वर्ल्डकप १९८३: भारतीय क्रिकेटच्या संक्रमणाची गोष्ट

१२ जानेवारी २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


ध्येय, आत्मविश्‍वास आणि धाडस काय असतं हे दाखवत कपिल देवने भारतीयांची मानसिकता बदलली. क्रिकेट दुनियेला भारतीय टीमची दखल घ्यायला भाग पडलं. नंतरच्या काळात भारतीय टीमच्या दिमाखदार कामगिरीने 83चं यश हा नुसता नशिबाने मिळालेला विजय नव्हता हे दाखवून दिलं. 83च्या विजयाने भारतीयांना मोठी स्वप्नं बघायची शिकवण दिली ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणता येईल.

दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मुंबई विरुद्ध कर्नाटक रणजी मॅच बघायला मी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या मैदानावर गेलो होतो. या मैदानाला स्टेडियमसारखे स्टँड नाहीत. तेव्हा प्रेक्षकांची अपेक्षाच नव्हती आणि तसंही हल्ली रणजी करंडकाच्या मॅचला प्रेक्षक कुठे असतात. त्या दिवशी त्या सामन्याला मला दोन प्रेक्षकांची साथ होती.

पहिले प्रेक्षक होते मुंबई क्रिकेटचे गाढे अभ्यासक, प्रख्यात क्रीडा समीक्षक डॉ. मकरंद वायंगणकर आणि दुसरे प्रेक्षक होते भारताचे माजी बॉलर, १९८३च्या वर्ल्डकप विजेत्या टीमचे सदस्य बलविंदरसिंग संधू. बलविंदरसिंग संधूंची अजून एक ओळख आता सर्वांना माहीत झालीय ती म्हणजे कबीर खानच्या ‘83’ सिनेमाचे ते प्रमुख सल्लागार होते.

समोरच्या मैदानातल्या मॅचमधे मुंबईची वाताहत लागत असल्यामुळे आम्हा मुंबईकर प्रेक्षकांना मॅच बघवत नव्हती. या संधीचा फायदा घेऊन मी बलविंदरसिंग संधू यांच्याशी गप्पा मारल्या. विषय होता तो अर्थात १९८३चा वर्ल्डकप ते ‘83’ सिनेमा.

83चे सल्लागार बलविंदरसिंग

भारताने १९८३चा वर्ल्डकप जिंकला तेव्हा तो बलाढ्य वेस्ट इंडिजला हरवून आपण जिंकू शकतो हा आत्मविश्‍वास कॅप्टन कपिल देव सोडला तर कुणा भारतीयात होता असं मला वाटत नाही. भारतीय नागरिक सोडाच; पण आपल्या वर्ल्डकपच्या टीममधेही तो नव्हता. जेव्हा कपिलने तो जागवला तेव्हाच इतिहास घडला.

वर्ल्डकपच्या सुरवातीला १९७५ आणि १९७९च्या सुमार कामगिरीनंतर भारताला कुणी खिजगणतीतही धरत नव्हतं. तेव्हा कुणी भारताला फेवरेट वगैरे म्हटलं असतं तर त्याच्या क्रिकेटच्या ज्ञानाची कीव केली गेली असती. साहजिकच मला तो इतिहास आणि त्या निमित्ताने 83 सिनेमाविषयी संधूंकडून जाणून घ्यायचं होतं.

भारताच्या वेस्ट इंडिजसाठी मामुली असणार्‍या १८३ धावांचा पाठलाग करताना पहिलं खिंडार पाडलं ते बलविंदरसिंग संधूंनी. ग्रिनीजला चकवणारा चेंडू संधूंना नवी ओळख देऊन गेला. माझ्याशी बोलताना ते गमतीत म्हणाले, माझ्या कारकिर्दीत मी अजूनही बळी मिळवले आणि काही तर त्याहून उत्तम चेंडूंवर. मला चटकन अमजद खानची आठवण आली. अमजद खानने अनेक भूमिका केल्या; पण ओळख कायमची राहिली ती गब्बरची. संधू आणि ग्रिनीजचं नातं असंच काहीसं म्हणावं लागेल.

हेही वाचा: महेंद्र सिंग धोनी: वनडेतला ‘ग्रेट फिनिशर’

कोरोनामुळे सिनेमा लांबणीवर

आमच्या गप्पांची गाडी आता हळूहळू १९८३ कडून ‘83’कडे यायला लागली होती. मुळात क्रिकेटवर सिनेमा बनवणं हे महाकठीण काम आहे. आपल्या देशात क्रिकेट हा धर्म आहेच; तेव्हा क्रिकेटवरच्या सिनेमात कलाकार क्रिकेटपटू वाटले नाहीत तर ती धर्माची विटंबना ठरते.

संधू मला गप्पा मारताना कलाकारांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल भरभरून सांगत होते. विशेषतः रणवीर सिंगने कपिलदेव बनण्यासाठी जी मेहनत घेतली त्याला तोड नाही. संधूंनी त्यांच्या तयारीचे काही वीडियो मला दाखवल्यावर या सिनेमाबद्दल माझी उत्सुकता अजूनच वाढली.

१० एप्रिल २०२०ला सिनेमा प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाने त्याचं प्रदर्शन दीड वर्ष लांबवलं. कबीर खानला तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर रीलिज करायचा नव्हता. कारण हा भीम पराक्रम बघायला मोठा पडदाच योग्य व्यासपीठ होतं. सिनेमा बघताना हे तंतोतंत पटते.

कलाकारांच्या निवडीची गोष्ट

खरं तर या सिनेमाची कथा काय आहे हे सर्वांना माहीत आहे. तरीही हा सिनेमा गुंगवून ठेवतो. कबीर खानने मोठ्या कल्पकतेने खर्‍या खेळाडूंच्या प्रतिमा आणि पडद्यावरचे कलाकार यांची सांगड घातली आहे. सिनेमाच्या सुरवातीला पासपोर्टच्या माध्यमातून खेळाडूंची ओळख करून देण्याची कल्पकता दाखवली असली तरी या कथेत दिग्दर्शकाला क्रिएटिव लिबर्टी घेण्याचं कुठे फारसं स्वातंत्र्य नव्हतं.

आज जी चाळीशी पार केलेली मंडळी आहेत, त्यांना तर प्रत्येक मॅचचा धावफलकही तोंडपाठ आहे. ते सगळं उभं करताना नुसते कलाकार खेळाडूंसारखे दिसून चालणार नव्हते. यामुळेच कलाकारांच्या निवडीबरोबर त्यांना त्या त्या प्रत्येक खेळाडूंच्या सवयी, लकबी आणि मुख्य म्हणजे त्यांच्यासारखं खेळताना दिसणं गरजेचं होतं.

कपिलदेवचा नटराज शॉट तसंच अफलातून इंग्लिश, श्रीकांतची नको तिथे डोळे मिचकवायची सवय, वेंगसरकरचा कवर ड्राईव किंवा गावस्करचे नुसतं चालणंही जसंच्या तसं यायला पाहिजे होतं. हे जर का जमलं नसतं तर सिनेमा वास्तवाशी विसंगत झाला असता. यातला एक खेळाडू रणजीपटू होता. पण बाकीचे सगळे गल्लीपर्यंतच खेळलेले होते. तेव्हा यांची एक कलाकार म्हणून मेहनत आणि ती करून घेणार्‍या बलविंदरसिंग संधूंचं कौतुक करावं तितकं थोडंच.

हेही वाचा: ख्रिश्चनांच्या पंढरीत अवतरलीय धर्मगुरूंची क्रिकेट टीम

कपिलदेवचा सहकाऱ्यांना मॅसेज

खेळांवर आधारित आता बरेच सिनेमे बॉलीवूडमधे बनलेत. पण त्यात आणि ‘83’मधे फरक आहे तो म्हणजे ‘83’साठी दिग्दर्शकाला कथा फुलवायला विशेष वाव नव्हता. कारण ‘83’च्या विजयात कुठलीही छेडछाड आपण सहन केली नसती. हा विजय निव्वळ विजय नव्हता किंवा वर्ल्डकप मिळवणं नव्हतं तर हा विजय म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर दाखवलेल्या विश्‍वासाचं प्रतीक होता. आपणही विश्‍वविजयी बनू शकतो हा आत्मविश्‍वास देणारा विजय होता.

जेव्हा क्रीडा पत्रकार एकाच दिवशी झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅचला धावले तेव्हा झिम्बाब्वे विरुद्ध भारत मॅचमधे ५ बाद १७ अशा अवस्थेत असताना कपिलदेवने इतिहास घडवत भारताला विजय तर मिळवून दिलाच; पण आपण इथे आलोय ते वर्ल्डकप जिंकण्यासाठी हे सांगत आपल्या सहकार्‍यांचे डोळे उघडले.

भारतीय टीम जेव्हा इंग्लडला गेली तेव्हा जमलं तर काही विजय मिळवून इंग्लंडच्या उन्हाळ्याचा आस्वाद घ्यायचा इतकीच माफक अपेक्षा होती. बहुतांशी खेळाडूंनी तर पुढे अमेरिकेत फिरायला जायचंही तिकीट काढलं होतं.

मोठी स्वप्नं बघायची शिकवण

कपिल देवनं ध्येय्य, आत्मविश्‍वास आणि धाडस काय असते हे दाखवत भारतीयांची मानसिकता बदलली. क्रिकेट दुनियेला भारतीय टीमची दखल घ्यायला भाग पडलं. याच मनोवृत्तीवर आपण पुढे गावस्करच्या नेतृत्वात १९८५ची वर्ल्ड सीरिज चॅम्पियनशिप जिंकत ‘83’ हा नुसता नशिबाने मिळालेला विजय नव्हता हे दाखवून दिलं.

या विजयानं मुख्य काय केलं असेल तर भारतीयांना मोठी स्वप्नं बघायची शिकवण दिली. हाच विजय बघत एके दिवशी वर्ल्डकप जिंकणार्‍या भारतीय टीमचा भाग असायचं स्वप्न शाळकरी सचिन तेंडुलकरने बघितलं आणि पुढे ३८ वर्ष ते स्वप्न बाळगत पूर्ण केलं.

भारताने या १९८३च्या विजयानंतर अनेक स्पर्धा जिंकल्या. २०११चा वर्ल्डकप जिंकला, २००७चा ट्वेंटी-ट्वेंटी वर्ल्डकप जिंकला. या विश्‍वविजयांचं महत्त्व तितकंच आहे; पण १९८३च्या विजयाचं काकणभर जास्त आहे. कारण या विजयाने पुढच्या विजयाची स्वप्नं रचली.

हेही वाचा: फूटबॉलपटूच्या किकने बदलला मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोन

वर्ल्डकप असाध्य ते साध्य

‘अंथरुण पाहून पाय पसरावे’ ही आपली शिकवलेली मध्यमवर्गीय मनोवृत्ती असते. पण भारतीय क्रिकेट जगतात मोठं अंथरुणही आपण मिळवू शकतो याचा विचार करायला कपिलदेवने शिकवलं. हा बदल घडवायला जितकी परिश्रमांची गरज असते, तितकीच मानसिकतेची गरज असते. एकदा का ही आवाक्याबाहेरची गोष्ट एका जिद्दी माणसाने साधली की, आपोआप इतरांनाही ती साध्य वाटायला लागते.

एकेकाळी १ मैल अंतर चार मिनिटांत धावायचं आव्हान अशक्य होतं. कुणी त्याच्या वाटेला जायचंच नाही. रॉजर बॅनिस्टरने १९५४ला ३ मिनिटं ५९ सेकंदात एक मैल धावून दाखवलं. तेव्हापासून अचानक हे आव्हान पेलण्यासारखं वाटायला लागलं आणि आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त धावपटू यापेक्षा कमी वेळात धावले आहेत.

क्रिकेटबद्दल बोलायचं तर वनडे मॅचमधे द्विशतक हे अशक्य वाटायचं. २०१०ला ते तेंडुलकरने पहिल्यांदा काढलं. त्यानंतर ७ द्विशतकं वनडेत काढली गेली. तेंडुलकरने तो भोज्जा शेवटच्या षटकात गाठला. पण पुढे रोहित शर्माने २६४ करून दाखवल्या. तेव्हा १९८३चा वर्ल्डकप हा संत तुकारामांच्या ‘असाध्य ते साध्य, करीत सायास, कारण अभ्यास तुका म्हणे’ या अभंगाला साजेसा होता. यात अभ्यास म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठीचा सायास, प्रयास, प्रयत्न, सराव, मेहनत सगळं काही आलं.

लॉईडची भविष्यवाणी खरी ठरली

आज क्रिकेटमधे पैसा आला आहे, तंत्रज्ञान आलंय फिटनेस आणि आहार तज्ज्ञ आहेत, प्रतिस्पर्ध्याचा अभ्यास करून डावपेच रचायला डेटा उपलब्ध आहे. यामुळे क्रिकेट सोपं झालंय असं नाही; पण तयारीला पूरक अशी बरीच मदत उपलब्ध आहे. पण निव्वळ जिद्दीच्या जोरावर इतिहास बदलता येतो याचं दुसरं कुठलं उत्कृष्ट उदाहरण १९८३च्या आपल्या वर्ल्डकप विजयाइतकं नसावं.

आजच्या ज्या तरुण पिढीने १९८३चा तो थरार अनुभवला नसेल, त्यांनी हा सिनेमा पाहायलाच पाहिजे. खरं तर या विषयावर सिनेमा खूप आधीच यायला पाहिजे होता. पण कबीर खानच्या ‘83’ने सर्व इतिहास फार सुंदर रीतीने पुन्हा जागवला.

नुकताच कपिल देव ६ जानेवारीला ६३ वर्षांचा झाला. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत त्याने अनेक विक्रम केले असतील; पण कृतार्थतेचा क्षण कुठला असेल तर तो वर्ल्डकप लॉर्डस्च्या मैदानात स्वीकारल्याचा. फायनलमधे हरल्यावर वेस्ट इंडिजचा कर्णधार क्लाईव लॉईड म्हणाला होता, भारतीय क्रिकेटचं आगमन झालंय ते दीर्घ काळासाठी असेल. लॉईडची भविष्यवाणी खरी ठरली.

हेही वाचा: 

कॉमेंट्रीटर असे अतिशहाण्यांसारखे का वागतात?

क्रिकेटची पिढी घडवणाऱ्या आचरेकर स्कूलची स्टोरी

सचिन, आम्ही तुला हृदयातून रिटायर्ड करू शकत नाही

वर्ल्डकपमधे तगड्या टीमला, लहान टीमने हरवण्याचा रेकॉर्ड भारताच्या नावावर

मदतीला धावून येणाऱ्या टीम मॅनेजमेंटकडून नंतर वासीम जाफरने पैसेही घेतले नाहीत

(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)