भारतातल्या विचारवंत-विदुषी डॉ. गेल ऑम्व्हेट यांचं निधन झालंय. अमेरिकेतून त्या भारतात आल्या. डॉ. भारत पाटणकर यांच्यासोबतचं त्यांचं सहजीवन म्हणजे निखळ मानवी प्रेमाची परीकथा होतं. ऑम्व्हेट यांनी आपलं आयुष्य कष्टकऱ्यांच्या चळवळीसाठी समर्पित केलं. त्यांचं लेखन सामाजिक राजकीय चळवळींसाठी दस्तऐवज बनलं. त्यांच्या कामाचा वेध घेणारी संपत देसाई यांची फेसबुक पोस्ट.
अमेरिकेत जन्माला आलेली, उच्च शिक्षण घेतलेली, उंच, गोरी, निळ्या डोळ्याची, सोनेरी केसाची एक मुलगी भारतात येते. अभ्यासाच्या निमित्ताने संपूर्ण भारतभर फिरते. इथल्या अनेक चळवळींचा जवळून अभ्यास करते. अभ्यास करता करता कष्टकऱ्यांच्या चळवळींचा एक भाग बनते.
त्यांच्या चळवळींना एक भक्कम वैचारिक पाया तयार करायला मदत करते. त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या लढ्याच्या अग्रभागी राहते. मोर्चे, आंदोलनात त्यांचा झेंडा खांद्यावर घेवून नेतृत्व करते. परिश्रमातून कमावलेलं सारं ज्ञानच नाही तर आपलं आयुष्य इथल्या कष्टकऱ्यांच्या चळवळीसाठी समर्पित करते.
कोणत्याही सिनेमाला शोभेल अशी ही कथा. पण ही काही कुठल्या सिनेमाची कथा नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांच्या संशोधनाचा दबदबा आहे आणि जागतिक स्तरावर एक विदुषी म्हणून ज्यांची ओळख आहे त्या डॉ. गेल ऑम्व्हेट अर्थात शलाका भारत पाटणकर यांचा हा जीवन प्रवास.
अमेरिकेतल्या एका मध्यम वर्गीय कुटुंबात जन्म घेतलेल्या गेल तशा मुळातच हुशार. कार्लटेन कॉलेजमधे पदवीपर्यंत शिक्षण घेतल्या नंतर मिन्याप्यालीस युनिवर्सिटीतून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.
संपूर्ण जगाला ज्या देशाचं आकर्षण आहे अशा वैभवशाली अमेरिकेत पायाशी सारी सुखं लोळण घेत असतानाही गेल भारतात आल्या. याचं मुख्य कारण त्यांची मानवतावादावर असलेली निष्ठा. कॉलेजचं शिक्षण घेत असताना अमेरिकेच्या युद्धखोर साम्राज्यवादी धोरणांच्या विरोधात उभा राहिलेल्या विद्यार्थी चळवळीत त्या सक्रीय झाल्या.
विद्यार्थी चळवळीतच त्यांच्या पुढील जिवनाची दिशा निश्चित झाली. भांडवली विकासात होणारं कामगार-कष्टकऱ्यांचं शोषण त्या जवळून पाहत होत्या. वर्गीय आणि लैंगिक शोषण पाहून त्या अस्वस्थ होत होत्या. त्यामुळे आपण कोणासाठी काम करायचं याची धारणा विद्यार्थी दशेतच पक्की झाली होती.
हेही वाचा: चळवळीच्या यशाचे मापदंड आज बदलतायत
अभ्यासाच्या निमित्ताने त्या भारतात आल्या. भारतीय समाज हा जातिव्यवस्थेच्या पायावर उभा आहे. माणूस कोणत्या जातीत जन्माला आला त्यावरून त्याची जात ठरते. त्याने कोणतं काम करायचे हे तो ज्या जातीत जन्माला आला त्यावरून ठरते.
जातीतच लग्न करायचं त्याला बंधन राहतं. इतकंच नाही तर हलकी, अत्यंत घाण आणि कष्टाची कामं करणाऱ्यांना अस्पृश्य ठेवलं जातं. या भयाण वास्तवाने त्या अधिकच अंतर्मुख झाल्या. भारतीय समाजात केवळ वर्गीय आणि लैंगिक शोषण होतं असं नाही तर इथं जातीय शोषणही होतं हे त्यांना दिसून आलं.
शोषणाचं आणखी अंग त्यांना जाणवलं. त्यामुळे भारतीय समाजक्रांती ही वर्गीय, जातीय आणि लैंगिक शोषणाचा अंत एकाचवेळी केल्याशिवाय होणार नाही अशी त्यांची पक्की धारणा झाली.
'वासाहतिक काळातील सांस्कृतिक बंड - प. महाराष्ट्रातील अब्राम्हणी चळवळ' असा त्यांनी आपल्या पीएचडीचा विषय निवडला. या निमित्ताने त्यांनी संपुर्ण महाराष्ट्र पायाखाली घातला. महात्मा फुले आणि त्यांच्या सत्यशोधक चळवळीच्या त्या गाढ्या अभ्यासक बनल्या.
पुढे जातीव्यवस्थेच्या अंतासाठी गोतम बुद्धांपासून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या चळवळींचा त्यांनी चिकित्सक अभ्यास केला. त्यातल्या उणीवा, दोष आणि शक्तीस्थानं ओळखून जातीअंतासाठी नवी सैद्धांतिक भुमिका विकसित करण्यात त्यांनी पुढाकार घेतला.
हेही वाचा: चला, आयडिया ऑफ इंडियाचे चौकीदार होऊया!
राष्ट्रीय-आंतरराष्टीय स्तरावर अनेक न्यूजपेपर, मॅगझीन, चर्चासत्रं, परिसंवाद, परिषदा यामधून त्यांनी आपली भुमिका ठामपणे मांडली. भारतीय समाजक्रांती मार्क्सवाद, फुले-आंबेडकरवाद आणि स्त्रीवादाच्या पायावरच शक्य आहे अशी आग्रही भुमिका त्यांनी घेतली.
आज भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर वैचारिक क्षेत्रात सैद्धांतिक भूमिका मांडणारे भरपूर विचारवंत-विदुषी आहेत. पण वैयक्तिक जीवनामधे स्वतः मांडलेला विचार आचरणात आणणाऱ्यांची मात्र वानवा आहे. डॉ. गेल मात्र याला अपवाद आहेत. स्वतःच्या खाजगी आयुष्यामधेही त्या स्वतःच्या विचाराशी ठाम राहिल्या.
वर्गीय, जातीय आणि लैंगिक शोषणाचा अंत करून नवा समतावादी समाज निर्माण करण्यासाठी कष्टकऱ्याच्या चळवळीत झोकून देवून काम करणाऱ्या डॉ. भारत पाटणकर या जीवनदानी कार्यकर्त्याशी त्यांचा प्रेमविवाह झाला.
आयुष्यभर स्वतःचं संशोधन आणि नोकरी असा व्याप सांभाळत एका पूर्णवेळ कार्यकर्त्याचा संसार सांभाळण्याचं अवघड काम त्यांनी लीलया पेललं. स्वतः नोकरी केली, लिखाण केलं आणि संशोधन केलं. त्यातून जे काही पैसे मिळाले ते सगळे पैसे कष्टक-यांच्या चळवळीवर खर्च केले.
स्वतःच्या गरजा कमी केल्या; पण चळवळ पैशा अभावी थांबू दिली नाही. आज श्रमिक मुक्ती दल आणि डॉ भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली दहा बारा जिल्ह्यामधे जी काही चळवळ उभी आहे त्यामागे डॉ. गेल यांचा फार मोठा त्याग आहे.
हेही वाचा: बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती तीनवेळा का जाळली?
अमेरिकेतली गोरी मॅडम बघता बघता अस्सल मराठमोळी बाई कधी बनली तेच कळलं नाही. सांगली जिल्ह्यातल्या निराधार स्त्रियांची ती मैत्रीण बनली. क्रांतीविरांगना इंदुताई पाटणकर या आपल्या सासुबाईला सोबत घेवून जिल्हाभर फिरली.
नवऱ्यानं सोडलेल्या, एकट्या राहणाऱ्या स्त्रियांना भेटली. त्यांना संघटीत केलं. त्यांना आत्मभान दिलं. त्यांच्या हक्काची जाणीव त्यांना करून दिली. लढण्याची जिद्द त्यांच्यात निर्माण केली. निराधारांच्या हक्काचा एक ऐतिहासिक लढा यशस्वी करून दाखवला. आपल्या सहकारी मैत्रिणींच्या मदतीन बहे ता. वाळवा जि. सांगली इथं स्वमालकीची घरं उभी केली.
खरंतर डॉ. गेल म्हणजे एक चालता बोलता ज्ञानकोषच. सततच्या अभ्यास, संशोधन आणि चिंतनातून त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. कोणताही विषय घ्या त्या विषयातलं सखोल ज्ञान डॉ. गेल यांच्याकडे आहे. समाजशास्राबरोबर साहित्य, कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रातलं त्यांचं काम उल्लेखनीय आहे.
दलित-आदिवासी-ग्रामीण साहित्य सभा असो किंवा विद्रोही सांस्कृतिक चळवळ असो या दोन्ही चळवळींची भूमिका विकसित करण्यात डॉ. गेल यांचा सहभाग महत्वाचा राहिलाय. विशेषतः जातीव्यवस्था आणि स्त्रियांचं शोषण हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे या देशातल्या जातीव्यवस्था आणि तिच्या अंतासाठी केला गेलेला संघर्ष या विषयावर संशोधनात्मक आणि चिकीत्सक लिखाण त्यांनी मोठ्या प्रमाणात केलं.
भारतातली नवी सामाजिक चळवळ, दलित आणि लोकशाही क्रांती, जातीविरोधी चळवळ आणि भारतीय संस्कृती- दलित दृष्टिकोन, भारतीय स्त्रियांचा संघर्ष यासोबत अलीकडे नुकतंच त्यांचं तुकोबांची गाणी हे पुस्तक प्रकाशित झालंय. या पुस्तकांशिवाय अनेक छोट्या छोट्या पुस्तिकांसह विविध नियतकालिकातून त्यांनी विपुल लिखाण केलं.
हेही वाचा: माणुसकीचे धागे मजबूत करणारी गडहिंग्लजची सलोखा परिषद
आज समाजात केवळ मी आणि माझं कुटुंब या पलीकडे कोणी पाहायला तयार नाही. प्रत्येकाने स्वतःभोवती एक कुंपण घालून घेतलंय. त्या कुंपणाच्या आत स्वतःच्या विश्वात जो तो हरवून गेला आहे. अशावेळी डॉ. गेल यांचं काम अधिक ठळकपणे अधोरेखित होतं.
अमेरिकेसारख्या प्रगत आणि ऐश्वर्यसंपन्न देशात जन्म. हाती प्रतिष्ठित युनिवर्सिटीची पदवी आणि कोणत्याही कामात झोकून देवून काम करण्याची वृत्ती यामुळे लौकिक अर्थाने त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप पैसा आणि नाव मिळवता आलं असतं. पण या सगळ्या सुखांना ठोकरून गेल भारतासारख्या एका नव्या देशात आली आणि इथल्या समाजजीवनाचा भाग होवून गेली.
मुळातच संशोधक वृत्ती असलेली गेल भारतात आली आणि तिच्या संशोधक नजरेला इथलं भीषण समाज वास्तव दिसून आलं. गेल जरी संशोधक असली तरी ती रुक्ष आणि कोरडी संशोधक नव्हती. ती एक संवेदनशील माणूस होती. समतावादी आणि मानवतावादी विचारधारेशी ती आत्यंतिक प्रामाणिक होती. त्यामुळे इथली जातीव्यवस्था आणि स्त्रियांची गुलामी पाहून ती अधिकच अस्वस्थ होत होती.
तिच्यातली कार्यकर्ती तिला स्वस्थ बसू देत नव्हती. सातपुड्यातल्या आदिवासी पाड्यापासून खेड्या पाड्यातल्या गावकुसाबाहेरच्या वस्त्यांपर्यंत ती फिरली. भारतातल्या समाज बदलाच्या चळवळीचा ती कधी भाग बनली हे तिलाच कळलं नाही.
डॉ. गेलचं लिखाण भारतातल्याच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सामाजिक राजकीय चळवळींसाठी दस्तऐवज बनलं. त्यांच्या लिखाणातून नव्या शोषणमुक्त समाजाकडे जाण्याचा मार्ग दिसू लागला. कोणत्याही विचारधारेचे आंधळे भक्त न बनता त्या विचारधारेला काळाच्या कसोटीवर तपासूनच घेण्याची त्यांची सवय. त्यामुळे त्यांचं लिखाण हे अत्यंत परखड आहे.
काही वेळा पोथीनिष्ठ बनलेल्या कर्मठ पुरोगाम्यानाही ते बोचणारं होतं. वैचारिक आणि सैद्धांतिक पातळीवर त्यांना खोडून काढणं शक्य होत नाही असं दिसताच त्यांना वैयक्तिक पातळीवर बदनाम करण्याचं कारस्थानही स्वतःला पुरोगामी समजणाऱ्यांनी केलं. पण या सगळ्याला त्यांनी भीक घातली नाही.
हेही वाचा: बाबासाहेबांनी पहिला मोर्चा दलितांसाठी नाही तर शेतकर्यांसाठी काढला
आज जागतिकीकरणा बरोबर एक नवी चंगळवादी संस्कृती इथं जन्माला येतेय. आजच्या नव्या प्रगत भांडवली व्यवस्थेमधे मानवी भाव-भावनांना क्रयवस्तू बनल्या आहेत. प्रेम सुध्दा बाजारपेठेतली एक वस्तु बनलंय. प्रेमालाही आता व्यावसायिकता आली आहे.
प्रेमाच्या निखळ, उदात्त आणि मानवीय हेतुबद्दलच शंका निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. गेल आणि डॉ. भारत यांच्या प्रेमाची उंची अधिकच गडद होते. धर्म, जात, वंश, देश, प्रदेश, भाषा आणि संस्कृतीच्या पलीकडे जावून त्यांच्या प्रेमाची परीकक्षा मानवी बनते. त्यांचं प्रेम निखळ मानवी संबंधाची परिभाषा बोलतं.
आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीचा पाया ज्या पती-पत्नीने घातला ते म्हणजे जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले. जोतिबाच्या प्रत्येक कृतीला सावित्रीची साथ होती तर सावित्रीच्या प्रत्येक गोष्टीला जोतिबाची शाब्बासकीची थाप होती. अगदी तसचं डॉ. गेल आणि डॉ. भारत यांच्याबद्दल म्हणता येईल.
मार्क्स, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांची कास धरून डॉ. गेल आणि डॉ. भारत यांनी आपलं आयुष्य वेचलं. सावित्री-जोतिबा सारखं परस्परांना समजून घेत समाज बदलाची चळवळ नेटाने सुरु ठेवली. कठीण प्रसंगामधे एकमेकांना साथ दिली. आज श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली नऊ-दहा जिल्ह्यांमधे कष्टकऱ्यांची चळवळ उभी आहे त्या पाठीमागे डॉ. गेल यांचं योगदान खूपच मोठं आहे.
डॉ गेल यांचं संशोधन, त्यांचं लिखाण, त्यांचा कष्टकऱ्यांच्या चळवळीतला सहभाग आणि त्यांचा त्याग यातून केवळ भारतातलाच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर नव्या पिढी समोर त्यांनी एक आदर्श घालून दिला आहे.
हेही वाचा:
मोहम्मद मोर्सी आणि अरब स्प्रिंगचा वारसा
गोड ऊस तोडणाऱ्या कामगाराचं कटू वास्तव मांडणारं पत्र
अपना बाजारची गोष्टीः सक्सेसफूल सहकार मॉडेलची कहाणी
दारिद्र्याची शोधयात्राः आपल्या अवतीभवतीच्या छळछावण्यांचं कथन
मोदी लोकशाही मार्गाने सत्तेत आलेत, त्यांना हरवण्यासाठीही तोच मार्ग वापरावा लागेल