कोरोनाच्या साथीचे परिणाम आणि दुष्परिणाम पुढेही सगळ्याच क्षेत्रात अनुभवावे लागतील. आताच आपला कम्फर्ट झोन नाहीसा झालाय. एकप्रकारची हतबलता आणि भीती सगळीकडे आहे. पुढे नेमकं काय होणार, आयुष्य कसं असणार, असे विचार सतत मनात येतात. ज्यांना अस्वस्थतेचे, नैराश्याचे आजार आहेत त्यांचे आजार वाढतायंत. ज्यांना नाहीत त्यांच्यात ते निर्माण होतायंत. होत राहतील. या परिस्थितीत सकारात्मक, आनंदी दृष्टिकोनच आपल्याला आणि लहान मुलांसह तरुण पिढीला सक्षम बनवेल.
आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, आपलं सुखी आणि आनंदी असणं ठरवतो. दोन काळ्याकुट्ट रात्रींमधे एक दिवस असतो, असा एखाद्याचा दृष्टिकोन असू शकतो आणि दोन दिवसांमधे एक रात्र असते. ती संपली की पुन्हा एक स्वच्छ लखलखीत, सोनसळसळीत दिवस असणारच आहे, असंही कुणी म्हणत असतं. असं म्हणणार्याचा दृष्टिकोन आनंदी, सकस, सकारात्मक ठरेल. हीच गोष्ट कुठल्याही गोष्टीकडे पाहण्यासाठी आणि आनंदाने राहण्यासाठी आवश्यक असते.
हेही वाचा: उगवत्या वर्षात नुसतं न्यू नॉर्मल नको, ‘न्यू निर्भय’ही हवं!
आताची सर्वार्थानं कठीण अशी कोरोना वायरसच्या साथीची परिस्थिती आणि त्यानंतरचा भविष्यकाळ याचं सावट, मळभ मनात दाटून येणं स्वाभाविक आहे; पण ही वेळही जाईल. आकाश स्वच्छ होईल. हाच सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला सध्याच्या कोरोनाच्या काळात ठेवावा लागणार आहे. इतकंच नाही, तर लहान मुलांमधे रुजवावा लागणार आहे. कोरोनाच्या महाभयानक साथीचे परिणाम आणि दुष्परिणाम ही साथ चालू असताना आणि पुढेही व्यक्तिगत, आर्थिक, सामाजिक, सगळ्याच क्षेत्रांत अनुभवावे लागणार आहेत.
आताच आपला कम्फर्ट झोन नाहीसा झालाय. एकप्रकारची हतबलता आणि भीती सगळीकडे आहे. पुढे नेमकं काय होणार, आयुष्य कसं असणार, असे विचार सतत मनात येतात. ज्यांना अस्वस्थतेचे, नैराश्याचे आजार आहेत त्यांचे आजार वाढताहेत. ज्यांना नाहीत त्यांच्यात ते निर्माण होताहेत. होत राहतील. या परिस्थितीत सकारात्मक, आनंदी दृष्टिकोनच आपल्याला आणि लहान मुलांसह तरुण पिढीला सक्षम बनवेल.
हांस सेले या विचारवंताचं एक छान वाक्य आहे. Adopting a right attitude can convert a negative stress into a positive one. आणि ते अगदी खरं आहे. आज नकारात्मक तणाव नियोजनाची नितांत गरज भासू लागलीय. हल्ली कॉर्पोरेट, मीडिया, कॉलेजचे विद्यार्थी आणि सर्वच क्षेत्रांमधे ताणतणावाचं नियोजन न करता आल्यामुळे अस्वस्थतेच्या आजारांमधे मोठ्या प्रमाणावर वाढ होतेय.
प्रत्येक व्यक्तीची स्वभावाची जडणघडण, तणाव पेलण्याची क्षमता, परिस्थितीला रियाक्ट होण्याची पद्धत, भावनिक समतोल वेगळा असतो. त्यामुळे ताणतणावाची शारीरिक आणि मानसिक दुष्परिणामांची तीव्रता वेगळी असू शकते; पण शेवटी तणावांमुळे शरीरात होणार्या cortisol, adrenalin आणि इतर घातक संप्रेरकांचे दुष्परिणाम होतातच. त्याचबरोबर मेंदूतील serotonin आणि norepinephrine या neurotransmitters मधे असंतुलन निर्माण होतं. ज्यामुळे अस्वस्थतेच्या आजाराला निमंत्रण मिळतं.
याची शारीरिक, मानसिक आणि वर्तणुकीतील लक्षणं दिसायला लागतात, ज्याची नोंद वेळेवर घेणं गरजेचं असतं. बदलत्या समाजव्यवस्थेमधे व्यक्तींवर अपरिमित ताणतणाव असतात. या ताणाचे स्रोत विविध प्रकारचे असतात. व्यक्तिगत, कौटुंबिक, कॉलेजअंतर्गतचे, डिपार्टमेंटअंतर्गतचे, राजकीय, सामाजिक आणि समाजव्यवस्थेचे. त्यातच अनियमित ड्युटीच्या वेळा, जेवणाच्या वेळा, अभ्यासाच्या वेळा, सबमिशन्सच्या वेळा, जागरणे, सततची जागरूक राहण्याची मेंदूची सवय आणि ताणाचा निचरा व्यवस्थित न होणं हे प्रश्न असतात. या ताणाचे परिणाम प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळे असतात.
हेही वाचा: लॉकडाऊनमधल्या स्थलांतरितांच्या व्यथा का वाचायला हव्यात?
वेगवेगळ्या व्यक्तींमधे वेगवेगळ्या कारणांमुळे ताण निर्माण होतो. या ताणामुळे जी अस्वस्थता निर्माण होत राहते त्याचे परिणाम शरीर आणि मनावर निश्चितपणे होतात. वेळीच जर यावर उपाय झाले नाहीत, तर वेगवेगळे शारीरिक, मानसिक आजार होतात. सततच्या अस्वस्थतेमुळे वाटणारी सुरवातीची शारीरिक आणि मानसिक लक्षणं असतात.
ही लक्षणं म्हणजे सतत अस्वस्थ वाटत राहणं, लहानसहान कारणांवरून होणारी चिडचिड, राग अनावर होणं, झोप न येणं किंवा जास्ती येणं, अनामिक भीती वाटत राहणं, भूक न लागणं किंवा अतिभूक लागणं, विनाकारण संशय येणं, एकाग्रता न होणं, विचारांमधे गोंधळ आणि निर्णय घेता न येणं, विलक्षण थकवा वाटणं, वारंवार पोट बिघडणं, निराश वाटत राहणं, आत्मविश्वास कमी होणं, जगण्यातला आनंद कमी होणं इत्यादी.
या आणि अशा लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास नैराश्याचा आजार किंवा एखादा शारीरिक आजार होऊ शकतो. cortisol आणि इतर ताणतणावाशी निगडित संप्रेरके अतिरिक्त प्रमाणात स्रवतात व त्यामुळे इतर शारीरिक अवयवांच्या metabolism वर विपरीत परिणाम होतो. त्यातून अतिरक्तदाब, हृदयविकार, पचनसंस्थेसंबंधातले विकार व अनेक आजार उद्भवू शकतात. Neuro immunology या शास्त्र शाखेच्या निष्कर्षांनुसार बहुतेक शारीरिक आजारांचं मूळ हे खूप काळ सहन केलेल्या मानसिक ताणतणावात असतं. तसंच या सर्व लक्षणांची परिणती कार्यक्षमता कमी होणं, व्यसनाधीनता वाढणं, गैरहजेरी वाढणं इत्यादी गोष्टींमधे होते.
१) आत्मविश्वास कमी होणं, अभ्यासात, कामात आणि एकूणच एकाग्रता न होणं २) लक्षात न राहणं, स्मृतीसंदर्भात अडचणी. ३) निर्णय क्षमता कमी होणं ४) लहानसहान गोष्टीत गोंधळ उडणं ५) विचार करताना मूळ मुद्दा सोडून भरकटायला होणं ६) छातीत धडधड, अचानक घाम फुटणं, काल्पनिक भीती वाटायला लागणं वगैरे ७) उताविळपणा वाढणं ८) अचानक रडू येणं ९) लहानसहान कारणांवरून अतिराग येणं १०) आत्मविश्वास डळमळीत होणं
१) झोपेचे प्रश्न - अजिबात झोप न येणं किंवा जास्त झोप येणं २) पचनाच्या तक्रारी ३) डोकेदुखी ४) त्वचेचे प्रॉब्लेम्स ५) अचानक थकवा येणं ६) रक्तदाब वाढणं किंवा कमी होणं ७) लैंगिक तक्रारी, इच्छा, क्षमता कमी होणं ८) इतर अनेक मनोविकार
हेही वाचा: २०२१ : कल, आज और कल
कणखर; पण शांत, स्वस्थ मन:स्थिती निर्माण करता येईल का? त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी पुढील पायर्यांमधे काम करावं लागेल. आवश्यक वाटल्यास तज्ज्ञांची मदत घ्यावी लागेल.
१) ताण समजून घेणं आणि त्यांची नोंद करणं - आपल्यावर सध्या कुठले ताण आहेत? कुठल्या गोष्टींची काळजी वाटत राहते? कसली भीती वाटते? कशामुळे राग येतो? तो ताब्यात राहतो का? कशामुळे वाईट वाटतं? कुठला अपराधगंड वाटत राहतो का? शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्याची लक्षणं, अशा अनेक गोष्टींची नोंद करावी. थोडक्यात, हे एकप्रकारचं भावनांचं ऑडिट असेल. तज्ज्ञांच्या मदतीने त्यावरचे उपाय शोधावेत. तज्ज्ञांशी बोलल्यामुळे ताणाचा निचरा व्हायला मदत होईल.
२) उपाययोजना आणि आवश्यक असल्यास औषधोपचार, थेरपीज - एकदा तणावाचे मूळ तसंच अस्वस्थतेच्या आजाराचं स्वरूप लक्षात आलं की, तज्ज्ञांनी सुचवलेली औषधे घेणं आणि आवश्यक सायकोथेरपी, समुपदेशन, तणाव नियंत्रणाची, मन:स्वास्थ्याची तंत्र शिकणं आणि या सर्वांचा विशिष्ट कालावधीपर्यंत उपयोग करणे महत्त्वाचे आहे.
३) व्यायाम, योगासनं, प्राणायाम, ध्यान आणि वर्तमान क्षणात राहण्याची तंत्र, रोज चल पद्धतीचा व्यायाम म्हणजे वेगात चालणं, धावणं, पोहोणं, इत्यादी. यामुळे शरीरात serotonin, endorphins तसंच इतर नैसर्गिक anti depressants स्रवतील. तसंच प्राणायाम, ध्यानाच्या काही पद्धती, श्वासावर आधारित ध्यान, mindfulness, वर्तमान क्षणात राहण्याची तंत्र शिकून घेणं.
४) संगीत, कविता, छंद आणि मैत्र, संगीत हे एक उत्तम औषध आहे. मन:स्थिती सुधारण्यासाठी रोज संगीताची साधना, आवडते संगीत रोज ऐकणं, कविता वाचणं, ऐकणं, आवडता छंद जोपासणं, याची खूप मदत होते. तसेच ज्याच्यापाशी मोकळं होऊ शकू असे जिव्हाळ्याचे; पण निर्व्यसनी मित्र जोडणं याचा छान उपयोग होतो.
५) सकारात्मक द़ृष्टिकोन आणि विचार -
परिस्थिती कधीच एकसारखी राहत नाही. ती बदलेलच यावर विश्वास ठेवायला हवा. माझ्यात सकारात्मक बदल घडतीलच, हा विश्वास ठेवायला हवा. सकारात्मक स्वयंसूचनेची तंत्र, स्वत:ला स्वस्थ करून स्वयंसूचना देणं हे सगळं शिकून घ्यायला हवं.
हेही वाचा: पश्चिम बंगालच्या रणांगणात कुणाचं पारडं होतंय जड?
६) तंत्र आणि गायडेड इमेजरी -
माणसाला बुद्धिमत्ता आणि कल्पनाशक्ती या खूप महत्त्वाच्या देणग्या मिळालेल्या आहेत. पाचही ज्ञानेंद्रिय वापरून बुद्धिमता आणि कल्पनाशक्तीच्या मदतीनं सकारात्मक आणि आनंदमय अनुभव आपण घेऊ शकतो. हे सुरुवातीला तज्ज्ञांच्या मदतीने स्क्रिप्ट निर्माण करावं लागतं. ताणतणावाच्या निराकरणासाठी या तंत्रांचा अतिशय चांगला उपयोग होऊ शकतो.
७) चौरस आणि पौष्टिक आहार -
ड्युटीच्या अनियमित वेळा लक्षात घेऊनसुद्धा जीवनसत्त्वयुक्त, प्रथिनंयुक्त, आहार, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, कमी तेलकट मांसाहार, भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.
८) दृष्टीकोन आयुष्याकडे पाहण्याचा -
मानसिक स्वास्थ्य कुठल्याही परिस्थितीत टिकवता येईल का? याचं उत्तर निश्चित होकारार्थी आहे. त्यासाठी मुळात आपण आतून स्वस्थ व्हायला हवं. शांतपणे परिस्थितीचं निरीक्षण करायला हवं. कुठल्या गोष्टी आपल्या आवाक्यात आहेत आणि कुठल्या नाहीत हे शांतपणे समजून घ्यायला हवं.
जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया,
जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया,
मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय
माझे मला कळाया देई बुद्धी देवराया!
या प्रार्थनेतलं मर्म समजून घेतलं तर बरेच प्रश्न सुटतील. मला काय शक्य आहे, अशक्य काय? हे केव्हा समजेल, जर आपण आतून स्वस्थ झालो तर. स्वस्थ झाल्यावर आपण परिस्थितीचं नीट आकलन करू शकू आणि मार्ग काढू शकू की, जो प्राप्त परिस्थितीत आणि पुढील आयुष्यात आपल्याला उपयोगी पडू शकेल. आपलं आतलं जग शांत राहिलं तरच बाह्यजगासाठी आवश्यक असलेली स्वस्थता, भावनिक समतोल, कार्यक्षमता, निर्णय घेण्याची क्षमता, धैर्य, तणाव सहन करण्याची क्षमता या सगळ्या गोष्टी साध्य होऊ शकतील. मानसिक ताकद वाढेल. म्हणूनच आतलं जग शांत करण्यासाठी रोज काही वेळ स्व कडे पाहण्याची सवय व्हायला हवी.
हेही वाचा:
नवा कोरोना वायरस भारतात 'सुपर स्प्रेडर' ठरेल?
कोरोनाच्या या काळात आपल्याला विचित्र स्वप्नं का पडतात?
टोमॅटो फ्रिजमधे ठेवणं योग्य नाही, असं शास्त्रज्ञ का म्हणतात?
साथरोग आला म्हणून मासिक पाळी थांबत नाही, उलट गुंतागुंतीची बनते!
करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस : मानसिक आरोग्य मोजण्याचा थर्मामीटर