दुबईत झालेल्या टी- ट्वेन्टी वर्ल्डकपवर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा आपलं नाव कोरलं. एरॉन फिंच याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या या टीमने सातत्यपूर्ण खेळाला अष्टपैलू कामगिरीची जोड देत स्वप्नवत कामगिरी केली. भारतीय खेळाडूंनी सर्वोच्च कामगिरी करणं अपेक्षित होतं. पण तशी जिद्द खेळाडूंकडून दिसली नाही. पैशापेक्षा देशाचं हित अधिक महत्त्वाचं आहे, हे खेळाडूंना कळेल तेव्हाच भारतीय टीम पुन्हा विश्वविजेता होऊ शकेल.
संयम, चिकाटी, सांघिक कौशल्य, महत्त्वाच्या क्षणी आक्रमकता आणि जबरदस्त आत्मविश्वास याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुबईत नुकत्याच झालेल्या टी ट्वेन्टी वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं. एरॉन फिंच याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या या टीमने सातत्यपूर्ण खेळाला अष्टपैलू कामगिरीची जोड देत स्वप्नवत कामगिरी केली.
हेही वाचा: कॉमेंट्रीटर असे अतिशहाण्यांसारखे का वागतात?
ऑस्ट्रेलियाने आजपर्यंत वनडे मॅचच्या वर्ल्डकप स्पर्धेत पाच वेळा अजिंक्यपद मिळवलं असलं तरी टी-ट्वेन्टी स्पर्धेत मात्र त्यांना जगज्जेतेपदावर मोहर नोंदवता आली नव्हती. त्यामुळेच की काय, यंदा या स्पर्धेपूर्वी संभाव्य विजेत्या टीममधे त्यांची गणना केली जात नव्हती.
कांगारूंची टीम फक्त कागदावरच वरचढ आहे, अशी टीकाही करण्यात आली होती. या टीकेला आपल्या कामगिरीने उत्तर द्यायचं, असं कांगारूंनी ठरवलं होतं आणि त्यानुसार प्रत्येक मॅचमधे त्यांची कामगिरी सरसच ठरली. शेवटच्या मॅचमधे त्यांनी पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या न्यूझीलंडचा सहज पराभव करत आपली महानता पुन्हा सिद्ध केली.
साखळी गटातल्या सगळ्या मॅचमधे सफाईदार विजय मिळणार्या पाकिस्तानने सेमी फायनलपर्यंत केलेली वाटचाल आणि बलाढ्य भारतीय टीमवर साखळी गटातच पराभूत होण्याची झालेली नामुश्की हेसुद्धा या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल.
वर्ल्डकप स्पर्धा म्हणजे कोण्या एका खेळाडूची स्पर्धा नसते. इथं टीममधला प्रत्येक खेळाडू मौल्यवान असतो, हेच ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी दाखवून दिलं. टीममधली पहिली फळी लवकर बाद झाली तर मधल्या फळीने सावध; पण आक्रमक खेळ करत टीमला विजयपथावर नेण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे, हे तत्त्व त्यांच्या खेळाडूंनी सेमी फायनलमधे पाकिस्तान विरुद्ध अंमलात आणलं.
विजयासाठी १७७ धावांचा पाठलाग करताना निम्मी टीम ९६ धावांमधे तंबूत परतली, त्यावेळी पारडं पाकिस्तानच्या बाजूने झुकलं होतं. पण मार्कोस स्टोईनिस आणि मॅथ्यू वेड यांनी ८१ धावांची अखंडित भागीदारी करत टीमला सनसनाटी विजय मिळवून दिला. बॉलिंगमधे कीर्तिवान बॉलर अपयशी ठरले तर त्यांची जागा भरून काढण्याची जबाबदारी ऑस्ट्रेलियाचे दुसरे बॉलर पार पाडतात, हे सेमी फायनल आणि फायनलमधे दिसून आलं.
कांगारूंच्या डम झंपा या लेग स्पिनरने या स्पर्धेत तेरा विकेट्स घेत महत्त्वपूर्ण कामगिरी केली. फायनल मॅचमधे त्याला अपेक्षित यश मिळालं नाही, तेव्हा त्याचा सहकारी जोश हॅजलवुड याने किफायतशीर बॉलिंग करतानाच तीन विकेट्सही घेतल्या.
हेही वाचा: देशाने लढाई करावी पासून विश्वचषक जिंकावा हा उन्मादच
अपयशी कॅप्टन म्हणून सनरायझर्स हैदराबाद टीमने डेविड वॉर्नर यांची टीममधून हकालपट्टी केली होती. त्याच वॉर्नरने वर्ल्डकप स्पर्धेत सात मॅचमधे २८९ धावा करताना स्पर्धेचा मानकरी किताबही पटकावला आणि ऑस्ट्रेलियाच्या विजेतेपदात सिंहाचा वाटा उचलला.
वॉर्नरचा सहकारी मिचेल मार्श हा गेली दोन-तीन वर्ष वेगवेगळ्या दुखापतींना सामोरा जातोय. तरीही त्याने या दुखापतींना महत्त्व न देता आपल्या टीमला सर्वोच्च यश मिळवण्यासाठी प्राधान्य दिलं. फायनलमधे त्याने केलेली नाबाद ७७ धावांची खेळी याचंच प्रमाण होती. नाहीतर भारतीय खेळाडू हार्दिक पंड्या. टीमच्या कामगिरीपेक्षा मौल्यवान वस्तू कशा घेता येतील याकडे त्याचं लक्ष असतं.
न्यूझीलंडच्या टीममधे अनेक गुणवान खेळाडू आहेत. त्यांनी २०००मधे चॅम्पियन्स कप जिंकला, तर यंदा त्यांनी जागतिक टेस्टचं अजिंक्यपद पटकावलं. या दोन विजेतेपदांचा अपवाद वगळता आजपर्यंत त्यांना अनेक वेळेला वर्ल्डकपच्या सर्वोच्च स्थानापासून वंचित राहावं लागलंय. टी-ट्वेन्टी स्पर्धेतही त्याचाच प्रत्यय दिसून आला. सेमी फायनलमधे बलाढ्य इंग्लंडविरुद्ध त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करत विजय मिळवला. फायनलमधे कांगारूंविरुद्ध त्यांच्या बॉलरनी सपशेल निराशा केली.
केन विल्यमसनने केलेल्या झंझावती ८५ धावांच्या जोरावर त्यांनी ऑस्ट्रेलियापुढे १७३ धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यावेळी न्यूझीलंडचे बॉलर ऑस्ट्रेलियन बॅट्समनना धावांसाठी संघर्ष करायला लावतील, अशी अपेक्षा होती. पण वॉर्नर, मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या धडाकेबाज खेळापुढे त्यांच्या बॉलर्सची डाळ शिजली नाही. विल्यमसन हा एकहाती विजय मिळवून देऊ शकत नाही, हे इथं सिद्ध झालं.
पाकिस्तानच्या खेळाडूंनी केलेली कामगिरी खरोखरीच कौतुकाला पात्र आहे. साखळी गटात सर्वच्या सर्व पाच मॅच त्यांनी जिंकल्या. त्यांचा विकेटकिपर बॅट्समन मोहम्मद रिझवान हा सेमी फायनलपूर्वी एवढा आजारी पडला होता, की त्याला अतिदक्षता विभागात दोन रात्री काढाव्या लागल्या. तरीही हा खेळाडू हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर थेट सरावासाठी हजर झाला. सेमी फायनलमधे त्याने दमदार अर्धशतकही टोलवलं.
एके काळी क्रिकेटचं सम्राटपद भूषवणार्या वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी यंदा सपशेल निराशा केली. साखळी गटातल्या पाच मॅचपैकी फक्त एकच मॅच त्यांना जिंकता आली. अनपेक्षित आणि सनसनाटी कामगिरी करण्यात प्रसिद्ध असलेल्या बांगलादेश टीमला एकही मॅच जिंकता आली नाही. श्रीलंकेसारख्या तुल्यबळ टीमलाही साखळी गटातच पराभव पत्करावा लागला. जेमतेम दोनच मॅच त्यांना जिंकता आल्या.
अफगाणिस्तान म्हटलं, की आपल्यासमोर सतत युद्धाच्या छायेत वावरणारा देश असं चित्र उभं असतं. दिवसातला प्रत्येक क्षण मृत्यूच्या छायेत वावरणार्या अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी या वर्ल्डकपमधे दोन मॅच जिंकून चाहत्यांची मनंही जिंकली. विजय मिळवण्याची ईर्ष्या असेल, आत्मविश्वास असेल तर कितीही अडथळे आले तरी ते सहजगत्या पार करता येतात, हेच त्यांच्या खेळाडूंनी दाखवून दिलं. त्यांचा बॉलर मुजीब उर झादरान याने स्कॉटलंडविरुद्ध पाच गडी बाद करत सनसनाटी कामगिरी केली.
हेही वाचा: भारत उगाच वर्ल्डकप खेळत नाही, तिथे घसघशीत कमाईही होते
आर्थिक उत्पन्नाचे मर्यादित स्रोत, सरावाची वानवा या अनेक अडचणी असताना कसं आत्मविश्वासाने सामोरं जाता येतं, हे भारतीय खेळाडूंना पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या खेळाडूंकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. इतर देशांच्या तुलनेत विचार केला तर भारतीय क्रिकेटपटूंना भरपूर पैसा मिळतो. बीसीसीआयने वेगवेगळ्या श्रेणीनुसार खेळाडूंना वार्षिक मानधन देण्याची सुविधाही उपलब्ध केली आहे. आयपीएल स्पर्धा तर खेळाडूंसाठी कुबेराचा खजिना लुटण्याची संधी असते.
कोणतीही आर्थिक चिंता नसताना खेळाडूंनी सर्वोच्च कामगिरी करणं अपेक्षित असतं. पण तशी जिद्द भारतीय खेळाडूंकडून दिसली नाही. पाकिस्तानकडून पहिल्याच मॅचमधे धुळधाण उडाल्यानंतर भारतीय जागे होतील, अशी अपेक्षा होती. पण न्यूझीलंड विरुद्ध लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर भारताच्या सेमी फायनलच्या आशा संपल्या.
धडाकेबाज सलामीवीर म्हणून ख्याती असलेल्या रोहित शर्माला तिसर्या क्रमांकावर पाठवणं, इतर बॅट्समनच्या क्रमवारीत विनाकारण बदल करणं, अनुभवी बॉलरचा समावेश न करणं, कचखाऊ नेतृत्व, टीम मॅनेजमेंट आणि खेळाडू यांच्यात सुसंवादाचा अभाव, वर्ल्डकप खेळण्यासाठी आवश्यक असणार्या गांभीर्यपूर्ण देहबोलीचा अभाव अशा अनेक कारणांमुळे भारताला सेमी फायनल गाठता आली नाही.
सततच्या मॅचमुळे खेळाडूंची झालेली शारीरिक आणि मानसिक दमछाक, भारताच्या लढतींना भरपूर प्रेक्षकवर्ग मिळतो म्हणून या लढती संध्याकाळीच ठेवण्याचं धोरण, त्यामुळे संध्याकाळी दवयुक्त वातावरणाचा खेळाडूंच्या कामगिरीवर झालेला अनिष्ट परिणाम हे भारतीय टीमच्या पराभवाची कारणं म्हणावी लागतील.
दुर्दैवाने क्रिकेट संघटकांसाठी क्रिकेट मॅच म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. त्यामुळे खेळाडूंच्या शारीरिक आणि मानसिक विश्रांतीचा अपेक्षेइतका गांभीर्याने विचार केला जात नाही. खेळाडूही आपली आर्थिक बाजू बळकट करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करीत असतात.
पंचतारांकित हॉटेलमधे आपल्या पत्नी किंवा मैत्रिणीसोबत राहिले तरी शेवटी घरातली विश्रांती अधिक महत्त्वाची असते, हे त्यांच्या लक्षात येत नाही. संघनिष्ठेपेक्षा त्यांना पैसा जास्त महत्त्वाचा वाटतो. पैशापेक्षा देशाचं हित अधिक महत्त्वाचं आहे, हे खेळाडूंना कळेल तेव्हाच भारतीय टीम पुन्हा विश्वविजेता होऊ शकेल.
हेही वाचा:
महेंद्र सिंग धोनी: वनडेतला ‘ग्रेट फिनिशर’
ख्रिश्चनांच्या पंढरीत अवतरलीय धर्मगुरूंची क्रिकेट टीम