विधानसभा निकालाने कुणाला पैलवान ठरवलं, कुणाची पाठ लावली?

२४ ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


दुपारी दोनपर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेचा एकूण कल स्पष्ट झालाय. काही ठिकाणचे निकालही आलेत. एकूण कल आणि निकाल बघितला तर भाजप हा सगळ्यांत मोठा पक्ष म्हणून पुढे येणार आहे. सध्या भाजप १०१ तर शिवसेना ६०, काँग्रेस ४५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ५६ जागा मिळताना दिसताहेत. याशिवाय अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांच्या खात्यात २६ जागा जाताहेत.

विधानसभा निवडणुकीत मराठी माणसाने सगळ्या एक्झिट पोलला हरवणारा निकाल दिलाय. काहींनी तर भाजपला सहज एकहाती सत्ता मिळेल, असं सांगितलं होतं. पण जवळपास सगळेच एक्झिट पोल फेल गेलेत. सत्ताधारी पक्षांच्या ध्यानीमनी नसणारे निकाल मराठी माणसाने दिलेत. हा निकाल भविष्यातल्या राजकारणासाठी सगळ्याच पक्षांसाठी महत्त्वाचा आहे.

दुपारी दोनपर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेचा एकूण कल स्पष्ट झालाय. काही ठिकाणचे निकालही आलेत. एकूण कल आणि निकाल बघितला तर भाजप हा सगळ्यांत मोठा पक्ष म्हणून पुढे येणार आहे. सध्या भाजप १०१ तर शिवसेना ६०, काँग्रेस ४५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ५६ जागा मिळताना दिसताहेत. याशिवाय अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांच्या खात्यात २६ जागा जाताहेत. अपक्षांमधे बंडखोरांचा आकडाही महत्त्वाचा आहे.

हेही वाचाः शरद पवार पावसात भिजल्यानं भाजपचे डोळे ओले होणार?

मेगाभरतीने भाजपला काय मिळालं?

यंदाच्या विधानसभेत एकहाती सत्ता मिळवण्याच्या भाजपच्या मनसुब्यांना मतदारांनी मोठा धक्का दिलाय. एकहाती सत्तेचं स्वप्न तर दूरच भाजपला यंदा गेल्यावेळच्या १२२ जागाही मिळताना दिसत नाहीत. गेल्यावेळपेक्षा वीसेक जागा कमी होताहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या मातब्बर, हमखास विजयाची खात्री असलेल्या नेत्यांना भाजपमधे घेतलं. पण त्यातल्याही अनेकांना पराभवाचं तोंड बघावं लागलंय. भाजपमधे आलेल्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार वैभव पिचड, आमदार गोपालदास अग्रवाल यासारख्या नेत्यांना मतदारांनी घरी बसवलंय.

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने एकहाती बहुमत मिळवलं होतं. त्या जोरावरच भाजपने नवं सोशल इंजिनिअरिंगचं राजकारण उभारण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न सपशेल फेल गेलाय. या प्रयत्नामुळे निष्ठावंत दुखावले गेलेत. काही मतदारसंघात तर निष्ठावंतांना नोटाला मतं दिलीत. मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार म्हणून बघितलं जाणारे भाजप प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा कोल्हापूर जिल्हा भाजपमुक्त झालाय. त्यामुळे काँग्रेसमुक्त भारताच्या भाजपच्या स्वप्नाला भाजपच्या नेतेमंडळींच्या जिल्ह्यांतूनच धक्के बसलेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गेल्या पाच वर्षांत विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून समोर आलाय. प्रत्येक निवडणुकीत इथल्या मतदारांनी भाजपच्या पारड्यात आपलं माप टाकलंय. पण यंदाच्या निवडणुकीत विदर्भानेच भाजपला हायवोल्टेज झटका दिलाय.

हेही वाचाः मुंडे भावंडांचं भवितव्य ठरवणार १९ सेकंदांची क्लिप ठरणार?

शिवसेना लहान भाऊच

सुरवातीच्या ट्रेंडमधे शिवसेना ७५ पार करणार असं चित्र होतं. पण आता कल आणि निकाल जसंजसं स्पष्ट होताहेत, तसं शिवसेनेला गेल्यावेळच्या जागाही राखता येत नसल्याचं दिसतंय. गेल्यावेळी शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या होत्या. आता एकूण कल आणि आलेल्या निकालाची गोळाबेरीज फक्त ५८ वर येऊन थांबलीय. सव्वाशे जागा लढवून शंभर जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या शिवसेनेला हा खूप मोठा धक्का आहे.

शिवसेनेलाही मेगाभरतीनंतर काही ठिकाणी दणकावून पराभवाचं तोंड बघावं लागलंय. बार्शीत राष्ट्रवादीतून आलेले आमदार दिलीप सोपल यांना मतदारांनी घरी बसवलंय. करमाळ्यात विद्यमान आमदाराचं तिकीट कापून राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांना नाकारून मतदारांनी पुन्हा एकदा अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या नारायण पाटील यांच्याच गळ्यात विजयाची माळ टाकलीय.

सर्वशक्तिमान भाजपच्या अपयशासमोर शिवसेनेचं यश उठून दिसतंय. असं असलं तरी शिवसेनेचा आपल्या बालेकिल्ल्यांतच पराभव झालाय. कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर, पारनेरमधून विजय औटी यांच्यासोबतच मातोश्रीच्या अंगणातल्या उमेदवारावरही पराभवाची नामुष्की ओढावलीय. कणकवलीत भाजपच्या नितेश राणे यांच्या एकहाती विजयाने शिवसेनेला मोठा धक्का बसलाय.

हेही वाचाः विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कुणाला कौल देणार?

राष्ट्रवादी काँग्रेसने अस्तित्वाची लढाई जिंकली

एकएक आमदार, नेता पक्ष सोडून जाऊ लागला, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांचा रिलेवन्स संपलाय, असं वाटू लागलं होतं. आणि तसं चित्रही होतं. खुद्द मुख्यमंत्र्यांनी पवार पॅटर्नच्या राजकारणाचे दिवस संपल्याचं म्हटलं होतं. पण ७९ वर्षाचे शरद पवार हरलेली लढाई जिंकण्यासाठी लढले. आणि यात ते सत्तेच्या गणितापासून दूर राहिले तरी आपल्या अस्तित्वाचं गणित जिंकण्यात यश आलंय, असं म्हणावं लागेल.

गेल्यावेळी ४१ जागांसह चौथ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आकडा यंदा दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावर राहिलं असं दिसतंय. आतापर्यंतच्या निकालावरून राष्ट्रवादीने आपली वोटबँक आणि मतदारसंघ जपलेले दिसताहेत. तसंच पक्ष सोडून जाणाऱ्यांना चपराक दिलीय. त्यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षांतर केलेल्यांना दिलेलं आव्हान फळाला आल्याचं दिसतंय. परळी, कर्जत जामखेड, आष्टी यासारख्या भाजपच्या बालेकिल्ल्यांत मुसंडी मारलीय. विद्यमान दोन कॅबिनेट मंत्र्यांचा पराभव केलाय.

हेही वाचाः डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रश्नांची नरेंद्र मोदींकडे उत्तरं आहेत का?

काँग्रेसने अस्तित्व कायम राखलं

काँग्रेस लढतीमधे कुठंच दिसत नव्हती. तरीही गेल्यावेळची ताकद यंदाही कायम ठेवण्यात काँग्रसने आश्चर्यकारकरित्या यश मिळवंलय. यंदाची निवडणूक काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई होती. त्यामुळे पक्ष म्हणून न लढता जिथे उमेदवार लढतीत आहे, तिथे त्यांनी वैयक्तिक स्वरुपात फाईट दिली. आणि ती स्टॅट्रेजी यशस्वी झाल्याचं दिसतंय. राष्ट्रीय नेते जवळपास प्रचारात नव्हते. असं असतानाही काँग्रेसने मिळवलेलं हे यश वाखाणण्याजोगं आहे.

आपले गड कायम राखण्यात यश मिळवलंय. तसंच हातातून निसटलेल्या विदर्भाच्या बालेकिल्ल्यांत पुन्हा एकदा मुसंडी मारलीय. विदर्भात काँग्रेसने आपल्या जुन्या जागा पुन्हा मिळवल्याने भाजपला मोठा धक्का बसलाय. भाजपच्या जागा कमी होण्यात काँग्रेसचं यश कारणीभूत आहे. गेल्यावेळी ४४ जागा जिंकणाऱ्या भाजपला आता केवळ २५ जागांवर समाधान मानावं लागतंय. त्याचवेळी १० जागांवर असलेल्या काँग्रेसने १८ जागा जिंकल्यात. त्यामुळे आताच्या घडीला तरी काँग्रेसमुक्त महाराष्ट्राचं भाजपचं स्वप्न सध्या तरी धुळाला मिळालंय.

अपक्षांनाही सत्तास्थापनेत महत्त्व

सध्याच्या परिस्थिती इतरांना खूप महत्त्व येणार आहे. सत्तास्थापनेसाठी महत्त्वाचं आहे. यंदाच्या निवडणुकीत अपक्षांसोबतच काही छोट्या पक्षांनाही यश मिळालंय. ही संख्या ३३ च्या घरात जातेय. वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार एका जागेवर आघाडीवर आहे. मनसेही एका ठिकाणी विजयाच्या टप्प्यात आहे. सध्या दोन आमदार असलेली एमआयएमही तीन ठिकाणी आघाडीवर आहे.

काँग्रेस आघाडीतला घटकपक्ष बहुजन विकास आघाडी तीन जागांवर आघाडीवर आहे. नेवाशातून काँग्रेस आघाडीच्या पाठिंब्यावर क्रांतीकारी शेतकरी पक्षाचा उमेदवार जिंकलाय. मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे यांचा राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर शिवसेना बंडखोर चंद्रकांत पाटील यांनी पराभव केलाय. महाआघाडीतला शेतकरी कामगार पक्ष एका जागेवर तर समाजवादी पार्टी दोन जागांवर आघाडीवर आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनाही एका जागेवर शर्यतीत आहे.

हेही वाचाः 

नरेंद्र मोदींची शेवटची प्रचारसभा रंगली नाहीच

यंदाच्या विधानसभा निवडणुकीचं वेगळेपण काय?

सर्वांत चुरशीच्या या पाच जागांवर कोण जिंकणार?

विदर्भातील दहा हाय व्होल्टेज लढतीकडे राज्याचं लक्ष

सगळं संपलंय, असं वाटेल तेव्हा शाहबाज नदीमची ही गोष्ट वाचा