प्रा. सुरेश द्वादशीवार यांचं ‘चार्वाक’हे पुस्तक साधना प्रकाशनाने नुकतंच प्रकाशित केलंय. आधुनिक मानवी जीवनाच्या विचारविश्वाला व्यापलेल्या कळीच्या प्रश्नाला द्वादशीवार यांनी पुस्तकात हात घातलाय. द्वादशीवार यांचा ‘चार्वाक’ वाचताना ताज्या सामाजिक-सांस्कृतिक संदर्भांसह प्राचीन-पौराणिक-ऐतिहासिक घडामोडींचा एक विशाल पट धावत्या सिनेमासारखा आपल्या डोळ्यासमोर येतो.
‘सारं जग धर्मांधतेकडून धर्मनिरपेक्षतेकडे जात असताना भारत मात्र पुन्हा उलट्या वळणाने धर्मांधतेकडे जाऊ लागलाय. जगातली अरब राष्ट्रंच केवळ स्वतःला धार्मिक म्हणवून घेतात. भारतालाही त्यात सामील करण्याचा इथल्या एका राष्ट्रीय पक्षाचा प्रयत्न आहे. या स्थितीत याच देशात जन्मलेला आणि सगळ्या संकटांना तोंड देत टिकलेला चार्वाक इथं आणखी किती काळ तग धरणार?'
'यातला भारताचा संदर्भ केवळ आनुषंगिक आहे. चार्वाक ही साऱ्या जगाला त्याच्या मानवी जीवनाच्या आरंभापासून लाभलेली देणगी आहे. या देणगीच्या बळावरच त्याला आपली प्रगती साधता आली. हितसंबंध व स्वार्थ या गोष्टी स्वाभाविकच स्थितिवादी व प्रगतीला विरोध करणाऱ्या असतात. त्यांनी चार्वाकांचा विचार केवळ बदनामच नाही तर नाहीसा केला. पण चार्वाक आणि त्याचा विचार ही मानवी मनाची आणि बुद्धीची एक सामाजिक आणि अविभाज्य अशी बाजू आहे.'
हेही वाचा: गाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, हे सांगणारा कवितासंग्रह
प्रा. सुरेश द्वादशीवार यांच्या ‘चार्वाक’ या नव्या पुस्तकाच्या पहिल्याच प्रस्तावनापर लेखातल्या या ओळी आहेत. आधुनिक मानवी जीवनाच्या विचारविश्वाला व्यापून राहिलेल्या कळीच्या प्रश्नाला द्वादशीवार यांनी या पुस्तकात हात घातलाय. पुस्तकाच्या पहिल्या पानावर ते या पुस्तकाच्या विवेचनाचं एक सूत्र पुढीलप्रमाणे मांडतात:
ईश्वराला रिटायर करा – श्रीराम लागू
ईश्वर मेला आहे – नित्शे
ईश्वर जन्मालाच आला नाही – चार्वाक
एरवी तत्त्वज्ञानपर आणि वैचारिक पुस्तकं वाचताना कमालीचा संयम लागतो. थांबून थांबून वाचावं लागतं. पण द्वादशीवार यांचं ‘चार्वाक’ अपवाद आहे. एखाद्या रहस्यकथेसारखं ते पकड घेतं आणि दीडशे पानांचं हे पुस्तक आपण वाचूनच संपवतो. रेल्वेप्रवासात स्टेशनवरच्या बुकस्टॉलवर घेतलेलं पुस्तक पुढचं स्टेशन येईपर्यंत आपण वाचून खाली ठेवावं असं हे पुस्तक वाचताना लेखक आपल्या समोर बोलत आहेत, असा अनुभव देणारं आहे.
मराठीत यापूर्वी उपलब्ध असलेला ‘चार्वाक’ वाचला आहेच. लहानपणी एकदा नवनीत एका डायजेस्टमधून ओळख झाली होती. नंतर वाईच्या प्राज्ञ पाठशाळेचे सदाशिव आठवले यांचं आणि पुढे डॉ. आ. ह. साळुंखे यांचं लोकायत प्रकाशनाचं ‘आस्तिकशिरोमणी चार्वाक’ हेही पुस्तक वाचलं होतं. पण ही पुस्तकं वाचताना तत्त्वचर्चेचं दडपण मनावर असतं.
द्वादशीवार यांचा ‘चार्वाक’ वाचताना ताज्या सामाजिक-सांस्कृतिक संदर्भांसह प्राचीन-पौराणिक-ऐतिहासिक घडामोडींचा एक विशाल पट धावत्या सिनेमासारखा आपल्या डोळ्यासमोर येतो. त्यामुळे केवळ तात्त्विक चौकटीतच नाही तर जीवनाच्या सर्व क्षेत्राला व्यापून राहिलेल्या धर्म-राजकारण आणि अर्थकारणाच्या संदर्भात चार्वाक दर्शन काय सांगतं आणि आज आपण चार्वाकाला कुठे शोधू शकतो, याचं भान हे पुस्तक देतं.
हेही वाचा: कथागत: अल्पसंख्यांकांच्या अस्वस्थ वर्तमानाच्या कथा
‘चार्वाक’मधे एकूण पंधरा छोटी प्रकरणं आहेत. त्यातून लोकायत या धर्मपरंपरेचे आणि चार्वाक पंथाचे विविध पैलू ते उलगडून दाखवतात. त्यांच्या एकूण विवेचनाची दिशा ऐतिहासिक वर्णनपर किंवा तत्त्वज्ञानाच्या अकादमिक शिस्तीची नाही. ती वर्तमान सापेक्ष धर्म, नीती, अर्थ, युद्ध, शिक्षण, विज्ञान, राजकारण आणि जीवनमूल्यांच्या सापेक्ष आहे.
जगाच्या इतिहासात धर्म, श्रद्धा कसे अस्तित्वात आले, विषमता आणि शोषण धर्माचाच एक भाग कसे बनले, माणसाचं आयुष्य सुखकारक करण्यासाठी विचारसरणी कशा उदयाला आल्या, पुढे विज्ञानाने काय दिलं, भारतात वैदिक, सांख्य, जैन, बुद्ध या ज्ञान परंपरांचं चार्वाकाच्या संदर्भात काय स्थान आहे, अशा प्रश्नांची अत्यंत नेमकी, टोकदार आणि प्रासादिक शैलीत उत्तरं शोधण्याचा प्रयत्न प्रा. द्वादशीवार यांनी केलाय.
आद्य धर्म आणि धर्मव्यवस्था सांगताना ते सुरवातीलाच म्हणतात, 'लोकायत हा जगाचा आद्य धर्म आहे. तो कुणा गुरूच्या ग्रंथातून किंवा ईश्वराकडून माणसाला मिळाला नाही. तो त्याने स्वतःच आत्मसात केला आहे. या धर्माची शिकवण शब्दांतून येत नाही. ती प्रत्यक्ष अनुभवातून येते. आईवडील, शिक्षक, समाज, राजा, सामाजिक संस्था ते सांगत नाहीत. तो ज्याचा त्याने प्रमाणपूर्वक आणि प्रयत्नातून मिळवलेला जपलेला असतो.'
'या धर्माची अनेक नावे आहेत. चार्वाक, बार्हस्पत्य वा जीवनाचे शास्त्र. जेवढी नावे अधिक तेवढाच त्याचा आवाका वा प्रभावाचे क्षेत्रही मोठे आहे. तो ज्ञानी वा अज्ञानी, शिक्षित वा अशिक्षित, शहरी वा ग्रामीण किंवा पाश्चात्य वा-पौर्वात्य अशा सर्व व्यक्तींना सहजगत्या प्राप्त होणारा आहे.'
हेही वाचा: कोरोनाकाळाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात कसं उमटलंय?
जगातल्या धर्मांचा उदय आणि प्रसार यांचं विवेचन करून ते भारतातल्या धर्मव्यवस्थेच्या संदर्भात आपली काही निरीक्षणं मांडतात:
'हिंदू धर्म त्याच्या सहिष्णुतेसाठी प्रसिद्ध आहे. त्याने इतर धर्मांचे ग्रंथ जपले. पण चार्वाकांचा एकही ग्रंथ ठेवला नाही. कारण इतर धर्म कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ईश्वर, मंदिर आणि भक्ती मानत होते. चार्वाकांचा लढाच त्याविरुद्ध होता. काही विद्वानांच्या मते, तेराव्या शतकात सापडलेला तत्वोपप्लवसिंह हा जयराशीभट्टाचा ग्रंथ चार्वाकांचा असावा. पण त्याचा ग्रंथकर्ता म्हणतो, मी चार्वाक मतासह सर्व धर्ममतांचं खंडन करून दाखवतो. तात्पर्य, चार्वाकांचा ग्रंथ नाही, परंपरा नाही, त्यांचे आचार्य नाहीत आणि तरीही तो पंथ राहिला आहे. कशाच्या बळावर? सामान्य माणसांच्या अनुभवसिद्ध ज्ञानाच्या भरवशावर.'
थोडक्यात आज चार्वाकावर एकही ग्रंथ अस्तित्वात नाही, कारण चार्वाक हा शब्दप्रामाण्य आणि ग्रंथप्रमाण्याच्या विरोधातच होता. स्त्री-शूद्रांचे शोषणच ग्रंथप्रमाण्याच्या आधारे होत होतं. हा इतिहास आणि चार्वाकाचा या शोषणालाच विरोध होता.
धर्मांनी शोषणासाठी आणि सत्तेसाठी अनुकूल समाजमन कसं घडवलं, ते सांगताना प्रा. द्वादशीवार लिहितात,
'सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वाताएवढे' ही विचारसरणी केवळ दुःखमयच नाही तर सुतकी आहे. माणसाला त्याचा जन्म मिळतो तोच शिक्षा म्हणून, पूर्वजन्मीच्या संचिताचं प्रायश्चित्त म्हणून. ते प्रायश्चित्त या जन्मात चांगलं अनुभवलं तर त्याला पुढचा जन्म चांगला मिळतो किंवा तो मोक्षप्राप्ती करतो. हे आपलं धर्मचिंतन माणसाचं आयुष्य मुळातच दुःखी असल्याचं, संचिताचं फलित असल्याचं आणि ब्रह्मतत्त्वाशी सायुज्यता प्राप्त केल्याशिवाय खरं सुख प्राप्तच होत नाही असं सांगणारं आहे.'
'ही रडतराऊ धर्मचिंतनं ख्रिश्चन, बौद्ध, जैन यांनीही सांगितली आहेत. तात्पर्य. धर्म, सुखाचा निषेध करणारे, ते पापांचं फलित असल्याचं सांगणारे, त्यावर चोरटेपणाचा आरोप लावणारे आहेत. खरी सुखं त्यागात, भक्तीत, सर्वसंगपरित्यागात, संन्यासात, संसारात राहूनही त्याचा आनंद न घेण्यात मिळतं असं म्हणतात.'
'ख्रिश्चन धर्म तर स्त्रीपुरुषांनी अपत्यप्राप्तीसाठी समागम करावा. पण त्या समागमाचा शारीरिक, मानसिक आनंद मात्र घेऊ नये असं सांगतो. निर्वाणात आनंद, मोक्षात आनंद, स्वर्गात आनंद आणि मृत्यूनंतर तो मिळण्याची शक्यता हे धर्माचं सांगणं तर सुख याच जन्मात आजच आणि सर्व तऱ्हेच्या कष्टाने मिळवायचं हे अमेरिकेच्या घटनेप्रमाणे आधुनिक जगाचंही सांगणं आहे.'
हेही वाचा: श्वासाच्या हक्कांसाठीचा लढा
'आश्चर्य हे की, हेच चार्वाकांचं मत आहे. जोपर्यंत जगायचं तोपर्यंत सुखाने जगा. कारण मृत्यू अज्ञात आहे, तो आला की सगळं संपतं. शरीराची एकदा राख झाली की मग मागे काही उरत नाही हे चार्वाकांचं सुखदर्शी सांगणं आहे. सुखप्राप्तीचा संबंध सामान्यपणे कोणत्याही मार्गाने सुख प्राप्त करण्याशी जोडला जातो.'
'चंगळवाद, फसवणूक, हिंसा, दडपशाही, युद्ध, जिंकणं हे सुखप्राप्तीचंच स्वरूप आणि मार्ग आहेत. त्यांचा दरवेळी नीतीशी संबंध असतोच असं नाही. मग चार्वाकांना नीतीचा मार्ग अमान्य आहे काय? नाही. चार्वाकांचा मार्ग केवळ नीतीचाच नाही तर सुखी आणि सुरक्षित जीवन जगण्याचा आहे. आयुष्य सुरक्षित करणं, त्याच्या गरजा भागवणं आणि आपली सुखं अनुभवणं हा तो मार्ग आहे. त्यांना हिंसा, अनीती, फसवणूक आणि चंगळही मान्य नाही.'
थोडक्यात आजच्या वर्तमान धर्मप्रणीत हुकुमशाहीकेंद्री बाजारमूल्यांवर आधारित शासनप्रणालींच्या ऐतिहासिक प्रेरणा समजून घ्यायच्या असतील आणि शाश्वत जीवनमूल्यांच्या दिशेने जाणारा भविष्याचा मार्ग शोधायचा असेल तर ज्ञानलालसा असलेल्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचावं असं झालंय.
पुस्तक - चार्वाक
लेखक - सुरेश द्वादशीवार
प्रकाशक - साधना प्रकाशन, पुणे, मार्च २०२१
किंमत - १५०
पुस्तकासाठी संपर्क - साधना मिडिया सेंटर पुणे- ९९२१०९८२९०
हेही वाचा:
कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?
व्यवस्थेनं झोप उडवली असताना ‘निद्रानाश’ अटळ आहे!
(प्रमोद मुनघाटे यांच्या फेसबुक पेजवरून साभार )