शेतीमधे योगदान देणाऱ्या काजव्यांचं अस्तित्व धोक्यात का आलंय?

०१ जुलै २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


काजवे शेतीला नुकसानदायक असलेले कीटक आणि अळ्या तसंच शेतात पिकावर ताव मारणाऱ्या गोगलगाई खाऊन फस्त करतात. त्यामुळे शेतीच्या विकासात त्यांचं मोठं योगदान राहिलंय. पण मागच्या तीस वर्षात काजव्या पाठोपाठ कितीतरी कीटक आपण संपवलेत. आधीच कमी उरलेल्या काजव्यांच्या संख्येतही लक्षणीय घट झालीय. असं हा होतंय हे सांगणारी भूषण भोईर यांची वायरल होत असलेली फेसबुक पोस्ट.

पूर्वी पावसाळा सुरू झाला की ठिकठिकाणी काजवे लुकलुकत असायचे. आईच्या मामाकडच्या घरी मी या काजव्यांच्या मागे पळत असायची आणि दहा पंधरा मिनिटात जवळपास शंभरएक काजवे पकडून ते बाटलीत भरून ती बाटली अंधाऱ्या खोलीत ठेवून आम्ही लहान मुलं मज्जा करत असायचो.

अवघ्या तीस वर्षात हे काजवे अशा पद्धतीनं गायब होतील याचा त्या काळी विचार पण केला नव्हता. आज तास भर अंधारात फिरलो तरी नजरेला जेमतेम एक तरी काजवा दिसला तर नशीब.

काजव्यांचा जन्म ते जगण्याचा संघर्ष

काजवे भुंग्यांच्या कुळात मोडतात,  जगभरात काजव्याच्या जवळपास २००० विविध प्रजाती विखुरलेल्या आहेत. त्यातल्या भारतात जेमतेम ९ ते १० प्रजाती आढळतात. काजव्यांचा जीवनक्रम पूर्ण व्हायला एक वर्ष जातं.

पावसाळ्यात एक मादी तब्बल १०० अंडी देते. ही अंडी ती एखाद्या झाडाच्या खोडामधे किंवा पाणथळ जागांच्या शेजारी, किंवा उंच गवताळ ठिकाणी पालापाचोळामधे दिली जातात. काजव्याची अंडी आणि अळी दोन्ही अंधारात चमकतात. साधारण दोन आठवड्यात अंड्यातून काजव्याची अळी बाहेर येते, आणि मग सुरू होतो जगण्यासाठीचा तिचा संघर्ष.

या काळात ती छोटे मोठे किडे, शेतीला नुकसानदायक असलेले कीटक आणि अळ्या तसंच शेतात पिकावर ताव मारणाऱ्या गोगलगाई खाऊन फस्त करतात. आणि त्या विकासाच्या पुढल्या टप्प्यात जातात. प्रत्येक वेळी जेव्हा त्यांचा आकार वाढतो तेव्हा त्या कात टाकतात. एकूण पाच वेळा कात टाकल्यानंतर अळ्या विकासाच्या पुढच्या टप्प्यात येतात, जिथं त्या फुलपाखराप्रमाणे कोश रुप धारण करतात.

लुकलूकण्याची नक्कलही करतात

मे ते जून महिन्यात पावसाच्या एक दोन जोरदार सरी येऊन गेल्या नंतर कोषातून लुकलुकणारे काजवे बाहेर येतात. आता त्यांचं दुसरं आयुष्य सुरू होतं, जिथं ते हवेत उडणारे लहान मोठे कीटक खातात. लहान मोठ्या किटकांव्यातिरिक्त ते स्वजाती भक्षणही करत असल्याचं समोर आलंय.

प्रत्येक जातीचा काजवा एका विशिष्ट पद्धतीने लुकलुकत असतो. काही काजवे अगदी कमी वेळात जलद गतीने लुकलुक करतात, तर काही मंद गतीने लुकलुकत असतात. त्यांच्या लुकलुकणाऱ्याची वारंवारता त्यांना त्यांच्या जनुकीय संरचनेच्या आधारे मिळते.

काजवे आपल्या जातीच्या नर आणि मादीना ओळखतात आणि आकर्षित करतात. काही जातीच्या मादी इतर जातींच्या लुकलुक करण्याच्या पद्धतीची नक्कल करून दुसऱ्या जातीच्या नराला आकर्षित करतात आणि त्याला भक्षही बनवतात.

हेही वाचा: उद्या गुजरातमधे धडकणाऱ्या वादळाला वायू हे नाव कोणी दिलं?

दहा, पंधरा दिवसाचं आयुष्य

काजवे कोषातून बाहेर आले की, त्यांच्या जवळ खूपच कमी वेळ असतो. कारण कोषातून बाहेर आल्यावर त्यांचं आयुष्य केवळ दहा ते पंधरा दिवसांचं असतं. एवढ्या कमी वेळात त्यांना मादी सोबत मिलन करून त्यांची पुढची पिढी निर्माण करण्यासाठी स्पर्धा सुरू असते. म्हणून बहुदा बरेच नर काही न खाता केवळ मिलन करणं हाच एक क्रम सुरू ठेवतात आणि लवकरच मरून जातात.

पुढे मादीही अंडी दिल्या नंतर अवघ्या काही दिवसात मरून जाते. आणि आता अंड्यातून अळी अळी पासून कोश आणि कोषापासून काजवा तयार व्हायला तब्बल एक वर्षाचा काळ लागतो. आपल्या आयुष्याचा खूप मोठा काळ अश्या रीतीने काजवे जमिनीवर काढत असतात.

काजव्यांच्या अळीला धोका?

काजवे पूर्वी खूप दिसायचे कारण त्या काळी बऱ्याच पाणथळ जमिनी अस्तित्वात होत्या, ठिकठिकाणी असलेल्या पाणथळ जमिनींमुळे भूजल पातळी काठोकाठ भरलेली असायची. त्यामुळे जमिनीतली आद्रता पूर्ण वर्षभर टिकून राहत असायची. तसंच त्यावेळी मोठमोठी गवताची कुरणं आमच्या पालघर जिल्ह्यात अस्तित्वात होती.

उंच वाढलेल्या दाट गवतामुळे सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोचत नसे. तिथं काजव्यांसाठी योग्य आद्रता वर्षभर टिकून राही. शेतांच्या बांधावर नागफणी, थेंगड, या काटेरी झाडांचं कुंपण असल्यामुळे अशा ठिकाणीही आद्रता चांगल्या प्रकारे राहायची. या ठिकाणी असलेल्या खेकड्याच्या सुक्या बिळात कजव्यांच्या अळ्या रात्री चमकताना दिसत.

हळूहळू एका पाठोपाठ एक पाणथळ जागा आणि गवताळ कुरणं नष्ट होत गेल्या, ज्यामुळे जमिनीतली आद्रता पावसाळा संपल्यानंतरही टिकेनाशी झाली. परिणामी काजव्यांच्या अळीला जगण्यासाठी आवश्यक असलेली आद्रता मिळेनाशी झाली.

हेही वाचा: पालघरचा भूकंप... कोट्यवधी वर्षांपासून आजपर्यंत!

वाढत्या शहरीकरणाचा फटका

शेतात माणसाने फवारणी आणि रासायनिक खतं टाकायला सुरवात केली. त्यामुळे इतर उपद्रवी किटकांपाठोपाठ परागीभवनासाठी उपयुक्त असणाऱ्या मधमाशा आणि इतर काजव्यांसारख्या शेतीला उपयुक्त कीटकही नष्ट झाले.

उरली सुरली कसर वाढत्या शहरीकरणाने पूर्ण केली. अगदी थोडा वेळ मिलनासाठी पंख उघडून लुकलुक करणारे हे कीटक रात्रीच्या वेळी लावलेल्या एलईडी आणि इतर झगमगाटामुळे त्यांना त्यांचा जोडीदार शोधण्यात अडथळे येऊ लागले. आधीच कमी उरलेल्या काजव्यांच्या संख्येत आणखीन घट होत गेली.

निसर्ग पर्यटनाच्या नावाखाली उरल्या सुरल्या ठिकाणी जिथं आजही काजवे त्यांची शेवटची लुकलुक करून पृथ्वीच्या पाठीवरुन कायमचे नष्ट होणार आहेत अशा ठिकाणी ही विचित्र शहरी माणसं यायला लागली तिथं नाईट ट्रेल, करत सोबत बॅटरी घेऊन फिरू लागली. ज्यामुळे काजव्याना घनदाट जंगलातही आता त्यांचा जोडीदार शोधण्यात अडथळे येऊ लागले आहेत.

तर जीवसृष्टी विनाशाच्या उंबरठ्यावर

माणसाची मानसिकता दिवसेंदिवस खूप घाणेरडी होत चालली आहे. आधी तो निसर्ग ओरबाडून काढतो, त्यातल्या जीवनाचा एकूण एक थेंब शोषून त्याचा कागदी पैसा बनवतो आणि नंतर हाच माणूस त्या पैशाने निसर्गात भ्रमंती करायला येतो. निसर्गाला बटिक समजतो.

पाहिजे तसं उपभोगायचं आणि पैसे फेकून मोकळं व्हायचं. या वृत्तीमुळे आज सर्वत्र पृथ्वी वरचं जीवन क्षणोक्षणी नष्ट होत आहे. अवघ्या तीस वर्षात काजव्या पाठोपाठ असे कितीतरी बहुउपयोगी कीटक आपण संपवले आहेत. ज्याचा खूप भयानक परिणाम येत्या काळात आपल्याला भोगावा लागणार आहे. 

निसर्गाच्या काठीला आवाज नसतो. कधी तो कोरोना बनून तर कधी अंफान, निसर्ग सारख्या चक्रीवादळाच्या रूपाने आपल्याला आपली जागा दाखवून देतो. येत्या फक्त पाच वर्षात जागतिक तापमान वाढीमुळे आणखी भयानक संकट ओढवणार आहेत, ज्यात संपूर्ण मानवासहित जीवसृष्टी विनाशाच्या उंबरठ्यावर उभी आहे.

हेही वाचा: 

मुंबईच्या विकासात पर्यावरणाला धक्का लागणारच!

शुद्ध हवेसाठी, हॅशटॅग ‘शुद्ध हवा हक हमारा’ कॅम्पेन

आपल्या मुलांसाठी डाएट प्लॅन गरजेचा की हेल्दी लाईफ प्लॅन?

जगात पर्यावरण आणीबाणी घोषित करा सांगणाऱ्या ग्रेटा ताईची गोष्ट

(लेखक सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर इथल्या प्राणीशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत)