आज शिवजयंती. शिवचरित्रातल्या नाट्यमय घटना स्वराज्यनिर्मितीची साधनं असतात. ते साध्य नाही. म्हणूनच त्यांच्या हिंदवी स्वराज्याची साध्यं म्हणजेच अधिष्ठानं कोणती होती, ते पहायला हवं. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेला निश्चित अशा प्रकारचं अधिष्ठान होतं. त्याशिवाय ते पवित्र कार्य आकाराला येऊ शकलं नसतं. त्यांच्या या अधिष्ठानाचा मागोवा शिवकालीन पत्रव्यवहार आणि आज्ञापत्रातून घ्यावा लागतो.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या संदर्भात महाराजांचं व्यक्तिमत्त्व आणि कार्यावर अगदी समकालीन आणि त्यांना सांगाती असणारा कविंद्र परमानंदापासून आजपर्यंत इतिहासकार, बखरकार, नाटककार, विचारवंत यांनी खूप लिहून ठेवलंय. शिवचरित्र सर्वांसाठी सदैव अक्षय असा अमृताचा कुंभ ठरला आहे. शिवाजी महाराजांनी जे लोककल्याणकारी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं ते काही आभाळातून पडलं नाही. ज्या शिवरायांनी ते उभारलं तेही आभाळातून एकाकी पडले नाहीत, हा इतिहासकार वि. का. राजवाडे यांचा अमूल्य विचार सदैव लक्षात ठेवावा लागेल.
शिवछत्रपतींच्या जडणघडणीत अगदी पिता शहाजी महाराज, आई जिजाबाई किंवा नेताजी पालकर, कान्होजी जेधे यांच्यासारख्या ज्येष्ठ सांगातींचा कसा सिंहाचा वाटा होता, हे अलीकडे अनेक अभ्यासक साक्षेपाने मांडत आहेत. अधिष्ठान याचा सर्वसाधारण अर्थ स्थापन करणं असा आहे. अधिष्ठान म्हणजे बैठक किंवा विचारधारा असाही अर्थ केला जातो. त्याच अर्थाने आपण शिवछत्रपतींच्या लोककल्याणकारी राज्याचं अधिष्ठान कोणतं होतं होतं, ते लक्षात घेणार आहोत.
सामान्य माणूस नेहमीच शिवछत्रपतींच्या जीवनातल्या त्यांनी रोहिडेश्वरी घेतलेली स्वराज्याची शपथ, दगाबाज अफजलखानाचा वध, बाजीप्रभू देशपांडे यांचं बलिदान, शाहिस्ताखानाची बोटे छाटणं, मिर्झाराजे जयसिंगांशी केलेला तह, आग्य्राहून सुटका, नरवीर तानाजी मालुसरे यांचं बलिदान, राज्याभिषेक, दक्षिण स्वारी यासारख्या घटनांमधे रमून जातो.
शिवचरित्रातल्या या नाट्यमय घटना स्वराज्यनिर्मितीची साधनं असतात. ते साध्य नाही. म्हणूनच आपण शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याची साध्यं म्हणजेच अधिष्ठानं कोणती होती, ते पाहणार आहोत. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेला निश्चित अशा प्रकारचं अधिष्ठान होतं. त्याशिवाय ते पवित्र कार्य आकाराला येऊ शकलं नसतं. त्यांच्या या अधिष्ठानाचा मागोवा शिवकालीन पत्रव्यवहार आणि आज्ञापत्रातून घ्यावा लागतो.
हेही वाचा: शिवरायांचं प्रतीक ही वारसदारांनी गमावलेली संधी
मराठीतले पहिले समग्र शिवचरित्रकार म्हणून कृष्णाजी अर्जुन केळूसकर यांना सन्मान द्यावा लागतो. १९०७मधे ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हा ग्रंथ प्रसिद्ध केला. या ग्रंथात शिवछत्रपतींचं हिंदवी स्वराज्य हे महाराष्ट्रापुरतं मर्यादित नव्हतं, हा विचार त्यांनी सविस्तरपणे मांडला. तोच विचार नरहर कुरूंदकरांनीही मान्य केला.
लोकप्रिय सिद्धहस्त कादंबरीकार रणजित देसाई यांच्या ‘श्रीमान योगी’ या प्रसिद्ध कादंबरीच्या प्रस्तावनेत कुरूंदकर लिहितात,‘शिवाजी महाराजांनाही आपण खास महाराष्ट्राचे आहोत याची जाणीव दिसत नाही. उलट महाराष्ट्र ताब्यात घेण्याऐवजी तो कर्नाटकात म्हणजे आजच्या तामिळ प्रदेशात गेला; पण तिथेही आपण परकीय भूमीत आलो आहोत, असं शिवाजीला कधी वाटलेलं दिसत नाही.’
स्वसमूह श्रेष्ठतावादातून काही कर्तारसिंग थत्ते यासारखे विकृत विचारवंत शिवरायांचं राज्य हे ‘टीचभर’ असल्याचं जे सांगतात, ते कसं चुकीचं आहे, हे आता लक्षात येईल. शिवछत्रपतींचं राज्य हे कसं लंकेपर्यंत जाऊन भिडलं होतं, याचे पुरावे आता नीरज साळुंखे यांच्यासारखे अभ्यासक सादर करतायत. म्हणून शिवरायांच्या लोककल्याणकारी हिंदवी स्वराज्याची व्यापकता हे त्याचं पहिलं अधिष्ठान मान्य करावं लागेल.
‘राज्यकर्ता’ या नात्याने शिवछत्रपतींनी हिंदुस्थानातल्या हिंदू-मुस्लीम संघर्षाने केलेले सखोल चिंतन आणि हा संघर्ष नष्ट कसा करता येईल, या दृष्टिकोनातून त्यांनी उचललेली पावलं. उदा. सैन्यात सर्व धर्मीयांना प्रवेश, मंदिरं, मशिदी, चर्च यांचं पावित्र्य जोपासणं. म्हणूनच यासंदर्भात त्र्यं. शं. शेजवलकर यांच्यासारखे वास्तववादी इतिहासकार ‘शिवाजी म्हणजे पाचशे वर्षांच्या हिंदू-मुसलमान लढ्याचा अन्वयार्थ समजलेला एकमेव कर्ता पुरुष, मुसलमानी संस्कृतीतली सर्व उत्तम अंगं आत्मसात केलेला एक पराक्रमी वीर, हिंदुत्वाचा नितांत अभिमान असलेला एक धर्मनिष्ठ माणूस,’ असं वर्णन करतात. हे हिंदवी स्वराज्याचं दुसरं अधिष्ठान होतं.
शिवछत्रपतींना आपण हिंदू असल्याचा जरूर अभिमान होता; पण त्यांच्या ठिकाणी असणारा हा अभिमान सहिष्णू हिंदू धर्माचा होता. त्यामुळेच त्यांच्या ठिकाणी सर्वधर्मसमभाव प्रकर्षाने दिसून येतो. किंबहुना शिवरायांची सर्वधर्मसमप्रवृत्ती हे त्यांच्या हिंदवी स्वराज्याचे सर्वांत महत्त्वाचे असं तिसरं तात्विक अधिष्ठान होतं, हे त्यांच्या जीवनकार्याचा मागोवा घेत असताना सहज लक्षात येतं. त्यामुळेच ते युद्धाच्या धामधुमीत पायदळी पडलेली कुराणाची प्रत आदरपूर्वक परत करतात.
अफजलखान स्वतःला ‘दीनदार बुत्शिकन’ म्हणजे मूर्तिभंजक असं मोठ्या गर्वाने म्हणवून घ्यायचा. त्याने हिंदू देव-देवतांची विटंबना केल्याचे पुरावे मिळतात. याउलट शिवछत्रपती मात्र मशिदी-दर्गे यांना हात लावत नाहीत. त्यामुळेच कृष्णाजी अनंत सभासद हा समकालीन बखरकार लिहितो, ‘मुलखात देव-देवस्थानं जागजाग होती. त्यास दिवाबत्ती नैवेद्य, अभिषेक स्थान पाहून यथायोग्य पाठविले. मुसलमानांचे पीर मशिदी त्यांचे दिवाबत्ती नैवेद्य शिवरायांनी स्थान पाहून पाठविले.’
हेही वाचा: राजमाता जिजाऊ म्हणजे स्वराज्याचा आधारवड
शिवछत्रपतींच्या स्वराज्याचं आणखी एक महत्त्वाचं असं चौथं अधिष्ठान म्हणजे आयुष्यभर आपल्या वेगवेगळ्या शत्रूंशी त्यांनी जो संघर्ष केला, तो धर्माधिष्ठीत असा कधीच नव्हता. त्याचं स्वरूप हिंदू विरुद्ध मुस्लीम असं केव्हाच नव्हतं. त्या संघर्षाचं स्वरूप एतदेशीय विरुद्ध परकीय असं होतं.
शिवछत्रपती विरुद्ध औरंगजेब हा संघर्ष हिंदू विरुद्ध मुस्लीम असा असता, तर मिर्झाराजे जयसिंग शिवछत्रपतींना पकडून आणण्यासाठी आले नसते. बादशहा औरंगजेबाच्या सैन्यात हजारोंनी हिंदू होते, त्याचप्रमाणे शिवछत्रपतींच्या सैन्यात असंख्य मुस्लीम होते. शिवछत्रपतींच्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान हा मुसलमान होता, तर मदारी म्हेतरसारखा निष्ठावान मुस्लीम तरुण जीवाची बाजी लावून आग्य्रामध्ये शिवछत्रपतींच्या बरोबर सावलीसारखा वावरत होता.
स्त्रियांच्या अबू्रची-शीलाची सुरक्षितता ठेवणं ही समाजाच्या संस्कृतीचं मोजमाप करणारी एक मोजपट्टी असते. शिवछत्रपतींनी हाती तलवारीसारखीच ही मोजपट्टी सदैव धारण केलेली दिसते. म्हणूनच ते कल्याणच्या सुभेदारांच्या सुनेचा यथोचित सन्मान करून तिला तिच्या सासरी पाठवतात, तर गावातल्या निराधार स्त्रीशी बदअमल करणार्या रांझेच्या पाटलाचे हातपाय तोडून त्याचा ‘चौरंग’ करण्याची अतिशय कठोर शिक्षा देतात.
अर्थात, स्त्रियांच्या शीलाचं संरक्षण प्राणपणाने करणं हे हिंदवी स्वराज्याचं पाचवं तात्विक अधिष्ठान म्हणून विचारात घ्यावं लागेल. म्हणूनच खाफिखान हा शत्रूपक्षातला इतिहासकार त्यांचा मनःपूर्वक गौरव करतो.
शिवछत्रपतींच्या समग्र जीवनकार्याचं ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर वादातून मूल्यमापन करणं योग्य ठरणार नाही, असं नरहर कुरूंदकर यांच्यासारख्या विचारवंतांना वाटतं. दुसरीकडे शेजवलकर यांच्यासारख्या विचारवंताला शिवछत्रपती हे ‘गो-ब्राह्मण प्रतिपालक’ अशी बिरुदावली कधीच लावत नव्हते, असं वाटतं.
लोकमान्य टिळकांनी १९०५ च्या पुण्यातल्या शिवाजी उत्सवामधे शिवाजी महाराजांच्या ‘गो-ब्राह्मण प्रतिपालक’ या राजवाडेनिर्मित कल्पनेची वासलात लावली होती, असं न. र. फाटक आपल्या ‘रामदार वाङ्मय आणि कार्य’ या प्रसिद्ध ग्रंथात निर्धारपूर्वक स्पष्ट करतात.
शिवछत्रपती हे कोणत्या एका जातीचे किंवा एका विशिष्ट धर्माचे नेतृत्त्व करणारे ‘राजे’ नव्हते. त्यांनी निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य हे केवळ अभिजनांचे किंवा बहुजनांचं राज्य नव्हतं. ते सर्वजनवादी असं कल्याणकारी राज्य होतं. तेच त्या राज्याचं मूलभूत असं सहावं तात्विक अधिष्ठान होतं. म्हणूनच आजही शिवछत्रपतींचं कल्याणकारी राज्य हे चिंतनाचा विषय होऊन राहिलेलं दिसतं.
हेही वाचा: या शिवजयंतीला प्रबोधनकारांचा `दगलबाज शिवाजी` वाचायलाच हवा
शिवकालात अस्तित्वात असणार्या वतनदारी पद्धतीबाबत सभासद बखर सांगते, ‘इदलशाही, निजामशाही, मोंगलाही देश काबीज केला. त्या देशात ‘मुलकाचे पाटील, कुलकर्णी यांचे हाती व देशमुखांचे हाती कुलूरयत याणी कमाविसी करावी आणि मोघम टक्का घ्यावा. हजार-दोन हजार जे गावी मिरासदारांनी घ्यावे ते गावी दोनशे तीनशे दिवाणात खंड मक्ता द्यावा. त्यामुळे मिरासदार पैकेदारी होऊन गावास हुडे, वाडे, कोट बांधून, प्यादे बंदुखी देऊन बळावले.’
सारा वसुलीच्या नावाखाली रयतेला गुलामीत ठेवू पाहणारी ही वतनदारी पद्धत पूर्ण आपल्या नियंत्रणाखाली ठेवण्याचा क्रांतिकारक निर्णय शिवछत्रपतींनी घेतला. मस्तवाल वतनदारांना त्यांनी मोलमजुरीचं स्वरूप दिलं. इतकेच नाही, तर त्यांना स्वतंत्र वाडे-किल्ले, गढ्या बांधायला बंदी केली. शिवछत्रपतींनी वतनदारीची रयतेला गुलाम बनवणारी पद्धत नष्ट करून आपलं स्वराज्य हे ‘रयतेचं राज्य’ आहे, याची ग्वाही दिली.
राजा म्हणजे ‘उपभोगशून्य स्वामी’ असतो. हे राज्य त्याच्या खासगी मालकीचं नसतं. ते केवळ रयतेचं आणि रयतेचंच असतं. म्हणूनच ते ५ सप्टेंबर १६७६ला सुभेदाराला लिहिलेल्या पत्रात सांगतात, ‘त्येणेप्रमाणे एक भाजीचा देठास तेही मनन दाखविता रास व दुरुस वर्तणे.’ हे सातवं तात्विक अधिष्ठान सदैव नजरेसमोर ठेवून शिवछत्रपतींनी स्वराज्याची धुरा वाहिली.
शिवछत्रपतींचं खाफीखानासारखा शत्रूपक्षातला इतिहासकार त्यांना अनेक दुष्ट विशेषणं लावून एकीकडे त्यांचं दानवीकरण करण्यात धन्यतः मानतो, तर दुसरीकडे स्वसमूह श्रेष्ठतावादाच्या प्रभावाखाली असणारे विचारवंत हिंदुस्थानाच्या इतिहासाच्या सहा सोनेरी पानांत विराजमान होण्याचा मान शिवछत्रपतींना न देता तो राघोबा पेशव्यांना देतात. ‘हिंदवी स्वराज्य’ हे विधिलिखित होतं. ते त्यांच्याकडून परमेश्वराने करवून घेतलं, असे सांगून शिवछत्रपतींचं दैवतीकरण करण्यात मश्गूल असतात.
शिवछत्रपतींना त्यांच्या हयातीत ‘ईश्वरी अवतार’ मानलं जात होतं, हे पुन्हा पुन्हा सांगण्यात ते हाडामासांचे ‘माणूस’ होते हे आपण विसरून जातो. त्यांनी आपल्या अंगी असणार्या प्रज्ञा आणि प्रतिभेच्या जोरावर सह्याद्रीइतकं उंच उंच असं कर्तृत्व करून अलौकिक असं लोककल्याणकारी हिंदवी स्वराज्य उभं केलं. त्याला वरच्या सप्तअधिष्ठानाचा आधार होता, हे सदैव लक्षात ठेवलं पाहिजे.
हेही वाचा:
शिवरायांच्या डच चित्राच्या दंतकथांचा पर्दाफाश
तान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं?
(दैनिक पुढारीतून साभार)