भारत-चीन तणाव वाढलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय टनेल इंजिनीयरिंग या चीनी कंपनीशी करार केला. आत्मनिर्भर भारताचा प्रसार करणाऱ्या मोदींनी हे डील मात्र ४३ कोटींचा घाटा सहन करून मान्य केलंय. त्यानंतर ७२ तासांनी चीनी सैन्यानं २० भारतीय जवानांचा जीव घेतला.
जगभरातील सत्ताधीशांच्या अहंकाराने फुगवलेल्या ५६ इंची छात्या नजरेला न दिसणाऱ्या ‘कोविड-१९’ म्हणजेच कोरोना वायरसने ५-६ इंचांत दडपून टाकल्यात. अमेरिका आणि सोविएत रशिया या दुसऱ्या महायुद्धानंतरच्या दोन महासत्ता. १९९० मधे सोविएत रशियाचे विभाजन झाले आणि उरलेल्या रशियात महासत्तेचा ताठा उरला नाही.
भारत-पाक वादात रशिया कायम भारताच्या बाजूने; तर अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने राहिलेला आहे. त्याच वेळी चीन पाकिस्तानला भारतविरोधी रसद पुरवित अमेरिकेशी बरोबरी करीत राहिलेला आहे. तथापि, चीन आणि अमेरिका एकत्र येऊ नये यासाठी भारताने अमेरिकेबरोबर व्यापाराच्या माध्यमातून मैत्रीचे संबंध ठेवले. भारताचे हे धोरण योग्य आणि उपयुक्त ठरले आहे.
हेही वाचा : चीन कधीच जगावर सत्ता गाजवू शकत नाही, कारण
भारताच्या या धोरणामुळे चीन नेहमीच अस्वस्थ असतो. भारत विरोधी कुरापती काढत असतो. तथापि, गेल्या २० वर्षांत भारताने चीनबरोबर व्यापार-व्यवहार सुरू केल्याने चीनच्या खोड्यांनाही मर्यादा आल्यात. चिनी मालासाठी भारत ही मोठी व्यापारपेठ आहे. त्याचा परिणाम अमेरिका-भारत व्यापार संबंधांवर होऊ लागलाय. त्यामुळे अमेरिका भारत-चीन व्यापार संबंधाला खीळ कशी बसेल, अशाप्रकारचे राजकारण खेळत असते.
याच हेतूने अमेरिकेने 'कोरोना' प्रसाराच्या मुद्द्यावर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनमधे चीनला दोषी ठरवून 'कोरोना' उगमासंबंधाने चीनने जी लपवाछपवी केली, त्याची तपासणी करण्यासाठी डब्लूएचओला चौकशी पथक नेमण्यास भाग पाडलं. त्यासाठी डब्लूएचओला दिला जाणारा आर्थिक निधी बंद करण्याची धमकी अमेरिकेने दिली.
अमेरिकेच्या या भूमिकेमागे बलवान युरोप राष्ट्रांप्रमाणे भारतही उभा राहिला. चीन एकाकीपणे आरोपीच्या पिंजऱ्यात अडकला. चौकशीला तयार झाला. या चौकशीत काहीच सापडणार नाही. कारण वायरसचा उगम नैसर्गिक असतो. तो कुठेही होऊ शकतो. त्याचा प्रसार रोखणं, हाच महत्त्वाचा उपाय असतो. तो चीनने यशस्वीपणे केला. 'कोरोना'ला वुहान शहरापुरता मर्यादित ठेवला. त्याची चीनच्या अन्य प्रदेशात लागण होऊ दिली नाही.
तरीही 'कोरोना'ची लागण जगभर पसरली. ती चिन्यांमुळे नाही; तर ती चीनमधून देशात परतलेल्यांमुळे जगभर पसरली. कुठल्या देशात काय चाललंय? कोणते संकट आहे? त्यापासून आपण कसे सावध राहायचं? याचा तातडीने विचार करून, आवश्यक ते उपाय योजणे, हे परराष्ट्र खात्याचं काम आहे. अशी उपाययोजना श्रीलंका, म्यानमार यांसारख्या छोट्या देशांनी वेळीच करून स्वतःला 'कोरोना मुक्त' ठेवले. ते अमेरिका आणि भारतासारख्या खंडप्राय देशाला जमले नाही.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अंधभक्तांची फारशी चलती नसल्याने स्वतः डोनाल्ड ट्रम्पच 'कोरोना'च्या साथ प्रसारासाठी चीनच्या नावाने बोंब मारीत राहिले. आपल्या इथे हे काम अंधभक्तांनी चोखपणे केलं. ‘चिनी मालावर बहिष्कार’ घालण्याचाही आवाज दिला. पण तो 'विष्णू अवतारी' नरेंद्र मोदी यांनी किती ऐकला ते बघा. लडाखमधील भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात १५ जूनला धुमश्चक्री झाली. त्यात २० भारतीय जवान शहीद झाले.
त्याच्या चारच दिवस आधी मोदी सरकारने ‘दिल्ली-मेरठ रॅपिड रेल्वे प्रोजेक्ट’ चिनी कंपनी ‘शांघाय टनेल इंजिनीयरिंग’ला दिला. हा प्रोजेक्ट मिळण्यासाठी ‘शांघाय टनेल इंजिनीयरिंग’ने १,१२७ कोटी रुपयांची बोली लावली होती. तर ‘लार्सन अँड टुब्रो’ या भारतीय कंपनीची बोली ११७० कोटी होती. म्हणजे ४३ कोटींचा घाटा घेऊन मोदी सरकारने चिनी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देऊन आत्मनिर्भरच्या बाता या थापा असल्याचे दाखवून दिले.
या कॉन्ट्रॅक्टनंतर अवघ्या ७२ तासांत चिन्यांनी भारताचे २० जवान मारले. या प्रसंगी कोरोना चौकशीसाठी चीनच्या विरोधात एकत्रित आलेल्या सर्व देशांनी भारताच्या मागे उभे राहून चीनचा निषेध केला पाहिजे होता. तसे झाले नाही.
हल्ल्यानंतर तीन दिवसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘भारत-चीन तणावावर अमेरिका लक्ष ठेवून आहे,' असे जाहीर केले. दरम्यान, त्यांनी हुवावायी या कंपनीवर वर्षभरापूर्वी मारलेला ‘ब्लॅकलिस्टेड’चा शिक्का पुसला. आणि या कंपनीशी ‘५जी तंत्रज्ञान आणि त्यातील उद्योगाच्या संधी’ याविषयी करार केला. 'हुवावाय' या कंपनीसाठी अमेरिकेची दारं खुली केली. हे अमेरिकेने चपट्या नाकाच्या चीनला ‘कोरोना’ प्रश्नी चेपटलं म्हणून घडलेलं नाही.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?
कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?
कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?
हर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र?
‘हुवावाय’ कंपनीला ‘ब्लॅकलिस्टेड’ करण्याआधी अमेरिकेने चिनी मालावर २०० बिलियन डॉलर्सचा टॅक्स लावला होता. त्याला चीनने आपल्या देशात येणाऱ्या अमेरिकन प्रॉडक्ट्सवर ‘टेरिफ टॅक्स’ लावून कडक प्रत्युत्तर दिले होते. म्हणून अमेरिकेला ‘हुवावाय’ कंपनीवरची बंदी उठवावी लागली. या दोन देशातलं आर्थिक युद्ध जोरात सुरू होतं. ते दोन्ही देशांनी आता सामंजस्याने, पण धूर्तपणे हाताळायचे ठरवलेलं असावं. यावरून कोरोना प्रसाराबाबतच्या सुरात सूर मिळवल्याने अमेरिका चीन विरोधात भारताच्या बाजूने राहील, या भ्रमात कुणी राहू नये.
सत्ताधीश जेव्हा अडचणीत असतात, तेव्हा ते देशाला होणारा मोठा फायदा दाखवून, लोकमत आपल्याकडे वळवत, विरोधकांचे दात पाडतात. हाच उद्योग अमेरिका, चीन आणि भारताचे राष्ट्रप्रमुख करीत आहेत. ‘कीटकनाशक औषधांची इंजेक्शन दिल्याने पेशंट ‘कोरोना’ मुक्त होऊ शकतो का, ते पहा,' अशी बेताल विधाने केल्याने ट्रम्प अमेरिकनांच्या मनातून साफ उतरले.
कोरोना हटावच्या टाळ्या-थाळ्या वाजवण्यासाठी तीन दिवसांची सूचना आणि 'लॉकडाऊन'ची अंमलबजावणी तीन तासांत, यामुळे देशातल्या कोट्यावधी गरीब-कष्टकऱ्यांची फरफट ‘मोदी सरकार’ने केली, ती विसरता येण्यासारखी नाही. ‘लॉकडाऊन’चा निर्णयही अर्थव्यवस्था भुईसपाट करणारा ठरला आहे. त्याने मोदी भक्तांचेही डोळे उघडले आहेत.
चीनचे राष्ट्रप्रमुख शी जिनपिंग हेही पक्षांतर्गत संघर्षाने ग्रासले आहेत. त्यांनी सत्ताबळाने पक्षाचे आणि देशाचे आजन्म प्रमुख राहण्याची तरतूद करून घेतलीय. त्यांच्या या हुकूमशाही विरोधात तिथल्या कम्युनिस्ट पक्षातून आवाज उठू लागलाय. अन्य पक्षनेते अस्वस्थ आहेत. कोरोनामुळे जगभर लॉकडाऊन पुकारला गेल्यामुळे चिनी मालाची निर्यात थांबलीय. त्याने चीनची अर्थव्यवस्थाही डळमळीत झालीय. त्याचा परिणाम तिथल्या कामगार-नोकरदारांवर झाल्याने ते नाराज आहेत.
सत्ता कोणतीही आणि कुणाचीही असो. सत्तेच्या बुडाला स्थिरता ही मजबूत अर्थव्यवस्थेनेच लाभते. अमेरिकेतील लोकमत हे अर्थकारणातूनच बनत असल्याने ट्रम्पने 'हुवावाय' कंपनीशी नव्याने करार केला. हे एक उदाहरण आहे. असे अनेक करार केले असतील. पण 'हुवावाय' कंपनीचा करार जाहीर केल्याने अमेरिकेतला मालही चीनमधे 'टेरिफ टॅक्स फ्री' होणार असा देखावा तयार होतो. तो अमेरिकन नागरिकांसाठी दिलासा देणारा आहे. तसाच देखावा चीननेही आपल्या नागरिकांसाठी ‘शांघाय टनेल इंजिनीयरिंग’च्या माध्यमातून तयार केला.
यातून भारताने काय साधले ? २० जवान शहीद झाले, हे साधले ? एखादं काम मनासारखं झालं, की काही मंडळी देवाला कोंबड्या-बकऱ्यांचे बळी देतात. तसेच, भारतीय ‘लार्सन टुब्रो’ला आत्मनिर्भरतेच्या फाट्यावर मारून, ४३ कोटींचा घाटा खाऊन ‘शांघाय टनेल इंजिनीयरिंग’शी डील झाले म्हणून २० सैनिकांचे बळी दिले का? भारतीय २० सैनिकांचे बळी जाताना एकाही चिन्याचा बळी गेला नाही. याचा जाब मोदी-शहा लष्करप्रमुखाला विचारणार नसतील तर ही कसली चौकीदारी ते करीत आहेत?
हेही वाचा : लॉकडाऊनविरोधातल्या रस्त्यावरच्या आंदोलनांना ट्रम्प पाठिंबा का देताहेत?
देशाची सत्ता पुन्हा मिळवून देणाऱ्या २०१९ च्या लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी ‘बालाकोट ऑपरेशन’ झाले. त्यात ३०० भारतविरोधी दहशतवादी मारले, अशा बढाया मारण्यात आल्या. पण एकाही दहशतवाद्याचा मुडदा दाखवला नाही. या ‘ऑपरेशन’साठी ४१ भारतीय जवानांना शहीद करणारा ‘पुलवामाचा दहशतवादी हल्ला’ कारण ठरला.
पण हा हल्ला करण्यासाठी अतिरेकी इतके आत कसे घुसले? त्यांना २०० किलो आरडीएक्स-स्फोटक कसे मिळाले? त्यांच्या कारवाईचा अंदाज आपल्या गुप्तचर यंत्रणांना का आला नाही? हे प्रश्न लोकांना पडले नाहीत. ‘मोदी सरकार’नेही सुरक्षा यंत्रणांना जाब विचारला नाही. पण देशभरात पाकिस्तान विरोधी चीड उसळली आणि ती ‘बालाकोट ऑपरेशन’च्या कथित यशात राष्ट्रभक्ती म्हणून विरघळली.
तीच राष्ट्रभक्ती, प्रेम आता २० भारतीय जवानांना शहीद केल्यावर का नाही उसळली? निवडणुका नाहीत म्हणून का? ही राष्ट्रभक्ती 'अच्छे दिन'सारखीच नकली असावी. अशाने ‘अंधे घोडे, फौज मे दौड’ सारखा प्रकार पुन: पुन्हा होतोय. सत्ताधीशांची नालायकी दडवणाऱ्या या असत्य खेळात गरीब कष्टकऱ्यांप्रमाणेच, भारतीय जवानही ‘बळीचे बकरे’ ठरत आहेत.
हेही वाचा :
लठ्ठ माणसांपेक्षाही कोरोना जास्त वजनदार आहे?
जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग
कोविड टो म्हणजे काय? हे कोरोनाचं नवं लक्षण आहे का?
सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?
छोटासा नेपाळ अचानक भारताकडे डोळे वटारून का बघतोय?
कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?
वस्तूंना हात लावल्यावर कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी झालीय?
ट्रम्प यांच्या धमकीला घाबरून भारतानं औषधावरची निर्यातबंदी उठवली?
विटॅमिन डीच्या कमतरतेमधे दडलंय देशांच्या वेगवेगळ्या मृत्यूदराचं गुपित?
(लेखक साप्ताहिक चित्रलेखाचे संपादक असून हा लेख चित्रलेखाच्या ताज्या अंकात पूर्वप्रकाशित झाला आहे. )