गेल्या वर्षीच्या केरळमधल्या ओणम सणानंतर तिथं कोरोना पेशंटच्या संख्येत वाढ झाली होती. याहीवर्षी केरळनं तोच अनुभव घेतलाय. महाराष्ट्रातही उत्सवांचा हंगाम सुरू होतोय. ओणमनंतर केरळला ठेच लागलीय. त्यातून महाराष्ट्रानं शहाणं होणं अपेक्षित आहे. येणार्या लहान-मोठ्या लाटेला आपण जबाबदार असू नये, एवढी तरी जबाबदारी आपल्याला उचलायला हवी. उत्सव साजरे करताना विवेकाचं भान ठेवायला हवं.
कोरोना वायरसची साथ सुरू झाली, त्याला जवळपास दीड वर्ष झालंय. या काळात जगभरातल्या वेगवेगळ्या देशांच्या अनुभवातून एकच निष्कर्ष निघाला तो म्हणजे गर्दीने होते सर्दी. सर्दी होते तशाच प्रकारचा कोरोना हा वायरस आहे आणि त्याला ताब्यात, काबूत ठेवणं अवघड नाही; पण इटली असो की अमेरिका, फ्रान्स असो की जर्मनी, खेळांचे सामने, उत्सव-सण-उरूसांना गर्दी करण्याचा मोह आवरता न आल्याने तो वायरस वेगाने फैलावल्याचं दिसून येतं.
हेही वाचा: आपण सारखं चेहऱ्याला हात का लावतो? ही सवय कशी मोडायची?
गेल्या वर्षीच्या इतिहासात जायची गरज नाही. अगदी दहा दिवसांपूर्वी साजर्या झालेल्या ओणम या केरळातल्या सणाचं उदाहरण घेऊ. गेल्या वर्षीच्या ओणम सणानंतर कोरोना पेशंटमधे वाढ झाली होती. तसाच अनुभव याही वर्षी आला. केरळात यावर्षी २६ मेला सगळ्यात जास्त ३० हजार ४९१ आढळले. त्यानंतर ही संख्या कमी होत जाऊन २७ जूनला केवळ ८ हजार ६३ पेशंट होते.
जुलैमध्ये कधी १४ हजार, तर कधी १७ हजार, तर ऑगस्टमधे रोज २० हजार पेशंट सापडू लागले. ऑगस्टच्या दुसर्या आठवड्यात ओणमची तयारी सुरू झाली. बाजारपेठेत गर्दी उसळली. २१ ऑगस्टला ओणम झाला आणि २८ ऑगस्टला केरळमधल्या कोरोनाग्रस्तांची संख्या गेली ३१ हजार २६५ वर. देशात त्या दिवशी ४६ हजार ७५९ पेशंट आढळले होते.
महाराष्ट्रात गणेशोत्सव गेल्या वर्षी सुरू झाला २२ ऑगस्टला. तेव्हा ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात ८१ हजार पेशंट नोंदले गेले होते. संपूर्ण महिन्याचा आकडा ३ लाख ६० हजार होता. सप्टेंबरमधे महाराष्ट्रातली पेशंट संख्या ५ लाख ७६ हजार १४० एवढी वाढली.
म्हणजेच एका महिन्यात पेशंट संख्या २ लाख १६ हजारांनी वाढली. दुसर्या लाटेचा तो परमोच्च बिंदू होता. महाराष्ट्रातला कोरोनाचा प्रादुर्भाव तूर्त आटोक्यात असला, तरी रोज साडेतीन हजार पेशंट सापडत आहेत.
आता सणांचा हंगाम सुरू होत आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी ३० ऑगस्टला झाली, ३ ते १० सप्टेंबरदरम्यान पर्युषण पर्व, त्यानंतर १० ते १९ सप्टेंबरदरम्यान गणेशोत्सव आहे. नंतर नवरात्र-दसरा आणि नोव्हेंबरमधे दिवाळी येईल. त्यामुळे पुन्हा गेल्या वर्षीची पुनरावृत्ती हवी आहे काय, असा प्रश्न आहे.
हेही वाचा: आजारी पडण्यापूर्वी कुठे कुठे जातात कोविड १९ चे पेशंट?
कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबरमधे येऊन तिचा परमोच्च बिंदू ऑक्टोबरमधे गाठला जाईल, असा अंदाज आहे. काहींच्या मते तिसरी लाट दुसर्या लाटेपेक्षा किमान दीडपट अधिक पेशंट संख्या घेऊन येईल, तर काहींच्या मते ती दुसर्या लाटेच्या तुलनेत फारशी गंभीर नसेल.
ही लाट नोव्हेंबर-डिसेंबमधे येऊ शकेल, असंही काही तज्ज्ञ सांगतात. ही मतमतांतरं बाजूला ठेवून किमान येणार्या लहान-मोठ्या लाटेला आपण जबाबदार असू नये, एवढी तरी जबाबदारी आपल्याला उचलता येणार नाही का? उत्सव साजरे करताना विवेकाचं भान आपल्याला ठेवता येणार नाही का?
सणांसाठी खरेदी करताना बाजारपेठेत एकाच वेळी गर्दी टाळता येईल. दुकानांमधे एका वेळी किती ग्राहक जाऊ द्यायचे, याबद्दल नियमावलीचं पालन करता येईल. अनेक गणेशोत्सव मंडळांनी गेल्या वर्षी ऑनलाईन गणेशोत्सव साजरा केला.
अनेक उत्तम सांस्कृतिक कार्यक्रम, कथाकथन, व्याख्यानं, गायन-नृत्य लोकांपर्यंत पोचवलं. त्यात यावर्षी आणखी अनेक मंडळांची भर पडल्याचं दिसतं. पुण्याचा दगडूशेठ हलवाई गणपती, अखिल मंडई मंडळाचा शारदा-गणेश, मुंबईचा लालबागचा राजा यांचे ऑनलाईन दर्शन घेऊन गर्दी टाळणं भाविकांना शक्य आहे.
मास्क लावणं, गर्दी न करणं, योग्य वेळी टेस्ट करून घेणं ही त्रिसूत्री पाळली सावधगिरीने वागलं, तर पेशंटच्या संख्येचा आकडा निश्चितच आटोक्यात राहील. नाहीतर तिसर्या लाटेच्या भयावह रौद्ररूपाला आपल्यालाच सामोरं जावं लागेल. म्हणूनच ओणमनंतर केरळला लागलेल्या ठेचीनंतर महाराष्ट्र शहाणा होणं अपेक्षित आहे.
हेही वाचा:
कोरोनाचा प्रादुर्भाव ही माणसाचीच चूक आहे!
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
कोरोना रोखण्यासाठी डिग्लोबलाइज होणं ही तर आपली घोडचूक ठरेल
पॅथॉलॉजीविषयी ४ : ब्लड बँकमुळे जीवन आणि पोस्टमॉर्टममुळे मृत्यू समजतो
(दैनिक पुढारीतून साभार)