दशा गुलामीमुळे झालीय. शेतकऱ्यांचा प्रश्न गुलामीचा आहे, हे अजून बऱ्याच लोकाना कळलेलं नाही.
सरकारला तर अजिबात नाही. आपल्या देशातल्या सर्व समस्यांच्या तळाशी ‘शेतकऱ्यांची गुलामी’ हे कारण आहे. ही गुलामी पिढ्यान् पिढ्याची आहे. राजे बदलले की गुलामीचं स्वरूप बदलायचं. देशाच्या स्वातंत्र्यानंतरही गुलामी राहिली. फक्त स्वरूप बदललं. राजे, वतनदार घरात घुसून धान्य उचलून न्यायचे.
आता कायदे करून शेतकऱ्यांना गुलाम बनवलं जातं. सीलिंगचा कायदा, आवश्यक वस्तू कायदा आणि जमीन अधिग्रहण कायदा हे तीन कायदे आज शेतकऱ्यांचा गळफास बनलेत. हे कायदे रद्द व्हावे यासाठी धडपडणारा एक कार्यकर्ता तुम्ही या व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून आणून बसवलाय. त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार मानतो.
हेही वाचा: सरकारचा प्रस्ताव धुडकावणारे शेतकरी अंबानी, अदानीशी लढू शकतील?
शेतकऱ्यांची कोंडी झालीय. त्याला पदोपदी निखाऱ्यावर चालावं लागतं. अत्यल्प भूधारणा असणाऱ्या शेतकऱ्यांना कुटुंबाचा खर्च कसा भागवावा ही चिंता सतावते. अलीकडे दोन क्षेत्रांत खर्च वाढलेला दिसतो. एक आरोग्य आणि दुसरं शिक्षण. मध्यंतरी कोरोनाची साथ पसरली होती. कुटुंबात कुणी आजारी पडलं आणि त्याला दवाखान्यात नेलं की, कुटुंब कारभार्याचं कंबरडंच मोडतं.
हल्ली नवनवे आजार निघतायत आणि सामान्य माणसाला दवाखान्याचा खर्च पेलवण्याच्या पलीकडे गेलाय. गरिबांना आजारपणाची चैन परवडणारी नाही, हे बुजुर्गांचं म्हणणं पटू लागलंय. वैद्यकीय सुविधा निर्माण झाल्या आहेत. पण ते पेलण्याची कुवत शेतकऱ्यांमधे आलेली नाही. शेतीचं चाक रुतलं गेल्यामुळे शेतकरी देशोधडीला लागलाय.
शेती परवडत नाही. लेकरांच्या नशिबी हे जगणं येऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी पदरमोड करून मुलामुलींना शिकवायला सुरवात केली. पण आता शिक्षणाचा खर्चही पळण्याच्या पलीकडे गेलाय. मुलामुलींना शिकवणं भाग आहे. मोकळं सोडता येत नाही. प्राथमिक शिक्षणाचं थोडंफार भागतं. पण लेकरू आठवी-नववीला आलं की खर्च सुरु होतो. दहावी बारावीला तो वाढतो आणि पुढचं शिक्षण तर विचारूच नका.
मुलगा शिकून शहाणा होतो की नाही, हे पाहण्यापेक्षा त्याला मार्क किती पडतात, हे पाहिलं जातं. स्पर्धा जीवघेणी आहे. पुण्यात एमपीएससीची तयारी करणारी मुलं मी पाहिलीयत. बाप जमिनीचा तुकडा विकून पोराच्या शिक्षणाची व्यवस्था करतो. पोरगं जीव तोडून अभ्यास करतं. काहीजण पास होतात. पण त्यांनाही नोकरी मिळत नाही. सरकार किती लोकांना नोकर्या देऊ शकतं? दहा हजारात दोघांना सरकारी नोकर्या मिळू शकतात.
पण आशा असल्यामुळे मुलं नाद सोडत नाहीत. का? एकदा सरकारी नोकरी लागली की आयुष्याची चिंता मिटते. त्याहीपेक्षा वरकमाई रग्गड करता येईल ही अपेक्षा असते. या अपेक्षांचा पैसा करायला लोक टपलेले असणारच. शिक्षणाच्या बाजारात एक फेरफटका मारून पहा. तिथं तुम्हाला ट्युशनच्या दुकानांच्या रांगाच रांगा लागलेल्या दिसतील. सोन्याच्या दुकानाच्या जाहिराती कमी पण ट्युशनच्या दुकानाच्या जाहिराती जास्त, असं समीकरण दिसतंय.
आरोग्य आणि शिक्षणावरचा खर्च पेलण्याची कुवत शेतकर्यांची राहिलेली नाही. पण त्यांना हा खर्च करणं भाग पडतंय. काही लोक आरोग्य आणि शिक्षण स्वस्त करावं, असा सल्ला देतात पण शेतकर्याची ऐपत वाढण्यासाठी लावलेलं कुंपण नाहीसं करावं, असं कुणी म्हणत नाही. शेतकऱ्यांच्या पायात बेड्या कायम ठेवून होणाऱ्या सर्व सुधारणांचा लाभ बिगर शेतकऱ्यांनाच होतो, असं आपण पाहिलंय. आजही पाहतोय.
आपल्या लहानपणी नव्हत्या अशा कोणकोणत्या गोष्टी आज व्यवहारात आल्यात? टीव्ही, मोबाईल, गॅस नव्हता, आज आहे. आपल्या कपड्यांची संख्या वाढली. चपलांच्या चोऱ्या थांबल्या. प्लास्टिकचं भांडं नसायचं, आता आलंय. पॉलीथिन पिशव्या नव्हत्या. आता पदोपदी दिसतात. मेलेल्या जनावरांच्या पोटात पॉलीथिन पिशव्या नेहमीच सापडतात. बँका, पतपेढ्या, फायनान्स, एटीएम आलं. मोट गेली, मोटार आली. शेतीत बैलांचा वापर कमी झाला. नांगर गेले, ट्रॅक्टर आले.
आमच्या लहानपणी भुईमूग घ्यायचे. नंतर सूर्यफूल, कापूस आला. आता सोयाबीन घेतात. सोयाबीन काढायला माणसं मिळेनात. माझ्या पिढीनं गावरान वाण म्हणजे घरचं बियाणं वापरून शेती केली. त्या काळात अन्नाचा अभाव बघितला. अमेरिकेत डुकरांना खाऊ घातली जाणारी मिलो आम्ही खाल्ली.त्या नंतर आली संकरित बियाणं आणि रासायनिक खतं. त्यांचा वापर केला. दोनच्या ठिकाणी एकरी आठ पोतं ज्वारी होऊ लागली.
पण शेतकऱ्यांची परिस्थिती बदलली नाही. उत्पादन वाढलं पण उत्पन्न वाढलं नाही. त्या वेळेस एक तोळं सोनं घ्यायला एक क्विन्टल कापूस पुरायचा. आता वीस क्विंटल कापूस विकला तरी एक तोळा सोनं घेता येत नाही. पैसे फार वाढले नाहीत पण पैश्याची किंमत मात्र कमी झाली. जग बदललं, पण कुणाचं जग बदललं हे पाहायला नको?
त्या बदलांचा लाभ झाला की यामुळे ताण वाढले? याचा विचार करावा लागेल. एका बाजूला परिस्थिती खूप बदललीय, कोणत्याच पिढीनं एवढे बदल पाहिले नाही तेवढे बदल आपल्या पिढीने पाहिलेत. सोयीसुविधा एवढ्या मुबलक झाल्या तरी आरोग्य आणि शिक्षणाचा खर्च शेतकरी पेलू शकत नाहीत. हे वास्तव आपण समजून घेतलं तर साहित्य आणि त्याची दिशा समजायला अडचण येणार नाही.
खरं तर साहित्य हे फक्त साहित्य असतं. समीक्षकांनी त्यांच्या सोयीसाठी त्याचे भाग केलेत. आपल्या कंपूला सत्तेत कुठे तरी स्थान मिळावं म्हणून काही महाभागांना ते सोयीचं असल्यामुळे त्यांनी त्याला हवा दिली. आपलाच साहित्यप्रकार थोर असल्याचा दावा केला किंवा आमच्या साहित्यप्रकारावर अन्याय होतो असा विलाप करून सत्तेच्या कमिट्या आणि पुरस्कार मिळवले.
वाचकांना त्या प्रकारांशी काही देणंघेणं नसतं. ते साहित्याला कलाकृती म्हणून पाहतात. त्याचा आस्वाद घेतात. साहित्यातून आनंद आणि ज्ञान मिळत असेल तर ते ग्रामीण, दलित, आदिवासी की आणखीन् कोणतं असो; वाचकाला काही फरक पडत नाही.
वाचक हा कोणत्याही साहित्यप्रकाराचा पुरस्कर्ता किंवा विरोधक नसतो. आरोग्याच्या क्षेत्रातही पॅथींचे वाद आहेत. रोगी त्या वादात न पडता ज्या औषधाने रोग बरा होईल, ती पॅथी चालवून घेतो. तसंच सामान्य वाचक साहित्याकडे पाहत असतो.
हेही वाचा: समर्थन किंवा विरोध करण्याआधी शेती कायदे समजून तर घ्या!
आपण ग्रामीण साहित्य संमेलन घेतोय, म्हणजे काय? ज्या साहित्यात ग्रामीण जीवन व्यक्त होतं, त्या साहित्याचा आपण अधिक विचार करतोय. आपण गाव, शेती आणि शेतकर्यांच्या जीवनाशी निगडीत असलेलं साहित्य आपल्या अजेंड्यावर घेतलंय. आपण आपल्या साहित्य संमेलनाचं नाव ‘मृदगंध’ ठेवलंय. मृदगंध म्हणजे मातीचा गंध. पहिला पाउस पडल्यावर जो गंध येतो त्याला ‘मृदगंध’ म्हटलं जातं.
याचा अर्थ एवढाच आहे की, आपण साहित्यात केवळ ग्रामीण जीवन रेखाटणाऱ्या कलाकृतींचा विचार करणार आहोत. पुन्हा एकदा स्पष्ट करतो की, आम्ही जरी ग्रामीण साहित्याचा या संमेलनाच्या निमित्ताने विचार करीत असलो तरी आम्ही साहित्यात भेदाभेद, श्रेष्ठ-कनिष्ठ असं काही मानीत नाही. आम्ही साहित्याला साहित्य म्हणूनच जाणतो.
मुळात साहित्याचा उगम हाच ग्रामीण जीवनाशी निगडित होता. प्रणयरत क्रौंच पक्ष्याची एका राजाने हत्या केली, तेव्हा त्या पक्ष्याने जो टाहो फोडला तो साहित्याचा पहिला उद्गार मानला जातो. ही घटना कुण्या फाइवस्टार हॉटेलात घडली नसावी, हे उघड आहे. ती कुठे तरी जंगलात घडली असावी. तेव्हा ग्रामीण जीवन वगळून साहित्याचा विचार होऊ शकत नाही.
ग्रामीण जीवनावर सातत्याने लिहिलं गेलं. कथा-कादंबरीत, कवितेत ग्रामीण भागाचं, निसर्गाचं चित्रण झालंच आहे. संस्कृत, पाली, देशी, विदेशी, कुठल्याही भाषेतल्या सनातन साहित्याचा परिवेष ग्रामीण आहे. त्याचं कारण उघड आहे. त्या काळात औद्योगिकीकरण झालं नव्हतं. जे होतं ते सगळे ग्रामीण होतं. त्यामुळे ग्रामीण संदर्भ नाही, अशी भाषा नाही. जशी भाषा असते तसं साहित्य निर्माण होतं.
सर्व भाषांतल्या सनातन साहित्यात निसर्ग रेखाटला गेलाय. औद्योगिकीकरणानंतर मात्र तफावत पडू लागली. कारखाने उभे राहिले. त्या भोवती मजूर राहू लागले. या मजुरांना लागणार्या वस्तू पुरवणारे लोक आले. शहरं वाढू लागली. हे जीवन ग्रामीण जीवनापेक्षा वेगळं होतं. काय होतं वेगळेपण? इथं शेती आणि शेतकरी नव्हते. वेगवेगळ्या भागातून आलेले, वेगवेगळी भाषा बोलणारे लोक वस्ती करून राहू लागले.
लोकांनी स्थलांतर केलं. गाव सोडलं पण त्यांची गावाशी असलेली नाळ तुटली नव्हती. कच्चा माल असो की खाण्यासाठी लागणारं अन्न, ते मात्र त्याच शेतकर्यांकडून यायचं. ते स्वस्त मिळालं तर त्यांना हवंच होतं. सरकार मधे पडलं. त्यांनी स्वस्तात माल पुरवण्याची व्यवस्था केली. तसे कायदे केले. सरकारनं बिबा घातला. कारखानदारांनाही हे हवंच होतं.
कारण अन्नधान्याच्या किमती कमी राहिल्या तर त्यांना मजूर स्वस्त मिळतो. नुसत्या अन्नधान्याच्या किमती कमी ठेवल्या तर शेतकरी अन्नधान्य पिकवायचं बंद करतील. मग काय? सगळ्याच शेतमालाच्या किमती कमी राहतील, अशी व्यवस्था करण्यात आली. कच्चा माल आणि कामगार स्वस्तात मिळू लागला म्हणून कारखानदार आनंदी झाला. कामगारांनाही स्वस्त अन्नाचा आनंदच व्हायचा.
त्यामुळे शेती आणि शहरं यात जो सुसंवाद असायला हवा होता तो तुटला. अशा शहरात जन्मलेल्या लेखकांनी ‘झुळझुळ वाहणारे निर्झर, शुद्ध हवेचा झोका, हिरवी शालू नेसलेली शेती, निसर्गाचे सौंदर्य’ असं गावांचं वर्णन केलं. औद्योगिकीकरणाच्या सुरवातीच्या काळात शहरी लेखकांनी शेतीचं ग्रामीण जीवनाचं लोभसवाणं चित्र रंगवलं.
हे लेखक शिक्षणाची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातले होते. त्यांनी शेतकरी अडाणी, वेडा, विदुषक दाखवला. गावंढळ हा शब्द तेव्हाच निर्माण झाला असावा. शेतीतल्या हाल-अपेष्टांचं वर्णन मात्र त्यांनी केलं नाही. कामगार चळवळींचा जोर वाढल्यानंतर डाव्यांच्या साहित्याला रंग चढला. त्यांनी शेतकरी खलनायक म्हणून प्रस्तुत केला. तेही विकृतीकरणच होतं. हे सगळं साहित्य बिगर शेतकर्यांचं आहे.
आजही जे ग्रामीण म्हणून साहित्य ओळखलं जातं ते बहुतेक प्राध्यापकांनी, नोकरदारांनी लिहिलंय. दलितांचं साहित्य दलित लिहितात, आदिवासी साहित्य आदिवासी लिहितात. शेतकर्यांचं साहित्य मात्र दुसरेच लिहितात, असं का? शेतकर्यांचं साहित्य शेतकरी का लिहीत नाहीत, हे आपण समजावून घेतलं तर शेतकरी म्हणा की ग्रामीण साहित्याचा उलगडा होईल. त्यासाठी थोडं मागे जावं लागेल.
शेतीचा शोध लागण्यापूर्वी माणसाला फक्त अन्नाची भ्रांत होती. रानावनात भटकायचं. कंद-मुळे शोधायची, शिकार करायची आणि भूक भागवायची, यात तो व्यस्त असायचा. या काळात ना संस्कृती निर्माण झाली, ना ग्रंध लिहिले गेले, ना विज्ञान विकसित झालं. कालांतराने शेतीचा शोध लागला.
असं म्हणतात की, शेतीचा शोध स्त्रीने लावला. शेती आली म्हणून माणसाच्या अन्नाची भ्रांत मिटली. मानवी जीवनाला स्थैर्य प्राप्त झालं. शेतीच्या शोधामुळे मानवजातीची जगण्याची पद्धत बदलून गेली. रानावनात भटकणारी माणसं वसाहती करून राहू लागली. नवनव्या वस्तू निर्माण होऊ लागल्या. त्यांची एकमेकांशी देवाणघेवाण सुरु झाली.
या प्रक्रियेत भाषेचा विकास झाला. त्यातून साहित्य जन्माला आलं. अन्नाची भ्रांत मिटल्यानंतरच भाषा, साहित्य, कला, विज्ञान या क्षेत्रातल्या विकासाला चालना मिळाली. सर्व कला आणि साहित्याच्या तळाशी शेतीतून निर्माण होणारं अतिरिक्त अन्न आहे. त्याला वगळलं तर कोणत्याच प्रकारचं साहित्य निर्माण होऊ शकत नाही.
हेही वाचा: दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट : भाग १
शेतकरी शेतीत राबला, त्याने घाम गाळला आणि तुमच्या अन्नाची तजवीज केली म्हणून तुम्ही निवांतपणे साहित्याची निर्मिती करु शकलात. दुर्दैवाने साहित्यिकांनी शेतकर्यांविषयी जो कृतज्ञताभाव ठेवायला हवा होता, तो ठेवला नाही. उलट, राबणं हा शेतकऱ्यांचा धर्म आहे आणि त्याने पिकवलेलं फुकट खाणं आमचा अधिकार आहे, अशी समजूत साहित्यिकांनी करून घेतली.
शेतकर्यांशी नाळ जोडण्याऐवजी शेतकर्यांना लुटणाऱ्या राजेराजवाड्यांत वावरणं त्यांनी पसंत केलं. राजे आणि त्यांच्या दरबार्यांना रिझवण्यासाठी आपली सारी प्रतिभा खर्ची घातली. संवेदनशीलताही कशी पक्षपात करते, हे प्रतिभावंतांच्या वर्तनाकडे पाहिलं की लक्षात येतं. त्यांच्या साहित्यातलं शेतकर्यांचं चित्रण ढोबळमानाने तीन गटात विभागता येईल. कृषी जीवनाचं उदात्तीकरण करणारं, शेतकर्यांचं विदुषकीकरण करणारं आणि शेतकर्यांना खलनायक म्हणून रेखाटणारं.
कृषी जीवन ही आदर्श जीवन पद्धती आहे, कृषी ही संस्कृती आहे, ती सर्वश्रेष्ठ आहे, असा दावा करून काही लोकांनी ग्रामीण जीवन रेखाटण्याचा प्रयत्न केला. त्यांनी रसभरीत निसर्गवर्णन केलं. ‘जोंधळ्याला लटकलेले चांदणे’ दिसणं काय किंवा ‘हिरवे सपान पाहणे’ काय सारखंच. शेतकऱ्यांचं दु:ख या वर्गाला उमगलं नाही. या वर्गातल्या साहित्यिकांनी केलेलं चित्रण कैद्याने तुरुंगाचं बहारदार वर्णन करावं, तसं हास्यास्पद झालंय.
एखादा कैदी म्हणाला की, ‘उंच भिंती, आकाशाला भिडणारे मनोरे, हत्तीलाही वाकवता न येणारे बलदंड गज. घोर अंधार, कोण्या साधूला न मिळणारा खोलीतला एकांत, राजाच्याही नशिबी नसणारं जेवण’ ही जशी आत्मवंचना आहे तशीच ग्रामीण जीवनाविषयी करण्यात आली. अनिच्छेने शेती करावी लागणं म्हणजे वेठबिगारी. आज बहुसंख्य शेतकरी अनिच्छेने, नाईलाज म्हणून शेती करतात. आदर्श जीवनशैली वगैरे म्हणून आपण आपली प्रतारणा करीत राहिलो.
स्वामीनाथन समितीने ‘४० टक्के लोक नाईलाजाने शेती करतात, त्यांना संधी मिळाली तर ते लगेच शेती सोडतील.’ असा निष्कर्ष काढलाय. कृषीजीवनाचं उदात्तीकरण करून अशा साहित्यिकांनी शेतकर्यांना शेतीत नादावून ठेवण्याचं पाप केलंय. मी त्यांना म्हणालो, ‘कृषी जीवनाचं तुम्ही एवढे उदात्तीकरण करता, तर तुम्ही शेती का करीत नाही?’ तर पळ काढतात!
कृषी ही जीवनशैली मानली की, ती परवडते का नाही, याचा माणूस विचार करीत नाही. शेती हा एक व्यवसाय आहे, असं मानलं तरच ती परवडते का नाही, हे पाहता येईल. शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन विकसित न होऊ देण्यात इतर घटकांसोबत अशा साहित्यिकांनी केलेलं उदात्तीकरण हे एक कारण मानावं लागेल.
सवर्णांनी शेतकऱ्याला शूद्र मानलं. चतुवर्णांत शेतकर्यांचं स्थान ब्राह्मण, वैश्य किंवा क्षत्रिय नाही. ‘मातीशी ज्यांचा संबंध येतो, ते सगळे शूद्र.’ या नात्याने शेतकरी शूद्र ठरले. महात्मा जोतिबा फुले यांनी ‘शेतकऱ्यांचा आसूड’मधे याबद्दल स्पष्टीकरण केलंय. शेतकऱ्याला अडाणी समजून अनेक विनोद रचले गेले. शेतकरी हे एक विनोदी पात्र बनलं. हे सर्व साहित्य शेतकर्यांना एकेकाळी शूद्र मानणाऱ्या सवर्ण लेखकांनी लिहिलंय.
सवर्णांनी शेतकरी विदुषक रंगवला तसा डाव्या लोकांनी शेतकरी खलनायक रंगविला. गावचा पाटील घोड्यावर बसून रानात जातो आणि तिथं दिसेल त्या सुंदर मुलीवर बलात्कार करतो, अशी वर्णनं डाव्या विचारांचा प्रभाव असणाऱ्या अनेक लेखकांनी केलीय. शेतकरी मालक आहे, कारण सात-बारा त्याच्या नावाने आहे. तो मजुरांचा वर्गशत्रू आहे. अशी डावी विचारसरणी. या विचारसरणीचा पुरस्कार करणाऱ्यांनी शेतकर्यांचं चित्र रंगवताना भडकपणे त्याला खलनायक रंगवलं.
महात्मा जोतिबा फुले, प्रेमचंद, साने गुरुजी, बहिणाबाई असे काही सन्मानीय अपवाद वगळले तर शेतकऱ्यांचं वास्तव चित्र अभावानेच रेखाटलं गेलं. सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांबद्दल मनात आकस ठेवूनच लिखाण झालेलं दिसतं. याचं कारण काय? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी, ‘पुस्तकं कोण वाचतो? कोण विकत घेतो?’ या प्रश्नांची उत्तरं विचारात घ्यावी लागतील.
वाचणारा वर्ग शहरी आहे. बिगर शेतकरी आहे. प्रामुख्याने नोकरदार आहे. त्याला कांदा स्वस्तात हवा. कांदा महागला की तो सरकार उलथून टाकतो. त्याला साखर, तेल, डाळी, भाजीपाला महाग झालेला चालत नाही. त्याला दुप्पट पगार वाढवून हवा, मात्र शेतकऱ्याला भाव वाढवून मिळालेला चालत नाही. हा मुंबई-पुण्यात राहणारा वर्ग प्रामुख्याने पुस्तकं वाचतो. तोच विकत घेतो.
त्याला न आवडणाऱ्या पुस्तकांना तो हात लावत नाही. पुस्तकं विकली जाणार नसतील तर प्रकाशक ती कशाला छापतील? या वर्गाच्या अभिरुचीला जुळेल असंच लेखन छापलं जातं. म्हणून लेखकही तशीच पुस्तकं लिहितात. या वाचकांच्या पसंतीला उतरलेलं पुस्तक आणि पुस्तकाचा लेखक डोक्यावर घेतला जातो. त्याला पुरस्कार मिळतात. सरकारी कमिट्या मिळतात. त्याचा नावलौकिक होतो. पैसाही मिळतो.
शेतकर्यांबद्दल शहरी वाचकवर्गाच्या मनात एक अढी आहे. शेतकऱ्याला नायक करून लेखन केलं तर शहरी वाचक त्या पुस्तकाला हात लावत नाही. म्हणून जोपर्यंत शेतकरी पुस्तकाचा ग्राहक बनत नाही, तोपर्यंत शेतकरी कधी खलनायक तर कधी विदुषक म्हणूनच चित्रित केला जात राहील. तो नायक दिसणार नाही.
हेही वाचा: दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट : भाग २
ग्रामीण साहित्य म्हणून जे काही प्रकाशित झालंय, ते शेतकरी कुटुंबात बालपण गेलेल्या आणि पुढे नोकरी करत असलेल्या लोकांनी लिहिलेलं साहित्य आहे. त्यातही प्राध्यापक, शिक्षक अधिक आहेत. शेती सोडून नोकऱ्या करत असलेल्या लोकांनी शेतकऱ्यांविषयी सहानुभूतीने लिहिलेलं हे साहित्य आहे. यात आठवणीत जे राहिलं ते आलं असल्यामुळे ते धूसर आहे.
शेतकऱ्यांचं खरं चित्र सादर करणं सोपे नाही. तळहातावर निखारा घ्यावा लागतो. शेतकरी नायक करायचा असेल तर सत्ताधारी खलनायक करावा लागतो. सत्ताधाऱ्यांना खलनायक करायला जिगर लागते. ही जिगर घेऊन अवतरलेला सहसा कुणी दिसत नाही. लेखकाचं ते काम नाही असं सोयीस्कर उत्तर देऊन ते मोकळे होतात.
बुडत्या माणसाचे वीडियो काढणाऱ्याला विचारलं की तू त्याला का वाचवलं नाहीस? तेव्हा तो म्हणाला, ते माझे काम नाही! इतका निगरगट्टपणा साहित्यिकांमधे कुठून येतो? आजचे बहुतेक ग्रामीण लेखक नोकरदार आहेत. सरकारला ते मायबाप समजतात. शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहायचं तर आपल्याला पगार देणारे मालक नाराज होतील अशी त्यांना भीती वाटत असावी त्यामुळे ते ठामपणे उभे राहत नाहीत.
साहित्यिक आज शेतकरी नाहीत. दलित साहित्य आणि ग्रामीण साहित्य यांच्यात हाच तफावतीचा मुद्दा आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेला माणूस नोकरदार झाला की त्याचे हितसंबंध बदलतात. मात्र दलित माणसाने गाव सोडलं, व्यवसाय बदलला तरी त्याची जात बदलत नाही. काल तो ज्या जातीचा होता, तीच जात आजही चिकटलेली असते. शेतकरी कुटुंबातल्या आणि दलित जातीतल्या प्राध्यापकांच्या जाणिवांच्या स्तरात फरक पडलेला असतो.
जात जाणिवांच्या बदलांचा वेग अत्यंत मंद असतो, आंतरजातीय विवाह केला तरी काही पिढ्यांनंतर फरक पडतो. मात्र एका आर्थिक गटातून दुसऱ्या आर्थिक गटात स्थलांतर करणाऱ्यांच्या हितसंबंधीय जाणिवा मात्र चटकन बदलतात. म्हणून शेतकऱ्यांचा मुलगा शेतीच्या बाहेर पडला की शेतकऱ्यांचा गळा कापायला मागेपुढे पाहत नाही. याच कारणामुळे राजकारणात गेलेली शेतकऱ्यांची पोरं शेतकऱ्यांना बेईमान होतात!
जसं दलित साहित्य निर्माण होतं तसं शेतकऱ्यांचं साहित्य का निर्माण होत नाही हे जर अधिक खोलात जाऊन समजावून घ्यायचं असेल तर कोषांतराचा सिद्धांत समजून घ्यावा लागेल. आदिवासींचा उठाव झाला की त्यांची गाणी होतात. दलित, स्त्रीवादी, कामगार चळवळीत तर खूप गाणी आहेत. शेतकरी आंदोलनात मात्र शेतकऱ्यांचं गाणं तयार झालं नाही.
साने गुरुजींनी स्वातंत्र्य आंदोलनात लिहिलेलं ‘आता उठवू सारे रान’ हे जुनं गाणं गावं लागतं. नारायण सुर्वे आणि इंद्रजित भालेराव यांनी लिहिलेली एक दोन गीतं शेतकरी चळवळीने उचलली खरी, पण जशी इतर चळवळीत गाणी तयार होतात तशी शेतकरी आंदोलनात गाणी निर्माण झाली नाही. हे वास्तव आहे. असं का? शेतकऱ्यांच्या चळवळीची गाणी का तयार होऊ शकली नाहीत?
विदेशातून मोगल आले, त्यांनी उत्कृष्ट साहित्याची निर्मिती केली. एके काळी ब्राह्मणांनी गाव सोडलं, त्यांनीही सुंदर लेखन केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘गाव सोडा' आवाहनाला प्रतिसाद देऊन दलितांनी गाव सोडलं. १९६०नंतर त्यांच्या लिखाणाला धार चढली. आत्मचरित्रे, नाटके, कविता, कादंबर्या या सर्व क्षेत्रांत दलित साहित्याने आपलं वेगळेपण ठसवलं.
बलुतेदार बाहेर पडले, त्यांनीही विपुल लेखन केलं. माहेरातून निघून सासरी गेलेल्या बायांनीही खूप गाणी रचली. या सर्व उदाहरणांवरून एक गोष्ट सिद्ध होते की, जे स्थलांतर करतात ते मोठ्या प्रमाणात साहित्य निर्माण करतात. स्थलांतरामुळे त्यांच्यातल्या प्रतिभावंतांना अनुकूलता मिळते आणि ते लिखाण करू लागतात. शेतकऱ्यांना स्थलांतर करता येत नाही. ते जमिनीशी बांधले गेलेले असतात.
गावात जन्मायचं, गावात जगायचं, गावातच मरायचं, असा त्यांचा जीवनक्रम असतो. लेखनासाठी ‘परकाया प्रवेशाची’ क्षमता महत्त्वाची मानली जाते. स्थलांतर केलेल्यांना ही अनुभूती सहज मिळते. ते अधिक सुलभपणे ‘परकाया प्रवेश’ करू शकतात. शेतकर्यांना जमीन, गुरं अशा कामांमुळे स्थलांतर करता आलं नाही म्हणून शेतकर्यांनी लिहिलेलं साहित्य तयार होऊ शकलं नाही.
कुटुंब, जात, गाव, देश या समाजशास्त्रीय संस्था एक प्रकारचे कोष आहेत. या कोषांतून बाहेर पडणाऱ्यांना सर्जनाचं वातावरण मिळतं. कोषांतर करणारे समूह सांस्कृतिक पातळीवर तुलनेने अधिक सक्रीय दिसतात. शेतकऱ्याला हे वातावरण मिळत नाही म्हणून शेतकर्यांचं साहित्य निर्माण झालेलं नाही, असं म्हणता येईल.
हेही वाचा: दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट : भाग ३
प्रगत देशांकडे पाहिलं तर असं लक्षात येतं की, त्या देशांत शेतीवर जगणारे लोक खूपच कमी आहेत. काही देशांत तर, कुणीतरी शेती करावी म्हणून सरकारद्वारे प्रोत्साहन दिलं जातं. आपल्या देशात शेतीवर जगणाऱ्यांची संख्या एकेकाळी ९० टक्के होती. अलीकडे स्थलांतराचं प्रमाण वाढलं असलं तरी अजूनही ५५ ते ६५ टक्के लोक शेतीवर जगतात. देशाची अर्ध्याहून अधिक लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे.
१९४७ला ९० टक्के लोक शेतीवर होते. त्यावेळी लोकसंख्या फक्त ३५ ते ४० कोटी होती. त्याच्या नव्वद टक्के म्हणजे जवळपास ३४ ते ३६ कोटी लोक शेतीवर जगत होते. आज टक्केवारी कमी झाली असली तरी शेतीवर जगणार्यांची संख्या मात्र वाढलीय. आज ७० ते ७५ कोटी लोक शेतीवर जगतात. जमीन तेवढीच राहिली पण त्यावर अवलंबून असणार्यांची संख्या मात्र वाढली.
शेतीच्या होल्डिंगचं प्रमाण पाहिलं तर अजून भयंकर स्थिती दिसून येते. कारण ८५ टक्के जमीन जास्त होल्डिंगवाल्यांकडे आहे आणि १५ टक्के जमीन बाकीच्यांकडे. जास्त जमीन कुणाकडे आहे? ते शेतकरी आहेत का? कुणी नोकरदार, कुणी पुढारी, कुणाकडे नंबर दोनचा धंदा असेल.
इन्कम टॅक्स वाचवायला या लोकांनी जमिनी घेऊन ठेवल्या आहेत. सरकारने शेतकर्यांच्या जमिनी अधिग्रहण करून हजारो एकर जमिनी कारखानदारांना दिल्यात. म्हणजेच, फक्त शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकर्यांच्या जमिनींचे तुकडे अत्यंत लहान झालेत. त्यातले बरेच लोक अर्धवेळ मजूर झालेत.
१९९०नंतर स्थलांतराचा वेग वाढला. शेतकरी आणि शेतमजूरही शहरांकडे धाव घेतायत. शहरात पोचलेली किसानपुत्रांची ही पहिली पिढी आहे. ती अजून नवखी आहे. १०-२० वर्षात ते स्थिर होतील. तो पर्यंत त्यांची गावाशी असलेली नाळ तुटून जाईल. दलित युवकांनी शहरात गेल्यानंतर जो दबदबा निर्माण केला होता, तसा या किसनपुत्रांना अजून तरी निर्माण करता आला नाही.
या वर्गाचा साहित्य क्षेत्रावर प्रभाव पडलेला दिसून येत नाही. शेतीवरचा भार कधी ना कधी कमी होणारच आहे. चार भावांपैकी तीन भाऊ इतर क्षेत्रांत जातील. एक भाऊ तेवढा शेती करेल. ७५ टक्के लोक शेतीच्या बाहेर पडतील. त्या काळात खेड्यांचं चित्र पार पालटून गेलेलं असेल. ग्रामीण साहित्याला या परिस्थितीला सामोरं जावं लागेल.
१९९०नंतर नवं तंत्रज्ञान आलं. या तंत्रज्ञानाने सारं जग बदलून टाकलं. एकदम नवी परिस्थिती निर्माण होतेय. शेतीचा शोध लागला तेव्हा मानवी जीवनाला एक प्रकारची कलाटणी मिळाली होती. आता नव्या तंत्रज्ञानामुळे पुन्हा जग बदलांच्या उंबरठ्यावर येऊन उभा ठाकलंय. या नव्या जगाचे प्रश्न नेमके कसे राहतील ते सांगता येणार नाही, पण ते आजच्यासारखे असणार नाहीत, हे निश्चित.
हा संक्रमण काळ टिपण्याचा जो जोरकस प्रयत्न व्हायला हवा, तेवढा होताना दिसत नाही. तरीही काही ताकदीचे लेखक समोर येतायत. १९९०च्या आधीच्या लिखाणाच्या तुलनेत मराठी ग्रामीण लेखक नवं लिहिण्याचा प्रयत्न करताना दिसतात. ही आशादायक आणि दिलासादायक गोष्ट आहे. नवं टिपणाऱ्या लेखकांच्या पाठीशी आपण उभे राहिलं पाहिजे.
तुलसीदास म्हणाले होते, ‘ढोल, गँवार, शुद्र, पशु, नारी, यह सब है ताडन के अधिकारी.’ याचा संदर्भ आपण बाजूला ठेवू. आपल्याला ढोल, गँवार, शूद्र, पशु, नारी हे सर्व घटक सर्जक आहेत हे महत्वाचं आहे. ढोल म्हणजे कलावंत, गँवार किंवा शूद्र म्हणजे शेतकरी, पशु म्हणजे जनावरे आणि नारी म्हणजे स्त्री हे सर्व घटक सर्जक आहेत. यात नव्या जगातले शास्त्रज्ञही जोडता येतील.
सर्जक म्हणजे काय? सर्जक म्हणजे जे नव्या अशा गोष्टीला जन्म देऊ शकते जी पुन्हा नव्या गोष्टीला जन्म देते. शेतकरी एक दाणा पेरतो. त्यातून शंभर दाणे निर्माण होतात. ते शंभर दाणे पेरले तर हजारो दाणे जन्म घेतात. ही प्रकिया सर्जनाची आहे. ही प्रक्रिया करणारा सर्जक. अशीच प्रक्रिया प्राण्यांत घडते आणि स्त्रियांत घडते. म्हणून तेही सर्जक आहेत.
जगाचा गोल कुणी तोललाय? असा एक सनातन प्रश्न आहे. शेषाच्या शिरावर पृथ्वीचा गोल आहे अशी कल्पना पुराणात केली गेली. ती आता कालबाह्य झालीय. औद्योगिक क्रांतीनंतर जेव्हा डावे मोठ्या प्रमाणात लिहू लागले होते, तेव्हा ते म्हणाले, जगाचा गोल कामगारांच्या तळहातावर तोललाय. खरेच कामगारांच्या तळहातावर जगाचा गोल तोलला गेलाय का?
जगाचा गोल कुणी तोललाय, याची कल्पना करायची असेल तर साधा प्रश्न आपल्या मनाला विचारा. कोण नष्ट झालं तर जग नष्ट होऊन जाईल? जेव्हा औद्योगिक कामगार अस्तित्वातच नव्हते तेव्हाही हे जग अस्तित्वात होतंच की. कामगार नसल्यामुळे जग नष्ट होत नाही. इतर घटकांचा विचार करून पहा.
डॉक्टर, वकील, शिक्षक, सरकारी कर्मचारी, राजकीय पुढारी. उत्तर मिळेल, नाही. काही फारसा फरक पडणार नाही. पण विचार करा एके दिवशी सगळे शेतकरी नष्ट झाले तर? काय खाणार? खायला अन्न आणणार कुठून? दगड, कोळसा किंवा लोखंड खाऊन पोट भरत नसतं. माणसाला जगण्यासाठी अन्नच खावं लागतं आणि ते पिकवतो शेतकरीच.
तुम्हाला किंवा मला शेतकरी झाल्याशिवाय मानवजात वाचवता येणार येणार नाही. म्हणून पहिला घटक शेतकरी आहे आणि जगातल्या सर्व स्त्रिया संपुष्टात आल्या तर? नवीन जनन होणार नाही आणि हळूहळू मानवजात नष्ट होऊन जाईल. हे दोन घटक सर्वात जास्त महत्त्वाचे आहेत. म्हणून मी म्हणतो, जगाचा गोल दोन हातावर तोललाय- एक शेतकर्यांचा आणि दुसरा हात स्त्रियांचा आहे.
हेही वाचा: डिसले गुरुजींकडून आपली शिक्षणव्यवस्था काय शिकणार?
लक्षात घ्या, हेच दोन घटक आज सर्वांत जास्त संकटात आहेत. शेतकरी आत्महत्या करतात आणि स्त्रियांची भ्रूणहत्या होतेय. एकाच काळातल्या या घटना आहेत. या दोन्ही घटकात एकच साम्य आहे. दोघे सर्जक आहेत. कोणत्याही जाती-धर्माच्या संघटनेच्या नेत्याला विचारा, तुझ्या जाती-धर्मात सर्वात जास्त वाईट परिस्थिती कुणाची आहे? एकसारखेच उत्तर मिळेल- शेतकरी आणि स्त्री!
सगळ्याच जाती-धर्मांत जर शेतकरी आणि स्त्री समान संकटात असतील तर आपसात का भांडत बसता? त्यांची परिस्थिती सुधारेल असं काही करा. वर्णसंघर्ष खोटा आहे; फसवा आहे. आपल्या जाती-धर्माचा आडत्या जास्त भाव देत नसतो. शेतकऱ्यांचा गळा कापायला आणि स्त्रियांचा छळ करायला सगळेच टपलेले असतात. तिथं जात धर्म, गरीब-श्रीमंत सगळे सारखेच असतात.
वर्गसंघर्षही खोटाच. ज्यांचे हितसंबंध शेतीत नाहीत ते सगळे एक होतात. कच्चा माल कारखानदाराला स्वस्त हवा असतोच. कामगारांनाही स्वस्त अन्नधान्य हवं असतं. शेतकऱ्याला लुटायला ते कमी करीत नाहीत. खरा संघर्ष आहे, सर्जक आणि भक्षक यांच्यात. सारी व्यवस्था सर्जकांना लुटायला बसलीय. छळायला बसलीय. त्याविरुद्ध ग्रामीण साहित्याने एल्गार पुकारला पाहिजे. हीच काळाची गरज आहे.
साहित्य संमेलन केवळ एक घटना न राहता एक चळवळ व्हावी अशी माझी अपेक्षा आहे. साहित्य संमेलन ही चळवळ व्हायची असेल तर त्याची तशी रचना करावी लागेल. हे पहिलं संमेलन होतं म्हणून त्यात काही उणीवा, काही चुका राहिल्या असतील. पण ‘मृदगंध’ सतत चालणारा प्रवाह करायचा असेल तर त्यात लोकसहभाग वाढवणं फार गरजेचं आहे. लोकसहभाग म्हणजे केवळ उपस्थिती नव्हे.
लोकांना निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घ्या. रसिकांनी पुढाकार घेऊन साहित्य संमेलने व्हायला हवीत. मोठे किंवा गाजलेले लोक किती येतात यापेक्षा छोट्यांना मोठे करण्यात आपण किती हातभार लावतो, हे जास्त महत्त्वाचं मानलं पाहिजे. मृदगंध म्हणजे मातीचा दरवळ. याचा अर्थ असा की, स्थानिक प्रतिभावंतांना आपण पुढे आणलं पाहिजे. माझा लोकल कलावंत, साहित्यिक ग्लोबल झाला पाहिजे, असा विचार करून मृदगंध साहित्य संमेलनाने वाटचाल केली पाहिजे.
एकाच व्यक्तीचा पैसा असेल तर त्याचेच चालेल. ते चालायला लागलं तर चळवळ बाद होऊन जाते. सर्वांच्या पैश्याने संमेलने झाली पाहिजेत. शंभर शंभर रुपये गोळा करा. जेवढे पैसे गोळा होतील तेवढ्यात संमेलन करा. कशाला हवी झगमगाट? कशाला हवेत तगडे लोक? इथं आपल्याला कुस्ती खेळायचीय? नव्या प्रतिभावंतांना व्यासपीठ देण्याचं ध्येय असेल तर फारसा पैसा लागत नाही. जेवढा गरजेचा असतो, तेवढा पैसा लोक देतात, असा माझा अनुभव आहे.
‘संमेलनाध्यक्षांचं साहित्य’ हा विषय आपण प्रत्येक संमेलनात अनिवार्य केलाय. तेव्हा संमेलनाध्यक्ष असाच निवडावा लागेल ज्याच्या साहित्यावर किमान तीन चार वक्ते तास दोन तास बोलू शकतील. उगीच बिनकामी ठोंब्याला आपण अध्यक्ष करणार नाही. संमेलनाध्यक्ष हे पद मानाचं किंवा मिरवण्याचं असता कामा नये; हे पद जबाबदारीचं मानलं पाहिजे.
परिसंवादाच्या विषयांबद्दलही सावध रहायला हवे. स्थानिक गोष्टींचं काही दस्तावेजीकरण करता येईल, असेच विषय घ्यावेत. ज्या विषयावर वारंवार विविध स्तरांवर चर्चा होते ते विषय तुम्ही का घेता? जे विषय इतर कुणी घेत नाहीत, असे आपल्या मातीशी निगडित असलेले विषय घ्यायला हवेत.
मला वाटतं, मृदगंध साहित्य संमेलन इतर साहित्य संमेलनांची नक्कल असता कामा नये. नवं काही तरी करा. तरच तुमच्याकडे जगाचं लक्ष वेधलं जाईल. या संमेलनात काही प्रमाणात सुरवात झालीय. या पुढे तिचा विस्तार व्हावा अशी माझी अपेक्षा आहे.
मी या संमेलनापुरता अध्यक्ष नाही. दोन वर्षाने होणार्या दुसर्या संमेलनात मी नव्या अध्यक्षांना हे पद बहाल करेल. दोन वर्षे मी अध्यक्ष राहील. मृदगंध साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून आगामी दोन वर्षात मी व्यक्तीश: काय करेल? याबद्दल मी बराच विचार केला. मला वाटतं, याबद्दल मी केलेला संकल्प येथे नोंदवले गेले पाहिजेत.
मी ग्रामीण भागातल्या प्रतिभांचा शोध घेण्यासाठी १०० शाळांमधे साहित्यविषयक कार्यक्रम घेईन. उपक्रम चालवेन. व्याख्याने देईन. आंबाजोगाई तालुक्यात बाल साहित्य संमेलनाच्या आयोजनात पुढाकार घेईन. अंबाजोगाई तालुक्यातल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबांना भेटी देऊन त्याचा दस्तावेज तयार करीन. आंबाजोगाई तालुक्यातल्या महिलांचा प्रातिनिधिक कवितासंग्रह प्रकाशित करेन.
इडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो!
हेही वाचा:
ब्रेन ड्रेनपेक्षा विघातक आहे वेल्थ ड्रेन!
ऑनलाईन क्लासपासून मुलांचे डोळे वाचवा
राष्ट्रीय कन्या दिन : तारा मनाच्या का मूक होऊ लागल्या?
शेतकरी संघटना आक्रमक झाल्यामुळे केंद्र सरकारची कोंडी झालीय
ऑनलाईन शिक्षणाचा ध्यास घेणाऱ्या शिक्षकांना ‘नितळी’च म्हणायला हवं