आपल्या देशाचा जीडीपी विक्रमी टक्क्यांनी घसरलाय. कोरोना आणि लॉकडाऊनने तिचं कंबरडं मोडलंय. लोक खर्चच करत नाहीत. सरकारने अर्थव्यवस्थेत जीव फुंकण्याचे प्रयत्न अगदीच अपुरे ठरलेत. अशावेळेस भारतीय अर्थव्यवस्थेसाठी काय करावं लागेल याचं एक टिपण रिझर्व बँकेचे माजी गवर्नर डॉ. रघुराम राजन यांनी सोशल मीडियावर सविस्तर दिलंय. त्याचा हा अनुवाद.
२०२० ते २०२१ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीची भारतीय अर्थव्यवस्थेची आकडेवारी प्रसिद्ध झालीय. आपण खडबडून जागं व्हायला हवं. एप्रिल ते जून २०२० या तिमाहीत भारताच्या जीडीपीच्या वाढीचा वेग गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत २३.९ टक्क्यांनी घसरला आहे. इटली आणि अमेरिका या कोविड १९ चा सर्वाधिक संसर्ग झालेल्या देशापेक्षाही भारतीय अर्थव्यवस्थेची घसरण अधिक आहे, हे प्रामुख्यानं लक्षात घ्यायला हवं. अमेरिकेच्या जीडीपीमधली घसरण ९.५ टक्के आहे तर इटलीचा जीडीपी १२.४ टक्क्यांनी घसरलाय.
भारताच्या अर्थव्यवस्थेची घसरण या दोन्ही देशांपेक्षा कितीतरी अधिक असून, कोरोनाचा संसर्ग अद्याप देशात थैमान घालतोय. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट किंवा इतर व्यवसायांमधे गर्दीच्या भीतीने अनेक दिवस उलाढाल कमी असणार आहे. अशा परिस्थितीत सरकार देत असलेलं पॅकेज महत्त्वाचं असतं. हे पॅकेज अत्यंत तोकडं असून, त्यात प्रामुख्याने गरिबांना मोफत अन्नधान्य, लहान आणि मध्यम उद्योगांना कर्ज देण्यासाठी बँकांना कर्जाची हमी असे उपाय असून ते ठिगळ लावल्यासारखे आहेत.
यापेक्षा अधिक काही द्यायला सरकार नाखूष दिसतं आणि त्यामागे कदाचित भविष्यात द्याव्या लागणार्या प्रोत्साहनात्मक पॅकेजसाठी पैसा वाचविण्याचं धोरण असू शकतं. हे धोरणही आत्मघातकीच ठरेल.
हेही वाचा : कोरोनाकाळात टाळायच्या सहा आर्थिक चुका
अर्थव्यवस्थेचा विचार एखाद्या पेशंटसारखा केला तर पॅकेज त्याला बरं वाटण्याच्या दृष्टीने दिलेलं औषध ठरतं. आजाराशी मुकाबला करताना पेशंटला तातडीने दिलासा हवा असतो. अर्थव्यवस्थेच्या पडत्या काळात असा दिलासा दिला नाही तर काही कुटुंबांची उपासमार होते. काहीजण त्यांच्या मुलांना शाळेतून काढतात आणि कामावर किंवा भीक मागायला पाठवतात. काही लोक सोनं गहाण ठेवून कर्ज काढतात. बँकांचे हप्ते आणि घरभाडं यांची थकबाकी वाढत जाते. त्याचप्रमाणे लहान आणि मध्यम व्यवसाय कामगारांचा पगार देऊ शकत नाहीत. कर्जाचे हप्ते भरत नाहीत किंवा व्यवसाय कायमस्वरूपी बंद करून टाकतात.
आजारपणामुळे पेशंट अशक्त होतो. पण त्याच्यात रोगप्रतिकारशक्ती असेल तर तो स्वतःचा बचाव करू शकतो. आता आर्थिक पॅकेजचा विचार टॉनिक म्हणून करून पहा. आजार बरा झाल्यानंतर एखादं टॉनिक पेशंटला दिलं तर त्याचा अशक्तपणा दूर करून वेगानं सुदृढ व्हायला मदत करतं. पण पेशंट जास्तीचा अशक्त झाला तर टॉनिकचा परिणाम फारच कमी होईल. त्याचप्रमाणे काही कुटुंबांमधे कमाई सुरू झाल्यानंतरसुद्धा खरेदी कमी असेल.
भविष्यात आपल्याला स्वतःसाठी बचत करून ठेवावी लागणार आहे आणि सरकारच्या मदतीशिवाय आपल्याला दिवस ढकलावे लागणार आहेत, असं लोकांना वाटत असेल तर ते फार खर्च करणार नाहीत. आता सुरू झालेल्या लहान आणि मध्यम उद्योगांना कर्ज आणि व्याजाची अधिक प्रमाणात परतफेड करायची असेल, तर उद्योग चांगल्या प्रकारे चालू शकणार नाहीत. थोडक्यात, लोकांना दिलासा देणारी ठोस मदत दिली नाही, तर अर्थव्यवस्थेचं प्रचंड नुकसान होऊ शकतं. ब्राझीलने लोकांना तातडीची आर्थिक मदत देण्यासाठी मोठा खर्च केला आणि त्यामुळेच ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेची आकडेवारी आपल्यापेक्षा चांगली दिसते.
भारत कोरोनापासून पूर्ण मुक्त होईल, त्यावेळी मोठं पॅकेज दिलं जाण्याची शक्यता सरकारी अधिकार्यांनी गृहित धरली असेल, तर त्यावेळी अधिक मंदावलेल्या आणि धास्तावलेल्या अर्थव्यवस्थेपुढची आव्हानं त्यांना ओळखता येत नसावीत, असंच म्हणावं लागेल. अर्थव्यवस्थेच्या 'वी' आकारातल्या उभारीबद्दल दावे करण्याऐवजी या अधिकार्यांनी एका प्रश्नावर विचार करायला हवा. अमेरिकेनं जीडीपीच्या २० टक्के रक्कम पॅकेज म्हणून वाटलेली असतानासुद्धा तिथली अर्थव्यवस्था २०२१ च्या अखेरपर्यंत याआधीची स्थिती गाठू शकणार नाही, अशी भीती तिथल्या राज्यकर्त्यांना का वाटते, हा तो प्रश्न आहे.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
कोविड साथीचा हाहाकार अचानक का वाढला?
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?
कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?
एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?
कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!
कोरोनाचा संसर्ग होण्यापूर्वीच भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला होता आणि सरकारी तिजोरीची स्थितीही अत्यंत नाजूक होती. त्यामुळे लोकांना तातडीची मदत आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी प्रोत्साहनात्मक पॅकेज या दोन्ही गोष्टी देण्याइतकं सरकार आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही, असं अधिकार्यांना वाटत असावं. ही खूपच नकारात्मक मानसिकता आहे. सरकारला उत्पन्नाचे जास्तीत जास्त स्रोत शोधावे लागतील आणि त्यातून मिळवलेली रक्कम जास्तीत जास्त शहाणपणाने खर्च करावी लागेल.
त्याचप्रमाणे अधिक खर्च न करता अर्थव्यवस्थेला गती कशी देता येईल, याचा विचार करून शक्य तेवढ्या उपाययोजना कराव्या लागतील. यासाठी सरकारने अधिक विचारी आणि कृतिशील बनण्याची गरज आहे. दुर्दैवाने, सुरुवातीला ज्या घडामोडी वेगाने वाढल्या होत्या त्या आता पुन्हा थंड पडल्यात.
आर्थिक रसद उभी करताना मध्यम मुदतीच्या बाँडच्या मदतीने कर्जाऊ रक्कम घ्यायला मागेपुढे पाहता कामा नये. पण त्यासाठी परताव्याची हमी द्यायला हवी. भविष्यात सरकारवरचं कर्ज वाढू नये म्हणून कायदा केल्यास, तसेच आर्थिक घडामोडींवर नजर ठेवणारी एक स्वतंत्र आणि पारदर्शक वित्तीय समिती स्थापन केल्यास हे शक्य आहे. अशा प्रकारे बाजारातून कर्जाऊ रक्कम घेण्याबरोबरच सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागांची ‘ऑन टॅप’ विक्री करण्याचा पर्याय सरकारसमोर आहे.
अनेक सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या सध्याच्या पडझडीच्या काळातही शहरी भागांमधे नफ्यात आहेत. त्यांच्या समभागाची विक्री तातडीने होऊ शकली नाही, तरी त्याची तयारी आणि वेळापत्रक जाहीर करणं सरकारला शक्य आहे. असं केलं तर अर्थव्यवस्थेला उभारी देण्याच्या बाबतीत सरकार गंभीर आहे, असा मॅसेज बाँड्सच्या बाजारात जाईल.
सरकारी खर्चाचा विचार करताना प्राधान्यक्रम ठरवणं अत्यंत आवश्यक आहे. मनरेगा ही ग्रामीण भागातली जनतेला रोजगाराच्या माध्यमातून दिलासा देणारी योजना असल्याचं स्पष्ट आणि सिद्ध झालंय. या योजनेत आवश्यकतेप्रमाणे पैसे गुंतवणं फायद्याचं ठरेल. शहरातल्या गरिबांना मनरेगा योजनेचा लाभ घेता येत नाही. अशा परिस्थितीत कोरोनाच्या संसर्गाचा कालावधी वाढेल हे गृहित धरून शहरी गरीब कुटुंबांना थेट आर्थिक लाभ पोचवण्यावर लक्ष द्यायला हवं.
हेही वाचा : बेरोजगारी कमी करण्यासाठी शेतीक्षेत्र खुलं करायला हवं!
सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या उद्योगांकडून अनेक देणी थकित आहेत, अशी चर्चा वर्षानुवर्ष सुरू आहे. या उद्योगांनी देणी दिल्यास खासगी उद्योगांकडे पैसा येईल. त्याचप्रमाणे विशिष्ट आकारापेक्षा लहान उद्योगांना त्यांनी गेल्या वर्षी जमा केलेल्या कॉर्पोरेट कर आणि जीएसटी करामधून पूर्णतः किंवा अंशतः सूट देता येईल. अशा प्रकारच्या उपाययोजनांमुळे प्रामाणिकपणे करभरणा केल्याबद्दल अशा कंपन्यांना बक्षिस दिल्यासारखंही होईल. कठीण काळात मदतही होईल. त्याचप्रमाणे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना त्यांचा तोटा भरून काढण्याच्या दृष्टीने सरकारने निधी देणं आवश्यक आहे.
खासगी क्षेत्रातल्या सक्षम उद्योगांनीही अडचणीतल्या उद्योग व्यवसायांना मदतीचा हात देण्याची ही वेळ आहे. उदाहरणार्थ अमेझॉन, रिलायन्स आणि वॉलमार्टसारख्या सक्षम कंपन्यांनी आपल्या पुरवठादारांना आर्थिक मदत दिल्यास त्यांना पुन्हा आपल्या पायावर उभं राहणं शक्य होईल. सर्वच मोठ्या कंपन्यांनी देणी वसूल होण्याच्या दृष्टीने सवलती जाहीर केल्या तर त्याचा फायदा होईल. कर्जाऊ आणि अन्य रकमांची परतफेड करण्यासाठीच्या सर्वच सवलती संपल्या तर अनेक कंपन्यांना देणी परत देणं अवघड होऊन बसेल. अशा उद्योग, व्यवसायांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकारला अत्यंत विचारपूर्वक कृती आराखडा तयार करावा लागेल.
अर्थव्यवस्थेला उभारी देण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन म्हणून अनेक ठिकाणी सरकारला गुंतवणूक करावी लागेल. विशेषतः पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी गुंतवणूक केल्यास त्यातून मोठ्या संख्येने रोजगारनिर्मिती होईल. परिणामी लोकांची काम करण्याची शक्ती वाढून बाजारपेठेतली मागणी वाढेल. जी राज्य सरकारं पायाभूत सुविधांच्या उभारणीत अधिक गुंतवणूक करतील, त्यांना केंद्राने प्रोत्साहन द्यायला हवं. या आणि अशा काही उपाययोजना सरकारला तातडीने कराव्या लागतील. तरच सध्याच्या घसरणीच्या अवस्थेतून अर्थव्यवस्था सावरू शकेल.
हेही वाचा :
जिंकू किंवा मरू, बेरोजगारीशी लढू!
अर्थव्यवस्था सावरण्यासाठी धाडस हवं!
टाळेबंदीने उद्ध्वस्त झाला आठवडी बाजार
आयपीएलच्या तपाची कहाणी : थोडी मिठी, जास्त खट्टी
(दैनिक पुढारीतून अनुवाद साभार)