इंडियन आयडॉल १२ च्या एका एपिसोडमधे आदित्य नारायणने 'हम अलिबाग से आए हैं क्या?' असं वाक्य उच्चारलं. त्यावरून मनसेचा एक पदाधिकारी भडकला. त्याने फेसबुक लाइव करत थेट कानाखाली आवाज काढण्याची भाषा केली. कुणालाही अपमानास्पद वाटेल, असं बोलणं टाळावं हे खरं असलं तरी ऊठसूट निषेधाच्या पाट्या घेऊन हिंडू लागलो तर जगण्यातली मजाच निघून जाईल.
पुन्हा एकदा अलिबाग चर्चेत आलंय. इंडियन आयडॉल १२ च्या एका एपिसोडमधे आदित्य नारायणने 'हम अलिबाग से आए हैं क्या?' असं वाक्य उच्चारलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका पदाधिकाऱ्याने फेसबुक लाइव करून त्याचा निषेध केला आणि पुन्हा असं वाक्य कानावर पडलं तर फेसबुक लाइव करणार नाही, तर थेट कानाखाली आवाज काढेन, असा इशारा दिला. त्यानंतर आदित्य नारायणने जाहीरपणे माफी मागितली वगैरे.
मागे मराठी बिग बॉसमधेही अभिनेता नंदकिशोर चौगुलेने 'मी अलिबाग वरून आलोय का?' असं वाक्य उच्चारल्यामुळे त्यालाही अनेकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. मार्च २०१९ मधे यासंदर्भात हायकोर्टातही एक याचिका दाखल झाली होती. 'अलिबाग से आया है क्या' या वाक्यावर बंदी घालण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली होती. महाराष्ट्रात कुणालाही मूर्ख ठरवण्यासाठी या वाक्याचा उपयोग केला जातो, असं याचिकेत म्हटलं होतं.
ती फेटाळताना हायकोर्टानं म्हटलं होतं की, `न्यायालयाला यात काहीही अपमानजनक वाटत नाही. पूर्वीपासून काही समुदायांवर विनोद, चुटके केले जातात. संता-बंताचे विनोद आहेत. मद्रासी माणसांवरचे विनोद आहेत. ते विनोदातच घ्यायला पाहिजे. अशा गोष्टींवरून अपमानास्पद वाटून न घेता ते गंमतीनं घ्यायला पाहिजे.`
एकूण न्यायालयानं सहिष्णू होण्याचा सल्ला दिला होता. कुणालाही अपमानास्पद वाटेल, असं बोलणं टाळावं हे खरं असलं तरी ऊठसूट निषेधाच्या पाट्या घेऊन हिंडू लागलो तर जगण्यातली मजाच निघून जाईल. बोली व्यवहारात जातीवाचक, लिंगवाचक अनेक वाक्प्रयोग आहेत.
हिणकस जे काही असेल ते टाकून टाकायला हवं. पण बोलण्याच्या ओघातल्या प्रत्येक शब्दावरून तलवारी काढण्याची आणि कानाखाली आवाज काढण्याची भाषा केली जाऊ लागली तर एकूण जगण्यातला कर्कशपणा वाढत जाईल.
हेही वाचा: चला आता आपण राज ठाकरेंना प्रश्न विचारुया
मी मुंबईत आल्यानंतर हे अलिबाग प्रकरण माझ्या कानावर आलं. त्यावरून सहज विचार करताना त्यामागचं सूत्रही माझ्या लक्षात आलं. अलिबाग हे केवळ गाव नाही, तर प्रत्येक मोठ्या गावाजवळच्या छोट्या गावाचं प्रातिनिधिक उदाहरण आहे. हा अलिबागचा धागा मला थेट माझ्या गावी घेऊन गेला.
आमच्या गावाजवळ सोंडोली नावाचं गाव आहे. आमचं चरण सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यात आणि सोंडोली कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यात. मधे वारणा नदी. त्यामुळं दोन जिल्हे. पलीकडच्या गावात पाहुण्या पै चे संबंध नसलेलं एकही घर दोन्ही गावात सापडायचं नाही इतकी दोन्ही गावांची जवळिक.
आमचं गाव बाजारपेठेचं, त्यामुळं आपण शहरी किंवा पुढारलेले असल्याचा अनेकांना अहंकार. त्यामुळं सोंडोलीच्या माणसांना येडपट, अडाणी, मूर्ख मानायचे. तसा दोन्हीकडच्या वर्तन व्यवहारात गुणात्मक फरक फारसा नव्हता. प्रत्येक गावाची बोलण्याची एक लकब असते, तसं सोंडोलीचे लोक बोलताना 'ईची भनं' पासून वाक्य सुरु करायचे. तर त्यांना हिणवण्यासाठी आमच्या गावातले काही दीड शहाणे 'ईची भनं' शब्द वापरायचे.
आम्ही शाळेत असताना सोंडोलीकरांच्या अडाणीपणाचे दोन किस्से सांगितले जात. एकदा म्हणे एका लग्न समारंभाच्या निमित्ताने गॅस बत्ती पेटवली होती. त्यावेळी गॅसबत्ती हेच लग्नातल्या उजेडाचं साधन असायचं, तर ती बत्ती भडकली. पेटवणाऱ्याला आणि अवतीभवती जमून तो बत्ती पेटवण्याचा सोहळा कुतूहलानं पाहणाऱ्यांना ते सगळं नवीन होतं.
बत्ती भडकताच त्यातल्या एकानं 'आरं भाया बत्ती पिसाळली` म्हणून तिच्यावर काठ्या मारायला सुरवात केली. ते बघून बाकीच्यांनीही काठ्या हाणल्या आणि बत्ती फोडून टाकली. आणखी एक किस्सा पाणी उपशासाठी बसवलेल्या डिझेल इंजिनचा सांगितला जायचा. इंजिन बसवताना फाउंडेशन चुकले. इंजिनची चाकं जमिनीवर टेकली आणि त्यामुळे म्हणे इंजिन धावायला लागले.
लोक काठ्या घेऊन `इंजान पिसाळलं, इंजान पिसाळलं` म्हणत काठ्या घेऊन इंजिनच्या माग धावू लागले. हे दोन्ही किस्से काल्पनिक असावेत असा माझा अंदाज आहे. पण चरणकरांनी सोंडोलीकरांना मूर्ख ठरवण्यासाठी त्यांचा खूप वापर केला.
मोठ्या गावातल्या लोकांनी छोट्या गावातल्या लोकांना मूर्ख ठरवण्याची सुरवात अशी माझ्या गावापासून मी पाहिली. सोंडोली गावातले अनेक मित्र आज वेगवेगळ्या क्षेत्रात, मोठमोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहेत, तरीसुद्धा या गावाबद्दलची माझ्या गावातल्या लोकांची मानसिकता बदलली आहे असं वाटत नाही.
हेही वाचा: गुजरात भेटीनंतर राज उतरणीला लागले, तेच उद्धव यांचं होणार?
पुढं कोल्हापूरला कॉलेजला आलो. इथंही तोच प्रकार बघायला मिळाला. कोल्हापूरजवळ वडणगे म्हणून गाव आहे. कोल्हापुरातून रत्नागिरीकडं जाताना पंचगंगा नदी ओलांडल्यावर लगेच उजवीकडं पहिला फाटा लागतो तो वडणग्याचा. इतकं कोल्हापूरच्या जवळ. त्यामुळं गावाचा सगळा व्यवहार कोल्हापूरशी. मोठं गाव आहे. विधानसभा निवडणुकीत निर्णायक ठरतील एवढं मतदान या गावात आहे.
कोल्हापूर जवळ असलं तरी कृषिसंस्कृती जोपासणारं असल्यामुळं ग्रामीण बाज टिकवून ठेवलाय. कुठल्याही शहरातल्या लोकांमधे खेड्यातल्या धोतर मुंडासेवाल्या लोकांची जरा खिल्ली उडवण्याची खुमखुमी असतेच. चेष्टा करण्यासाठी गिऱ्हाईक हवं असतं. शेजारच्या खेड्यातली माणसं हेच त्यांचं गिऱ्हाईक असतं.
कोल्हापूरकरांसाठी वडणगेकर हा चेष्टेचा विषय होता. आजही आहे. एखाद्याला मूर्ख ठरवण्यासाठी `वडणग्यास्नं आलायास काय?` ` वडणग्याचा आहेस काय?` असं म्हटलं जातं. वडणगे गावाचा उच्चार वडिंगे असाही केला जातो. तर सोंडोली, वडणग्याचाच धागा पुढं अलिबागपर्यंत येतो.
चरणकरांना सोंडोलीकर मूर्ख वाटतात. कोल्हापूरकरांना वडणग्याचे लोक मूर्ख वाटतात, तसंच मुंबईकरांना अलिबागचे मूर्ख वाटतात. ही सगळी मानसिकता सारखीच आहे. मुंबई मोठं शहर असल्यामुळं आणि इथल्या प्रत्येक गोष्टीची बातमी होत असल्यामुळं अलिबागची अधिक चर्चा होते एवढंच.
खरंतर मला अलिबाग आणि अलिबागचा नितळ समुद्रकिनारा खूप आवडतो. आपलं गाव असं पाहिजे होतं असं अनेकदा वाटतं. एवढ्या सुंदर गावातल्या लोकांना कुणी विचारलं, 'अलिबाग से आया है क्या?' तर विचारणाऱ्याचा हेतू काही असला तरी अभिमानानं सांगाव 'होय मी अलिबागचा' एवढं सुंदर आहे अलिबाग!
हेही वाचा: आंखी दास यांच्या फेसबूक राजीनाम्याच्या निमित्ताने
अलिबागचा हा धागा पार पुढे राजधानी दिल्लीपर्यंत जातो. माझ्या मुलीने अक्षराने एनडीटीवीमधून ब्रॉडकास्ट जर्नालिझमचा डिप्लोमा केला. एक वर्षाचा अभ्यासक्रम होता. ती दिल्लीहून परत आल्यानंतर वर्षभरानंतर आम्ही दिल्लीला गेलो होतो. एनडीटीवी इंडियामधे कार्यकारी संपादक प्रियदर्शन माझे मित्र आहेत.
अक्षरा आणि मी एनडीटीवीच्या ऑफिसमधे त्यांना भेटायला गेलो. प्रियदर्शन मला आणि तिला ओळखत होते. पण इंटर्नशिप करणारी मुलगी तशी इतर कुणाच्या लक्षात राहण्याचं कारण नाही. त्यांनी तिच्याकडं निर्देश करत आपल्या दुस-या एका सहकाऱ्याला विचारलं, `हिला ओळखलंत का?` त्यावर ते म्हणाले, `हिला कोण विसरेल?` आणि हसले. त्यावर कळलेला एक किस्सा मजेदार होता.
तेव्हा एनडीटीवीच्या ऑफिसमधेच एका कोपऱ्यात इंटर्नशिप करणारे दोघे तिघे आणि ऑफिसचे एक दोन सीनिअर चहा पीत बोलत उभे होते. तर गप्पा मारताना एका इंटर्न मुलाला दुसरा एकजण काहीतरी चुकीची माहिती देऊन गंडवण्याचा प्रयत्न करत होता. ते अक्षराच्या लक्षात आल्यावर ती त्याला पट्कन म्हणाली, `अरे ये लोग तुझे बिहारी बना रहे हे` आणि हे वाक्य तिनं एवढ्या मोठ्यानं उच्चारलं होतं, की सगळं ऑफिस एकाएकी शांत झालं आणि पाठोपाठ हास्यकल्लोळही उडाला.
प्रियदर्शन मला म्हणाले, `ज्या एनडीटीवीच्या ऑफिसमधे नव्वद टक्के बिहारी लोक आहेत, तिथं मधोमध उभं राहून एक मराठी मुलगी `तुझे बिहारी बना रहे म्हणते. तिला कोण कसं विसरेल?` ते ऐकत असतानाच माझ्या सोंडोलीपासून सुरू झालेल्या साखळीला आणखी एक कडी मिळाली.
राजधानी दिल्लीतले लोक एखाद्याला मूर्ख संबोधण्यासाठी बिहारी म्हणतात. अवघे पाच सात महिने दिल्लीत राहिलेल्या माझ्या मुलीच्या मनातही ते पक्कं बसलं होतं. मुंबईत आलेला कुणीही दोनचार महिन्यात सहजपणे एखाद्याला, अलिबाग से आया है क्या असं म्हणतो. कोल्हापुरात आलेला सांगली साताऱ्याकडचा कुणी चार महिन्यात एखाद्याला, वडिंग्यासनं आलायस काय असं म्हणू शकतो. तसंच दिल्लीत बिहारच्या लोकांना मूर्ख मानतात.
खरंतर कुणी कुणाला मूर्ख समजण्याचं कारण नाही. कुणी शहाणपणाचा मक्ता घेऊन जन्माला आलेलं नसतं. दुसऱ्याला मूर्ख म्हटलं म्हणून स्वतःचं शहाणपण सिद्ध होत नाही. हे खरं असलं तरीसुद्धा बोली भाषेतल्या सहज संवादांवरून एकदम टोकाची भाषा करण्याचंही कारण नाही. थोडं सहिष्णू होण्याची आवश्यकता आहे.
समजा उद्या एखाद्या सभेत, `आम्हाला मूर्ख समजता काय, आम्ही काय अलिबागवरून आलोय?` असं बोलण्याच्या ओघात राज ठाकरेच बोलले तर काय करणार?
हेही वाचा:
हत्ती आणि गाढव अमेरिकेच्या राजकारणात आले कसे?
प्रबोधनकारांच्या पत्रकारितेविषयी आपल्याला काय माहितीय?
जोतिबाच्या नावानं चांगभलं ही संपूर्ण मानवजातीच्या भल्याची मागणी
बाळासाहेब ठाकरेंनी सेक्युलर पक्षांबरोबर २२ वेळा केली होती दोस्ती
(विजय चोरमारे ज्येष्ठ पत्रकार असून हा लेख त्यांच्या फेसबुक पोस्टमधून साभार)