पालघर झुंडबळी सत्य कळण्यासाठी सहा प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत

२२ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


लॉकडाऊन असताना आपल्या परिचिताच्या अंत्यसंस्कारासाठी आडवळणानं गुजरातकडे निघालेल्या तिघांची एका झुंडीनं हत्या केली. महाराष्ट्र आणि दादरा नगर हवेली सीमेवरच्या झुंडबळीच्या घटनेनं सारा देश हादरलाय. चार दिवसांनी अचानक देशाचं पॉलिटिक्स ढवळून काढणाऱ्या या घटनेचे रोज नवेनवे अँगल समोर येताहेत. या निमित्तानं काही प्रश्नांची उत्तरं सर्वसामान्य जनतेला मिळाली पाहिजेत.

पालघरमधल्या मॉब लिंचिंगच्या घटनेनं देशभर खळबळ उडवून दिलीय. मोबाइल कॅमेऱ्याच्या निगराणीत झालेल्या या मॉब लिंचिंग म्हणजेच झुंडबळीचे विडिओ मानवी मनाचा थरकाप उडवणारे आहेत. कल्पवृक्षगिरी महाराज, सुशीलगिरी महाराज आणि ड्रायवर निलेश तेलगडे हे तिघं मोटारगाडीनं गुजरातमधे एका अंत्यदर्शनासाठी निघाले होते. पण पोलिसांच्या मते, अफवेचा बळी ठरलेल्या एका झुंडीनं या तिघांचा जीव घेतला. पोलिसांनी या प्रकरणात जवळपास ११० जणांना ताब्यात घेतलंय.

महाराष्ट्र आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाच्या हद्दीवरच्या पालघर जिल्ह्यातल्या गडचिंचले गावात १६ एप्रिलला रात्रभर हा सारा प्रकार घडला. या प्रकरणाविषयी काही गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. घटनेचं गांभीर्य ओळखून देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केला. वांद्रे इथं परप्रांतीय कामगारांची अचानक गर्दी झाली त्यावेळी शाह यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला होता. पण शाह यांनी सुरतमधे जमलेल्या गर्दीबद्दल चिंता व्यक्त करण्यासाठी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना का फोन केला नाही, असं विरोधक विचारतात.

सत्ताधारी आणि विरोधकही आपापले हितसंबंध जपत आरोप-प्रत्यारोप करत आहेत. पण या आरोप-प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन काही शोधण्याचा प्रयत्न केल्यास काही प्रश्न आपल्या हाताला लागतात. त्यांची उत्तरं शोधली पाहिजेत.

हेही वाचाः पालघरबद्दल मी गप्प नव्हतो, हिंदू-मुस्लिमवाली टोळी जास्त सक्रिय होती

१) लॉकडाऊन मोडण्यासाठी कुणाची परवानगी घेतली?

कोरोना वायरसचा प्रसार रोखण्यासाठी अख्खा देश लॉकडाऊन आहे. महाराष्ट्र सरकारनं तर लॉकडाऊनचा निर्णय केंद्राच्या आधी घेतलाय. आत्ता आपण लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात आहोत. मुंबई परिसरात कोरोनाचा प्रसार वाढतोय. त्यामुळे मुंबई परिसरात तर लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी आहे, असं सरकारचं म्हणणं आहे. कुणाला कुठं जायचं असेल तर पोलिसांची परवानगी घ्यावी लागते.

पोलिसांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, कल्पवृक्षगिरी महाराज, सुशीलगिरी महाराज आणि ड्रायवर यांनी कर्फ्यू पास काढला नव्हता. अशावेळी लॉकडाऊन असताना मुंबईच्या कांदिवली परिसरातून हे तिघं गाडीनं दादरा नगर हवेलीच्या हद्दीपर्यंत जाईपर्यंत त्यांना कुणीच रोखलं, हटकलं कसं नाही? लॉकडाऊनच्या काळात तिघं बिनधास्तपणे जवळपास सव्वाशे किलोमीटरचा प्रवास करून तिथपर्यंत गेलेच कसं? लॉकडाऊनमधेही बिनपरवानगी यांना प्रवास करता यावा म्हणून कुणी तोंडी शिफारस केली होती का? या प्रश्नांची उत्तरं पोलिसांनी आणि अर्थात सरकारनं दिली पाहिजेत.

हेही वाचाः दिल्लीच्या तबलिगी प्रकरणात नेमकं खरं काय आणि खोटं काय?

२) साधुंची हत्या का रोखली नाही?

घटनास्थळावर पोलिसांदेखत मॉब लिंचिंगचा हा प्रकार घडल्याचं विडिओमधे दिसतंय. पण यापेक्षा आणखी एक गंभीर मुद्दा समोर आलाय. तो म्हणजे, लॉकडाऊनच्या काळात राज्याराज्यांत बेबनाव असल्याचा, समन्वय नसल्याचा. हे तिघं महाराष्ट्र पोलिसांच्या नजरेतून सुटले असतील किंवा तिघांना सोडून दिलं असेल तर त्यांना केंद्रशासित प्रदेश असलेल्या दादरा नगर हवेलीच्या हद्दीत रोखण्यात आलं. पण दादराच्या पोलिसांनी ही माहिती महाराष्ट्र पोलिसांना कळवली नाही. म्हणजे झुंडबळीची ही घटना दोन ठिकाणी रोखता आली असती.

एक म्हणजे महाराष्ट्र पोलिसांनी यांना कांदिवलीतच किंवा रस्त्यात कुठं अडवलं असतं तर. आणि दुसरं म्हणजे, दादरा नगर हवेली पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतलं असतं किंवा महाराष्ट्र पोलिसांकडे सोपवलं असतं तर. पण असं न झाल्यानं पुढचा सारा अमानवी प्रकार घडला. मग आता महाराष्ट्र पोलिस आणि दादरा नगर हवेली पोलिस या दोघांनीही हे का रोखलं नाही, याचं उत्तर दिलं पाहिजे.

कोरोनाचा धोका ओळखून तबलिगी जमातच्या वसईतल्या कार्यक्रमाला पालघर पोलिसांनी परवानगी नाकारली. पालघर पोलिसांनी त्यावेळी जे शहाणपण दाखवलं ते दिल्ली पोलिसांत दिसलं नाही. त्यामुळे सारं तबलिगी महाभारत घडलं. जे असून सुरूच आहे. आता त्याचं पालघर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर झुंडबळी घटनेनं प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. पोलिसांनी लॉकडाऊन तोडणाऱ्या दोन धर्मगुरूंसह ड्रायवरविरुद्ध कारवाई करत वेळीच पावलं उचलली असती तर हा प्रकार टळला असता. मग पोलिसांनी तो का टाळला नाही?

३) जमावबंदीत शेकडोंचा जमाव जमला कसा?

लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी जमावबंदी कायदा लागू आहे. पालघर पोलिसांनी दाखल केलेल्या एफआरआरनुसार, घटनास्थळी ४०० ते ५०० लोकांचा जमाव होता. एवढा जमाव जमेपर्यंत पोलिस काय करत होते? हा अतिदुर्गम आदिवासीबहुल भाग आहे, हे खरंय. पोलिसांकडे पुरेसं मनुष्यबळही नाही. त्यामुळे सगळीकडे पोलिस हजर राहणं शक्यही नाही. पण पोलिसांचे खबरे, सुत्रं काय करत होती? केंद्राच्या आणि राज्याच्या गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या?

हे कोरोना स्पेशलही वाचाः 

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

बाहेरून आणलेलं सामानं वायरस फ्री कसं करावं?

कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

हमीद पर उम्मीद : कोरोनाचं औषध सिप्ला शोधेल असं जगाला का वाटतं?

राजेश टोपेः आईच्या आजारपणातही महाराष्ट्र बरा होण्यासाठी लढणारा आरोग्यमंत्री

४) अफवांचा बाजार बसवण्यासाठी पोलिसांनी काय केलं?

पालघरच्या या पट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अफवांचा बाजार भरलाय. पोलिसांनी एफआरआरमधे म्हटल्यानुसार, झुंडबळीची ही घटनासुद्धा चोर असल्याच्या समजेतून घडलीय. महत्त्वाचं म्हणजे, झुंडबळीच्या या घटनेआधाही दोनदा अफवेमुळे हाणामारीच्या घटना घडल्यात. एकदा तर थेट पोलिस अधिकाऱ्यावरच हात उगारण्यात आला होता. याच्या बातम्याही आल्यात.

खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या परिसरात मुलं पळवणारी टोळी फिरत असल्याची अफवा पसरल्याचं म्हटलंय. मग या अफवांचा बाजार बसवण्यासाठी सरकारनं काय केलंय, लॉकडाऊन लागू केल्यानं पोलिसांना अनेक अधिकार मिळालेत. मग अफवा रोखण्यासाठी पोलिसांनी काय केलं?, अफवा पसरवणाऱ्यांना पोलिसांनी शोधलं का? आणि शोधलं असेल तरी अफवा सुरूच का राहिल्या? हे प्रश्न शिल्लक राहतात.

हेही वाचाः तबलीगने भारतात कोरोना पसरवण्याचा कट केलाय का?

५) हा संगनमतानं केलेले कट आहे का?

सोशल मीडियावरून सरकारवर एक आरोप होतोय. तो म्हणजे ही झुंड म्हणजे संगनमतानं केलेला कट आहे. पोलिसांच्या तक्रारीतलं एक वाक्यही इथं नोंदवायला हवं. पोलिसांनी १७ तारखेला नोंदवलेल्या एफआयआरमधे सुरवातीलाच हा सारा प्रकार चोर असल्याच्या समजातून घडल्याचं म्हटलंय. पण पुढे संगनमतानं कट रचल्याचंही फिर्यादीत म्हटलंय. आता हा कट आहे किंवा नाही हे पोलिसांनी लवकरात लवकर शोधून काढलं पाहिजे.

लॉकडाऊनच्या काळात कुणी समाजकंटक असा काही कट करत असतील आणि तो कट सहजपणे पूर्णत्वास जात असेल तर हे खूप घातक आहे. असा कट शिजवणाऱ्यांना आणि तो पूर्णत्वास नेण्यासाठी यंत्रणा राबवणाऱ्यांना सरकारनं शोधून काढलं पाहिजे. आणि कायद्यानं त्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल हे बघितलं पाहिजे.

इथं एका गंभीर गोष्टीची नोंद घेतली पाहिजे. ते म्हणजे, गडचिंचले गावात १६ एप्रिलच्या रात्री हा प्रकार घडला. त्याच्या दुसऱ्या दिवशी साऱ्या मीडियात बातम्याही आल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरुण भारतमधेही बळींचा उल्लेख साधू असा नाही तर प्रवासी असा करण्यात आलाय. पोलिसांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी १७ तारखेला एफआयआर नोंदवली. त्यातच शंभरहून जास्त लोकांविरुद्ध गुन्हा नोंदवलाय. तसंच ११० हून जास्त जणांना ताब्यात घेतलं. असं असताना मग १९ तारखेला रविवारी प्रकरणाला अचानक हवा कुणी दिली? या सगळ्यांमागं कुणी मास्टरमाइंड आहे का, हे पोलिसांनी शोधायला हवं.

हेही वाचाः लॉकडाऊनमधे पॉर्न पहातच आहात; तर त्याआधी हे वाचा

६) झुंडबळी म्हणजे धर्माविरुद्धचा कट आहे का?

सरकार, पोलिस यांच्याकडून गडचिंचले गावात घडलेल्या झुंडबळीच्या घटनेचा धर्माशी कोणताचं संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तर पीडित आणि आरोपी हे एकाच धर्माचे असल्याचं म्हटलंय. दुसरीकडे सरकारविरोधी गोटातून हा सारा हिंदूविरोधी मामला असल्याची टीका होतेय.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा, सुनील देवधर यासारख्या राष्ट्रीय नेत्यांनी तर हल्लेखोर हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित असून त्यांची विचारधारा हिंदू आणि हिंदू धर्मविरोधी असल्याचं सांगत या प्रकरणाला धर्माचा अँगल असल्याचा सरळ सरळ आरोप केलाय. दुसरीकडे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी हल्लेखोर हे भारतीय जनता पक्षाशी संबंधित असल्याचं म्हटलंय. तसंच गडचिंचले ग्रामपंचायत अनेक वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असल्याचं सावंत सांगतात.

राज्य सरकारनं झुंडबळीच्या घटनेचा धर्माशी काहीएक संबंध नाही, असं म्हटलंय. मग याचा धर्माशी संबंध जोडणाऱ्यांवर सरकारनं काही कारवाई केली का? अशावेळी सरकारनं या आरोपातलं तथ्य लवकरात शोधून संबंधितांवर कठोर कारवाई केली पाहिजे. यातलं खरंखोटं पॉलिटिक्स पोलिस तपासातून लोकांसमोर यायला हवं.

हेही वाचाः 

नसीरुद्दीन शाह असं का बोलले असतील?

अब आया वाधवान सातारा के पहाड के नीचे

चला, आयडिया ऑफ इंडियाचे चौकीदार होऊया!

रामायण, महाभारताचं स्वागत करायला काय हरकत?

पीएम फंड असताना पीएम-केअर्सची नवी भानगड कशाला?

आज लेनिनचं भारताशी असलेलं नातं समजून घ्यावंच लागेल

भारतीय मुसलमानांना बदलवण्याचं तबलिगचं पॉलिटिक्स काय?

मॉब लिंचिंगवर विचारवंतांचं लेटर वॉर हे लोकशाहीचं विदारक वास्तव

बेरोजगारीतही भारतातल्या मध्यमवर्गानं सांप्रदायिकतेला रोजगार बनवलं

जगाचा बिझनेस कोमात, डीमार्ट जोमात, F.Y.B.Com ड्रॉपआऊट काकांची सक्सेस स्टोरी