महाराष्ट्रातल्या महिला कुस्तीसाठी अच्छे दिन!

२६ मार्च २०२३

वाचन वेळ : ५ मिनिटं


महाराष्ट्राला मल्लविद्येची दैदप्यमान परंपरा आहे. कुस्तीमधे महिला हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच यशस्वी होताना दिसत असल्या तरी या पुरुषप्रधान खेळात स्त्रियांनी इतिहास निर्माण केलाय. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे नुकतीच सांगलीत झालेली पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा. या स्पर्धेत सांगलीच्या प्रतीक्षा बागडीनं बाजी मारलीय. त्यानिमित्ताने महिला कुस्तीची नव्याने चर्चा होतेय.

आज सर्वच क्षेत्रात महिला अग्रभागी आहेत. आजच नाही तर इतिहासातल्या सर्व काळात महिलांना देशात मानाचं स्थान होतं. रामायण, महाभारत काळात महिलांचे स्वयंवर रचले जायचे म्हणजेच आपला पती कोण असावा हा सर्वस्वी निर्णय महिलांच्या हाती असायचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या  काळात जिजाऊसाहेबांनी तर हिंदवी स्वराज्यासाठी महिलांचं संघटन केलं होतं.

स्वातंत्र्य हवं तर पुरुषांनीच हातात तलवार घ्यावी असं कुठे नाही, स्त्री सुद्धा स्वातंत्र्यासाठी हातात तलवार घेऊ शकते हे आपल्या कृतीतून जिजाऊसाहेबांनी दाखवून दिलं होतं. शिवाजीराजे पन्हाळगडी वेढ्यात अडकले असताना, आगर्‍यात नजरकैदेत असतानाही आई साहेब स्वतः चिलखत घालून रणांगण गाजवायला सिद्ध झाल्याची नोंद इतिहासात सापडते.

महाराष्ट्रात आजच्या घडीला राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कला, क्रीडा यासोबत समाजातल्या सर्वच क्षेत्रात स्त्रिया अग्रेसर आहेत. कुस्ती सारख्या पुरुष प्रधान खेळात सुद्धा स्त्रियांनी इतिहास निर्माण केला आहे. आज कित्येक महिला मल्ल आपल्या झुंझार खेळीनं जनमाणसांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.

हेही वाचा: ऑलम्पिकमधे उत्तेजक घेऊन खेळणाऱ्या खेळाडूंचं काय करायचं?

पहिली महिला कुस्ती स्पर्धा

महाराष्ट्राला मल्लविद्येची दैदीप्यमान मल्लपरंपरा आहे. पण महिलांचा या क्षेत्रात येण्याचा कल फारसा दिसून येत नाही. पण ज्या ज्या मुली आज कुस्ती सारखा खेळ आपल्या करियर चा भाग म्हणून निवडत आहेत त्यांना सरकारी पाठबळाची गरज आहे. महाराष्ट्रातल्या अनेक महिला खेळाडू आहेत. त्यांना शासकीय नोकरीत समावून घेतलं तर त्या कुस्तीकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन त्यात यश मिळवतील.

सांगलीमधे पहिला महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नुकतीच झाली. मागची २ वर्ष कुस्तीच्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय संघटनेत घडत असलेल्या घडामोडींचा जवळचा साक्षीदार मी स्वतः आहे. अगोदर ६० वर्ष जुनी असणारी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद भारतीय कुस्ती टीमने बरखास्त केली.

नवे पदाधिकारी कामाला लागणार इतक्यात जुन्या संघटनेनं न्यायालयात धाव घेऊन बंदीवर स्थगिती आणली. त्यामुळे अस्थायी समिती महाराष्ट्रात काम करू लागली. कोथरूड महाराष्ट्र केसरीला सुद्धा अस्थायी समितीनंच मान्यता दिली होती. त्यानंतर भारतीय कुस्ती संघच बरखास्त झाला.

महिलांना कुस्तीमधे करियरची संधी

उत्तरेतल्या मल्लांनी थेट भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्यावर आरोप केले. हे घडत असताना महाराष्ट्रात अस्थायी समिती नियुक्त गट आणि जुना कुस्तीगीर गट असं मोठं राजकारण सुरू झालं. दोन्ही संघटना राज्यस्तरीय अनेक स्पर्धांचे अधिकृत आयोजक आपणच आहोत असं सांगून काम करू लागली, ज्याचा एक भाग म्हणजे सांगलीतली महिला महाराष्ट्र केसरी.

राज्यातला जिल्हा तालीम संघ आणि महानगरपालिका अशा ४४ संघातल्या अंदाजे ४५० महिला कुस्तीगीरांनी या स्पर्धेसाठी हजेरी लावली. महिला महाराष्ट्र केसरी गटात कोल्हापूर जिल्ह्यातल्या वैष्णवी कुशाप्पा, शिरोळ इथल्या कोल्हापूर शहराचं प्रतिनिधीत्व करणारी अमृता पुजारी. यजमान सांगली जिल्ह्यातून तुंगची प्रतीक्षा बागडी, सातारची धनश्री मांडवे. नगरची आंतरराष्ट्रीय पदक विजेती भाग्यश्री फंड, त्याचबरोबर पुण्याची कोमल गोळे या प्रमुख नावासह इतर अनेक महिलांचा सहभाग होता.

कुस्तीमधे महिला हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच यशस्वी होताना दिसतात. साहजिकच महिला कुस्तीगीरांची संख्या कमी आहे म्हणून आजच्या घडीला त्यांना कुस्तीमधे करियरची संधी आहे. जिथं मुलांना अनेक फेर्‍या अनेक दिगग्ज मल्लांच्यासोबत खेळाव्या लागतात तिथं केवळ काही फेर्‍यांनंतर राज्य, राष्ट्रीय पातळीवर मुली जाऊ शकतात. या गोष्टीची पालकांनी जरूर दखल घ्यावी असं वाटतं.

हेही वाचा: दंगल आणि लीगपेक्षा तर राणादादाने कुस्तीला ग्लॅमर दिलं

महिला मल्लांनी याची काळजी घ्यावी

कुस्ती हा खेळ तसा मनगट मस्तीचा, नाजूक रुसव्या फुगव्याना इथं काही अर्थ नसतो. त्यामुळे ज्या मुलींना कुस्ती हा करियरचा खेळ निवडावा असं वाटतं त्यांना झोकून देऊन व्यायाम करावा लागेल, सकस आहार घ्यावा लागेल, योग्य झोप घ्यावी लागेल आणि वस्तादांचा मार सुद्धा खावा लागेल.

या सर्व गोष्टींची तयारी करुन मगच हा खेळ निवडा कारण एकदा तुम्ही हा विषय निवडला आणि कालांतराने यातून रिटायरमेंट घेतली तर तुमचं पूर्वीचं आयुष्य जसंच्या तसं मिळेल याची खात्री नाही, कारण कुस्तीमधे जास्त ऊर्जेचा आहार, प्रामाणिक कष्ट यामुळे शरीर पुरुषाप्रमाणे टणक बनू लागतं, सौंदर्यावर परिणाम दिसतो. त्यामुळे कुस्ती करत असताना योग्य गुरु, मार्गदर्शकांची निवड करणं हे सुद्धा महत्वाचं असतं. तुमचं सौंदर्य सुद्धा टिकणं हे तुम्ही खात असलेल्या खुराकावर अवलंबून असतं.

कुस्तीनंतर वजन बेफाम वाढू शकतं, यासाठी आहार, व्यायाम, शास्त्र यांची माहिती असणारा गुरु जरूर असावा. ही अट पुरुषांना लागू नाही कारण पुरुषांची कुस्ती कारकीर्द वयाच्या ११ वर्षांपासून ते १५ वर्ष असते, तिथून पुढे कितीही वर्ष तो त्याच्या कर्तृत्वावर आपला फॉर्म टिकवू शकतो, पण मुलींची कुस्ती कारकीर्द ५ ते ८ वर्ष इतकीच असते आणि यानंतर वैवाहिक जीवन. त्यामुळे महिला मल्लानी या गोष्टीची जरूर काळजी घ्यावी. पण  या क्षेत्रात मुलींना तेजस्वी आदर्श निर्माण करण्याची चांगली सधी आहे हे लक्षात घ्यावं लागेल.

आज गीता फोगट सारखी महिला पैलवान डीवायएसपी सारख्या क्लास वन पदावर केवळ कुस्तीमुळे पोचली आहे, अनेक मुली पोलिस दलात आहेत. त्यामुळे कुस्तीमधे महिलांना नक्कीच सुवर्णसंधी आहे.  महिला कुस्तीमधे कोच महिला असणं सर्व दृष्टीनं आवश्यक आहे असं मला वाटतं.

मनं समजून घेणारी कोच हवी

जिथं महिला कुस्ती सेंटर आहे तिथं केवळ महिलाच कोच असणं ही गरजेची गोष्ट आहे. पण, अनेक ठिकाणी सराव करताना महिला मल्लच नसल्यामुळे नाईलाजाने मुलांच्या सोबत सराव करणं मुलींना भाग पडत आहे. ही जशी फायद्याची गोष्ट आहे तशीच तोट्याची सुद्धा आहे.

तोटा एवढ्यासाठी की, ज्या वयात मुली कुस्तीकडे येतात ते वय म्हणजे त्यांच्या मनात अनेक भावभावनांचा गुंता सुरु होण्याचं वय असतं त्यामुळे साहजिकच नकळत त्यांच्या हातून चुका घडण्याची शक्यता असते आणि त्या चुका पुढे जाऊन जटील समस्या बनतात. पालकांनी जो दृष्टिकोन ठेवून त्यांना कुस्तीमधे घातलेलं असतं ते ध्येय दूरच राहतं आणि इतर समस्या सोडवता सोडवता नाकी नऊ येतात. अशा अनेक महिला पालकांच्या तक्रारी मला येतात पण त्यावर उघडपणे भाष्य करणं ना पालकांना शक्य आहे ना मला.

मुलींना याची जाणीव अगोदर करून द्यायला हवी. त्यासाठी त्यांची मनं समजून घेणारी महिला कोच त्या त्या सेंटरवर उपलब्ध करून देणं काळाची गरज बनलीय. आज अनेक सेंटर अशी आहेत जिथं पुरुष कोचनी अनेक आंतरराष्ट्रीय महिला पैलवान घडवल्या, पण प्रत्येक ठिकाणी असं होईलच असं नाही. याचा अभ्यास करून महिला कुस्तीगीरांनी कुस्ती रिटायरमेंटनंतर कुस्तीच्या दीर्घ आभ्यासाकडे जरूर लक्ष द्यावं.

एनआयएससारख्या शासकीय कोर्समधे करियरची सुवर्णसंधी आहे. प्रत्येक महिला कुस्तीगीरांनी आपआपल्या परीने यासाठी योगदान देणं गरजेचं आहे तर भविष्यात महाराष्ट्रातून अनेक महिला कुस्तीगीर घडतील अशी खात्री वाटते..!

हेही वाचा: 

कधीकाळी बालिश वाटणाऱ्या विराटची प्रगल्भ तिशी

सौरव गांगुली बीसीसीआयमधे दादागिरी करू शकेल काय?

फूटबॉलपटूच्या किकने बदलला मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोन

महात्मा गांधींचं क्रिकेटशी नातं सांगणारे हे किस्से आपल्याला माहीत आहेत का?

(लेखक कुस्ती अभ्यासक असून त्यांचा लेख दैनिक पुढारीतून घेतलाय)