भारतीय महिला क्रिकेटमधलं मिताली 'राज'

१३ जून २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


भारतीय महिला क्रिकेट खेळाडू मिताली राजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. तिच्या वाट्याला कौतूक आलं, तसंच टीकाही आली. अर्थात कुठलाही खेळाडू आपल्या खेळातूनच टीकेला उत्तर देतो तसंच तिनेही केलं. आज भारतीय महिला क्रिकेटला चांगले दिवस आले आहेत. महिला क्रिकेट टीम संक्रमणातून जातेय. या परिस्थितीत महिला क्रिकेटला मिताली सारख्या खेळाडूंच्या अनुभवाची गरज आहे.

गेल्या आठवड्यात दोन बातम्या पाठोपाठ आल्या. भारताच्या दोन महिला खेळाडू मिताली राज आणि स्मृती मंधाना यांनी आयसीसीच्या महिला क्रिकेट खेळाडूंच्या वनडे क्रिकेटच्या रँकिंगमधे पहिल्या दहा खेळाडूंमधे स्थान मिळवलं. त्यानंतर पाठोपाठ बातमी आली ती मिताली राजच्या सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची. मिताली राजच्या या बातमीने खरोखरच एका राजयुगाचा अस्त झाला आहे.

२६ जून १९९९ला सुरु झालेली आंतरराष्ट्रीय कारकीर्द जवळजवळ २३ वर्ष गाजवून मितालीने तिची बॅट म्यान केली. निव्वळ कालखंडाच्या हिशोबात मांडायचं तर भारतीय क्रिकेटमधे सचिन तेंडुलकरच्या २४ वर्षाच्या आंतराष्ट्रीय कारकिर्दी खालोखाल हा विक्रम असेल. अर्थात महिला क्रिकेटने अलीकडे फोफावत व्यावसायिक रूप घेतल्यामुळे २३ वर्ष खेळूनही तिच्या वाट्याला १२ कसोटी, २३२ वनडे आणि ८९ ट्वेन्टी ट्वेन्टी सामनेच आले.

भारतीय महिला क्रिकेट टीम सध्या संक्रमणकाळातून जातेय. हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना यासारख्या खेळाडूंकडे जबाबदारी सोपवून मिताली राज, झुलन गोस्वामी यासारख्या बुजुर्ग खेळाडू निवृत्तीच्या मार्गावर होत्याच. मिताली राजच्या निवृत्तीने यावर शिक्कामोर्तब झालं.

महिला क्रिकेटचं नवं युग

महिला क्रिकेटला आज संधी, ग्लॅमर आणि पैसे मिळत आहेत पण दोन दशकांपूर्वी परिस्थिती वेगळी होती. अशावेळी सिकंदराबादमधल्या हवाई दलातून निवृत्त झालेल्या दोराई राज यांच्या घरात आठ वर्षाच्या मितालीवर क्रिकेटचे संस्कार घडायची सुरवात झाली होती. छोट्या मितालीला उशीरपर्यंत झोपण्यापासून परावृत्त करायला तिचे वडील तिला सकाळी सकाळी मितालीच्या भावाबरोबर त्याच्या सिकंदराबादमधल्या सेंट जॉन्स क्रिकेट अकादमीत घेऊन जायचे.

भावाचा क्रिकेटचा सराव चाललेला असायचा तेव्हा छोटी मिथाली सीमारेषेबाहेर बसून आपला अभ्यास करत बसायची. आपला अभ्यास झाल्यावर मिथाली मैदानात उतरायची आणि बॅट घेऊन फटकेबाजी करायची. तिचं चेंडू टोलवणं, नैसर्गिक पदलालित्य तिथल्या क्रिकेट प्रशिक्षक ज्योती प्रसाद यांनी अचूक हेरलं आणि मितालीत मोठी क्रिकेटपटू होण्याची कुवत आहे हे त्यांनी ओळखलं. भारताने १९९७ च्या महिला विश्वचषकाचं यजमानपद भूषवलं होतं पण भारत काही अंतिम सामन्यापर्यंत पोचू शकला नव्हता.

भारतात महिला क्रिकेट अस्तित्वात होतं पण ते फोफावत नव्हतं. याच दरम्यान मिताली राजने १९९९ला पदार्पण केलं आणि पदार्पणाच्या वनडे सामन्यातच तिने आयर्लंडच्या विरुद्ध तडाखेबाज नाबाद ११४ धावांची खेळी केली. तिची जोडीदार रेश्मा गांधी हिनेही शतक झळकावलं आणि दोघींनी २५८ धावांची भागीदारी करत इंग्लंडच्या महिला खेळाडूंचा २६ वर्ष अबाधित विक्रम मोडला. पुढे नऊ वर्षांनी हाही विक्रम मोडला पण या खेळीने मिताली राजने नुसत्या आपल्या आगमनाचीच वर्दी जगाला दिली नाही तर भारतीय महिला क्रिकेटच्या नव्या युगाची ती नांदी होती.

हेही वाचा: लेजंड धोनीचा अखेरचा 'षटकार'

१४व्या वर्षातच परिपक्व

मितालीने तीन वर्षात कसोटी पदार्पण केलं. अपेक्षांच्या ओझ्याखाली आणि मोठ्या सामन्यात खेळायच्या दडपणात ते अपयशी ठरले. महिला क्रिकेटमधे कमी कसोटी सामने होतात तेव्हा पदार्पणात शून्यावर बाद झाल्यावर पुढची संधी महत्वाची होती. त्यात तिने अर्धशतक झळकावलं पण तिची खरी गुणवत्ता दिसून अली ती पुढच्या इंगलंडविरुद्धच्या टाँटनच्या कसोटी सामन्यात ज्यात तिने २१४ धावा काढल्या.

ही कसोटी महिला क्रिकेटमधे वैयक्तिक धावांचा विक्रम ठरली. या नुसत्या धावा नव्हत्या तर मिताली राज भारतीय टीमचा आधारस्तंभ बनण्याची सुरवात होती. १९९७ च्या विश्वचषकाच्या तयारीच्या कॅम्पमधे खेळायला येण्यार्‍या १४ वर्षाच्या कोवळ्या मितालीचं रूपांतर एका परिपक्व खेळाडूत झालेलं होतं.

दोन, तीन पिढ्यांसोबत क्रिकेट

मिताली राज आणि सचिन तेंडुलकर यांच्या दीर्घ कारकिर्दीत खूप साम्य आढळतं ते त्यांच्या दोन ते तीन पिढ्यांच्या खेळाडूंबरोबर खेळण्यातून. कृष्णम्माचारी श्रीकांतच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा कोवळा सचिन पुढे महेंद्रसिंगधोनीच्या नेतृत्वापर्यंत खेळला आणि त्यात स्वतःही नेतृत्वाची धुरा सांभाळली.

वनडे सामन्यात मितालीने पदार्पण केलं ते चंद्रकांता कौलच्या नेतृत्वाखाली आणि अनेक स्थित्यंतरं बघत ती कर्णधार झाली ती शेवटपर्यंत. सचिन तेंडुलकरचं १९८९ला कसोटीत पदार्पण झालं तेव्हा त्याच्या शेवटच्या कसोटीतल्या टीमचे बहुतांशी साथीदार वय वर्ष दोन ते पाच वयोगटात होते. मोहम्मद शामी तर जन्मलाही नव्हता.

मितालीच्या बाबतीत सांगायचं तर तिला आदर्श मानून महिला क्रिकेटमधे आलेल्या लहान वेदा कृष्णमूर्थी किंवा स्मृती मंधाना जेव्हा आंतरराष्ट्रीय खेळाडू झाल्या तेव्हाही मिताली राज क्रीजच्या दुसर्‍या टोकाला त्यांना साथ द्यायला उभी होती.

हेही वाचा: स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं

क्रिकेट हेच आयुष्य बनलं

तिचं यश आहे आणि ते आलंय कठोर परिश्रमातून. तिच्या वडलांच्या सैनिकी शिस्तीतून, तिला लहान वयात मिळलेले ज्योती प्रसाद, संपत कुमार यांच्या प्रचंड परिश्रमातून तिची कारकीर्द घडली आहे. क्रिकेटसाठी तिने वैयक्तिक आयुष्यात अनेक गोष्टींवर पाणी सोडलं. ना ती कुठच्या कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थित राहू शकायची ना तिच्याकडे क्रिकेट व्यतिरिक्त कुठचा दुसरा प्लॅन होता. तेव्हा क्रिकेट खेळून यशस्वी होणं हेच तिचं एकमेव उद्दिष्ट होतं.

संपत कुमार तिचे प्रशिक्षक असताना रोजचे सहा ते तास प्रशिक्षण, शिवाय एका पॅसेजमधे तिला फक्त सरळ फटके मारण्यासाठी सराव आणि चेंडूवर नजर इतकी बसली पाहिजे म्हणून संध्याकाळी ६ ते ८ मधला सराव असा तिचा दिनक्रम असायचा. यामुळे तिच्या कुटुंबियांपेक्षा तिची जास्त जवळीक तिच्या टीम सहकार्यांशी झाली. तिचं क्रिकेटशी नातं इतकं जुळलं होतं की, वैयक्तिक आयुष्यात जोडीदार केला नाही हे बरं झालं असं तिचं म्हणणं होतं. ते खरंच वाटतं. कारण लग्न संसार यात अडकली असती तर ती इतकं यश मिळवू शकली नसती.

मितालीच्या अनुभवाचं प्रशिक्षण हवं

मिताली राजच्या इतक्या प्रदीर्घ कारकिर्दीत तिच्या वाट्याला कौतूक आलं, तसंच टीकाही आली. अलीकडच्या काळात प्रशिक्षक रमेश पोवार यांच्याबरोबर झालेला वाद, तिचा संथ स्ट्राईक रेट इथपासून ते तिच्यामुळे टीममधे दोन गट पडले आहेत इथपर्यंतची टीका तिच्या वाट्याला आली. अर्थात कुठलाही खेळाडू आपल्या खेळातूनच टीकेला उत्तर देतो तसंच तिनेही केलं पण तिची निवृत्ती आता कधीही ऐकू येईल असंच वातावरण काहीसं निर्माण झालं होतं.

इतकी प्रदीर्घ कारकीर्द असून महिला क्रिकेटच्या सुरवातीच्या काळातल्या उदासीनतेमुळे तिला फक्त बाराच कसोटी सामने खेळता आले ही खंत आहे. आज मात्र महिला क्रिकेटला चांगले दिवस आले आहेत. भारतीय महिला क्रिकेट टीम संक्रमणातून जात असल्याने मितालीच्या अनुभवाची उणीव सुरवातीला नक्कीच भासेल पण भारताच्या कानाकोपर्‍यात पोचलेल्या महिला क्रिकेटला मिताली सारख्या खेळाडूंच्या अनुभवाची गरज आहे.

भारताच्या गावागावातून अशा गुणी महिला क्रिकेटपटू शोधून त्यांना जर मितालीच्या अनुभवाचं प्रशिक्षण मिळायची सोय झाली तर मितालीचं राज कायमच भारतीय महिला क्रिकेटच्या अव्वल रूपाने सत्तास्थानी असेल.

हेही वाचा: 

क्रिकेटचे लघुउद्योग सुटलेत सुसाट

महेंद्र सिंग धोनी: वनडेतला ‘ग्रेट फिनिशर’

आयपीएलच्या तपाची कहाणी : थोडी मिठी, जास्त खट्टी

अपघाताने जन्माला आलेल्या वनडे क्रिकेटची आज पन्नाशी 

(दैनिक पुढारीतून साभार)