डॉक्टर श्रीराम लागू म्हणजे नित्शेचा सुपरमॅन!

२० डिसेंबर २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


१७ डिसेंबरला डॉक्टर श्रीराम लागू यांचं निधन झालं. अभिनयाला विवेकाची जोड देणाऱ्या लागूंबद्दल प्रत्येक मराठी माणसाला आकर्षण असतंच. २००५ साली प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या लमाण या आत्मचरित्रातून लागूंचं आयुष्य उलगडतं. या आत्मचरित्राचं डॉ. शर्मिला वीरकर यांनी केलेलं परिक्षण

‘लमाण’ नुकतेच प्रसिद्ध झाले. रुढार्थाने ज्याला आत्मचरित्र म्हटलं जातं, तसं प्रस्तुत ग्रंथाचं स्वरुप नसून ‘मनोगता’त म्हटल्याप्रमाणे त्यांच्या एकूण नाट्यप्रवासाचा तो धावता आढावा आहे. आपलं खासगी जीवन चित्रित करण्यात लेखकाला स्वारस्य नाही. साडेतीनशेहून अधिक पृष्ठसंख्या असलेल्या या पुस्तकात कौटुंबिक उल्लेख अपवादत्मकच आहेत.

नाट्यक्षेत्राशी संबंधित व्यावसायिक जीवन शब्दबद्ध करण्यासाठी, सुहृदांच्या आग्रहानुसार ‘लमाण’ची निर्मिती झाली आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या जडणघडणीत किंवा व्यक्तिमत्व समृद्ध होण्यासाठी ज्यांचा हातभार लागला, त्यांच्याविषयीच्या आठवणींनी पुस्तकाची सुरवात होते.

आई-वडिलांपासून निघून भालबा केळकर, प्राध्यापक दीक्षित, वसंत कानेटकर, इंदिरा संत, पु.शि रेगे, जी. ए. कुलकर्णी इत्यादींपर्यंत वाचक पोहोचतो. के. नारायण काळे, शंभू मित्रा, कुमार गंधर्व इत्यादींकडून डॉक्टरांनी जे घेतलं, त्याचा ते कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतात. मर्ढेकरांचा कलाविचार समजून घेऊन तो नाट्यक्षेत्राला लागू करतात. रसेलने चाचपडत, लटपटत जाणाऱ्या वैचारिकतेला पोलादी कणा दिल्याचं सांगत असतानाच ‘कधीकधी रसेलच्या पंजातून निसटून पळायला मजा वाटते’ हेही मान्य करतात.

नाटकाचे प्रयोग न पाहता नाटक पाहिल्याचा आनंद

फ्रेंच जोडप्याचे मद्यप्राशनविषयक विचार, नाटकातल्या आणि सिनेमातल्या अभिनयात असणारा फरक, लॉरेन्स ऑलिव्हिए आणि अलेक गिनेस यांच्या अभिनयशैलीतला फरक, अरिस्टॉटल आणि ब्रेख्ट यांच्या नाट्यविचार आणि एकंदरीतच पाश्च्यात्य रंगभूमीचा, नाटकांचा सिनेमांचा परिचय वाचकाला होतो, तो डॉक्टरांची लेखणी अशा कित्येक विषयांना स्पर्श करुन जाते म्हणून.

‘जगन्नाथाचा रथ’, ‘देवांचं मनोराज्य’, ’यशोदा’, ‘सूर्य पाहिलेला माणूस’ इत्यादी नाटकांच्या जन्मकहाण्या कळतात. तालमींच्या, नाट्यप्रयोगांच्या वेळी कसे बाके प्रसंग उद्भवू शकतात आणि त्यातून सहीसलामत सुटल्यावर कशी अवस्था होते, त्याचे प्रत्ययकारी चित्रण डॉक्टरांची लेखणी करते. नाटकाची संहिता न वाचता, प्रयोग न बघता नाटक कळल्याचं समाधान, अल्पांशानं का होईला, पण खचितच मिळतं. 

‘वेड्याचं घर उन्हात’, ’गिधाडे, ‘मी जिंकलो-मी हरलो’, ‘हिमालयाची सावली’, ‘गार्बो’ इत्यादी नाटकांच्या थीम्सचं डॉक्टरांनी केलेलं वर्णन थीमच्या गाभ्याबरोबरच वाचकांच्या मनाच्या गाभ्यालाही स्पर्श करुन जाण्याइतकं प्रभावी आणि तरीही अल्पाक्षरी आहे. ते वाचकाच्या जाणिवेच्या कक्षा रुंदावण्याचं कार्य करते.

विवेकवादाची जडणघडण सांगायला हवी

‘लमाण’ केवळ जाणिवा समृद्ध करण्याचं काम करत नाही, तर वाचकाला विचारप्रवृत्त करतं. विचारांना चालना देतं. परखडपणे आणि सुसंगतपणे डॉक्टरांनी मांडलेली सेन्सॉरविषयची मतं, पाचव्या वेतन आयोगाच्या परिणामांचा विचार, आणीबाणी आणि विचारस्वातंत्र्य यातला विरोध या विषयांवरचं डॉक्टरांचं चिंतन मूलगामी आहे. 

‘समाजप्रबोधना’ची संकल्पना स्पष्ट करुन त्याची निकड त्यांनी अधोरेखित केली आहे. ‘मी भूमिका कोणत्या निकषांवर स्वीकारतो किंवा नाकारतो’, ‘अभिनय कला आहे की कारागिरी’ अशा प्रश्नांचा गंभीरपणे विचार करुन त्यांनी आपली वैचारिक भूमिका निःसंदिग्धपणे मांडली आहे. 

‘ईश्वराला रिटायर करा’ असा आग्रह धरणाऱ्या डॉक्टरांचा विवेकवाद आपल्या सर्वांचा परिचयाचा आहे. मात्र विवेकवादी दृष्टिकोन त्यांच्यात कसकसा विकसित होत गेला, हे त्यांनी जाता-जाता स्पष्ट केलं असतं, तर ते अस्थानी झालं नसतं, असं वाटतं. 

हेही वाचा : एक शून्य प्रतिक्रियाः जगणं आणि लिहिण्यातल्या शून्य अंतराची कविता

लागूंचं संवेदनशील मन काळानुसार बधिर झालं काय?

संपूर्ण लमाण मधून व्यक्त होते, ते डॉक्टरांचे खानदानी, सुसंस्कृत, कर्तुत्वसंपन्न, रुबाबदार, सामर्थ्यशाली, प्रतिभावान, प्रभावी व्यक्तिमत्व. अरिस्टॉटलचा ‘मॅग्नेनिमस’. जगातील सर्वोत्तम गोष्टींचा मनःपूर्वक आस्वाद घेण्याचा त्यांना असणारा ध्यास. कनवाळूपणा, कणव, आर्द्रता, हळवेपणा अशा सौम्य, नाजूक, मुलायम किंवा माणसाला दुबळं, कमकुवत करणाऱ्या भावभावनांना त्यांच्या जीवनात थारा नसतो. अपवाद एखाद्याच माईंसारख्यांचा!

त्यांच्या कपाळातून डोळ्यावर रक्ताची लागलेली धार आज सत्तर वर्षानंतरही डॉक्टर विसरु शकत नाहीत. दुसऱ्यांच्या वेदनांनी व्यथित होणारं संवेदनशील मन काळाच्या ओघात बधिर झालं की काय, अशी शंका येते. कारण पुढे असे उल्लेख जवळजवळ नाहीतच.

डॉक्टर म्हणतात त्याप्रमाणे मेडिकल कॉलेजमधे नाटकाच्या धुंदीत, नशेत आणि स्वतःच्या मस्तीत, कैफात ते दंग होते. त्यावेळी जागतिक महायूद्ध झालं, संपलं, हिरोशिमा-नागासाकी बेचिराख झाले, गांधीजींच्या सत्याग्रह, ‘चले जाव’ चा ठराव  इतकं काय काय झालं पण डॉक्टरांच्या मानगुटीवर ते त्याप्रमाणे फक्त नाटकाचे भूत होते. सतत आत्मविकासात मग्न म्हणून गांधींजींवर अशाच प्रकारचा आरोप  ‘इंडिया अ वुन्डेड  सिविलायझेशन’ या पुस्तकात व्ही. एस. नायपॉल यांनी केला आहे, त्याची इथं आठवण होते.

सर्जनशील होण्याचा प्रयत्न

खासगी तसेच व्यावसायिक जीवनात येणाऱ्या सुखदुःखांची, चढउतारांची, खाचखाळग्यांची त्यांना म्हणूनच फिकीर नाही. डॉक्टर वारंवार म्हणतात त्याप्रमाणे अपयशाने नाउमेद होण्याइतकाही त्यांना वेळ नाही. उत्तमोत्तम चिजांचा ध्यास घेऊन त्याद्वारे आपली परिपूर्णता साधण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यामुळे पॅशन्सचे, विकारवासनांचे समूळ उच्चाटन न करता त्यांना आवर घालून अधिकाधिक सर्जनशील होण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणूनच नियंत्रित मद्यपानाचा विचार येणं क्रमप्राप्त ठरतं.

मन कमकुवत करणाऱ्या ऋणात्मक भावनांना त्यांच्या आयुष्यात स्थान नसतं. पण ज्यामुळे आयुष्य समृद्ध होतं, त्या अनुभवांना सर्व शक्तीनिशी सामोरे जाण्याची तयारीच नव्हे तर जिद्द असते. पॅशन्सना पुरून उतरण्याचे सामर्थ्य किंवा त्यांवर मात करण्याचा विवेकही असतो. अशांना नित्शे ‘सुपरमॅन’ म्हणतो.

माणुस स्वतंत्र बुद्धीचा, प्रतिभावान, ताकदवान, धैर्यशाली मनुष्य विवेकाच्या आधारे मनुष्यत्वाच्या सीमा पार करून ‘जीवाचा गाभा उजळून’ टाकण्याच्या दुर्दम्य इच्छेने प्रेरित होतो. अंतिमतः ‘सुपरमॅन’ होतो आणि त्याचं जीवन सार्थकी लागतं. पाशवी वृत्तींवर मात करून मनुष्य हिंस्र श्वापदांपासून निराळा ठरतो. तर वासनांवर काबू ठेवून तो इतर सामान्य माणसांपासून वेगळा ठरतो.

हेही वाचा : सत्यशोधकीय नियतकालिकेः वाङ्मयेतिहासात मोलाची भर घालणारा संदर्भ ग्रंथ

नित्शेचा सुपरमॅन म्हणजे लागू

अशा स्वतंत्र आणि असामान्य प्रज्ञेच्या प्रभृतींना अर्थातच नीतिमत्तेच्या ठोकळेबाज, चाकोरीबद्ध, रूढ, पारंपरिक संकल्पना मान्य नसतात. ‘दारूची नशा करी देहीची दुर्दशा’, ‘नाटकात काम करणं अप्रतिष्ठेचं’ हे डॉक्टरांना अर्थातच पटणार नाही. नैतिक मूल्यांचे निर्धारण आपण स्वतःच करावयाचे आणि त्या आदर्शांबरहुकूम जगायचे, हा अस्तित्ववादी विचार ते पुरेपूर आचरणात आणतात.

परंतु अस्तित्ववाद्यांनी रंगवलेल्या माणसाचे पुसटसे दर्शनही लमाणमधे दिसत नाही. विवेकाला प्रधान्य आणि भावनांना गौणत्व दिल्यानं इथं ‘सिसिफस’ नाही आणि ‘बोलाक्का’ तर नाहीच नाही. अमर्याद स्वातंत्र्यांच्या जाणिवेने कासाविस झालेल्या मृत्यूचे सतत भान राखणाऱ्या, नातेसंबंध तुटल्यामुळे उन्मळून पडणाऱ्या एकाकी आत्मदुरावा म्हणजेच एल्यनेशन सहन करणाऱ्या, पश्चापदग्ध, सोशीक, व्याकुळ, तगमगणाऱ्या जीवाचा इथं मागमूस नाही. एकंदरीत, जिवंत, हाडामांसाचा ‘श्रीराम लागू’ नामक माणूस ‘लमाण’ मधे दिसत नाही. उलट दर्शन होते ते निव्वळ डॉक्टर श्रीराम लागू यांचं.

जीवन उद्ध्वस्त करणारे, आदर्शांची उलटापालट करणारे, शतशः विदीर्ण करणारे, ‘मी जिंकलो-मी हरलो’ पद्धतीचे, जयापयाच्या सीमारेषा पुसून टाकणारे, दारुण पराभवाचे, अपयशाचे, तेजोभंगाचे, मानहानीचे अनुभव त्यांच्या वाट्याला आलेच नसतील असं मानणं भाबडेपणाचं ठरेल. पण अशा जीवनानुभवाची पुसटशीही झलक ‘लमाण’ मधे नाही. कटु अनुभवांची उजळणी न करता, दुःख उगाळत न बसता ते खिशात घालून पुढे जातात, ते ‘सुपरमॅन’ श्रीराम लागू!

डॉक्टर ‘लमाण’ नाहीत!

डॉक्टरांचा आत्मशोध आणि जीवनचिंतन विचारात घेतलं तर त्यांनी स्वतःला लमाण म्हणवून घेणं हा निश्चितपणे त्यांच्या विनयाचा भाग आहे, असं म्हणावसं वाटतं. नाटककराचा माल प्रेक्षकाकडे नेऊन टाकणाऱ्या निव्वळ लमाणाची भूमिका डॉक्टरांनी कधीही केली नसावी.

जरी भूमिकेशी संपूर्ण तादात्म्य पावून अभिनय करणं त्यांना मान्य नसलं तरी अभिनयतंत्राचा त्यांचा अभ्यास एकंदरीत नाट्यप्रकाराची त्यांना असलेली जाण, प्रयोगावरची त्यांची पकड, आपत्काली त्या त्या लेखकाच्या शेलीत पदरचे शब्द उत्स्फूर्तपणे घालून जो संवाद पुढे नेऊ शकतो, इतक्या अप्रतिमरीत्या सिंहावलोकन करून नाट्यप्रवासाचा आलेख मांडू शकतो, त्याला ‘लमाण’ म्हणणं अन्यायकारक वाटतं.

हेही वाचा : 

तरुण संपादकांनी संपादित केलेले दिवाळी अंक

गोमंतकीय साहित्याचा ओला दुष्काळ आता दूर करायला हवा!

 युगानुयुगे तूच : महामानवाच्या जीवनाचा ठाव घेणारी दीर्घकविता

‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं

(हा लेख आजचा सुधारक या मासिकाच्या फेब्रुवारी २००५ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.)