क्रिकेटवेड्या वेस्ट इंडिजच्या लोकांसाठी कायरन पोलार्ड आशेचा किरण आहे. यंदाचा टी ट्वेन्टी वर्ल्डकप त्याच्यासाठी सत्त्वपरीक्षा ठरणार हे नक्की. सहसा क्रिकेटपटू देशाकडून क्रिकेट खेळतात आणि मग व्यावसायिक क्रिकेटकडे वळतात किंवा व्यावसायिक खेळाला प्राधान्य देतात. पण याबाबतीत पोलार्डचा प्रवास मात्र उलटा आहे आणि तितकाच रंजकही.
आयपीएलचा फिवर उतरतो न उतरतो तोच टी ट्वेन्टी वर्ल्डकपची नशा क्रिकेटप्रेमींवर चढत आहे. सध्या टी ट्वेन्टी वर्ल्डकपची पात्रता फेरी सुरू असली, तरी चर्चा मात्र ‘सुपर १२’ची होतेय. यंदाच्या टी ट्वेन्टी वर्ल्डकपमधे फेवरेट टीम कोणती, यावर जाणकार आपल्या तर्क-वितर्कांचा किस पाडत आहेत. या सर्व चर्चेत एक नाव कायम येतंय ते म्हणजे कायरन पोलार्ड नेतृत्व करत असलेल्या वेस्ट इंडिजचं.
वेस्ट इंडिजची टीम आयसीसीच्या टी ट्वेन्टी रँकिंगमधे नवव्या क्रमांकावर आहे. त्याच्या खालच्या सर्व टीम सध्या पात्रता फेरी खेळत आहेत. म्हणजे विंडीज ही तशी पाहिली तर रँकिंगमधली तळातली टीम. मग ती वर्ल्डकपची दावेदार कशी? कारण एकच, टी ट्वेन्टी वर्ल्डकपच्या दावेदारीसाठी रँकिंग नाही, तर टीमची ताकद महत्त्वाची असते. त्या टीमचं कॅरेक्टर महत्त्वाचं असतं. हे सगळं वेस्ट इंडिजच्या टीममधे आहे.
विशेष म्हणजे, ते याआधीचे विजेते आहेत. त्यांनी २०१६ला भारतात झालेल्या टी ट्वेन्टी वर्ल्डकपमधे इंग्लंडला पराभूत करून ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय. विंडीज अशी एकमेव टीम आहे ज्याने दोनवेळा वर्ल्डकप जिंकलाय. आता ही टीम कायरन पोलार्डच्या नेतृत्वात यूएई आणि ओमानमधे धुमाकूळ घालायला सज्ज झालीय.
विंडीजच्या टीमला सारखं सारखं कायरन पोलार्डच्या नेतृत्वातली टीम म्हणण्याचं एक कारण आहे. व्यावसायिक टी ट्वेन्टी स्टार ते विंडीजच्या टीमचं नेतृत्व करण्यापर्यंत कायरन पोलार्डने केलेली वाटचाल हे ते कारण. पोलार्ड कधी काळी वेस्ट इंडिजच्या टीमला खिजगणतीतही धरत नव्हता. तो विंडीजच्या टीमपेक्षा व्यावसायिक सारखं स्पर्धांना, त्यातल्या पैशांना अधिक महत्त्व द्यायचा.
आता तो या टीमचा कॅप्टन आहे. सहसा क्रिकेटपटू देशाकडून क्रिकेट खेळतात आणि मग व्यावसायिक क्रिकेटकडे वळतात किंवा व्यावसायिक खेळाला प्राधान्य देतात. त्यामुळे कायरन पोलार्डचा हा उफराटा प्रवास फारच रंजक आहे.
त्याची कथा सुरू होते त्रिनिदादच्या पोर्ट ऑफ स्पेनपासून साधारणपणे २० किलोमीटरवर असलेल्या टाकारिग्वा या निमशहरी भागातून. कायरन पोलार्ड तरुण होत होता त्या काळात टाकारिग्वा हे शहर ड्रग्ज, गांजा, गँगवॉर आणि खून यासाठी कुप्रसिद्ध होतं. तिथं ड्रग्ज, गांजा, खून ही सामान्य गोष्ट होती.
हेही वाचा: स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं
कायरन पोलार्ड हा सिंगल पॅरेंट चाईल्ड. त्याच्या आईने त्याला वाढवलं. त्यांची आर्थिक परिस्थिती यथातथाच होती. तो एका मुलाखतीत म्हणाला होता, आई ज्यावेळी तुम्हाला सांगते की, आपल्याकडे इतकेच पैसे आहेत त्यावेळी तुम्हाला अनेक त्याग करावे लागतात.
अशा परिस्थितीत कोणती आई आपल्या मुलाचे क्रिकेट खेळण्याचे चोचले पुरवेल; पण कायरन पोलार्डने आपलं क्रिकेटचं वेड अशा आव्हानात्मक परिस्थितीतही जोपासलं. क्रिकेटच्या मैदानावरही त्याला सुरवातीला नकार मिळाला. क्लबच्या दारातून फक्त सहा महिने वय कमी होतं म्हणून तो माघारी परतला होता.
क्रिकेटबद्दलची पॅशन त्याला सहा महिन्यांनी पुन्हा त्या क्लबच्या मैदानावर घेऊन आली. वयाच्या मानाने धिप्पाड शरीरयष्टी पाहून कोणीही त्याच्यात बॉलिंगचं भविष्य पाहील. मात्र, क्रिकेटच्या मैदानात पोलार्डने चेंडूऐवजी पहिल्यांदा बॅटलाच पसंती दिली.
त्याची बॅटिंगची सुरवात ही १० व्या क्रमांकावरून सुरू झाली. त्याला त्याचे शाळेतले पार्टटाईम प्रशिक्षक फक्त तो चेंडू मैदानाबाहेर घालवतो म्हणून नेटमधे बॅटिंगला सगळ्यात शेवटी पाठवायचे. कारण, पोलार्डमुळे त्यांच्या शाळेच्या चेंडूंचं बजेट बिघडायचं; पण मॅचवेळी त्याला त्याच्या फटकेबाजीमुळे क्रमवारीत बढती मिळायची. शाळेत तो सार्वजनिक किट वापरत होता. त्याच्याकडे स्वतःचं किटही नव्हतं. तरीही पोलार्ड प्रसिद्ध होता.
लहानपणापासूनच पोलार्डच्या बॅटिंगचे लोक चाहते होते. तो मारत असलेल्या लांब लांब षटकारांचे लोक पागल होते. क्लबस्तरावर, वयोगटातल्या मॅच खेळतानाही पोलार्डची बॅटिंग पाहण्यासाठी लोक खास स्टेडियममधे गर्दी करायचे. पोलार्ड खेळत असलेल्या काळात विंडीजचा गौरवशाली क्रिकेटिंग इतिहास लयाला गेला होता. मात्र, अस्सल क्रिकेटवेड्या विंडीजमधल्या लोकांना पोलार्डच्या रूपात एक आशेचा किरण दिसत होता.
हेही वाचा: जगातल्या सगळ्यात मोठ्या दुर्गुणाविरुद्ध क्रिकेटनं एका हत्यारासारखं काम केलं
पोलार्ड मोठा होत होता, तसतसं टी ट्वेन्टी क्रिकेटही मोठं होत होतं. त्यामुळे पोलार्डचा कल टी ट्वेन्टी क्रिकेटकडे अधिक असणं साहजिकच होतं. असा हा विंडीजचा प्रेक्षक खेचून आणणार्या पोलार्डने मात्र विंडीजकडून खेळायला सुरवातीच्या काळात अनुत्सुकता दाखवली होती.
विंडीज क्रिकेटमधे त्यावेळी अंतर्गत वाद मोठ्या प्रमाणावर होते. तर दुसर्या बाजूला टी ट्वेन्टी व्यावयासिक क्रिकेट जोर धरू लागलं होतं. पोलार्ड आपल्या पंचविशीत पोचला होता. तरी तो फ्रिलान्स क्रिकेटर होता. सहसा वृद्ध क्रिकेटपटू फ्रिलान्स क्रिकेट खेळायचे. त्यातच २०१०ला कायरन पोलार्डने वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचा केंद्रीय करार नाकारून टी ट्वेन्टी लीग क्रिकेटला प्राधान्य दिलं. यावरून त्याच्यावर टीका झाली.
मयाकल होल्डिंग तर म्हणाला की, ‘पोलार्ड माझ्या मते क्रिकेटपटू नाहीच.’ मात्र, पोलार्डवर याचा काही परिणाम झाला नाही. देशापेक्षा पैशाला महत्त्व देण्यात कायरन पोलार्डचं एक वेगळं मत आहे. ज्यावेळी तुम्हाला तुमचं कुटुंब जगवायचं असतं. दिवसाच्या शेवटी तुम्ही त्यांच्या टेबलवर दोन घास ठेवता का, हे महत्त्वाचं असतं.
पोलार्ड एका मुलाखतीत यासंदर्भात म्हणाला होता की, जोपर्यंत तुम्ही त्या परिस्थितीतून जात नाही तोपर्यंत तुम्हाला ती परिस्थिती लक्षात येत नाही. पोलार्डची आई मॅच पाहायला मैदानात नेहमी जायची. तिच्या मनात कायम धाकधूक असायची. मुलगा क्रिकेटमधे पुढे जाईल की नाही. आधीच घरातली परिस्थिती जेमतेम, त्यामुळे महागड्या क्रिकेटच्या नादात पोरगा कमवणार किती, असे प्रश्न तिच्या मनात होते.
टीमचा कॅप्टन बनला त्याच काळात पोलार्डचं लग्न झालं होतं आणि तो बापही बनला होता. त्याच्यावर जबाबदारींचं ओझं होतं. त्याची कमावणारी आई आता वृद्ध होत होती. पोलार्डला तिला आता या धकाधकीच्या जीवनातून रिटायर करून चांगलं आयुष्य द्यायचं होतं. त्यामुळे पोलार्ड ज्या परिस्थितीतून गेला त्या परिस्थितीतून त्याच्या कुटुंबाला जाऊ द्यायचं नव्हतं.
हेही वाचा: लेजंड धोनीचा अखेरचा 'षटकार'
व्यावसायिक क्रिकेटनंतर तो एका देशाचा कॅप्टन बनला. क्रिकेटच्या या प्रवासात त्याने एक आक्रमक बॅट्समन ते उत्तम कॅप्टन म्हणून मजल मारली आहे. त्याने रोहित शर्माच्या अनुपस्थितीत मुंबई इंडियन्सचं चांगलं नेतृत्व केलं. त्याला आता मॅन मॅनेजमेंटही चांगलं जमतं.
त्याने आपल्या टीमबद्दल बोलताना सांगितलं की, ‘आमच्यासाठी निकोलस पूरन आणि शिमरोन हेटमायर यांच्यासारख्या युवा खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी आहे. त्यांना कवेत घेऊन त्यांना संरक्षण देऊन त्यांच्याकडून कामगिरी करून घ्यायची आहे. आम्ही टीम म्हणून या युवा खेळाडूंबरोबर काम करणार आहोत.’
त्याच्या या वक्तव्यावरून तो विंडीजच्या टीमची बांधणी करण्यात किती उत्सुक आहे, हे दिसतं. कधी काळी विंडीज बोर्डाचा करार नाकारणारा पोलार्ड आता टीम बांधणीच्या गोष्टी करत आहे. पोलार्ड समजण्यासाठी तो सांगतो त्याप्रमाणे पोलार्ड ज्या परिस्थितीतून गेला त्याच परिस्थितीतून गेलं पाहिजे.
पोलार्डच्या नेतृत्वाखाली विंडीज टीममधे टी ट्वेन्टी मधले रथी-महारथी खेळणार आहेत. हे रथी-महाराथी म्हणजे टी ट्वेन्टी मधलं स्वतंत्र संस्थानंच आहेत. प्रत्येकाचं वलय वेगळं आणि प्रत्येकाची मिजास वेगळी.
काही युवा खेळाडूही टीमसोबत आहेत. ही युवा मंडळी या टी ट्वेन्टी मधल्या रथी-महारथींकडून बाळकडू घेऊन त्यांचे आणि पर्यायाने विंडीज क्रिकेटचे भविष्य घडवणार आहेत. पोलार्डवर या रथी-महारथींना सांभाळण्याबरोबरच युवा खेळाडूंसमोर वेस्ट इंडिजचा टीम म्हणून एक आदर्शही उभा करायचा आहे.
मुंबई इंडियन्सचा पार्टटाईम कॅप्टन होणं आणि वेस्ट इंडिजच्या हेलकावे खाणार्या शिडाच्या जहाजाला किनार्यापर्यंत पोचवण्याची जबाबदारी पेलणं यात जमीन-अस्मानचा फरक आहे. तगडे खांदे लाभलेल्या पोलार्डला हे आव्हान पेलायचं आहे आणि यंदाचा टी ट्वेन्टी वर्ल्डकप हा त्याची सत्त्वपरीक्षा बघेल, यात शंका नाही.
हेही वाचा:
अली अख्तर : टेनिस हाच त्यांचा विश्वास होता
सचिन, आम्ही तुला हृदयातून रिटायर्ड करू शकत नाही
स्वस्तात सर्वात मस्त असणार भारतीय रेल्वेचा थ्रीई डब्बा