उस्मानाबाद इथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. या निवडीचं साहित्यिक वर्तुळातून स्वागत झालं. पण काही धार्मिक संघटनांनी या निवडीला विरोध केला. या वादावर शिक्षक आमदार कपिल पाटील यांचं भाष्य.
पत्थरांचा मारा सनातन
पाप्यांची नजर विखारी
बडव्यांचा बाजार सभोती
कालवरीच्या जखम जिव्हारी
परी सुवार्तेची वेळ समिप
होता ख्रिस्त मनात माझ्या...
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची उस्मानाबादला होणाऱ्या ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि सनातन पत्थरांचा मारा सुरू झाला. फ्रान्सिस दिब्रिटो फादर आहेत. धर्मगुरू आहेत. त्याहीपेक्षा ते ख्रिश्चन आहेत. पत्थरांचा मारा त्यासाठी आहे.
दिब्रिटोंची ज्यांनी निवड केली त्यात एकही ख्रिश्चन नव्हता. मागे यु. म. पठाणांची निवड झाली. तेव्हा मतदार होते काही, पण साहित्य महामंडळावर एकही मुसलमान नव्हता. शंकरराव खरात अन् दया पवारांची निवड झाली तेव्हा एकही बौद्ध नव्हता. आताच्या निवड समितीवर एकही दिब्रिटोंच्या उपासना धर्माचा नव्हता.
पण निवड समितीवरच्या प्रत्येक सदस्याचा समाजधर्म आणि साहित्यधर्म समान होता. त्यांची मातृभाषाही अर्थात समान होती, जशी ती वसईच्या फ्रान्सिस दिब्रिटोंची आहे. मराठी. पण समानतेचा हा धागाच ज्यांना मान्य नाही, त्यांनी धमक्यांचे दगड कौतिकराव ठाले पाटील आणि श्रीपाद जोशींच्या शिरावर मारले.
हेही वाचाः वसईचे फादर फ्रान्सिस दिब्रिटो साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, कारण
जैसी पुष्पांमाजी पुष्पा मोगरी,
की परिमळांमाजी कस्तुरी
तैसी भाषामांजी, साजिरी मराठिया
असं मराठीचं रसाळ वर्णन करणाऱ्या फादर स्टिफन्स यांची मातृभाषा मराठी नव्हती. सन १५५९ मधे फादर स्टिफन्स इंग्लंडहून भारतात आले होते. मराठी शिकले. ख्रिस्तपुराण लिहिलं. त्यात केलेलं मराठीचं वर्णन संत ज्ञानेश्वरांशी नातं सांगतं.
फादर दिब्रिटो यांची मातृभाषा तर मराठी आहे. त्यांच्या एकट्याची नाही. मुंबईत, कोकणात अन् वसईत राहणाऱ्या तमाम कॅथलिकांची मातृभाषा मराठीच आहे. ते मराठीत बोलतात. मराठीत विचार करतात. मराठी शाळा चालवतात. मराठीत शिकतात. मुंबईतील शाळांमध्ये वसईकर ख्रिस्ती शिक्षक मराठीत शिकवतात. कार्डिनल सायमन पिमेंटा यांनी ही मराठी जपली आणि वाढवली.
दिब्रिटोंचा उपासना धर्म ख्रिस्ती असेल पण त्यांची समाज भाषा मराठी आहे. रेव्हरंड नारायण वामन टिळकांच्या वाटेने गेलेल्या कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, चंद्रपूर अशा महाराष्ट्रातल्या कैक जिल्ह्यातील प्रोटेस्टंट ख्रिस्ती धर्मीय भूमीपुत्रांची मातृभाषा मराठीच आहे.
मराठीचे पहिले कादंबरीकार बाबा पद्मनजी धर्माने ख्रिस्तीच होते. लोकमान्य टिळकांचे अनुयायी थोर स्वातंत्र्यसेनानी बॅ. काका बाप्टिस्टा यांची मातृभाषा मराठीच होती. दोघांच्याही कबरी शिवडीच्या ख्रिस्ती स्मशानभूमीत आहेत. तिथल्या अर्ध्या कबरींवरची प्रार्थना मराठीत आहे.
शांती आणि समतेच्या शोधात उपासनेचा धर्म बदलणाऱ्या या मराठीच्या पुत्रांनी आपली मायबोली आणि समाज भाषा बदलली नाही. कारण त्या मराठीचा वारसा ज्ञानेश्वर, तुकारामांचा आहे. करुणा आणि शांतीच्या शोधात त्यांना ख्रिस्त जवळचा वाटला. कौतिकराव ठाले पाटील आणि श्रीपाद जोशींवर सनातन पत्थरांचा मारा करणाऱ्यांचा धर्म त्यांना जवळचा वाटला नाही. म्हणून तर त्यांनी धर्मांतर केलं.
हेही वाचाः `आरे, ऐका ना` हा हॅशटॅग ट्रेंड होण्यामागे अशी गडबड सुरूय
दुसरीकडे ज्ञानोबा, तुकोबांची मायबोली तीच करुणा आणि शांतीची उब देते म्हणून ती भाषा त्यांनी सोडली नाही. फादर दिब्रिटोंनी सुबोध बायबल लिहिलं म्हणून आक्षेप आहे. फादर दिब्रिटो त्यांना धर्म प्रचारक वाटतात. पाणी शिंपडून धर्मांतर करणारे वाटतात. फादर दिब्रिटोंनी कोणाचं धर्मांतर केलं असतं तर बातमी आजवर लपून राहिली नसती.
मराठीत भावार्थ दिपिका आणि गीतारहस्य यांचं जितकं महत्वं आहे तितकंच दिब्रिटोंच्या सुबोध बायबलचं आहे. तो काही धार्मिक ग्रंथ नाही. ती रसाळ, सुंदर साहित्यकृती आहे. मानवाच्या महान पुत्राची गाथा सांगताना मराठीचा जिव्हाळा आणि कळवळा सुबोध बायबलमध्ये पानोपानी जाणवतो. पानोपानी तुकाराम अणि ज्ञानेश्वरांचा अभंग हटकून येतो. जेरूसलेमचा राजा डेविड आणि देहुचे तुकाराम बुवा यांची ईश्वर पारायण मनं जुळणारी आहेत.
फादर दिब्रिटो सांगतात,
हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी
लुलपते तसा हे देवा
माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे
- राजे डेविड
कन्या सासूराशी जाये
मागे परतूनी पाहे
तैसे झाले माझे जीवा
केव्हा भेटसी केशवा
- संत तुकाराम
महाराष्ट्रात मराठीची गोची झालीय. तशी अन्य राज्यात तिथल्या भाषांची नाही. इथं मराठी म्हणजे हिंदू अशी ओळख बनलीय. 'वसईकर परेरा, डाबरे, ब्रिटो ख्रिश्चन असूनही मराठी चांगलं बोलतात. शफाअत खान, अब्दुल कादर मुकादम मुसलमान असूनही किती सुंदर मराठी लिहतात,' असं आपण सहजपणे बोलतो. मनाला वेदना होतात तेव्हा.
यात कौतुकापेक्षा मराठी असणं म्हणजे धर्मभेद बाळगणं असं अंतर पडलेलं असतं. अरे त्यांचीही मातृभाषा मराठीच आहे. जशी ब्राह्मण, मराठा, साळी कोळी यांची भाषा मराठी आहे. विदर्भातले आदिवासी पूर्ण महाराष्ट्रीय असले तरी त्यांची मातृभाषा मराठी नाही. ती असते गोंडी, माडिया, कोरकू.
वसंतराव नाईक, सुधाकर नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांची मातृभाषा गोरमाटी बंजारा. गुजरात, केरळ, तामिळनाडू इथं असा भेद नाही. तिथे भाषेला धर्म चिकटलेला नाही. केरळी ख्रिश्चन, हिंदू आणि मुसलमान यांची मातृभाषा मल्याळमच असते. तीच गोष्ट तामिळींची. गोव्यातले हिंदू आणि ख्रिश्चन कोकणीच बोलतात. गुजरातमधले मुसलमान भाषेने गुजराती असतात.
हेही वाचाः दर्जेदार नाट्यनिर्मिती करणारी संस्थाः धि गोवा हिंदू असोसिएशन
दिब्रिटोंचं ललित लेखन विपुल आहे. तितकंच वैचारिक लिखाण. पर्यावरणाच्या त्यांच्या लढाईत त्यांनी जे जे लिहलं त्यात धर्माचा संबंध येतो कुठं? ते माणसांसाठी लिहितात आणि समाजधर्म माणुसकी आहे हेच सांगतात. मी अस्सल भारतीय आहे, हे त्यांना सांगायला लागावं. आपल्या समाजातल्या नतद्रष्टयांनी त्यांचा खुलासा मागावा यासारखं दुःख काय आहे?
धर्माव्यतिरिक्त त्यांनी खूप काही लिहलं आहे. पण त्यांनी नुसतं सुबोध बायबल लिहिलं, तरीही ती मराठीची फार मोठी सेवा ठरते. जगभर बायबलच्या रोज हजारो प्रती विकल्या जातात. महात्मा गांधी, लिओ टॉलस्टॉय, पंडिता रमाबाई, आचार्य विनोबा भावे, महात्मा फुले अशा महामानवांनी या ग्रंथातून प्रेरणा घेतली.
त्या बायबलचा परिचय करून देणं म्हणजे धर्मप्रचार नाही. दिब्रिटोंचा तो ग्रंथ म्हणजे केवळ अनुवाद नाही. ललितरम्य शैलीतला भावानुवाद तर तो आहेच, पण मानवाच्या इतिहासावर प्रभाव टाकणाऱ्या धर्मग्रंथाचा आणि परंपरेचा शोध घेणारा संशोधनपर ग्रंथ आहे. तो सांस्कृतिक सेतू आहे.
फादर दिब्रिटो लिहतात, 'येशूसाठी मुक्ती केवळ आध्यात्मिक जीवनापुरती मर्यादित नव्हती. तर तिचा ऐहिक जीवनाशी अनन्य संबंध होता. माणूस केवळ आत्मा नाही. त्याला देहही आहे. म्हणजे तो देहात्मा आहे. म्हणूनच मुक्ती म्हणजे माणसाचं सर्वंकष कल्याण साधणं. हा विचार या शुभवर्तमानातून आलाय. तिसरं शुभवर्तमान सांगताना संत लुकने येशूची प्रतिमा रंगवलीय. गोरगरीब, वंचित, पीडित, स्त्री, मुले, विधवा, परित्यक्त्या यांचा मित्र.'
फ्रान्सिस दिब्रिटो साहित्यिक म्हणून मोठे आहेतच. पण त्यापेक्षा माणूस म्हणून मोठे आहेत. संत लुक लिहित शुभवर्तमानातली ख्रिस्ताची ती पायवाट दिब्रिटोंनी कधीच सोडली नाही. ख्रिस्त निर्भयपणे क्रुसावर गेला. हरित वसईचा लढा उभारताना तीच निर्भयता दिब्रिटोंनी महाराष्ट्राला शिकवली.
डेविड-गोलिएथच्या कथेसारखी. गांधींच्या सत्याग्रहासारखी. खुद्द दिब्रिटोंनीच गांधींच्या सत्याग्रहाचं नातं डेविड-गोलिएथच्या कथेशी जोडलंय. डेनिडनं गावकऱ्यांना निर्भय बनवलं होतं. भारतीयांना गांधींनी. वसईतल्या दिब्रिटोंनी वर्तमानाला.
ते निर्भय फादर दिब्रिटो मी पाहिलेत. अनुभवलेत. अफवांचं विष कालवलेल्या विहिरीत उतरलोय. तळ गाठलेल्या त्या निर्मळ पाण्यात सौहार्द आणि सलोख्याचे मासे मुक्त विहरताना पाहिलेत. फादर दिब्रिटोंच्या ओंजळीने त्या विहिरीतलं पाणी मी प्यायलोय.
९३व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर दिब्रिटोंची निवड होणं ही अवघ्या मराठीसाठी सुवार्ता ठरावी.
परी सुवार्तेची वेळ समिप
होता ख्रिस्त मनात माझ्या...
हा ख्रिस्त कोणी देवाचा पुत्र नाही. ख्रिस्ती धर्माचा प्रेषित नाही. हा ख्रिस्त सनातन वेदनेवर फुंकर घालणारा मानवाचा महापुत्र आहे. माणुसकीच्या चिरंतन प्रवाहातून वाहणारी करुणा आहे. झाकोळलेल्या अलम मराठी दुनियेसाठी, द्वेष अन् भेदाच्या जखमांनी विव्हळणाऱ्या भारतासाठी साहित्य संमेलनाची ही घटना सुवार्ता ठरावी. ख्रिस्त अन् ज्ञानेशाच्या करुणेसारखी.
हेही वाचाः
आपल्याला कोणता आणि कसा हिंदू धर्म हवाय?
स्वतःशी संवाद साधण्यासाठी करावं हरतालिकेचं व्रत
पेरियार: बहुजनांना जातीच्या जोखडातून सोडवणारा विचार
आजोबांच्या वयाच्या शरद पवारांची तरुणांमधे क्रेझ का वाढतेय?
मोदींच्या स्टेजवर ट्रम्पतात्या आले, त्याचा देशाला काय फायदा झाला?