आज मंगळवार ३० जुलै. डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी यांची १३३ वी जयंती. आपण बातम्यांमधे गेल्या काही दिवसापासून लोकसभेत महिला सहकाऱ्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरुन वाद सुरु असल्याचं वाचतोय. तर ज्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून पहिल्यांदा विधान परिषदेत पाय ठेवणाऱ्या महिलेचा काळ कसा असेल? या विचारानेच आपण सुन्न होतो, पण त्यांनी सगळी बंधन झुगारून इतिहासच रचला.
भारतीय राजकारणात आत्तापर्यंत खूपशा महिलांनी आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली. आज सरपंच, आमदार, खासदार ते राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्ष, पंतप्रधान, राष्ट्रपती अशा सर्व महत्वाच्या राजकीय स्थानावर महिला विराजमान होऊ लागल्यात. पण, महिलांच्या या सभागृहातल्या राजकारणाची नेमकी सुरवात कोणी केली माहीत आहे का? ही सुरवात केली डॉ. मुथूलक्ष्मी रेड्डी यांनी. डॉ. रेड्डी या भारतातल्या पहिल्या महिला विधिमंडळ सदस्या म्हणजे आमदार होत्या.
डॉ. मुथूलक्ष्मी रेड्डी यांचा जन्म ३० जुलै १८८६ ला तेव्हाच्या मद्रास प्रांतातील पुडुकोट्टाई संस्थानात झाला. वडील नारायण स्वामी हे चेन्नईच्या महाराजा कॉलेजचे प्राचार्य होते. तो केवळ पुरुषांनीच शिक्षण घ्यायचा काळ. महिलांचं जीवन केवळ चूल आणि मूल यापुरतंच मर्यादित. स्त्रिया या पुरुषांच्या सामाजिक गुलामीत जखडलेल्या आणि शोषणाने पिचलेल्या.
समाजाने तर स्त्रियांना बारीक सारीक हक्कसुद्धा नाकारले होते. मग स्त्री- शिक्षण तर दूरचीच गोष्ट. अशा परिस्थितीत मुथूलक्ष्मींनी मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर शिक्षणाची आवड आणि बंडखोर स्वभावामुळे पुढचं शिक्षण घ्यायचं ठरलं. त्यांची आई त्यांच्या या निर्णयाच्या मागे ठामपणे उभी राहिली.
हेही वाचा: शीला दीक्षितः काँग्रेसमधल्या एका कर्तृत्ववान पिढीचं जाणं
मुथूलक्ष्मीनी चेन्नईच्या महाराजा कॉलेजमधे प्रवेश घेतला. पुरुषांच्या महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या त्या पहिल्याच महिला होत्या. तिथून पदवी घेतल्यानंतर त्यांनी मद्रास मेडिकल कॉलेजमधे प्रवेश घेतला. तो अभ्यासक्रम पूर्ण करताना, त्यांना बरेच पुरस्कार मिळाले. त्या मद्रासच्या शासकीय मातृत्व आणि नेत्र रुग्णालयातल्या पहिल्या महिला शल्यविशारद म्हणजेच सर्जन बनल्या.
सर्जन म्हणून काम करत असताना मुथूलक्ष्मींचा संपर्क सरोजीनी नायडूशी आला. त्यानंतर त्यांनी महिलांच्या प्रश्नांसंबंधित बैठकांना हजेरी लावू लागल्या. पुढे त्यांची भेट अॅनी बेझंट आणि महात्मा गांधीजींशी झाली. त्यानंतर त्यांच्या आयुष्याने वेगळं वळण घेतलं. गांधींच्या इच्छेनुसार त्यांनी महिलांच्या हक्कासंबंधी कार्य करण्यासाठी स्वतःला वाहून घेतलं.
हेही वाचा: चे गवेराची मुलगी दिल्लीत येऊन काय बोलली?
इंग्लंडमधे उच्च शिक्षणाची संधी मिळाली होती. पण ती नाकारून त्यांनीच स्थापन केलेल्या 'वुमेन्स इंडिया असोसिएशन'च्या विनंतीवरून राजकारणात प्रवेश केला. आणि १९२६ ला त्या मद्रास विधिमंडळाच्या सदस्या बनल्या. अशाप्रकारे विधिमंडळाच्या सदस्या बनणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. त्याचवेळी त्यांची मद्रास विधिमंडळाची पहिली महिला उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. केवळ भारतातल्याच नाही तर जगातील सर्वच विधिमंडळाच्या पहिल्या महिला उपाध्यक्षा म्हणून त्यांचं नाव इतिहासात नोंदवलं गेलं.
विधिमंडळाचं काम करत असताना महिलांच्या हक्कांसंबंधी त्यांनी हिरीरीने आवाज उठवला. मद्रास प्रांतात त्यांनी देवदासी प्रतिबंध बिल पास करवून घेतलं. लग्नासाठी मुलीचं किमान वय सोळा असावं यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी महिला आणि बालकांच्या अवैध्य व्यापाराविरोधी बिल पास करवून घेतलं. आणि वेश्याव्यवसायात जबरदस्तीने ओढलेल्या अनेक महिलांना मुक्त केलं. मुस्लिम मुलींसाठी वसतिगृह, दलित मुलींसाठी शिषुवृती उपलब्ध करून दिल्या. या कार्याची माहिती त्यांनी आपल्या ‘माय एक्सपिरीअंस अॅज अ लेजिस्लेटर’ या पुस्तकात लिहिला आहे.
हेही वाचा: जेंडर इक्वॅलिटीमधे भारताला १०८ वा नंबर देणारी संस्था कोणती?
गांधीवाद प्रमाण मानून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिशांच्या विरोधात भाग घेतला. समाजसुधारणेमधेही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. भारतीय शिक्षण व्यवस्थेमधे अमुलाग्र बदल घडवणाऱ्या १९२९ मधल्या हर्टोग समितीच्या कामकाजात त्यांचं बहुमूल्य योगदान होतं. १९३१ साली त्यांनी अड्यार इथे 'अव्वाई होम'ची स्थापना केली. या माध्यमातून अनाथ मुली आणि निराधार महिलांना त्यांचा धर्म, जात, सामाजिक स्तर न विचारात घेतलं. आणि आश्रय दिला. त्यांच्या शिक्षणाची सोय केली. त्यांना आर्थिकदृष्टया स्वावलंबी करून प्रतिष्ठेसह जीवन जगण्यासाठी मदत केली.
त्यांनी 'ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स'ची स्थापना केली. त्यानी संपादिका म्हणून त्यांचं मुखपत्र रोशनीच्या माध्यमातून महिलांच्या हक्कांसंबधी विपुल लेखन केलं. त्यांनी कॅन्सर रिलीफ फंडची स्थापना केली. १९५२ साली त्यांनी अड्यार कॅन्सर संस्था स्थापना केली. त्याकाळी अशा प्रकारची कॅन्सरसंबंधी काम करणारी ती देशातील केवळ दुसरी संस्था होती. या संस्थेचं रूपांतर आज एका वटवृक्षात झालंय.
हेही वाचा: नलिनी पंडितः दलित, बहुजनांच्या वकील
डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी या भारतातल्या पहिल्या विधिमंडळ महिला सदस्य झाल्या. हे भारतीय सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामधे स्त्री समनातेकडे पडलेलं उल्लेखनीय पाऊल. त्यांच्या या जीवनकार्याची दखल घेऊन १९५६ साली त्यांना पद्मभूषण या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. १९६८ ला त्या ८१ वर्षाच्या असताना त्यांचा मृत्यू झाला.
आपलं संपूर्ण आयुष्य स्त्रियांच्या हक्कांसाठी समर्पित केलं. आणि भारतीय समाजाला एक नवी दिशा दिली. त्यांनी समाजसुधारक, स्त्रीवादी कार्यकर्त्या, लेखिका, यशस्वी राजकारणी अशा विविधांगी भूमिका पार पाडल्या. आज डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलने डुडल करून मानवंदना दिलीय. डॉ. रेड्डींनी आरोग्य क्षेत्रात दिलेल्या योगदानाचं स्मरण म्हणून तमिळनाडु सरकारकडून हा दिवस हॉस्पिटल दिन म्हणून साजरा केला जातो.
हेही वाचा:
खरंच संत नामदेव चमत्कार करायचे?
नरसी नामदेव गावात भेटलेले संत नामदेव
नामदेवांची पुण्यतिथी महाराष्ट्र आणि पंजाबमधे वेगवेगळ्या दिवशी का?
ब्राह्मणी अरेरावी आणि मुसलमानी धर्मवेड यांना आव्हान देणारे संत नामदेव
शाळेच्या पुस्तकांमधे आपण कधी जग जिंकणारे ग्लोबल संत नामदेव वाचलेत?