डॉ. जयसिंगराव पवार: इतिहासाला वर्तमानाशी जोडणारे संशोधक

३० डिसेंबर २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


इतिहास संशोधक हे प्रामुख्याने इतिहासात रममाण होणारे असतात. वर्तमानाशी त्यांचा धागा जुळतोच असं नाही. डॉ. जयसिंगराव पवार हे त्याला अपवाद म्हणता येतील. इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी देतानाच वर्तमानातल्या राजकीय, सामाजिक घटना, घडामोडींवरही बारकाईने लक्ष ठेवून असतात. त्यासंदर्भात वृत्तपत्रीय स्वरुपाचं लेखन ते करत नसले तरी समविचारी लोकांशी चर्चा करत असतात. त्याअर्थाने ते नव्या पिढीशी, नव्या प्रवाहांशी जोडून घेऊन वाटचाल करतात.

संशोधन ही सतत चालणारी प्रक्रिया असते. त्यामधे भावनेपेक्षा पुरावे महत्वाचे असतात अशी डॉ. जयसिंगराव पवार यांची धारणा आहे आणि त्यांनी त्याच धारणेनं संशोधनाचं काम केलं. नव्या पिढीला इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी देणाऱ्या इतिहास संशोधकांमधे डॉ. जयसिंगराव पवार यांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागतं.

शिवकालीन इतिहास हा त्यांच्या अभ्यासाचा, संशोधनाचा मुख्य विषय आहे. त्यांच्या आस्थेचा विषय आहे. याच इतिहासाचा भाग असलेल्या करवीर संस्थापिका ताराराणी यांचं चरित्रलेखन करून त्यांच्या कर्तृत्वाची ओळख करून देण्याची महत्त्वाची कामगिरी त्यांनी केली. त्याहीपुढे त्यांचं महत्वाचं योगदान आहे ते राजर्षी शाहू महाराजांच्या चारित्राला न्याय देण्यात. हे काम त्यांनी कृतज्ञतेच्या भावनेतून केलंय.

हेही वाचा: नागनाथअण्णा जिवंतपणी दंतकथा बनले, त्याची गोष्ट

सांगलीतलं तडसर गाव ते कोल्हापूर

सांगली जिल्ह्यातलं तडसर हे डॉ. पवार यांचं मूळ गाव. शेतकरी कुटुंबातला जन्म. त्यामुळे वडिलोपार्जित शेती करावी असे विचार त्यांच्या मनात यायचे. शेतीतच काही वेगळे प्रयोग करण्याचा ते गंभीरपणे विचार करत होते. अर्थात त्यांनी ते केलं असतं तरी तिथंही काही नवं निर्माण केलं असतं. पण त्यापेक्षा महत्त्वाचं काम त्यांच्या हातून व्हायचं होतं. कोरडवाहू शेती असल्यामुळे विहीर खोदण्याची इच्छा होती, पण आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या वडिलांना ते शक्य झालं नाही.

शालेय शिक्षण संपल्यानंतर काही घटनांमुळे सगळ्या दिशाच बदलून गेल्या. त्यांची शेती एका श्रीमंत व्यक्तीने विकत घेतली. दहावी झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी कराडला जाण्याचा विचार करू लागले. त्यासंदर्भात ते मित्रांसोबत गप्पा मारत बसले असताना त्यांचे एक शिक्षक तिथं आले. त्यांनी कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये जाण्याचा सल्ला दिला. दुसऱ्या दिवशी ते कराडऐवजी राजाराम कॉलेजमधे आले. साल होते १९५८.

राजाराम कॉलेजमधे डॉ. जयसिंगराव पवार यांच्या घडण्याला खऱ्या अर्थाने सुरवात झाली. सगळ्या मित्रांनी घेतला म्हणून त्यांनीही बी.ए.ला अर्थशास्त्र विषय घेतला, पण त्यांची काही गोडी लागेना. ते इतिहासातच रमले.  एम.ए. ला शिवाजी विद्यापीठात पहिले आले आणि तेव्हापासूनच संशोधक म्हणून कारकीर्दीची सुरूवात झाली. १९६५ साली त्यांचा इतिहासावरचा पहिला लेख प्रसिध्द झाला. तीच इतिहास संशोधक म्हणून त्यांच्या कारकीर्दीची नांदी ठरली.

शाहूविचारांनी झपाटलेलं झाड

शाहू महाराजांनी वसतिगृहं काढली नसती तर आपल्याला शिकता आलं नसतं, याची कृतज्ञ जाणीव डॉ. पवार यांच्याकडे आहे. या कृतज्ञतेपोटीच त्यांनी शाहू महाराजांच्यासंदर्भात काम करण्याचा निर्धार केला. राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ हे त्याचं मूर्त स्वरूप आहे. शाहूंचे जीवनकार्य आणि त्यांच्या कार्याच्या सर्व पैलूंची ओळख करून देण्याचं काम त्यांनी या ग्रंथातून केलंय. हिंदी, इंग्रजीसह अनेक विदेशी भाषांतूनही हा ग्रंथ प्रसिद्ध झाला आहे.

जगातील सर्व भाषांमधून हा ग्रंथ अनुवादित व्हावा आणि शाहूंच्या कार्याची महती जगाच्या कानाकोपऱ्यात पोचली पाहिजे, अशी डॉ. पवार यांची इच्छा आहे. त्यादृष्टीने अनेक पातळ्यांवर त्यांचे प्रयत्न सुरु असतात. शाहू, शाहू आणि शाहू असं शाहूविचारांनी झपाटलेलं झाड म्हणता येईल डॉ. जयसिंगराव पवार यांना. शाहूप्रेमापोटीच त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्राचे मानद संचालकपद अवघ्या एक रुपया मानधनावर स्वीकारलं. त्या केंद्रामार्फत शाहूंशी संबंधित अनेक महत्वाची पुस्तकं नव्यानं प्रकाशित केली.

हेही वाचा: गोविंद पानसरे: डोंगराला भिडणारा म्हातारा

शाहूंच्या सामाजिक कार्यावर लक्ष

राजर्षी शाहू महाराजांचा काळ हा तसा अलीकडचा काळ आहे. म्हणजे १९२२ मधे शाहू महाराजांचे देहावसान झालं. एवढ्या अलीकडच्या काळातल्या इतिहासामधेही तत्कालीन इतिहास संशोधकांनी अनेक घोळ घालून ठेवलेत. शाहू महाराजांच्यासंदर्भात अनेक कपोकल्पित कथा पसरवून त्यांचं चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. डॉ. विलास संगवे, डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. रमेश जाधव, इंद्रजित सावंत, डॉ. मंजुश्री पवार यांच्यासारख्या संशोधकांनी शाहूंच्या कार्याकडे नव्यानं लक्ष वेधलं.

त्यांचं कार्य राष्ट्रीय पातळीवर पोचवण्याचा प्रयत्न केला. डॉ. संगवे यांनी शाहूंच्या कागदपत्रांच्या खंडांचं संपादन करून कोल्हापूरच्या राजाने किती सर्वस्पर्शी आणि कल्याणकारी काम केलंय, हे जगभर पोचवलं. डॉ. जयसिंगराव पवार यांनी शाहूंच्या सामाजिक कार्यावर अधिक लक्ष केंद्रित केलं आणि त्यादृष्टीकोनातून त्यांचे कार्य जागतिक पातळीवर पोचवण्याचा प्रयत्न केला.

नव्या पिढीशी, नव्या प्रवाहांशी जोडलेतइतिहास संशोधक हे प्रामुख्याने इतिहासात रममाण होणारे असतात. वर्तमानाशी त्यांचा धागा जुळतोच असं नाही. डॉ. पवार हे त्याला अपवाद म्हणता येतील. इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी देतानाच ते वर्तमानातल्या राजकीय, सामाजिक घटना, घडामोडींवरही बारकाईने लक्ष ठेवून असतात. त्यासंदर्भात वृत्तपत्रीय स्वरुपाचं लेखन ते करत नसले तरी समविचारी लोकांशी चर्चा करत असतात. त्याअर्थाने ते नव्या पिढीशी, नव्या प्रवाहांशी जोडून घेऊन वाटचाल करतात.

ते कधीही ज्येष्ठत्वाचा आव आणत नाहीत, की उपदेशकाची भूमिका घेत नाहीत. नव्या पिढीकडून नव्या गोष्टी मनःपूर्वक ऐकून घेतात. आपल्याहून पन्नास वर्षे लहान असलेल्यांशीही मैत्रीपूर्ण संवाद साधतात. सामाजिक क्षेत्रातल्या बऱ्या-वाईट गोष्टींबद्दल चर्चा करतात. राजकारणातल्या तत्त्वहीन गोष्टींबद्दल व्यथित होतात. फॅसिस्ट प्रवृत्ती, जातीय-धार्मिक विद्वेष पसरवणाऱ्या प्रवृत्तींबद्दल संताप व्यक्त करत असतात. आणि या सगळ्याला शाहू विचारांचं अधिष्ठान असतं.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल भरभरून बोलत असतात. त्यांचं मोठेपण सांगता सांगताच त्याचा वर्तमानाशी धागा जोडून वैचारिक मशागतीचे काम करीत असतात.

हेही वाचा: शंभूराजांना औरंगजेबाच्या कैदेतून सोडवण्याचे प्रयत्न का झाले नाहीत?

कायम कार्यकर्त्याच्या भूमिकेत

डॉ. पवार यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चांगल्या कामाच्या पाठिशी उभं राहण्याचा त्यांचा स्वभाव. कोणत्याही चांगल्या कामाच्या, चांगल्या व्यक्तिच्या पाठिशी ते आपली ताकद उभी करतात. अशा ठिकाणी निमंत्रणाची वाट पाहत नाहीत. स्वतः होऊन दाखल होतात. त्यातही फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचं कार्य असेल तर ती आपली जबाबदारी आहे, असं मानून ते कार्यकर्त्याच्या भूमिकेत उभे राहतात.

पंचाहत्तरी पार केल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्लेषणात्मक इतिहास लिहिण्याचा संकल्प केलाय. ज्येष्ठ नेते गोविंदराव पानसरे यांनी त्यांच्याकडून तशी अपेक्षा व्यक्त केली होती. पानसरे यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवासमोर त्यांनी तसा संकल्प केला होता. शिवकालीन इतिहासातली चुकीची पानं फाडण्याचे काम त्यांनी यापूर्वीही केलंय. आता त्यांच्याकडून जे नवं लेखन येईल, ते स्वाभाविकच शिवकालीन इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी देईल, यात शंका वाटत नाही. हे काम त्यांच्याकडून लवकरात लवकर पूर्ण होवो, ही शुभेच्छा !!!

हेही वाचा: 

महाराष्ट्राचा महानायक : निळू फुले

राजमाता जिजाऊ म्हणजे स्वराज्याचा आधारवड

शाहू महाराजांनी खरंच ब्रिटिशांना मदत केली होती?

पश्चिम बंगालच्या रणांगणात कुणाचं पारडं होतंय जड?

कादर खान: झीरोतून हीरो बनलेला लाखमोलाचा माणूस

अनंत दीक्षित: मी अनुभवलेला पहिला संपादक जशाचा तसा

(ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या लेखवजा फेसबूक पोस्टचा हा संपादित भाग आहे)