चोरबाजारात राहुल आणि काँग्रेसची शेंदाड फौज

२५ मार्च २०२३

वाचन वेळ : ५ मिनिटं


काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यामधे दोन वर्षांची शिक्षा झालीय. त्यामुळे त्यांची खासदारकीही रद्द झाली आहे. लोकसभा सचिवालयाने शुक्रवारी अधिसूचना काढून त्यांच्या अपात्रतेवर शिक्कामोर्तब केलं. इतका महत्त्वाचा आणि देशापुढे आक्रमकपणे नेण्याचा हा विषय असताना काँग्रेसचे नेते मात्र सुस्त असल्याचं चित्र आहे. त्यावर भाष्य करणारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांची फेसबुक पोस्ट.

प्रवीण तोगडिया नामक एक हिंदू हृदयसम्राट होते. नव्वदनंतरच्या काळात ते जेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होते, तेव्हा भाषणात सतत म्हणायचे, सगळेच मुसलमान दहशतवादी नसतात, पण सगळेच दहशतवादी मुस्लिम कसे? त्यांचं हे वाक्य आता आठवण्याचं कारण म्हणजे अशाच आशयाच्या एका वाक्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा झाली आहे आणि पाठोपाठ त्यांच्यावर खासदारकीवरही गंडांतर आलंय.

राहुल गांधींची खासदारकी रद्द

२०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी कर्नाटकातल्या कोलारमधल्या एका सभेत त्यांनी `सगळेच मोदी चोर कसे?` असा प्रश्न विचारून ललित मोदी, नीरव मोदी आणि नरेंद्र मोदी यांची नावं घेतली होती. त्यावरून गुजरातचे आमदार पूर्णेश मोदी यांनी बदनामीचा खटला दाखल केला आणि राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यापर्यंत कारवाई पुढे गेली.

राहुल गांधी यांना गुजरातमधल्या जिल्हा न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे, त्यामुळे त्या शिक्षेच्या गुणवत्तेची चर्चा वरच्या न्यायालयात होईल. उच्च न्यायालयात होईल किंवा नाही सांगता येत नाही, पण सर्वोच्च न्यायालयात नक्की होईल, अशी आजतरी आशा वाटते.

ही लढाई न्यायालयीन पातळीवर लढली जाईल. काँग्रेस पक्ष राजकीय पातळीवर फारसा निकराने लढेल, असं वाटत नाही. पण त्यापलीकडे जाऊन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ताजी वक्तव्यं बघितली तर त्यांची कीव वाटल्यावाचून राहात नाही.

हेही वाचा: नव्याने उभं राहण्यासाठी कॉंग्रेसने भाजपकडून शिकाव्यात अशा गोष्टी

काय म्हणाले होते राहुल गांधी?

राहुल गांधी यांचं वक्तव्य तेली समाजाचा आणि ओबीसी समाजाचा अपमान करणारं असल्याचा शोध अचानक भाजपच्या या दोन अध्यक्षांना लागला आहे. गड्डा यांच्या मेंदूत खड्डा पडला आहे काय, अशी शंका आल्यावाचून राहात नाही. नरेंद्र मोदी हे तेली समाजाचे आहेत आणि हा समाज ओबीसीमधे येतो ही वस्तुस्थिती आहे. पण नीरव मोदी, ललित मोदी यांचीही नावं घेतली.

राहुल गांधींनी नीरव मोदीचा मामा मेहुल चोक्सीचं नाव घेतलं. विजय मल्ल्या, अनिल अंबानी यांचीही नावं घेतलीत. भ्रष्टाचाराचं प्रतीक म्हणून ही नावं घेतली आहेत. या सगळ्या लुटारूंची नरेंद्र मोदी यांच्याशी असलेली जवळीक लक्षात आणून देण्यासाठी ही नावं घेतली आहेत.

राहुल गांधी त्या सभेत म्हणाले होते, 'चोरांचा ग्रूप आहे, चोरांची टीम आहे. तुमच्या खिशातून पैसे काढतात, शेतकर्‍यांचे पैसे हिसकावून घेतात, छोट्या दुकानदारांकडून पैसे घेतात आणि त्याच पंधरा लोकांना वाटून टाकतात. तुम्हाला सांगतात काळ्या पैशाविरुद्ध लढाई, तुम्हाला भर उन्हात बँकेपुढे रांगेत उभे करतात, तुमच्या खिशातून पैसे काढून बँकेत भरायला भाग पाडतात आणि तुम्हाला एके दिवशी कळते की, तुमचे पैसे घेऊन नीरव मोदी पळून गेला. ३५ हजार कोटी रुपये तुमच्या खिशातून काढून त्यांच्या खिशात घातले. मेहुल चोक्सी, ललित मोदी वगैरे. एक छोटासा प्रश्न या सगळ्या चोरांचं नाव मोदी कसं – नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी... आणखी शोधले तर आणखी काही मोदी सापडतील.'

चोरांना चोरच म्हणायला हवं

राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे ओबीसी समाजाचा अपमान झाला, असं म्हणणार्‍यांच्या माहितीसाठी सांगावं लागतं की, नीरव मोदीच्या कुटुंबात सात पिढ्यांपासून हिर्‍यांचा व्यवसाय केला जातो. १९४०मधे नीरव मोदी यांचे वडील हिर्‍यांच्या कारभारासाठी बेल्जियमला गेले.

पुढे मामा मेहुल चोक्सी यांच्याकडून हिरे व्यवसाय शिकण्यासाठी नीरव मोदी भारतात परत आला. दोघा मामा-भाच्यांनी मिळून भारतीय बँकांना चौदा हजार चारशे कोटींचा चुना लावून ते देश सोडून पळून गेले. या चोरांना चोर म्हटलं म्हणून ओबीसी समाजाचा अपमान झाला, असं नड्डा, बावनकुळे म्हणतात, याची गंमत वाटल्यावाचून राहात नाही.

आयपीएलचे जनक ललित मोदी यांचा जन्म दिल्लीतल्या एका मारवाडी कुटुंबात झाला. ललित मोदीचे वडील कृष्णकुमार हे चार हजार कोटींच्या मोदी समूहाचे अध्यक्ष. त्याचे आजोबा राजबहादूर गुजरमल मोदी यांनी मोदीनगर वसवलं.

आयपीएल २०१० संपल्यानंतर ललित मोदी यांना दुराचार, नियमबाह्य वर्तन आणि आर्थिक अनियमिततेच्या आरोपावरून बीसीसीआयने निलंबित केलं. बीसीसीआयने त्यांची चौकशी सुरू केली आणि चौकशीत दोषी आढळल्यानंतर त्यांच्यावर आजन्म बंदी घालण्यात आली. त्यांच्या आर्थिक अनियमिततांच्यासंदर्भात ईडीनं चौकशी सुरू करण्याच्या काही काळ आधी ललित मोदीनी लंडनला पलायन केलं. या ललित मोदीला चोर म्हटलं म्हणून ओबीसींचा अपमान झाला, असं नड्डा-बावनकुळे म्हणतात.

हेही वाचा: राजकारणातल्यापेक्षाही इतिहासातली चौकीदारी जास्त इंटरेस्टिंग

गौतम अदानीशी नातं काय?

नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काय बोलावं? अख्खा देश गौतम अदानीच्या नावाने शंख करतोय, पण नरेंद्र मोदींनी त्याचं नावसुद्धा उच्चारलेलं नाही. राफेल सौद्यांबद्दल, अनिल अंबानींना दिलेल्या कंत्राटांबद्दल बरीच चर्चा झाली. पण रंजन गोगोई यांच्या सरन्यायाधीशपदाच्या काळात सगळ्या व्यवहाराला क्लीनचीट मिळाली, त्याचं बक्षिस म्हणून गोगोईंची राज्यसभेवर नियुक्ती झाली, हा फार जुना इतिहास नाही.

एक अकेला सबपर भारी हे भाषणात ठीक आहे, पण ते गौतम अदानीशी काय नातं आहे हेही सांगून टाकावं एकदा. खरंतर एखाद्या समूहाचा अवमान होईल असं वक्तव्य कुणीही जबाबदार राजकीय नेत्यानं करायला नको. राहुल गांधी यांच्या वक्तव्याकडे नीटपणे पाहिलं तर लक्षात येतं की, तिथं कुठल्या समूहाचा संबंध नाही. पूर्णेश मोदी आणि आता भाजपच्या नेत्यांनी ते समूहावर ओढून घेतलंय. कारण त्यांना त्याचं राजकारण करायचं आहे.

काँग्रेसचा धोरणात्मक गचाळपणा

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली शुक्रवारी दुपारच्या आधीच. काँग्रेसजनांनी टीवीवर बाईट देऊन कर्तव्य पार पाडलं. कुठेतरी चार-दोन ठिकाणी निदर्शनं झाली असतील तेवढंच. बाकी शनिवार, रविवार दोन दिवस सुट्टी साजरी करून, आराम करून ताजंतवानं होऊन सोमवारी म्हणे आंदोलन करण्यात येणार आहे.

काँग्रेसच्या इतिहासातला दुर्मीळ असा प्रसंग आला असताना दोन दिवस विश्रांती घ्यावीशी वाटते, यातच काँग्रेसची सरंजामी वृत्ती दिसून येते. अशा आळशी पक्षाला परमेश्वरही वाचवू शकणार नाही. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर संध्याकाळी काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली. जयराम रमेश, अभिषेक मनू सिंघवी होते. इतका महत्त्वाचा आणि देशापुढे आक्रमकपणे नेण्याचा विषय असताना अभिषेक मनू सिंघवी यांनी पहिल्यांदा इंग्रजीत भूमिका मांडली.

काँग्रेसनं इथं देशापेक्षा राहुल गांधींचा वायनाड मतदारसंघच नजरेसमोर ठेवलेला दिसतो. सिंघवी यांचं निवेदन इंग्रजीत असल्यामुळे थोड्या वेळातच काही वाहिन्यांनी पत्रकार परिषदेचं थेट प्रसारण थांबवून त्या इतर बातम्यांकडे वळल्या. मुळात काँग्रेसची पत्रकार परिषद दाखवण्यासाठी कुणी उत्सुक नसावं. त्यात इंग्रजीतल्या निवेदनामुळे हिंदी, मराठी वाहिन्यांना आयती संधी मिळाली. धोरणात्मक पातळीवर किती गचाळपणा असावा, याचंही उदाहरण म्हणून याकडे पाहता येईल.

महाराष्ट्रातला काँग्रेस पक्ष तातडीने बरखास्त केला तरी फारसा फरक पडणार नाही. विधिमंडळाच्या आवारात राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारले जातात आणि त्यावर पक्षाकडून एका पत्रकापलिकडे प्रतिक्रिया उमटत नाही. नपुंसकाच्या चारित्र्याला किंमत नसते असं म्हणतात, त्याच धर्तीवर काँग्रेसजनांच्या अहिंसेला काडीची किंमत नाही, असं म्हणता येईल. राहुल गांधी यांच्या फोटोला विधिमंडळाच्या आवारात जोडे मारले गेले असताना काँग्रेसजन स्वस्थ कसे बसू शकतात, हाच खरा प्रश्न आहे. असल्या शेंदाड फौजेसाठी राहुल गांधी यांनी जिवावरच्या जोखमी घेऊ नयेत, असं नम्रपणे सुचवावंसं वाटतं.

हेही वाचा: 

राजकारणाची भाषा आणि भाषेचं राजकारण

गांधी घराण्याशिवाय काँग्रेसचं चांगभलं होईल?

राहुल गांधींचा अख्खा राजीनामा समजून घ्या ८ पॉईंटमधे

भाजपला हरवणारे हेमंत सोरेन हे झारखंडचे उद्धव ठाकरे!

कर्नाटकच्या निकालाचा महाराष्ट्रातल्या ठाकरे सरकारसाठी धडा काय?