‘जनसंपर्काच्या अंतरंगा’चा सर्वंकष वेध घेणारं पुस्तक

१५ नोव्हेंबर २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिवर्सिटीच्या जर्नालिझम विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांच्या ‘जनसंपर्काचे अंतरंग’ या पुस्तकाचं प्रकाशन १४ नोव्हेंबरला सोलापूर इथं झालं. जनसंपर्क क्षेत्राविषयी एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक या निमित्ताने मराठीत आलंय. या पुस्तकाविषयी माहिती देणारा डॉ. आलोक जत्राटकर यांचा हा लेख.

डॉ. रवींद्र चिंचोलकर सर जनसंपर्काच्या संदर्भात पुस्तक लिहत आहेत, याची माहिती होती. त्यामुळे पुस्तक पूर्ण कधी होतं, याची अत्यंत उत्कंठा लागून राहिलेली होती. त्याचा कळसाध्याय म्हणजे ‘जनसंपर्काचे अंतरंग’ या पुस्तकाचं प्रकाशन.

यापूर्वी डॉ. सुरेश पुरी यांनी १९८४ला ‘जनसंपर्क: संकल्पना आणि सिद्धांत’ हे जनसंपर्काविषयी मराठीतलं पहिलं पुस्तक लिहीलं. तेच आजपर्यंत पत्रकारिता आणि जनसंपर्काचं शिक्षण-प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पिढ्यांनी संदर्भासाठी वापरलं. मराठीत डॉ. पुरी यांच्या या पुस्तकानंतर सुमारे ३६ वर्षांनी जनसंपर्काविषयी आलेलं सकस आणि दर्जेदार पुस्तक म्हणजे डॉ. चिंचोलकर सरांचं ‘जनसंपर्काचं अंतरंग’ होय. ही दोन पुस्तकं म्हणजे मराठीतली जनसंपर्क या विषयामधला मैलाचा दगड ठरावीत, अशी आहेत.

हेही वाचा: वाचकानं सजगपणे वाचन संस्कृती कशी घडवावी?

या पुस्तकाच्या निमित्ताने एक फार महत्त्वाचा योगायोग घडून आला आहे. पुरी सरांच्या पुस्तकाला त्यांचे गुरू डॉ. सुधाकर पवार यांची प्रस्तावना लिहिलीय. तर, चिंचोलकर सरांच्या या पुस्तकाला त्यांचे गुरू डॉ. सुरेश पुरी यांची प्रस्तावना आहे. आधुनिक काळात गुरू-शिष्य परंपरा जोपासनेचं यापेक्षा अधिक सकारात्मक उदाहरण दुसरं कोणतं बरं असेल?

एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की, पत्रकारिता किंवा जनसंपर्क ही क्षेत्रं अनुभवाधिष्ठित आहेत. पत्रकारांच्या, प्रॅक्टीशनर्सच्या अनुभवातून या ज्ञानक्षेत्रांचा विस्तार झाला आहे. डॉ. चिंचोलकर यांच्या या पुस्तकालाही त्यांच्या अनुभवाचा भरभक्कम पाया लाभल्यानं त्याची मांडणी अतिशय संवादी झालेली आहे. पुरी सरांनी त्यांच्या प्रस्तावनेमधे, चिंचोलकर सरांनी ज्या संघर्षमय परिस्थितीतून शिक्षण पूर्ण केले, त्याचा उल्लेख केलेला आहे.

चिंचोलकर सरांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात दहा वर्ष रिपोर्टर, आवृत्ती प्रमुख अशा जबाबदाऱ्या यशस्वीपणे पेलल्या. त्यानंतर जळगावच्या बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र युनिवर्सिटीचे पहिले जनसंपर्क अधिकारी म्हणून बारा वर्षांहून अधिक काळ काम केलं. ऑक्टोबर २००८पासून ते सोलापूर युनिवर्सिटीच्या जर्नालिझम विभागाचे प्रमुख म्हणून रुजू झाले. सरांच्या या समग्र वाटचालीतल्या अनुभवाचा अर्क त्यांच्या पुस्तकामधे उतरल्याचं आपल्याला दिसतं.

पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना सैद्धांतिक ज्ञान आवश्यक आहेच; मात्र फिल्ड वर्क आणि पत्रकारिता, जनसंपर्क क्षेत्रातल्या प्रत्यक्ष कामाचा अनुभव त्याहूनही अधिक महत्त्वाचा असतो. बातमी लेखनापासून ते संपादनाच्या विविध प्रक्रिया, उत्तम जनसंपर्कासाठी आत्मसात करायच्या नेमक्या गोष्टी, आपत्कालीन स्वरुपाच्या परिस्थितीत घ्यायचे निर्णय अशा अनेक गोष्टी क्रमिक पुस्तकांतून वाचून शिकणं आणि प्रत्यक्ष फिल्ड वर्क केलेल्या व्यक्तीच्या तोंडून समजावून घेणं यात फरक आहे. या कामातल्या खाचाखोचा, अचानक आलेल्या अडचणी, त्यावर मात करण्यासाठी करायचे प्रयत्न याची माहिती सर्वांगीण अनुभवसिद्ध शिक्षक उत्तम प्रकारे देऊ शकतो. डॉ. चिंचोलकर सरांनी त्या अनुभवाचा पुरेपूर वापर करून या पुस्तकाचं लेखन केलंय.

अगदी मुखपृष्ठापासूनच त्याची सुरवात झालेली आहे. सर्व माध्यमं- अगदी उपग्रहापर्यंतची अत्याधुनिक साधनं भोवतीने आहेत. मात्र, त्यांच्या केंद्रस्थानी माणूसच आहे. सगळी माध्यमं, समस्त जनसंपर्क यांचा आटापिटा कशासाठी? तर, मानवाची संवादाची भूक भागवण्यासाठी. संवाद नसेल, तर माणूस वेडा होऊन जातो. लॉकडाऊनच्या काळात सर्वांनीच त्याचा अनुभव घेतला आहे.

हेही वाचा: पुस्तक माणसाला कसं घडवतं?

ऑनलाईन, वर्चुअल माध्यमांद्वारे कितीही संवाद साधा; प्रत्यक्ष संवादाची उत्कटता त्याला कधीही लाभणार नाही. पूर्वी आपण म्हणायचो, पारंपरिक शिक्षणाचं भवितव्य ऑनलाईन शिक्षण आहे. आपलं विधान अर्धसत्य असल्याचं या काळात सिद्ध झालं. पारंपरिक शिक्षणाला ही माध्यमं पूरक म्हणूनच उत्तम काम करतील, असं आता चित्र आहे. अशा प्रकारे माणसाचं संवाद प्रक्रियेतलं मध्यवर्तीपण अधोरेखित करतच डॉ. चिंचोलकर त्यांच्या जनसंपर्काच्या अंतरंगाची मांडणी करताना दिसताहेत.

जनसंपर्काची प्रक्रिया आणि स्वरुप या गोष्टी अतिव्यापक आहेत. केवळ बोलणं, संवाद साधणं अगर माहिती देणं असा जनसंपर्क व्यवसायाचा संकुचित अर्थ आजही काढला जातो. स्वाभाविकपणे जनसंपर्काचा अर्थ तिथं मर्यादित राहतो. त्याचप्रमाणे जाहिरात, विक्री, विपणन, उत्पादन वृद्धी, प्रेस एजंट्री, प्रसिद्धी या संकल्पनाही जनसंपर्कसदृश समजल्या जातात. मात्र, जनसंपर्काची संकल्पना ही त्याहून वेगळी आणि या सर्वच गोष्टींना कमीअधिक प्रमाणात सामावून घेणारी आहे.

या सर्व गोष्टींचा अंतर्गत आणि बाह्य घटकांमधे सुसंवाद प्रस्थापित करण्यासाठी वापर करून अंतिमतः संस्थेच्या हितास्तव व्यापक सामाजिक स्तरावर दूरगामी सदिच्छा प्रस्थापना करणं, यासाठी जे सकारात्मक वस्तुनिष्ठ प्रयत्न केले जातात, त्याचा जनसंपर्काच्या कक्षेत समावेश होतो. जनसंपर्काचं क्षेत्र हे तुलनेत आधुनिक आहे. गेल्या शतकभरात त्याचा संकल्पनात्मक, सैद्धांतिक आणि क्षेत्रीय विकास आणि विस्तार झाला आहे. शासकीय विभागांसह खासगी उद्योग-व्यवसायांनी जनसंपर्काचा अंगिकार करून आपली प्रगती साधलेली असल्याचं आपल्याला दिसतं.

जनसंपर्काच्या विविध पैलूंचा साकल्याने वेध घेण्याचं काम ‘जनसंपर्काचे अंतरंग’ या पुस्तकातून डॉ. चिंचोलकर यांनी केलंय. अत्यंत मुद्देसूद आणि तपशीलवार मांडणी, त्याच्या जोडीला समजावून सांगण्याची संवादी, प्रवाही शैली आणि त्याला पूरक फोटो, रेखाचित्रं यांचा सुरेख मेळ घालत त्यांनी हे पुस्तक साकारलं आहे.

या पुस्तकात एकूण ४४४ पानांमधे नऊ प्रकरणांची मांडणी करण्यात आली आहे. जनसंपर्काचा उदय आणि विकास, जनसंपर्क: संकल्पना आणि सिद्धांत, जनसंपर्क आराखडा, जनसंपर्काची माध्यमं, जनसंपर्काची साधनं आणि लेखन तंत्रं, जनसंपर्काच्या व्यावसायिक संस्था आणि आचारसंहिता, जनसंपर्काची विविध क्षेत्रं, कॉर्पोरेट संवाद आणि जनसंपर्क संशोधन अशी ही अगदी क्रमवार प्रकरणं आहेत.

हेही वाचा: गाथासप्तशती: प्रत्येक घरात असावा असा मराठीतला आद्यग्रंथ

जनसंपर्काच्या सुरवातीपासून ते समकाळातल्या जनसंपर्क क्षेत्राच्या डिजीटल विस्तारापर्यंत सर्वंकष वेध लेखकाने घेतलाय. पारंपरिक, प्रस्थापित माध्यमांबरोबरच नवमाध्यमांच्या आधारे जनसंपर्क कसा साधावा, याचं दिग्दर्शनही यात त्यांनी केलंय. विद्या बुक पब्लिशर्सचे प्रकाशक शशिकांत पिंपळापुरे यांनी निर्मितीमूल्यांच्या बाबतीत कुठंही तडजोड केलेली नाही, याचाही उल्लेख करणं आवश्यक आहे.

जागतिक स्तरावरच्या पी.टी. बार्नम यांच्यापासून ते आयवी लेड बेटर ली, वॉल्टर लिपमन, जॉर्ज क्रील, एडवर्ड बार्नेस यांच्या योगदानाचा आढावा तर या पुस्तकात घेण्यात आला आहेच; शिवाय, भारतीय परिप्रेक्ष्यात सम्राट अशोक यांनी शिलालेख, स्तंभ या माध्यमातून तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांची राजमुद्रा, विविध हुकूमनामे यांद्वारे प्रस्थापित केलेल्या जनसंपर्काचाही गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला आहे.

भारतीय जनसंपर्काचे जनक म्हणून महात्मा गांधी यांचा सार्थ गौरव करत असतानाच भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचीही जनसंपर्काच्या अंगाने त्यांनी केलेली मांडणी मुळातूनच वाचण्यासारखी आहे. फाळके यांनी सिनेमाध्यमाच्या प्रसारासाठी जनसंपर्काच्या वापरलेल्या विविध क्लृप्त्यांचा वेध यात घेतला आहे. विशेषतः डॉ. आंबेडकर यांच्या संदर्भातली मांडणी अतिशय लक्षणीय स्वरुपाची आहे.

कोणत्याही ज्ञानशाखेची वृद्धी आणि विस्तार या गोष्टी त्या क्षेत्राशी निगडित उपलब्ध असणारं संदर्भ साहित्य आणि त्या क्षेत्रात सुरू असणारं संशोधन यावर अवलंबून असतात. पत्रकारिता आणि जनसंपर्काचं क्षेत्रही त्याला अपवाद नाही. मराठीमध्ये या संशोधन सिद्धांतांचा गांभीर्यपूर्वक मांडणीचा मोठा अभाव होता. ही उणीव या पुस्तकामधे चिंचोलकर सरांनी भरून काढली आहे. जनसंपर्क आराखडा, संशोधन, सर्वेक्षण प्रकार, जनसंपर्क मोहीम, उपक्रम मूल्यमापन, आशय विश्लेषण अशा सर्व संशोधकीय गोष्टींचा परिचय पुस्तकात सविस्तर करून देण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे शासकीय, कॉर्पोरेट, वित्तीय, शैक्षणिक, स्वयंसेवी संस्था, आरोग्य, संरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्था आणि राजकीय अशा सर्व क्षेत्रांमधल्या जनसंपर्काचा वेधही सरांनी घेतलेला आहे. हा वेध घेत असताना त्या त्या क्षेत्रातली अनेक समकालीन उदाहरणं देऊन स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यातली क्लिष्टता जाऊन विषय समजावून घेणं सोपं झालंय. शैक्षणिक जनसंपर्काच्या संदर्भात शिवाजी युनिवर्सिटीच्या महापूर काळातल्या सामाजिक कामाचाही पुस्तकात गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे.

हे पुस्तक पत्रकारिता आणि संवादशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी प्रचंड उपयुक्त ठरणारं आहेच; पण त्याचबरोबर विविध शासकीय, खासगी आस्थापना, संस्था, उद्योग-व्यवसाय यांनाही आदर्श जनसंपर्क कशा प्रकारे असावा, याचं मार्गदर्शन करणारं आहे. आजच्या माध्यमांनी घेरलेल्या काळात उत्तम जनसंपर्काची आवश्यकता प्रत्येकालाच वाटू लागली आहे. संस्थाच नाही, तर सेलिब्रिटी नसलेल्या सर्वसामान्य व्यक्तीला सुद्धा व्यक्तीगत पातळीवर आपला जनसंपर्क वृद्धिंगत करण्याची, आपली स्वतंत्र ओळख, छबी निर्माण करण्याची आस लागलेली आहे. या पुस्तकाच्या आधारे ही गोष्ट सहजसाध्य आहे.

हेही वाचा: पाचवीला पुजलेल्या प्लेग लॉकडाऊनमुळेच जगाला शेक्सपिअर मिळाला!

खरं तर, या पुस्तकाला केवळ क्रमिक पुस्तक म्हणणं, त्याच्यावर अन्याय करणारं ठरेल. कारण जनसंपर्क ही पुस्तकात कमी आणि व्यवहारात अधिक अंमलात आणायची संकल्पना आहे. जनसंपर्क जितका प्रभावी, तितकी उत्तम प्रतिमा निर्मिती असं थेट समीकरण आहे. म्हणूनच माध्यमकर्मी, जनसंपर्क व्यावसायिक, जनसंपर्काचे शिक्षक, विद्यार्थी यांच्यासह जनसंपर्काची आस असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हाती हे पुस्तक असलंच पाहिजे, असं त्याचं स्वरुप आहे.

या पुस्तकाचं गुणवैशिष्ट्य अगदी एका शब्दात सांगायचं तर ‘समग्रता’ हाच शब्द त्याला लागू पडेल. जनसंपर्काचे सर्व घटक, सर्व बाजू यांचा साकल्याने वेध त्यात आहे. पण, त्या समग्रतेला पृष्ठसंख्येच्या मर्यादा पडल्यामुळे अनेक संकल्पनांना धावता स्पर्श करावा लागलेला आहे. यातल्या जवळपास प्रत्येक संकल्पनेवर एकेक पुस्तक होईल, अशी त्यांची व्याप्ती आहे. इंग्रजीत तशी ती आहेतही. मराठीत मात्र आता तशा प्रकारची पुस्तकं निर्माण होण्याची गरज या पुस्तकामुळे नव्याने अधोरेखित झालेली आहे.

एकूणातच, जनसंपर्काविषयी मराठीमधे एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक ‘जनसंपर्काचे अंतरंग’ या पुस्तकाच्या रुपाने दाखल होतंय. इथून पुढच्या काळात महाराष्ट्रातल्या सर्व पत्रकार, शिक्षण संस्था, युनिवर्सिटी, विद्यार्थी यांना या पुस्तकाचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. जनसंपर्क व्यावसायिक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी तर एक महत्त्वाचा दस्तावेज मातृभाषेत उपलब्ध होतो आहे. हे सर्वच घटक चिंचोलकर सरांच्या या पुस्तकाचं स्वागत केल्याशिवाय राहणार नाहीत, याची खात्री आहे.

पुस्तकाचं नाव: जनसंपर्काचे अंतरंग
लेखक: डॉ. रवींद्र चिंचोलकर
प्रकाशन: विद्या बुक्स पब्लिशर्स, औरंगपुरा, औरंगाबाद
पानं: ४४४
किंमत: ५००/-

हेही वाचा: 

आगळ ही कादंबरी गाव आणि शहर यांच्यातला संवादसेतू

युगानुयुगे तूच : महामानवाच्या जीवनाचा ठाव घेणारी दीर्घकविता

एक शून्य प्रतिक्रियाः जगणं आणि लिहिण्यातल्या शून्य अंतराची कविता

‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं