स्वातंत्र्य, सार्वभौमत्वाचं नवं युग आणणारा शिवराज्याभिषेक सोहळा

०६ जून २०२३

वाचन वेळ : ६ मिनिटं


आज छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४९वा शिवराज्याभिषेक दिन. महाराजांनी या समारंभाचं ऐतिहासिक महत्त्व चिरकाल राहावं, यासाठी राज्याभिषेकापासून शिवशक सुरू केला. शक सुरू करणं म्हणजे सामान्य गोष्ट नव्हती. शक सुरू करणं म्हणजे नवं युग सुरू करणं. या राज्याभिषेकानं नवं युग सुरू झालंय.

कृष्णाजी अनंत सभासद हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आद्य चरित्रकार. मराठ्यांचा राजा रायगडावर छत्रपती झाला, हे पाहण्याचं भाग्य लाभलेला. त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे रायगडावर झालेल्या सोहळ्याचा खरा अर्थ समजलेला हा मराठी बखरकार आहे. तो म्हणतो: 'या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा. मऱ्हाटा पातशहा येवढा छत्रपती जाला, ही गोष्ट कांही सामान्य जाली नाही.' ही खरोखरच असामान्य गोष्ट होती.

शतकानुशतकांतून एखाद्या समाजाच्या इतिहासात असा एखादा वैभवशाली दिवस येतो. महाराष्ट्राच्या इतिहासामधे आलेला हा असा वैभवशाली दिवस होता. या युगात सर्वत्र मुसलमान राजे आम्हा हिंदूंना राजे होता येणारच नाही, अशा न्यूनगंडाने पछाडलेल्या हिंदू समाजात महाराजांनी राज्याभिषेक करून नवचैतन्य निर्माण केलं.

राज्याभिषेकाची आवश्यकता वाटली कारण...

देवगिरीच्या यादवांनंतर महाराष्ट्रात खरंखुरं राजेपद नाहीसं झालं होतं. निजामशाही आणि आदिलशाही या दक्षिणेतल्या शाह्यांत आणि उत्तरेकडच्या मोगल बादशाहीत अनेक हिंदूंना 'राजा' हा किताब असे; पण हे सर्व नावानेच राजे असत. जावळी, पालवण, शृंगारपूर जहागिरीच्या प्रमुखानांही 'राजे' असं म्हणत. खुद्द महाराजांचे वडीलही 'राजे' पद लावत. पण त्यांची सत्ता मुसलमान राजासारखी नव्हती. ते मुसलमान राजांचे सेवक होते.

आदिलशहाच्या दृष्टिकोनातून महाराज म्हणजे आपल्या जहागिरदाराचा बंडखोर पुत्र, आपल्या राज्यातला एक बंडखोर, लुटारू मनुष्य होते. कुतूबशहा, मोगल, पोर्तुगीज, इंग्रज या सर्वांचाही महाराजांकडे बघण्याचा दृष्टिकोन याहून फारसा वेगळा नव्हता. एवढंच नाही, तर महाराष्ट्रातले मोरे, सुर्वे, दळवी, निंबाळकर असे मराठे महाराजांना आपल्यासारखेच एक आदिलशहाचे सेवक समजत होते.

महाराजांना राज्याभिषेकाने हे दाखवून द्यायचं होतं की, प्रस्थापित मुसलमान राजवटीविरुद्ध बंडखोरी करण्याची पायरी महाराजांनी ओलांडली असून, त्यांनी 'मराठी राज्याची' स्थापना केली आहे आणि ते मोगल बादशहासारखे सार्वभौम सत्ताधीश बनलेत.

हेही वाचा: शिवरायांचं प्रतीक ही वारसदारांनी गमावलेली संधी

क्षत्रियांच्या अस्तित्वाबद्दलच शंका

अकबराच्या काळात कृष्ण नृसिंह शेष या धर्मपंडिताने 'शुद्राचार शिरोमणी' नावाचा ग्रंथ लिहिला होता. त्यामधे त्याने या कलियुगात जगात क्षत्रियच नाहीत, असा सिद्धांत सांगितला होता आणि त्याचाच प्रभाव हिंदुस्थानातल्या सर्व प्रजाजनांवर पडला होता.

महाराष्ट्रातले काही ब्राह्मण पंडितही त्याला अपवाद नव्हते. महाराजांनी राजाभिषेकाचा विचार बोलून दाखविताच त्यांनी दोन मूलभूत प्रश्न उपस्थित केले. या जगात क्षत्रिय आहेत काय? असतीलच तर महाराज क्षत्रिय आहेत काय? जसा प्रश्न तसंच त्यावर उत्तर शोधणं आवश्यक होतं.

खुद्द महाराजांना आपण क्षत्रिय आहोत, असं मनापासून वाटत असूनसुद्धा त्यांनी कुणाही पंडिताच्या मनात काही किल्मिष राहू नये, यासाठी आपल्या पदरी असणारे बाळाजी आवजी, केशवभट पुरोहित, भालचंद्र भट अशा पंडितांचं एक शिष्टमंडळ उत्तरेतल्या जयपूर, अंबर, काशी या ठिकाणी पाठवलं.

या शिष्टमंडळाने जयपूरच्या राजघराण्यातून सिसोदिया कुलाची शिवाजी महाराज याच वंशातले आहेत, हे सांगणारी वंशावळ प्राप्त केली आणि रजपूत राजांच्या दरबारी होणाऱ्या राज्याभिषेक समारंभाची शास्त्रीय माहिती जमा केली. पुढे हे शिष्टमंडळ काशीला गेलं, तिथं हिंदू जगतामधे प्रसिद्ध असलेल्या गागा भट्ट या महापंडिताला त्यांनी महाराजांच्या वतीने राज्याभिषेकाचं आध्वर्यत्व स्वीकारण्याची विनंती केली आणि ती त्यांनी मानली.

गागा भट्टाना पाचारण केलं

विश्वेश्वर ऊर्फ गागा भट्ट यांचं मूळ घराणं महाराष्ट्रातल्या पैठण या गावचं होतं. या घराण्यात अनेक महापंडित होऊन गेले होते. खुद्द गागा भट्ट हा हिंदू जगतामधला एक सर्वश्रेष्ठ पंडित समजला जात असे. अशा महान पंडिताला महाराजांनी राज्याभिषेकासाठी पाचारण केलं होतं.

खुद्द गागा भट्ट अनेक वेळा दक्षिणेत धर्मशास्त्र निर्णयासाठी येऊन गेला होता आणि महाराजांशी त्याचा चांगला परिचय होता. बाळाजी आवजीचे शिष्टमंडळ परतल्यानंतर महाराजांनी गोविंद भट्ट खेडकर याला गागा भट्टाना आणायला पाठवलं.

गागा भट्ट आल्यानंतर आपल्या अलौकिक विद्वत्तेनं आणि बुद्धिचातुर्याने त्याने ज्या मंडळींनी राज्याभिषेकाला विरोध केला होता, त्यांच्या शंकांचं निरसन करून समाधान केलं आणि समारंभाच्या पुढच्या तयारीला तो लागला.

हेही वाचा: राजमाता जिजाऊ म्हणजे स्वराज्याचा आधारवड

असा होता राज्याभिषेक सोहळा

६ जून १६७४ला रायगडावर शिवाजी महाराजांवर राज्याभिषेक झाला. त्यापूर्वी, सुमारे महिनाभर निरनिराळ्या देवदेवतांचं दर्शन आणि विविध धार्मिक विधी चालूच होते. त्यामधे तुलापुरुषदानविधी, उपनयन संस्कार, समंत्रक विवाह यांचा समावेश होता. मुख्य कार्यक्रम अत्यंत सुशोभित करण्यात आलेल्या राजसभेत झाला.

राज्यारोहणासाठी अत्यंत मौल्यवान असं ३२ मण वजनाच्या सोन्याचं आणि अष्ट रत्नजडीत स्तंभांचं सिंहासन तयार केलं गेलं होतं. शिवचरित्रकार सर जदुनाथ सरकार यांनी म्हटलंय की, ३२ मण म्हणजे १४ लक्ष रुपयांचं सोनं. रत्नांची किंमत त्याशिवाय हे सिंहासन तयार करत असता शिवाजी महाराजांच्यासमोर दिल्लीचं मयुरासन असावं.

महाराजांनी या सोहळ्यावर अपार दानधर्म केला. विद्वान पंडित, ब्राह्मण, संत-महंत, तडीतापसी यांना मुक्त हस्ते दाने दिली. २४ हजार होन केवळ दक्षिणेवर खर्च झाले. एकट्या गागा भट्टाला ७ हजार होन दक्षिणा देण्यात आली. राज्याभिषेकानंतर पुढे बारा दिवस हा दानधर्म सुरू होता. सभासदाच्या म्हणण्याप्रमाणे, एक करोड बेचाळीस लाख होन महाराजांनी या सोहळ्यावर खर्च केले. 'न भूतो न भविष्यती' असा हा राज्याभिषेक झाला.

नवं युग सुरू झालं

राज्याभिषेकाने महाराष्ट्राच्या कार्यावर कळस चढवला गेला. घटनात्मकदृष्ट्या खऱ्या अर्थाने स्वतंत्र सार्वभौम राज्य निर्माण होऊन त्याची घटना तयार झाली. अष्टप्रधान मंडळ हे या घटनेचं मुख्य अंग होतं. अष्टप्रधानांपैकी काहींच्या नेमणुका यापूर्वीच झाल्या असल्या, तरी आता त्या संस्कृत नावानिशी राज्याचे एक अंग म्हणून स्थिर झाल्या.

महाराजांनी पेशव्याला पंतप्रधान, मुजुमदाराला अमात्य अशी संस्कृत नावं देऊन मराठीवरच्या पारशी भाषेचं अतिक्रमण नष्ट करण्याचा प्रयत्न केला. खुद्द स्वतःसाठीसुद्धा विक्रमादित्य अशा प्रकारचं बिरूद न घेता ते छत्रपती असं घेतलं. त्याचा अर्थ छत्र धारण करणारा राजा. या छत्राखाली सर्व प्रजेला न्यायाने आणि धर्माने वागवलं जाईल, तिचं संरक्षण केलं जाईल, असं आश्वासन या पदवीत आहे.

महाराजांनी शिवशक सुरू केला. शक सुरू करणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही. अखिल हिंदवी राजकारणात या राज्याभिषेकाने नवं युग सुरू झालं आहे. हेच महाराजांना या शकाच्या निर्मितीनं घोषित करायचं होतं. हा घटनात्मक बदल महत्त्वाचा आहे. तसंच स्वतंत्र राज्याचं चलनही स्वतंत्र असंच पाहिजे. म्हणून महाराजांनी आपल्या राज्याची नवी नाणी पाडायला सुरवात केली. तांब्याचा पैसा, शिवराई आणि सोन्याचा शिवराई होन ही महाराजांची नवी नाणी यावेळी प्रचारात आली.

हेही वाचा: महात्मा जोतीराव फुलेच पहिले शिवचरित्रकार आणि शिवजयंतीचे उद्गातेही

मराठी धाटणीची लेखनपद्धती आली

महाराजांच्या राज्यकारभारात राज्याभिषेकाचं नवं पर्व सुरू झालं. धर्मशास्त्रानुसार जे कायदे योग्य होते, ते तसेच ठेवले गेले. काही नवे केले गेले. या कायद्यांचं स्वरूप मुलकी, लष्करी, धर्मविषयक आणि न्यायविषयक असं होतं.

पूर्वीची लेखनपद्धती मुसलमान धाटणीची होती. ती बदलून महाराजांनी मराठी धाटणीची लेखनपद्धती निर्माण केली. त्यासाठी महाराजांच्या आज्ञेने बाळाजी आवजी चिटणीस या हुशार चिटणीसाने लेखनप्रशस्ती नावाचा ग्रंथ लिहिला.

मराठी भाषेचा राज्यकारभारात अधिकाधिक पुरस्कार करण्यात आला. मराठी भाषेवरचं पारशीचं अतिक्रमण दूर करण्यासाठी रघुनाथ पंडिताने महाराजांच्या आज्ञेवरून राज्यव्यवहारकोश निर्माण केला आणि राज्यभरातल्या पारशी नावांना संस्कृत नावं रूढ केली.

महाराज सर्व भूमिपुत्रांचे छत्रपती

त्या काळातल्या हिंदू राजनीतीनुसार धार्मिक विधींनी महाराजांचा राज्याभिषेक झाला. ती त्या काळातली राजनैतिक गरज होती, हे लक्षात घेतलं पाहिजे.

वरवर पाहता महाराज हिंदूंचे राजे झाले असं वाटत असलं, तरी ते केवळ हिंदूंचे राजे न राहता सर्व भूमिपुत्रांचे घटनात्मक राजे झाले. शिवाजीराजांनी या भूमिपुत्रांच्या डोईवर संरक्षणाचं छत्र धरलं. त्यांच्यामधे स्वातंत्र्याची आणि सार्वभौमत्वाची अस्मिता निर्माण केली हाच या ऐतिहासिक घटनेचा अन्वयार्थ.

हेही वाचा: 

शिवरायांच्या डच चित्राच्या दंतकथांचा पर्दाफाश

लोकशाही मुल्यांमुळेच रयतेला शिवशाही हवीहवीशी

बगलबाज अर्जुनापेक्षा दगलबाज शिवराय शतपट श्रेष्ठ

या शिवजयंतीला प्रबोधनकारांचा `दगलबाज शिवाजी` वाचायलाच हवा

(लेखक ज्येष्ठ इतिहासकार असून त्यांचा लेख दैनिक पुढारीतून घेतलाय)