आपण इतके हिंसक का होतोय?

०४ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ७ मिनिटं


आजचे प्रश्न बिकट आहेत. तसंच या प्रश्नांना प्रतिसाद देणाऱ्या समाजमनात खूप घाण, विष साठलंय. आजारपणात माणसाची चिडचिड होते. त्याचं शरीर इतकं हलक होतं की जरा टोचलं तरी त्याची वेदना त्याच्या डोक्यात जाते. सध्या आपला सारा समाज असाच झालेला दिसतोय. इतरांचं वेगळं मत असू शकतं हे कबूल करणारी जाणीवच हरपलीय, अशी खंत सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत आंदोलन मासिकामधे एका लेखात बोलून दाखवलीय. त्यांच्या लेखाचा हा संपादित अंश.

आसाम जळतोय. तिथं कर्फ्यू लावला गेलाय. इंटरनेट वगैरे बंद केलं गेलंय. ईशान्य भारतातल्या इतर राज्यांतही असंतोष आहे. दिल्लीसोबत देशातल्या अन्य काही भागांत निदर्शनं चालू आहेत. पुढेही होणार आहेत. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक बहुमताच्या जोरावर भाजपनं दडपून मंजूर केलं. आता राष्ट्रपतींनी त्याला मंजुरी दिलीय. म्हणजे तो आता कायदा झाला. पंजाब, केरळ, पश्चिम बंगाल अशा काही राज्यांनी आम्ही तो अमलात आणणार नाही, असं जाहीर केलंय.

मनाला व्यापणारी, चरत जाणारी एक व्यथा मनात असते. एका हिंसेला उत्तर म्हणून दुसऱ्या हिंसेला तयार होणारं समर्थन वाढतंय. हिंसा पूर्वी नव्हती असं नाही. हिंसा असलेल्या आदीम मानवाच्या अस्तित्वाचा प्राणी पातळीवरचा संघर्ष, साम्राज्यशाहीतली युद्धं, गुलामांशी वागणूक या काळाबद्दल मी बोलत नाही.

राष्ट्र राज्य झाल्यानंतर, भारत स्वतंत्र झाल्यानंतर जे लोकांचं राज्य आलं त्या काळाशी तुलना करतोय. या काळातही हिंसा झाली. विशेषतः फाळणी, जातीय दंगली. खून, जाळून मारणं, गुंडांचं एनकाऊंटर वगैरे. पण आजची हिंसा वेगळी आहे. तिचं प्रमाण वेगळं आहे.

हिंसेतलं क्रौर्य वाढतं चाललंय

एखाद्या गुंडाचा त्रास सहनशीलतेच्या पार गेला म्हणून लोकांनी त्याला बेदम मारला आणि त्यात त्याचा जीव गेला, अशा घटना आधीही घडल्या आहेत. असं मारणं योग्य की अयोग्य यावर चर्चा झालीय. पण मुलं पळवायला आल्याचा आरोप ठेवून झुंड एखाद्याला ठार करते. गाईला मारल्याच्या, गाईचं मांस वाहून नेत असल्याच्या आणि घरी ठेवलं असल्याच्या संशयावरुन मुस्लिम-दलितांना ठार केलं जातंय.

लव जिहादच्या नावाखाली किंवा जातीला बट्टा लावल्याच्या कारणाने आंतरजातीय, आंतरधर्मीय लग्न करणाऱ्या दोघांनाही त्यातल्या कथित खालच्या जातीला मारुन टाकलं जातंय. अशा घटना आज साथीसारख्या वाढल्या आहेत. वाढत आहेत. त्यातलं क्रौर्य भयानक झालंय. सोनई खटल्यातल्या गुन्हेगारांना फाशी झाल्याचा निकाल आला. या घटनेत सवर्ण मुलीच्या प्रेमात पडल्याचा राग येऊन तिच्या पालकांनी दलित मुलाला आणि त्याच्या साथीदारांना ठार मारलं. त्याचे तुकडे करुन संडासच्या टाकीत टाकले.

उन्मादी मानसिकता अस्वस्थ करणारी

आजकाल हत्या केल्यावर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचे तुकडे करुन बॅगेत भरणं हे सर्रास झालंय. बलात्कार करुन नंतर बलात्कारित मुलीचा खून करणं, जाळणं, तिच्या प्रेताचे तुकडे करणं हे नेहमीचं झालंय. जवळपास रोज आणि कधीकधी एकाच दिवशी अनेक या प्रकारच्या बातम्या वर्तमानपत्रात येत असतात. एक बातमी वाचून आपण सुन्न होतो, तोपर्यंत दुसरी आदळते, काही काळात तिसरी आदळते. मग बधीर व्हायला होतं.

हैद्राबादच्या क्रूर अत्याचारानंतर पकडले गेलेल्यांना चकमकीत पोलिस ठार करतात, याचा देशभर आनंद साजरा केला जातो. या पोलिसांवर लोक फुलं उधळतात. अत्याचाराची बातमी जेवढी त्रासदायक तेवढीच लोकांची ही उन्मादी मानसिकता अस्वस्थ करणारी, हादरवणारी होती. ही भावना व्यक्त करणाऱ्यांना फेसबूक, व्हॉट्सअपवर लोकांनी फाडून खाल्लं.

तुमच्या आई, बहिणी, मुलींवर असा अत्याचार झाला असता तर तुम्ही काय केलं असतं? यापलीकडे कितीतरी पटीने असभ्य भाषेत लोक तुटून पडले. हे काही ठरवून ट्रोलिंग करणारे लोक नव्हते. आपल्या भावना, संताप प्रामाणिकपणे व्यक्त करणारे लोक होते. पण ज्यारीतीने ते तुटून पडत होते ते भयंकर होतं. पुरुषांचा स्त्रियांकडे दुय्यमतेने बघण्याचा दृष्टिकोनच त्यातून व्यक्त होत होता.

हेही वाचा: रात्रीस खेळ चालेः शेवंता हॉट म्हणून बदलला प्लॉट?

दलित, मुस्लिम, गरीब आरोपींबद्दल विखार

न्यायाला होणारा विलंब, पोलिस तपासातला उशीर, दिरंगाई हे प्रश्न खरे आहेत. पण त्यावरच्या रागापायी पोलिसांनी गुन्हेगारांना गोळ्या घालून थेट न्याय करण्याला पाठबळ तयार होणं चिंताजनक आहे. निरपराधाला शिक्षा होऊ नये याची दक्षता म्हणून तसंच आधुनिक जगात आरोपीलाही मानवी अधिकार असतात याचा आदर राखून चालणाऱ्या न्यायप्रक्रियेविषयी लोकांना पुरेसी समज नाही.

जलद न्यायासाठीच्या उपायांसाठी झगडण्याऐवजी अशा झटपट न्यायाला लोक बळी पडताहेत. या रागाला जात, धर्म आणि आर्थिक स्तर असणं ही आणखी चिंतेची गोष्ट आहे. प्रतिक्रिया देणाऱ्या कथित उच्च जाती, वर्गातल्या लोकांच्या भाषेत दलित, मुस्लिम, गरीब आरोपींबाबत तुच्छता आणि द्वेष यांचा विखार तीव्र असतो. खासगीत बोलताना ‘हे असेच असतात’ हे सहज कानावर पडतं.

अत्याचाराविरोधात होणाऱ्या रागाच्या तीव्रतेला बळींच्याही जात, धर्म, वर्गाचं परिमाण असणं खूप अस्वस्थ करणारं आहे. आमच्या मुलींना या खालच्या जात, वर्गांतल्यांची हात लावायची हिंमत कशी होते, हा भाव तिथं असतो. ‘आर्टिकल १५’ या सिनेमात हे बघितलेलं आहे. खैरलांजी, कोपर्डी, निर्भया या प्रकरणांतही आपल्याला हे फरक दिसलेत.

विरोध म्हणजे थेट राष्ट्रद्रोहच

प्रश्न बिकट आहेत. त्याचबरोबर या प्रश्नांना प्रतिसाद देणाऱ्या समाजमनात खूप घाण, विष साठलंय. हे भयंकर आहे. आजारी माणूस चिडचिडा होतो. आजारपणात त्याचं शरीर इतकं हुळहुळं होतं की जरा टोचलं तरी त्याची वेदना त्याच्या मस्तकात जाते. सर्वच समाज असा झालेला दिसतोय. अपवादांचं मोजमाप करण्यात अर्थ नाही.

३७० कलम रद्द करणं, काश्मीरचं विभाजन करणं किंवा आताचं नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संमत करणं राष्ट्रहितच आहे, त्याबद्दल कुणी कसं काय मतभेद व्यक्त करु शकतो. असं करणारे राष्ट्रद्रोहीच आहेत, असं पक्कं मत भारतातल्या बहुसंख्याकांचं असतं. वेगळं मत मांडणाऱ्यांवर मग ते गिधाडांसारखे तुटून पडतात. समग्रतेनं पाहणं, इतरांचं वेगळं मत असू शकतं हे कबूल करणं याची जाणीवच हरपलीय.

हिंसेचं पीक सर्वत्र तरारुन येतंय

हिंसा ही हत्येतच असते असं नाही. ती विचारांत आणि बोलण्यातही असते. खरं म्हणजे सगळ्याच हत्यांना हिंसा म्हणणं बरोबर नाही. बुद्धाच्या हिंसा, अहिंसेच्या तत्त्वाचं विवेचन करताना ‘नीड टू किल’ आणि ‘वील टू किल’ असा भेद केला जातो. मारण्याची गरज आणि मारण्याची इच्छा. जिच्यासोबत भांडण झालं तिचं कोंबडं अंगणात आलं म्हणून त्याला रागाने धोंडा मारुन ठार करणं आणि जावई सासरी आल्यावर त्याला कोंबडं कापून शिजवून घालणं, या दोन्हींमधे हत्या आहे.

दोन्ही हिंसा नाहीत. धोंडा मारून रागानं ठार केलेल्या घटनेत हिंसा आहे. तिथं मारण्याची इच्छा, तर जावयाला कोंबडे खायला घालण्यात मारण्याची गरज आहे. या गरजेत हिंसा नाही. म्हणजेच बुद्धाची हिंसा ही मानसिक गोष्ट आहे. मनात विद्वेष असणे ही हिंसा आहे. आज या मानसिक हिंसेचं पीक सर्वत्र तरारुन येतंय.

हेही वाचा: किती भाषा मारल्या याचीही यूएन मानवाधिकार संस्थेने नोंद करावीः भालचंद्र नेमाडे

सगळीकडचा भक्त संप्रदाय सारखाच

काहीही झालं तरी मोदींची तळी उचलून धरणं आणि विरोधात बोलणाऱ्यांवर तुटून पडणं ही लक्षणं असणाऱ्यांना मोदीभक्त ही संज्ञा रुढ झालीय. वास्तविक हा भक्त संप्रदाय आता सार्वत्रिक आहे. आपापल्या नेत्यांची बाजू लावून धरण्यात आणि विरोधकांना शत्रू समजण्यात हे गैरमोदी भक्तगण मोदीभक्तांइतकेच कडवे असतात. ब्राम्हणी विचारांवर तुटून पडणारे अब्राम्हणी, अब्राम्हणी मधल्या जातींच्या विरोधात आंबेडकरी, आंबेडकरी कक्षेतले बामसेफी वंचितांवर, वंचित बामसेफींवर तुटून पडतात.

सगळीकडचं स्वतःला श्रेष्ठ आणि दुसऱ्याला कमी मानणारं ‘ब्राम्हण्य’ सारखंच आहे. ‘तुझं मत मला मान्य नाही, पण ते मांडायला जो विरोध करेल त्याला मी विरोध करेन’ या वॉल्टेअरच्या भूमिकेचे पुरस्कर्ते बाबासाहेब होते. हे विचार आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आंबेडकरी चळवळीतल्याच अनेकांना पचनी पडत नाहीत.

‘वैरानं वैर मिटत नाही, ते अवैरानं, प्रेमानेंच मिटू शकतं’ हे सांगणाऱ्या आणि त्यासाठी सम्यक वाचा, सम्यक विचार यांचा उपदेश करणाऱ्या बुद्धाला मानणारी ही मंडळी फेसबूकवर याच्या उलट वागताना दिसतात. यांची मनं वैरानं भरलेली, विद्वेषी भाषेत फुसफुसणारी. अपवाद आहेत. पण ते अपवाद. मुख्य लक्षण आज द्वेषाचं आहे. चळवळीला आणि स्वतःच्या व्यक्तित्वाला हे घातक आहे.

डॉ. आंबेडकर, गांधीजी, नेहरु, पटेल, राजेंद्र प्रसाद, मौलाना कलाम आझाद या मंडळींनी आपसातले मतभेद राखत, व्यक्त करत, कधी त्यावरुन संघर्ष करत समाजाला पुढे नेणाऱ्या सामायिक सहमतीच्या मुद्द्यांवर एकत्रित व्यवहार केला. भारतीय संविधान हा या सामायिक सहमतीच्या व्यवहाराचा आदर्श वस्तुपाठ आहे. यासाठी आपल्या उद्दिष्टाबद्दलची स्पष्टता आणि निष्ठा, पटत नसले तरी त्याचा आदर करण्याची वृत्ती, इतका मोठेपणा आपल्याकडे नाही. आज त्याचीच वानवा आहे.

आपण दिशा बदलायली हवीय

प्रतिगामी मंडळींच्या हालचालींची, प्रचाराची आणि संघटित करण्याची गती आज प्रचंड आहे. पुरोगामी प्रवाह विस्कळीत आहे. घेऱ्यात आहे. तो समाज माध्यमांतून खूप बोलत असतो. पण ते आभासी असतं. त्याबाहेरच्या समाजाशी त्याचा संवाद दुर्मिळ असतो. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक तसंच देशात काय चाललंय, याची फारच कमी माहिती वस्तीतल्या बाया, पुरुषांना असते. त्यांना त्याची प्रत्यक्ष झळ आज लागलेली नाही.

खलनायिकांच्या कारस्थानांनी भरलेल्या मालिकांत गुंग होणारा समूह बातम्या कमी पाहतो. विश्लेषण ऐकणं तर दूरच. पेपरही हल्ली वरवर वाचले जातात. मोबाईलमधे डोकं, डोळे व्यस्त असणं हे आणखी एक मोठं आव्हान. अशावेळी त्यांचं राजकीय शहाणपण वाढवण्यासाठी त्यांच्या वस्तीत जाऊन त्याच्याशी संवाद साधणं, त्याला समजेल अशा रीतीनं आजच्या स्थितीचे गुंते उलगडणं गरजेचं आहे. हे आजचं राजकीय काम आहे. ते करता येईल. त्याचा परिणाम चांगला होतो, हा अनुभव आहे.

सध्याचा हा दौर खतरनाक आहे. तो तसाच राहील का? अर्थात नाही. पण तो आणखी खतरनाकही होऊ शकतो. तो तसा व्हायचा नसेल, तर आपल्याला हस्तक्षेप करावाच लागेल. समाज माध्यमांवरल्या आभासी नाही तर प्रत्यक्षातल्या जगात. याचा अर्थ समाज माध्यमं पूर्ण टाळावीत असं नाही. त्यांचा माहिती, विचार पोचवण्यासाठी नक्की उपयोग आहे. पण चळवळीचं ते मुख्य रणक्षेत्र मानण्याची गफलत करायला नको. काय होईल याची चर्चा थोड्या अवकाशाने करु. काय व्हायला हवं, याची स्पष्टता करुन त्या दिशेने चालायला लागू.

हेही वाचा: 

जो मजा साथ दौड़ने में है...

चळवळीच्या यशाचे मापदंड आज बदलतायत

यल्लम्माची यात्रा हे जोगतिणींचं, तृतीयपंथीयांचं माहेरघरच

कोकूटनूरच्या यल्लम्मा यात्रेत आजही देवदासी सोडतात का? 

धर्मांतराच्या ६२ वर्षांनंतर तरी आत्मटीकेचा प्रवाह वाढायला हवा

(लेखक हे सामाजिक चळवळींचे अभ्यासक आणि कार्यकर्ते आहेत. आंदोलन मासिकाच्या जानेवारी २०२० च्या अंकात आलेल्या लेखाचा हा संपादित अंश आहे)