डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणसासारखी वागणूक देण्यापासून रोखणारी मनुस्मृती जाळली त्याला आज ९२ वर्ष झाली. गुणवत्ता असतानाही शूद्रांना संपत्ती जमा करण्याचा अधिकार नाही. स्त्रियांना कधीही स्वातंत्र्य देऊ नये असल्या गलिच्छ विचारांची पोतडी म्हणजे मनुस्मृती अशी भूमिका मांडणाऱ्या प्रा. हरी नरके यांच्या फेसबूक पोस्टवजा लेखाचा हा संपादित अंश.
मनुस्मृती हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून ते एक कायद्याचं पुस्तक होय. बाबासाहेब म्हणतात, मनुस्मृती वॉज लिगल ॲण्ड पिनल कोड. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात ज्याप्रमाणे ब्रिटीशांचे अन्याय कायदे आम्ही मानत नाही असं सांगण्यासाठी कायदेभंगाचं आंदोलन केलं गेलं तसंच आंदोलन म्हणजे मनुस्मृतीचं दहन करणं होय. विदेशी कापडांची होळी करणं जसं जनआंदोलन होतं तसंच मनुस्मृती या माणूसघाण्या पुस्तकाची प्रत जाळण्याचं कृत्य प्रतिकात्मक होतं.
बाबासाहेब पुस्तकप्रेमी असताना त्यांनी पुस्तक कसं जाळलं? मनुस्मृतीत काहीच चांगलं नव्हतं का? मनुचा काय दोष, त्याने तर तत्कालीन कायद्यांचं संकलन केलं, मनू ब्राह्मण नसून क्षत्रिय होता, अशा नानाविध युक्तिवादांद्वारे या गलिच्छ पुस्तकाचं आणि कर्त्याचं समर्थन केलं जातं.
हेही वाचाः नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला का विरोध केला पाहिजे?
१. मनुस्मृतीचे पिढीजात लाभार्थी,
२. अशा लाभार्थ्यांकडे बुद्धी गहान टाकलेले स्त्री किंवा पुरुष = पाळीव पोपट,
३. आत्यंतिक अज्ञानी, सनातनी, विकृत, वेडे.
मनुस्मृतीचं समर्थन करणारा कुणीही प्राणी माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचा असत नाही. अशा विकृतांना चार जोडे मारून एक मोजला पाहिजे. अशी घाण दूरच ठेवलेली बरी. पिढ्यानपिढ्या वरील ३ वर्गात मोडणार्या या इसमांची कीव किंवा किळसच करायला हवी. मनुस्मृतीचं समर्थन करणं म्हणजे बलात्कारी, स्मगलर, सराईत गुन्हेगार किंवा राष्ट्रद्रोही इसमांच्या वर्तनाचं समर्थन करणं होय.
मूठभर त्रैवर्णिक पुरुषांना उच्च आणि तमाम बहुजनांना नीच मानणारा हा कायदा, सरसकट समस्त स्त्री वर्गाला गुलाम मानणारा हा मनू, उच्चवर्णियांचं हितरक्षण करताना माणुसकीला काळीमा फासणारा हा ग्रंथ तीनदाच काय पुन्हापुन्हा जाळायला हवा. जोपर्यंत मनुची पिलावळ जिवंत आहे, तोवर नियमितपणे जाळायला हवा. नाकारायला हवा. समर्थकांच्या तोंडावर थुंकण्यासाठी गटारात फेकायला हवा.
बाबासाहेबांना कुठं संस्कृत येत होतं? त्यांना काय माहीत मनुस्मृतीत काय होतं? असले साळसूद प्रश्न विचारणार्या हरामखोरांना जोड्यानेच मारायला हवं. तुमच्या बापजाद्यांनी त्यांना संस्कृत शिकू दिलं नाही. त्यांना शाळेत त्याऐवजी पर्शियन शिकावं लागलं. तरीही त्यांनी पुढे गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे, सोहनलाल शास्त्री अशा मान्यवरांच्या खासगी शिकवण्या लावून संस्कृतवर हुकमत मिळवली.
माणुसकीच्या शत्रूने म्हणजेच मनूने नीच प्रवृत्तीतून ८५ टक्के स्त्री शुद्रांना जनावरांपेक्षा हीन वागणूक दिली. उच्च प्रतीची गुणवत्ता असतानाही शूद्रांना संपत्ती जमा करण्याचा अधिकार नाही. संडासला बसतानाही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्रांनी वेगवेगळ्या दिशांना तोंडं करून बसावं, ब्राह्मणाचं नाव मंगलवाचक तर शूद्राचं नाव किळसवाणं ठेवावं, स्त्री शूद्रांनी शिक्षण घेणं हा गुन्हा आहे, स्त्रियांना कधीही स्वातंत्र्य देऊ नये असल्या गलिच्छ विचारांची पोतडी म्हणजे मनुस्मृती.
हेही वाचाः 'तुम्हीच आहात बलात्कारी' असं सांगणारं गाणं जगाचं बलात्कार विरोधी गीत झालंय!
‘व्याभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे.’ [9/19]
‘लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते हे तिने कायम ध्यानात ठेवावे.’ [5/152]
‘पती सदाचारशून्य असो, तो दुसर्या बाईवर प्रेम करीत असो, विद्येने तो गूणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी.’ [5/154]
‘स्त्रिया सुंदर रूप पाहात नाहीत, त्यांना यौवनादी वयाबद्दल आदर नसतो, पुरुष सुरूप की कुरूप कसाही असला तरी तो पुरुष आहे एवढ्याच कारणाने त्याचा भोग घेतात.’ [9/14]
‘पुरुषाला पाहिल्याबरोबर संभोगाविषयी अभिलाषा उत्पन्न होणे हा स्त्रिचा स्वभाव असतो. त्या चंचल असतात. त्या स्वभावत: स्नेहशून्य असतात.’ [9/15]
‘नवर्याने बायको सोडली किंवा विकली तरी त्याची मालकी कायम राहते.’ [9/46]
सार्थ श्रीमनुस्मृती हा मूळ संस्कृत श्लोकांसह त्यांचा मराठी अनुवाद देणारा वेदशास्त्रसंपन्न विष्णुशास्त्री बापट यांचा ग्रंथ जिज्ञासूंनी अवश्य वाचायला हवा. विशेषत: सर्व समाजातल्या महिला आणि माळी, साळी, तेली, कुणबी, वंजारी, आगरी, भंडारी, शिंपी, सोनार, सुतार, नाव्ही आदींनी वाचायला हवा.
संस्कृत पाठशाळा चालवणारे बापटशास्त्री प्रस्तावनेमधे लिहितात, ‘मनुस्मृती हे धर्मशास्त्र आहे आणि त्याची योग्यता इतर कोणत्याही स्मृतीपेक्षा अधिक आहे. सनातन धर्माचा जीव असे जे चार आश्रम आणि चार वर्ण त्यांची व्यवस्था या स्मृतीमधे जशी स्पष्ट दिसते तशी ती वेदांमधे आढळत नाही. स्त्रीधर्म आणि पुरुषधर्म यांचा या स्मृतीमधे पूर्णपणे विचार केलेला आहे.’
मनुस्मृतीवर मेधातिथी, सर्वज्ञनारायण, कुल्लकभट्ट, राघवानंदसरस्वती, नंदन,रामचंद्र, गोविंदराज, श्रीमाधवाचार्य, धरणीधर, श्रीधरस्वामी, रूचीदत्त, विश्वरूप, भोजदेव आणि भारूचि अशा एकंदर चौदा महापंडितांनी निरनिराळ्या काळी केलेल्या चौदा टीका सर्वमान्य आहेत. या सर्व टीकांचे आठ खंड भारतीय विद्या भवनने प्रकाशित केलेत.
हेही वाचाः बाबासाहेबांनी पहिला मोर्चा दलितांसाठी नाही तर शेतकर्यांसाठी काढला
आचार्य नरहर कुरूंदकर, डॉ. प्रदीप गोखले, डॉ. आ. ह. साळुंखे आणि भदन्त आनंद कौशल्यायन यांचे मनुस्मृतीवरचे ग्रंथ अतिशय मौलिक आहेत. मनुस्मृती हा ग्रंथ १२ अध्यायांचा असून त्याचे २६३४ श्लोक आहेत. बापटशास्त्रींचा मराठी अनुवाद पुढे देत आहे. कंसात अध्याय आणि श्लोक क्रमांक आहे.
‘सहज शृंगार चेष्टेने मोहीत करुन पुरुषांस दुषित करणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे. यास्तव ज्ञानी पुरुष स्त्रियांविषयी कधी बेसावध राहात नाहीत.’ [2/13]
‘माता, बहीण आणि कन्या यांच्याबरोबरही पुरुषाने एकांतात बसू नये.’ [2/15]
‘ज्यांना फक्त मुलीच झालेल्या असतील त्यांच्या मुलींशी लग्नं करू नयेत.’ [3/8]
‘जिला भाऊ नसतील तिच्याशी शहाण्याने विवाह करू नये.’ [3/11]
‘ज्या कुळामधे पिता, पतीद्वारा स्त्रियांची पूजा होत असते तेथील देवता प्रसन्न होतात.’ [3/56]
‘नवर्याने बायकोसोबत एका ताटात जेवण करू नये. तसेच पत्नीला जेवताना, शिंकताना, जांभई देताना पाहू नये.’ [4/43]
‘आता स्त्रियांचे धर्म सांगतो, ते ऐका- बाल्यावस्थेत मुलीने, तरुण स्त्रीने किंवा वृद्ध बाईनेही घरातील लहानसे कार्यही स्वतंत्रपणे करू नये.’ [5/47]
‘स्त्रीने कधीही स्वतंत्र होऊ नये.’ [5/48]
‘पिता, पती, पुत्र यांच्यावेगळी राहणारी स्त्री दुष्ट झाल्यास आपल्या दोन्ही कुळांस निंद्य करते.’ [5/49]
‘पती जरी विरूद्ध असला तरी स्त्रीने प्रसन्न मुद्रेने असावे. गृहकर्मामधे दक्ष होऊन राहावे. घरातील सर्व भांडी तिने घासून पुसून स्वच्छ ठेवावीत.’ [5/150]
‘लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते हे तिने कायम ध्यानात ठेवावे.’ [5/152]
‘पती सदाचारशून्य असो, तो दुसर्या बाईवर प्रेम करीत असो, विद्येने तो गूणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी.’ [5/154]
‘पतीची सेवा हेच पत्नीचे व्रत होय. तिचा यज्ञ होय. त्याच्या आज्ञेत राहाणे हाच तिचा स्वर्ग होय.’ [5/155]
‘स्त्रियांनी पहिला पती वारला तरी कधीही दुसरा नवरा करू नये.’ [5/162]
‘स्त्रीधर्माप्रमाणे मन, वाणी, देह, यांच्याद्वारे जी आपली पतीची कायम सेवा करते तिलाच स्वर्ग मिळतो.’ [5/166]
‘पहिली पत्नी वारली तर तिचे दहन करून पतीने दुसरे लग्न करावे.’ [5/168]
‘पिता, पती, आप्त यांनी स्त्रियांस सर्वदा आपल्या अधीन ठेवावे. सामान्य विषयांमधे त्या आसक्त झाल्यास त्यास आपल्या वश करून घ्यावे.’ [6/2]
‘विवाहाच्या पूर्वी पित्याने, त्यानंतर पतीने, म्हातारपणी पुत्राने तिचे रक्षण करावे. सारांश कोणतीही स्त्री स्वातंत्र्यास पात्र नाही. योग्य नाही.’ [ 6/3]
‘स्त्रीसाठी मद्यपान, दुर्जनसमागम, पतीपासून दूर राहणे, इकडे तिकडे भटकणे, अयोग्य वेळी निजणे, दुसर्याच्या घरी राहणे हे सहा व्याभिचारदोष होत.’ [9/13]
‘स्त्रियांना वेदांचा अधिकार नाही. स्मृतींचा नाही. धर्माचा नाही. त्या धर्मज्ञ बनू शकत नाहीत. त्या अशुभ असतत.’ [9/18]
म्हणून आय हेट मनुस्मृती.
आय सॅल्युट बाबासाहेब, कुरूंदकर, गोखले, साळुंखे ॲण्ड कौशल्यायन.
२५ डिसेंबर १९२७ ला पहिल्यांदा, भारतीय राज्यघटनेच्या १३ व्या कलमाद्वारे दुसर्यांदा आणि बौद्ध धर्म स्वीकारून तिसर्यांदा भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळलीय.
मनुस्मृतीचं समर्थन करणं म्हणजे बलात्कारी, स्मगलर, राष्ट्रद्रोही इसमांचं समर्थन करणं होय. अशांना जवळपासही फिरकू देऊ नका. हे प्लेगचे उंदीर जाळलेलेच बरे. कारण ते निकोप आरोग्याला घातक आहेत. भयंकर वायरस आहेत. त्यातून साथीचे रोग पसरतात.
हेही वाचाः
प्रत्येक माणसात सांताक्लॉज असतोच!
ट्रोलिंगची विकृती किती इंचात मोजायची?
संविधानाची भीती कोणाला आणि कशासाठी?
(लेखक हे सामाजिक, राजकीय प्रश्नांचे विश्लेषक आहेत. )