महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अभूतपूर्व राजकीय नाट्य पहायला मिळतंय. शिवसेना नेते एकनाथ शिंदेच्या बंडामुळे सरकारसमोर पेच निर्माण झालाय. भाजपच्या या 'ऑपरेशन लोटस'ची तयारी मागच्या अनेक वर्षापासूनची आहे. त्यात त्यांना यश आलंय. दुसरीकडे बाळासाहेबांच्या पुण्याईमुळे बंड होणार नाही हे उद्धव ठाकरेंनी गृहित धरल्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आलीय.
शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाची स्क्रिप्ट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीच आहे, किंवा भाजपसोबत अंतर्गत संधान बांधून शरद पवार या सगळ्यामागे असतील अशा आशयाचे बरेच पतंग उडत आहेत. पण या सगळ्या नाट्याची पटकथा ही वर्षानुवर्ष लिहिली जात होती. मुख्यत: भाजप शक्तीशाली झाल्यावर आणि राज्यात पक्षाला देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा नेता मिळाल्यावर या प्रक्रियेला वेग आला. इतका की बाळासाहेबांसारख्या जाज्वल अजरामर नेत्याचे सगळे वाघ त्यांच्या वारसाला सोडून गेले.
बाळासाहेबांनी शेवटच्या दसरा मेळाव्यात घरातून केलेल्या भाषणात शिवसैनिकांना जाहीर आवाहन केलं होतं. 'आज मला वचन हवं आहे, जसं मला सांभाळलंत, तशी साथ उद्धवलाही द्या.' पण वेळ आली तेव्हा तशी साथ काही कुणी दिली नाही. १०० वर्ष जुन्या असलेल्या काँग्रेसला आमदार सांभाळता येत नाहीत, त्यामुळे अनेक राज्यातली हातातली सत्ता घालवून बसले. हे आपण पाहिलंच पण इथं तर सगळा विधिमंडळ पक्षच पळून गेला.
सत्तेतल्या पक्षाचा प्रभाव असतो, त्याचा सहज फायदा मिळ्तो, पण आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री तो ही पक्षप्रमुख, खाली खेचा आणि दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री करा हे सांगणारा विधिमंडळ पक्ष म्हणजे आठवं आश्चर्यच! शिवसेनेतून फुटणं म्हणजे मरण. शिवसेनेशी गद्दारी करणारा उद्ध्वस्तच होणार अशी धगधगती स्थिती ठेवणारा हा पक्ष, आज त्याच पक्षावर अशी वेळ यावी यापेक्षा दुर्दैव ते काय.
खरं तर ही वेळ नेमकेपणाने साधली गेलीय. सगळी ताकद लावून सरकारवर तुटून पडलेल्या भाजपने आता पत्ते बाहेर काढलेत, जोकर त्यांच्या हाती आहे.
आज जे घडतंय ते कुणामुळे आणि का? या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर उद्धव ठाकरे यांच्यामुळेच असं पहिल्यांदा सांगावं लागेल, शिवसैनिक निष्ठावान असतो, बाळासाहेबांच्या पुण्याईमुळे बंड होणार नाही हे गृहित धरल्यामुळे हे पाहणं त्यांच्या नशिबी आलंय.
आज भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेसाठी धोकादायक आहे, त्यांना जो अंदाज आलाय तो एकनाथ शिंदेसह त्यांच्या पक्षाच्या कुणा आमदाराला अद्याप येऊ शकलेला नाही आणि त्याबद्दल उद्धव ठाकरे आपल्या लोकांना पूर्णत: पटवू शकले नाहीत, त्यामुळेही ही स्थिती आलीय.
हेही वाचा: शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार म्हणजे ‘तीन पायांचा तमाशा’
देवेंद्र फडणवीस यांची कार्यपद्धती, मुख्यमंत्री म्हणून केलेली कामगिरी आणि ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचासाठी राज्यातले परफेक्ट 'पॉईंट पर्सन' बनल्यामुळेही आज असा राजकीय पट मांडला गेलाय. सरकारमधे सगळ्या विभागात ढवळाढवळ करुन अजित पवार यांनी केलेल्या दादागिरीमुळेही ही महविकास आघाडीवर वेळ आलीय.
आमदार विशेषत: एकनाथ शिंदे नाराज आहेत याची कल्पना उद्धव ठाकरेंना होती. मात्र ते गाफिल राहिले. कारण एक तर एकनाथ शिंदेसारखा मवाळ, संयमी नेता असं काही करणार नाही. मुलगा खासदार, घरात पदं-सत्ता असताना गप्प राहण्यावाचून त्यांच्याकडे पर्याय नाही असं त्यांना वाटत राहिलं.
बाळासाहेबांच्या प्रेमापुढे देवेंद्रप्रेमाचे पारडं जड होणार नाही, झालंच तर, फार काय चार आठजण घेऊन तोंड फोडून घेतील, असा चुकीचा अंदाज त्यांनी बांधला. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर काही आमदारांसमोर त्यांनी एकनाथ शिंदे यांना थेट तसं सुनावलंही होतं. एक दोन प्रसंगी आदीत्य ठाकरेंशीही त्यांचं बिनसलं होतं. हे गृहित धरणं त्यांना बाधलं.
बाळासाहेबांसारखा स्वभाव नसल्याने आक्रमक संघटना उद्धव ठाकरेंनी मवाळ केली, केडर सांभाळण्यासाठी त्यांची भाषा मात्र आक्रमक राहीली. अनेक आघात सहन करुनही पक्ष टिकला, नंतर मात्र त्यांच्या प्रकृतीच्या समस्या वाढल्यावर आदित्य ठाकरे संघटनेत बरेच निर्णय घेऊ लागले. त्यांनी पक्ष आणखी मवाळ केला.
कार्पोरेट पोरं गंडे घालून शिवसैनिक झाले. राकट शिवसैनिक गोंधळून गेले पण बाळासाहेबांच्या प्रेमापोटी ते ही नव्या वातावरणात रुळले. उद्धव ठाकरे यांचा लहान मुलगा तेजसला २०२४ मधे लॉन्च करुन संघटना आक्रमक करण्याचं नियोजन होतं. बाळासाहेबच एकदा म्हणाले होते. 'तेजस माझ्यासारखा आहे, अगदी रोखठोक.' पण त्याआधीच शिवसेनेच्या वाघांनी 'गुजरातच्या ढोकळ्या'ची ऑर्डर दिली.
हेही वाचा: महापोर्टलचा महाव्यापम घोटाळा सुनियोजित होता?
भाजपचं कायमच 'शत प्रतिशत'चं धोरण राहिलंय. प्रत्येक राज्यात सहयोगी पक्षात घुसणं, तिथली माणसं आपलीशी करणं, इतकी की आपल्या रंगात रंगवून टाकणं ही भाजपची निती राहीली आहे, महाराष्ट्रातही प्रमोद महाजन यांच्या काळातच शत प्रतिशतचे नारे दिले गेले होते.
बाळासाहेब होते त्यामुळे वेगाला संधी मिळाली नाही. मोदी पर्व आल्यावर पक्षाने प्रचंड वेग घेतला. पक्षाची हवा आणि निवडून येण्याची क्षमता असलेले ठोकळ चेहरे घेऊन २०१४ च्या निवडणुकीत १२३ अशा मोठ्या संख्येने भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष बनला.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यांनी सगळ्यांचा अंदाज खोटा ठरवला. सुरवातीला ब्राह्मण म्हणून मराठा बहुल बहुजनवादी राज्यात बुजणाऱ्या फडणवीसांनी सगळ्या प्रकारचे लोक जोडत आपली एक टीम निर्माण केली.
जस जसे ते मुख्यमंत्री म्हणून रुळत गेले आपल्या टिमला ताकत देत गेले. बाहेरचे आणि आतले विरोधक संपत-संपवत गेले, प्रत्येक पक्षातले उपयोगी लोक हेरले, त्यांची कामं केली. त्यांनी पाच वर्षाच्या काळात आमदार, नेते, पत्रकार अशा सगळ्या स्तरावर माणसं जोडली. उदार मुख्यमंत्री अशी ओळख निर्माण केली.
उशिराने सरकारमधे सामील झालेल्या शिवसेनेची कमकुवत ठिकाणं त्यांना माहीती होतीच, ती अधिक स्पष्टपणे पाहिली. सेनेला आता आपली गरज आहे असं मानून नियोजन केलं, शिवसेनेतले अनेक नेते गळाला लावले. त्यांची कामं केली, निवडून येण्याची स्वत:ची क्षमता असलेल्या आमदारांना जोडलं.
शिवसेनेचे अनेक मंत्री पहिल्या खेपेतही कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांचे अधिक ऐकताना दिसायचे. पक्षाध्यक्ष आदेश देत की मंत्रीमंडळाच्या बैठकीत तत्कालीन धोरणात्मक विषय घेऊन आक्रमक व्हा. पण रामदास कदम वगळता सगळे नांगी टाकत. बाहेर माध्यमांना बाईट मात्र वेगळा देत असत. सुभाष देसाई, दिवाकर रावते, दीपक सावंत, एकनाथ शिंदे तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्याशी फार एकरुप होऊन गेले होते, इतके की आपल्या पक्षाचं हित विसरले होते, विविध ठिकाणी अधिकाराच्या मुद्यावर पक्षाचा अपमान झाला तरीही हे मंत्री गप्प राहत.
मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या एका जागेवर पक्षाने अनिल परब यांना मंत्री करायला सांगितलं तेव्हा ते नकोत त्यांच्याऐवजी सुनिल प्रभूंना घेतो असा निरोप देवेंद्र फडणवीस यांनी पाठवला. स्थिती कुठपर्यंत गेली होती, हे समजायला एवढं उदाहरण पुरेसं आहे. सत्तेत अत्यंत कमी वाटा, तुटपुंजी मंत्रीपदं, वरून अपमान आणि ढवळाढवळ. अशी कोंडी झालेली असतानाही उद्धव ठाकरे शांत राहिले कारण त्यांना तेव्हाच शिवसेना फुटण्याची भीती होती.
हेही वाचा: सरकारला धडकी भरवणारं महुआ मोईत्रा यांचं वायरल भाषण
परिस्थितीचं गांभीर्य पाहून ते शांत राहिले, तेव्हा महापौर बंगल्यावर मागच्या बाजूला समुद्रकिनारी त्यांच्याशी गप्पा मारण्याचा योग आला. वरिष्ठ पत्रकार अनंत सोनावणे सोबत होते, आम्ही तिघेच. फार वेळ विविध विषयांवर बोललो. भाजपबद्दलचा त्यांचा द्वेष कोणत्या पातळीवर गेलाय याचा अंदाज तेव्हाच आला होता. त्यानंतर त्यांनी दोन्ही काँग्रेस बरोबर हातमिळवणी केल्याच्या निर्णयाचं अजिबात आश्चर्य वाटलं नाही.
२०१९च्या निवडणुकीत युती झाली. आठ दहा जागांवर स्वत: खर्च करू शकतील अशा भाजपशी जवळीक असलेल्या उमेदवारांना शिवसेनेच्या तिकिटावर लढवण्याचा आग्रह झाला. खर्च वाचतोय म्हणून आणि तेव्हा काहीच पर्याय अथवा नियोजन नसल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा प्रस्ताव मान्य केला. त्यातले बरेच निवडून आले. सत्ता स्थापताना मात्र शिवसेनेने युती तोडून वेगळी वाट धरली आणि भाजपला धक्का दिला.
भाजप आपला संपूर्ण पक्ष गिळंकृत करेल ही स्वाभाविक भीती वाटल्याने हे टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला. या निर्णयावेळी उद्धव, आदित्य ठाकरेंसह सुभाष देसाई, संजय राऊत आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते. सगळ्यांनी मिळून भाजपच्या छ्त्र-छायेखाली शिवसेना संपवण्यापेक्षा त्यांचं खच्चीकरण करून आपलं अस्तित्व दाखवायचं, असा निर्णय घेतला आणि शरद पवार यांच्या प्रेमात असलेल्या संजय राऊत यांच्यावर पुढची कामगिरी सोपवली.
यावेळी सेनेला गृहित धरण्याची चूक भाजपने केली होती. राष्ट्रपती राजवट उठवलाय अजित पवार यांचा वापर करण्यात आला, पहाटेचा शपथविधी करुन परतलेल्या अजित पवार यांच्या माध्यमातून पुन्हा भाजपला धक्का दिला गेला. अनपेक्षितपणे तीन पक्षाचं सरकार सत्तेत आलं आणि रुळलंही.
दरम्यानच्या काळात एका एका उपकृत फॅन आमदाराला साम दाम दंड भेदचा 'प्रसाद' देत 'फिट' करण्याचा कार्यक्रम सुरू झाला. तुलनेत सोपे असलेल्या, कात्रीत सापडलेल्या अजित पवार यांच्यावर दबाव टाकून पाहिला पण राष्ट्रवादीतून तेवढं संख्याबळ जुळत नव्हतं आणि अजित पवारही गंडवत होते. आमदारांच्या शरद पवार प्रेमामुळेही हा पर्याय यशस्वी झाला नाही.
तुलनेत भावनिक असलेले, एकेकाळी सामान्य असलेले, कसलीही पार्श्वभूमी नसलेले शिवसेना आमदार गळाला लागत गेले. त्यातच चौकशी यंत्रणांची भीती घेऊन कुढत दिवस काढण्यापेक्षा रंगात रंग मिसळून टाकू असा साधा विचार प्रभावी ठरला.
संजय राऊत अनेकांना खटकत, कारण ते सरकारची बाजू जोरकसपणे मांडत, स्वत: पुढाकार घेऊन आलेल्या सरकारमधे भावाला मंत्रीपद न दिल्याने नाराज असूनही ते पक्षाची बाजू मांडत राहिले. दम देण्याची भाषा हे ठाकरी भाषा आणि शिवसेनेचा दबदबा ठेवण्याच्या प्रयत्नातून येत राहीली.
हेही वाचा: सत्ता संघर्षाच्या पेचात देवेंद्र फडणवीस एकाकी
संघटन आणि कार्यकर्ते आक्रमक राहिले नसताना, कुणीही सोम्या गोम्या उठून टपली मारत असताना, कसलीच प्रतिक्रीया उमटत नाही, हे दिसल्यावर बहुतेकजण हिम्मत करू लागले, थेट उद्धव ठाकरे यांच्यावर चिंटे पिंटे वाटेल त्या भाषेत बोलू लागले. त्यामुळे अनेक आमदारांची भावना होत गेली की, हे सरकार बनवून चूक तर केली नाही ना? 'झाकली मुठ सव्वा लाखाची होती', उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रीपद घेतल्यावर अधिक उपलब्धता असती तरी फरक पडला असता.
छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक या नेत्यांची संस्थानं बनली आणि पक्षाला त्यांनी दिलेले हादरे पचवून पुढे जाणं जड गेलं. यानंतर पक्षापेक्षा कुणी मोठा होऊ नये म्हणून रामदास कदम, एकनाथ शिंदे या मास बेस असलेल्या नेत्यांचं खच्चीकरण केलं गेलं. अगदी संजय राऊत यांनाही उद्धव ठाकरेंनी बाजूला ठेवलं होतं. पण सगळं सहन करून, ते पक्षासाठी पुढे होऊन काम करत राहीले.
बाळासाहेबांनी दिलेल्या पहिल्या संधीनंतर ते संसदेत जाऊ शकले नसते आणि कदाचित दैनिक सामनाचे कार्यकारी संपादकही राहीले नसते. आपल्याला ओळख दिलेल्या पक्षासाठी नाराजी असली तरी झटलं पाहिजे अशी स्वत:ची समजूत घालून त्यांनी उपयुक्तता सिद्ध केली म्हणून ते टिकले. वास्तविक सत्तेत नसतानाही ते सरकार आणि पक्षासाठी एकटे बोलत राहिले, विरोधक अंगावर घेत राहीले, राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि काँग्रेसचे सचिन सावंत एवढे आघाडीच्या वतीने लढत राहीले. बाकी सगळे सत्तेचे धनी होते आणि आहेत हे एवढं स्पष्ट झालंय.
कोणत्या कारणाने का असेना राजकारणात सगळे आपापला डाव खेळत असतात. ते स्वाभाविक आहे, राजकीय पक्षाने राजकारण नाही तर दुसरं काय करावे.! पण सगळा विधिमंडळ पक्षच निघून गेला आणि ते ही आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री असताना. असा प्रकार कधी झाला नाही आणि कदाचित होणारही नाही. पण हे घडलंय, यातून पुढे काय होईल हे सगळं समोर येईलच पण शिवसेना भाजपपासून वाचवण्यासाठी उचललेलं पाऊलच आज घातक ठरलंय, औषधच विष झाल्याचा प्रकार घडला.
शिवसेनेची संघटना म्हणून बाळासाहेबांनी घडवलेली एक पिढी आहे, त्यामुळे हा जबर हादरा बसला तरी पक्ष संपला किंवा ठाकरे संपले असं म्हणणं चूक आणि घाईचं ठरेल. पण त्यांचा ठाकरी दबदबा मात्र या घटनेने पूर्णत: संपवलेला आहे. एक पक्ष म्हणून आता काम करायचं, वेगळी, फार ग्लॅमरस स्वतंत्र ओळख असलेला पक्ष म्हणून जी बाळासाहेबांनी शिवसैनिकांना घेऊन निर्माण केली होती, ती या घटनेने संपली.
दुसरीकडे शिवसेनेच्या बंडखोरांची वाटचाल फार सोपी नसते, हे वेळोवेळी दिसलं आहेच. इतर जनतेलाही अशा उड्यांचे प्रकार फार आवडत नाहीत. पण एक मात्र खरं, राज्याच्या अत्यंत बदललेल्या राजकीय स्थितीमधे भविष्याचे अंदाज आता फार सरळ सोपे राहिलेले नाहीत. त्यामुळेच बहुदा सर्व माध्यमांच्या हेडलाईनमधे ज्योतिषी घुसलेत. दोन्ही बाजूने ते बोलतात. यातलं नाही तर त्यातलं काही तरी आपोआप घडून खरं होतंच. पत्रकारांपेक्षा राजकीय विश्लेषण करायला ज्योतिषी बसू लागलेत. हा बदलही आजच्या परिस्थितीला साजेसा आहे.
हेही वाचा:
तर नितीन गडकरीच होतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री!
तरुण भारतच्या निशाण्यावर संजय राऊत की उद्धव ठाकरे?
शिवसेना-भाजपमधला सध्याचा पेच निव्वळ सत्तेपुरता नाही, तर
शिवसेनेची संधी हुकल्याने हा असेल सत्तेचा सगळ्यात सोप्पा फॉर्म्युला