मतला म्हणजे गझलेच्या सुरवातीचं धृवपद आणि मक्ता म्हणजे गझलेच्या शेवटी येणारी शायराची नाममुद्रा. स्वातंत्र्य ही गझल असेल तर लोकमान्य टिळक हे तिचा मतला आहेत आणि महात्मा गांधी मक्ता. सदानंद मोरे यांनी लोकमान्य ते महात्मा याचं सूत्र या एका वाक्यात सांगितलंय. त्यामुळे दोघांपैकी एकचहवं असेल, तर गझल अर्धवटच राहील.
डॉ. सदानंद मोरे. ते स्वतःला `महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे अभ्यासक` इतकंच म्हणवून घेत असले तरी ते महाराष्ट्राच्या इतिहासाचे देशातील एक महत्त्वाचे भाष्यकार आहेत. `लोकमान्य ते महात्मा` या दोन खंडांच्या महाग्रंथात त्यांनी महाराष्ट्राचं लोकमान्य टिळक ते महात्मा गांधी हे स्थित्यंतर मोठ्या ताकदीने आणि तपशीलाने मांडलं. त्यामुळे लोकमान्यांच्या अभ्यासाचा नवा आयाम प्रस्थापित झाला. शिवाय त्यांनी सविस्तर टिळकचरित्रही लिहिलं.
या सगळ्याच्याही आधी लिहिलेल्या `तुकाराम दर्शन`पासून काही महिन्यांपूर्वी आलेल्या `विद्रोहाचे व्याकरण` या महात्मा फुलेंच्या वैचारिक चरित्रापर्यंत जवळपास प्रत्येक ग्रंथात कमी किंवा जास्त टिळक सापडतात. त्यामुळे इतरत्र टिळकांवरचं नवं वैचारिक लेखन थांबलेलं असताना मोरे सरांना गवसलेले लोकमान्य महत्त्वाचे ठरतात. लोकमान्यांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने साप्ताहिक साधनासाठी सचिन परब यांनी त्यांची मुलाखत घेतलीय. त्यातले प्रश्न वजा करून मुलाखतीचं शब्दांकन लेखाच्या स्वरूपात मांडलंय.
लोकमान्य टिळकांचा परियच महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना असतोच. शेंगा खाल्ल्या नाहीत, टरफलं उचलणार नाही. टिळक आगरकर वाद. कॉलेजमधे असताना तब्येतीसाठी ड्रॉप घेतला होता, वगैरे. मग तिथून एकदम जातो `स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे`. हे मलाही माहीत होतंच. पण माझ्या वडिलांकडे खूप पुस्तकं होती. त्यात `टिळकभारत` नावाचं शि.ल. करंदीकर यांनी लिहिलेलं टिळकचरित्रही होतं. शिवाय गीतारहस्यही होतं. ते माझं शाळेत असतानाच वाचून झालं होतं. गीतेचा, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना वडिलांच्या बरोबर गीतारहस्यावरून चर्चाही व्हायच्या. त्यामुळे एखाद्या अभ्यासकाला टिळकांविषयी किमान माहिती हवी असते, त्याचा पाया अगदी शालेय वयातच घातला गेला होता.
पण मी टिळकांकडे स्पेसिफिक कसा वळलो, ते इंटरेस्टिंगच आहे. विश्राम बेडेकरांचं `टिळक आणि आगरकर` हे नाटक आलं होतं. तेव्हा मी अहमदनगरला प्राध्यापक होतो. ते नाटक मी पाहिलं. बेडेकरांनी अशी भूमिका घेतली होती, मी आगरकरांना न्याय देऊ इच्छितो. ते देखील टिळकांसारखे स्वराज्यप्रेमीच होते, वगैरे वगैरे. ते सांगत होते की मी आगरकरांचा समर्थक आहे. पण प्रत्यक्ष नाटकामधे टिळकांचं चित्रच जास्त उठावदार झालं.
त्याआधी मी अहिताग्नी शंकर रामचंद्र राजवाडे यांचं आत्मवृत्त वाचलं होतं. हा फार मोठा माणूस होता. त्यांची बरीचशी धोरणं प्रतिगामी असल्यामुळे ती लोकांना आज आवडणार नाहीत. पण त्या काळची सामाजिक परिस्थिती काय होती, ते समजून घ्यायला त्यांचं आत्मवृत्त फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला बेडेकर नाटकात कुठे फसलेत, याचा अंदाज आला. म्हणून मी टिळक आणि आगरकर नाटकाचं परीक्षण करणारा एक लेख लिहिला.
हेही वाचा : डावे, आंबेडकरवाद्यांच्या टोकाच्या गांधीविरोधामुळे आरएसएसचं फावलं!
लाल निशाण पक्षाचे ज्येष्ठे नेते कॉ. भास्करराव जाधव `श्रमिक विचार` नावाचं पत्र चालवायचे. त्यात मी दर रविवारी लिहायचो. मी लिहिलं की बेडेकरांनी आगरकरांना कात्रजचा घाट दाखवला. कारण ते म्हणतात मी आगरकरांचा पाठीराखा आहे पण त्यांनी जास्त झुकतं माप टिळकांना दिलं. मी ते पुराव्यानिशीही मांडलं. त्यात आगरकर आणि टिळक ही काय भानगड आहे, याकडे माझं लक्ष गेलं.
त्याचवेळेला डॉ. य.दि. फडकेंनी या नाटकासंबंधी लिहिलं होतं. भाषणं केली होती. त्यात त्यांनी म्हटलं होतं की यात आगरकरांचं चित्र हिणकस झालेलं आहे. आमचं मत एकच होतं. फडके त्या काळातले आधुनिक महाराष्ट्राचे फार मोठे अभ्यासक. मी त्या विषयात फारसा प्रसिद्ध नसलेला. संतसाहित्याचा अभ्यासक म्हणून थोडंफार नाव होतं, नाही असं नाही.
पण फडकेंनी माझा लेख वाचला. तो त्यांना खूप आवडला. फडकेंकडे महाराष्ट्राच्या इतिहासाची अद्ययावत साधनं होती. माझ्याकडे तसं काहीच नव्हतं. पण मी मधल्या जागा कल्पनेने भरून काढल्या होत्या. त्यामुळे फडकेंनी मला बोलावलं. फडके त्या वेळेला पुणे विद्यापीठात पोलिटिकल सायन्सला होते. आमच्या गप्पा झाल्या. आणि चांगली मैत्रीही झाली.
फडके त्यावेळी आधुनिक महाराष्ट्राचा इतिहासाचा एक प्रोजेक्ट करत होते. त्यात राजेंद्र व्होरा, यशवंत सुमंत, सुहास पळशीकर अशी सगळी राज्यशास्त्राची मंडळी होती. मी तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक. तरीही मला बोलावलं. ते मला बरं वाटलं. त्यात फडकेंचं कॉम्प्लिमेंट, तुमचं वाचन सखोल आणि चौफेर आहे. अरे म्हटलं, असं आहे का?मी त्यांना होकार दिला. सगळ्यांनी मिळून करायचा प्रोजेक्ट काही झाला नाही. अर्थात फडकेंनी तो पुढे आपल्या पद्धतीने एकहाती पूर्ण केला.
पण माझा आधुनिक महाराष्ट्राचा अभ्यास सुरू होता. आधुनिक महाराष्ट्रावरचा संत साहित्याचा प्रभाव हा माझा कुतुहलाचा विषय होता. त्यातनं मी `तुकाराम दर्शन` लिहिलं. तुकाराम दर्शनची पार्श्वभूमी आधुनिक महाराष्ट्रच आहे. एका अर्थाने आधुनिक महाराष्ट्राचा एका विशिष्ट दृष्टिकोनातून लिहिलेला तो इतिहासच आहे.
`तुकाराम दर्शन` संपता संपता मला एक गोष्ट जाणवली. १९२० साली लोकमान्य टिळक वारले. महात्मा गांधींचं आगमन झालं. टिळकांच्या ज्या अनुयायांना गांधीजी पटत नव्हते, त्यांनी गांधींना विरोध केला, तो कोणत्या ग्राऊंडवर केला?त्या विरोधाची पायाभरणी इतिहासाचार्य वि.का. राजवाडेंनी तुकाराम विरुद्ध रामदास या वादाने केली होती. तुकोबा आणि त्यांचा वारकरी संप्रदाय हा नेभळट, निवृत्तीवादी आहे वगैरे. त्यांच्यामुळे स्वराज्य गेलं. आणि रामदास म्हणजे प्रवृत्तीवादी, लढाऊ वगैरे.
त्याच प्रभावातले पत्रकार, वकील `भाला`कार भोपटकर यांचंएक विधान वाचनात आलं,`टिळक म्हणजे रामदास आहेत आणि तुकाराम टाळपिट्या तुकाराम आहे.` ते वाचलं आणि मी उडालोच. म्हटलं, अशी भानगड आहे का?`तुकाराम दर्शन` इथे संपत नाही. ते इथपर्यंत जातं. इतिहासाचार्य राजवाडेवगैरे मंडळींनी रामदास विरुद्ध तुकाराम असं द्वंद्व मांडलं होचं. ते द्वंद्व वेगळ्या अर्थाने गांधी-टिळक यामधेही सुरू राहिलं. हे मला तिथे स्ट्राईक झालं. तिथेच मी ठरवलं की आपण याच्यावरती स्वतंत्र काम करायला पाहिजे. एका अर्थाने `लोकमान्य ते महात्मा` हे `तुकाराम दर्शन`चं एक्स्टेंशन आहे.
त्यात मी नेतृत्वाच्या संक्रमणाचा मुद्दा मांडला. १९२०साली टिळकांकडून गांधींकडे महाराष्ट्राच्या नेतृत्वाचं संक्रमण झालं. त्याचा महाराष्ट्राच्या सगळ्याच क्षेत्रांवर परिणाम झाला. कपडेलत्ते, संगीत, साहित्य, नाटक, तमाशा. फिजिकल, आयड़ियॉलॉजिकल, सायकॉलॉजिकल अशा सगळ्या गोष्टी आल्या.
तुकोबांना केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्राचा इतिहास लिहिता येतो, हे मी `तुकाराम दर्शन`मधे मांडलं होतं. तसं आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास लिहिताना आपल्याला दोन केंद्र पकडावी लागतात, एक टिळक आणि दुसरे गांधीजी. तशा प्रकारे मी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाची द्विकेंद्री लंबवर्तुळाकार मांडणी केली.
श्रीकृष्ण आणि त्याचं तत्त्वज्ञान हा माझ्या पीएचडी आणि त्यानंतरच्या अभ्यासाचा विषय होता. ज्ञानेश्वरांनी गीतेचा मराठीत अर्थ सांगितला, तसाच टिळकांनी गीतारहस्य लिहून सांगितला. त्यामुळे त्यांच्यात साम्य काय, फरक काय, हा माझ्या कुतुहलाचा विषय होताच. त्याच दरम्यान `केसरी`चे लोक दरवर्षी गीतारहस्य जयंती साजरी करतात. त्यादिवशी कुणाचं तरी प्रवचनवजा व्याख्यान असतं. त्यात मीही एका वर्षी `गीतारहस्याची निर्मितीमीमांसा` असं व्याख्यान दिलं होतं. कृष्णाच्या मुळे या विषयात खोल गेलो होतो. या व्याख्यानामुळे मला अधिक खोलात जाता आलं. कृष्ण, टिळक आणि ज्ञानेश्वर माऊली असा तो अभ्यासाचा ट्रॅंगल होता.
त्याची आणखीही एक पार्श्वभूमी आहे. `तुकाराम दर्शन`च्या आधीच `जागृती`कार भगवंतराव पाळेकरांवरच्या प्रोजेक्टची सुरवात झाली. ते ब्राह्मणेतर चळवळीतले फार मोठे संपादक होते. त्यांच्या`जागृती`पत्राइतकी वर्षं दुसरं कुठलंच तोलामोलाचं ब्राह्मणेतर चळवळीतलं पत्रं चाललं नाही.`जागृती`कारांचा दृष्टिकोन फारच उच्च म्हणावा असा होता. संघर्षाच्या जागी संघर्ष करायला हवा. पण संघर्ष रोज नाही करायचा. योग्य त्या ठिकाणी आपल्याला समन्वयही करावा लागतो, अशी त्यांची भूमिका होती. ते अत्यंत सुसंस्कृतपणे लिहिणारे ते निष्पक्ष पत्रकार होते.
`जागृती` हे पत्र १९१७-१८ला सुरू झालं. ते स्वातंत्र्यानंतरही चाललं. हा ब्राह्मणेतर चळवळीचा महत्त्वाचा कालखंड होता. बाबा आढावांनी मला पाळेकरांच्या निवडक लेखांचं संपादन करायला सांगितलं होतं. त्यासाठी आम्ही बडोद्याहून `जागृती`च्या फायली आणल्या. त्यातले लेख निवडले. त्याचं `निवडक पाळेकर` म्हणून संपादन केलं. त्याला विस्तृत प्रस्तावनाही लिहिली.
ते करताना त्यात या काळातल्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्या होत्या. टिळकांचे अनुयायी कोण आणि गांधींचे अनुयायी कोण. ब्राह्मणेतर चळवळीतल्या पुढाऱ्यांचा गांधींकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलत गेला. ब्राह्मणेतर अगोदर गांधींच्या बाजूने होते. त्यांना गांधीजींविषयी आदर, सहानुभूती होता, कारण त्यांना ते आपल्यापैकी वाटत. पण टिळकांकडून गांधींकडे महाराष्ट्राचं नेतृत्व गेलं तेव्हा हे लोक प्रत्यक्ष चळवळीत नव्हते. टिळक ते गांधी या संक्रमणकाळातला संघर्ष हा ब्राह्मणाब्राह्मणांमधला संघर्ष होता. प्रामुख्याने टिळकांच्याच अनुयायांमधला आपापसातला संघर्ष होता. अर्थात विनोबा भावे, शंकरराव देव यांच्यासारखे काही नवे तरुणही गांधींकडे आले होते.
तेव्हा ब्राह्मणेतर चळवळ या संघर्षापासून अलिप्त होती. कारण त्यांचं लक्ष ब्राह्मणी वर्चस्वामुळे ब्राह्मणेतरांचा झालेला बॅकलॉग भरून काढण्याकडे होतं. त्यासाठी त्यांची ब्रिटिश सरकारची मदत घ्यायलाही हरकत नव्हती. हळूहळू त्यांच्याही हे लक्षात आलं की ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद हा अंतर्गत वाद आहे. आपला खरा शत्रू इंग्रज साम्राज्य आहे. तो आपल्याला झुलवत ठेवतो आणि आपला उपयोग करून घेतो. हे कळण्याची प्रक्रिया काही सोपी नव्हती. त्यासाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंनी प्रयत्न केले. त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीतले बिनीचे लोक म्हणजे जेधे - जवळकर हे हळूहळू गांधींकडे म्हणजे काँग्रेसकडे जाऊ लागले. त्यातून ब्राह्मणेतर चळवळीचा ऱ्हास सुरू झाला.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?
जगाच्या तुलनेत भारत कसा लढतोय कोरोनाशी?
साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं
एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?
कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?
डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?
शेतकरी, कामकऱ्यांची सत्ता येईल या व्यापक दृष्टीने ब्राह्मणेतर पुढाऱीकाँग्रेसमधे आले. आपण शेतकऱ्यांच्या, कामकऱ्यांच्या हितासाठी काँग्रेसला राबवू, असं त्यांना वाटत होतं. त्यासाठी एक अपेक्षा तर थेट सत्ता आपल्या हातात यावी अशी होती. १९३७ सालीही काँग्रेस जिंकली. त्यात ब्राह्मणेतरांचं योगदान होतं. पण प्रत्यक्षात मुख्यमंत्री,तेव्हा मुख्यप्रधान म्हणायचे,ते बाळासाहेब खेर झाले.१९४६-४७ साली परत खेर मंत्रिमंडळ आलं. अर्थात तेव्हा मुंबई प्रांत होता. महाराष्ट्र नव्हता. त्यामुळे गुजराती भांडवलदारांचं वर्चस्व होतं.
गुजराती बनिया आणि मराठी ब्राह्मण हे वर्गाच्या भाषेत बोलायचं तर भांडवलदारांचं वर्चस्व होतं. त्यातून शेतकऱ्यांना, कामकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी काही जणांनी शेतकरी कामगार पक्ष काढला. त्यात त्यांनी मार्क्स आणि फुले यांचा समन्वय करण्याचा प्रयत्न केला. पुढे ते शेतकरी कामगार पक्ष सोडून पुन्हा काँग्रेसमधे गेले. या सगळ्या झिगझॅग प्रवासाचं चित्र मला `जागृती`मधे दिसलं. हा प्रवास एका अर्थाने `लोकमान्य ते महात्मा` या बदलाचा अवशेष आहे. टिळक आणि गांधी या द्विकेंद्री मॉडेलचंच एक्स्टेंशन आहे.
पाळेकरांच्या संपादनामुळे मला ब्राह्मणेतर चळवळीच्या अभ्यासावर एकप्रकारची हुकुमत आली. ते करताना मी इतरही संदर्भ पाहत होतो. फडकेंची आणि आमची मैत्रीच होती. प्रभातकार वा.रा. कोठारींशीहीसंपर्क होता. `जागृती`च्याही आधी त्यांनी `जागरूक` काढलं होतं पुण्यात. ते ब्राह्मणेतर चळवळीतले पुण्यामधले पहिले खंदे कार्यकर्ते होते.
आमचे एक चुलते भागवतमहाराज देहूकर हे ब्राह्मणेतर चळवळीत होते. त्यांच्यासोबत जेधे मेन्शनवर जाणंयेणं असायचं. त्यामुळे हा इतिहास मला काही परका नव्हता. तो जणू माझ्या नेहमीच्या वावरातला आहे, असं वाटायचं. हे करताना महात्मा फुलेंचा अभ्यास झाला आपोआपच. फुल्यांसंबंधीची माझी वेगळी मांडणी आली. फुले आणि तुकोबांचा संबंध मी मांडला. माझं लेटेस्ट पुस्तक `विद्रोहाचे व्याकरण` हे महात्मा फुले यांचे वैचारिक चरित्रच आहे.
लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्यात काही अंतस्थ सूत्र होतं का? ही आता आपली अकॅडमिक लेवलवरची केवळ चर्चा असू शकते. पण हाच प्रश्न तेव्हा रोजच्या जगण्याचा भाग म्हणून लोकांना प्रत्यक्षात पडला होता. आणि तो सर्वच दृष्टीने कळीचा प्रश्न होता. वरकरणी टिळकांपेक्षा गांधीजींचा पवित्रा एकदम वेगळा वाटेल. पण प्रत्यक्षात त्यांचं एक आंतरिक ऐक्य आणि सुसंगती आहे. कंटिन्युटी आहे. त्यावेळेला निर्माण झालेला वाद हाच होता की गांधीजी टिळकांचं राजकारण पुढे नेत आहेत कीटिळकांचं राजकारण भरकटवत आहेत?ते टिळकांचे उत्तराधिकारी आहेत का?
काही लोकांना वाटलं की गांधीजी टिळकांची जागा घेऊ शकत नाहीत, म्हणून त्यांनी गांधीजींना विरोध केला. दुसऱ्या बाजूला काही टिळक अनुयायांना असं वाटलं की ते टिळकांचा वारसा पुढे नेत आहेत. मुंबईतल्या गिरगावात नाना अभ्यंकर म्हणून एक कार्यकर्ते होते. ब्राह्मणसभेतल्या एका सभासदाने त्यांना विचारलं की तुम्ही तर गांधीवादी दिसताय. त्यावर ते म्हणाले, मी गांधीवादीच आहे, पण मी टिळकवादी आहे म्हणून मी गांधीवादी आहे. नाना अभ्यंकरांची एक कादंबरीच आहे या कंटिन्युटीवरची. त्यांनी केलेला संघर्ष, सहन केलेली अवहेलना, टिंगलटवाळी असं सगळं आहे त्यात.
टिळक आणि गांधी यांच्यातल्या कंटिन्युटीचं सूत्र काय आहे, हे मी एका शेरमधून मांडलंय. अर्ज हैं,
मत्ल`अ है `गर तिलक गज़ल-ए- आज़ादीके
तो यकिनन मक्त`अ हैं महात्मा।
क़ादिर अंदाज थे वे भी जिन्होने
क़ाफिया तंग किया दुश्मन का दरमियां।
याचा अर्थ असा, स्वातंत्र्याच्या गझलेचा मतला म्हणजे धृवपद टिळक असतील, तर गांधी हे नक्कीच मक्ता म्हणजे शायराची नाममुद्रा आहेत. या दोघांच्या दरम्यान झालेले इतर स्वातंत्र्यसैनिकही महत्त्वाचेच होते. त्यांनी शत्रूचा `काफिया तंग` केला. म्हणजे शत्रूला सळो की पळो केलं. पण गझलेत काफिया म्हणजे यमक. हे सगळे नेमक्या यमकासारखे शोभून दिसले, असाही त्याचा अर्थ होतो.
टिळक आणि गांधी हे दोघेही कट्टर देशभक्त, हे मान्यच करावं लागेल. अर्थात टिळकांच्या काही अनुयायांनी गांधीजींच्या देशभक्तीबद्दल संशय घेतलाय. पण त्यांना टिळकांचे अनुयायी कितपत म्हणायचं, हे माहीत नाही. कारण त्यांना टिळकांच्याच बऱ्याचशा गोष्टी मान्य नव्हत्या. टिळकांनी केलेला लखनौ करार, मंडालेतून सुटून आल्यानंतर काँग्रेसमधे जाणं, प्रखर हिंदुत्ववादी न घेणं, त्यांना मान्य नव्हतं. पण एरव्ही ते टिळकांशी जोडलेले होते.
त्या काळात अफगाणिस्तानच्या आमिराने हिंदुस्थानावर हल्ला करायचा वाद सुरू होता, त्याला गांधीजींनीच निमंत्रित केलंय. गांधी हे फितूर आहेत. जयचंद आहेत. अशी मांडणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर करत होते. काही लोकांनी त्यालाच जोडून असंही म्हटलं की गांधीजी हे ब्रिटिशांचेच हेर आहेत. ते टिळकांची चळवळ मारायला पुढे आलेत. ते ब्राह्मणांच्या मुळावरच चाललेल. वगैरे.
पण आज मागे वळून पाहताना काय दिसतं की आमिराला बोलावण्यात टिळकांचाही हात होता. फक्त टिळक ते प्रकरण रंगात यायच्या आत गेले. पण टिळकांनी आमिराला पुणेकरांच्या वतीने मानपत्र देण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे ब्रिटिश सरकारने त्याला मुंबईत मुक्काम करू दिला नाही. तरीही आमिराची गाडी खडकी स्टेशनवर काही काळ थांबली असताना तिथे मानपत्र द्यायची व्यवस्था टिळकांनी केली
याच लोकांनी पुढे गांधीजींवर मुसलमानांचा अनुनय केल्याचा आरोपही केला. पण त्याची सुरुवात टिळकांनीच केली असं म्हणावं लागेल. तोही मुददा कट्टर हिंदुत्ववाद्यांनी मांडलेला आहे. लखनौ करार करताना टिळकांनी मुसलमानांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणाच्या तुलनेत जास्तच जागा दिल्या. टिळक हे मुसलमान विरोधी होते, हे अलीकडच्या काळात राजकारणी लोकांनी उठवलेली हूल आहे. असं तेव्हाच्या मुसलमानांचं मत नाही.
हेही वाचा : बसवण्णा आणि गांधीजींची तीन माकडं
मुसलमानांचे त्या काळातले मुख्य पुढारी शौकत अली, महंमद अली, मौलाना हसरत मोहानी आणि स्वतः बॅरिस्टर जिना हे सगळे टिळकांना जवळजवळ गुरू मानायचे राजकारणातले. आपण त्याला ज्येष्ठ सहकारी म्हणुया. जिनांनी टिळकांच्या बरोबर होमरूल चळवळीत काम केलंय. शौकत अली त्यांना गुरूच मानायचे. हसरत मोहानींनी टिळक गेल्यावर अप्रतिम असं शोकगीत उर्दूत लिहिलं. टिळक हे पूर्णपणे राष्ट्रवादी होते. ते कोणत्याही एका समाजगटाचे असण्याचं कारण नाही. त्यांना बदललेल्या जगाची कल्पना आली होती. ते प्रॅक्टिकल होते.
अर्थातच गांधीजीही प्रॅक्टिकल होते. पण ते वाटायचे नाहीत. गांधीजींना कोणतंही आंदोलन कधी थांबवायचं ते कळायचं. म्हणजे दत्ता सामंतांना गिरणी संप कधी थांबवायचा ते कळलं नाही. ते प्रॅक्टिकल नव्हतं. गांधीजी त्याबाबतीत परफेक्ट होते. चळवळ हाताबाहेर जाऊ लागलीय, पुरेसं यश मिळत नाही, तर ते लगेच थांबवायचे. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगेंनी असं म्हटलंय की चळवळ कशी सुरू करायची हे मी टिळक किंवा लेनिन यांच्याकडून शिकलो आणि चळवळ कुठे थांबवायची हे गांधींकडून शिकलो.
या दोघांत भेद कुठे होता ते सांगतो तुम्हाला सांगतो. आणि तो दोघांनाही मान्य होता. टिळकांनी हिंदूची व्याख्या केली होती. त्यातला एक मुद्दा होता की `साधनानाम् अनेकता`. हिंदूबद्दल म्हणणं होतं तेच त्यांचं राजकारणाबद्दल म्हणणं होतं. हिंदूंमधे भक्ती, कर्म, ज्ञान, योग असे वेगवेगळे मार्ग आहेत. तसंच राजकारणाचंही आहे.
ते स्वातंत्र्याला राजकीय मोक्ष म्हणायचे. त्यासाठी कोणतं साधन वापरायचं? तर साधनानाम् अनेकता. प्रत्येकाच्या मार्गात आपापल्या रूचिप्रमाणे, कुवतीप्रमाणे, परिस्थितीच्या वाचनाप्रमाणे फरक पडेल. म्हणून एकाने दुसऱ्याला बाद ठरवायचं कारण नाही, असं टिळकांचं म्हणणं होतं. यातलं कोणतंही साधन योग्य नसेल पण साध्य चांगलं असेल नैतिक दृष्टिकोनातून तर ते साधन चांगलंच होतं. पदरी पडलं आणि पवित्र झालं. त्यानुसार हिंसा ही वाईटच आहे पण ती स्वराज्याच्या कारणासाठी केली तर ती त्यांच्यासाठी पवित्र होती.
पण गांधीजींनी काय केलं, साधनशुचिता मानली. ते म्हणाले, स्वराज्य उशिरा मिळालं तरी चालेल पण ते हिंसक मार्गाने नको. साधनं नैतिक नसतील तर साध्यपण कलुषित होतं. हा दोघांच्यात फरक आहे. बाकी काही फरक नाही. गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गाने स्वराज्य मिळत असेल तर टिळकांची काहीच हरकत नव्हती. टिळकही हिंसेला घेऊन चालणारे नव्हते. पण ते करणाऱ्यांना त्यांनी मदत केली. अर्थात गांधीजींनी त्यांना टिळकांसारखी बॉम्ब वगैरे आणायला मदत केली नाही. पण क्रांतिकारकांची शिक्षा कमी करायला मदत केलीच ना.
गांधींजींना क्रांतिकारकांनी केलेला त्याग, त्यांनी सहन केलेले क्लेश यांच्याबद्दल आदरच होता. सावरकरांची अंदमानातून सुटका व्हावी, म्हणून गांधीजींनी अनेकवेळा लिखाण केलंय. काँग्रेसमधून ठराव आणलेले आहेत. फक्त गांधीजींचं म्हणणं होतं की हिंसेतून हिंसाच होते. आपण स्वातंत्र्यानंतरही त्याच मार्गाने जाऊ, असं इतिहास सांगतो. म्हणून आम्हाला ते नकोय.
प्रबोधनकार ठाकरे यांनी एका ठिकाणी म्हटलंच आहे की मंडालेपूर्व टिळक वेगळे होते आणि मंडालेनंतरचे टिळक वेगळे होते. त्यापुढे जाऊन मी असं म्हणेन इंग्लंडला जाण्यापूर्वीचे टिळक वेगळे आणि इंग्लंडवरून आल्यानंतरचे टिळक वेगळे. १९१४ ते २० या काळात टिळक इंग्लंडला जाऊन आले. तिथे त्यांना आंतरराष्ट्रीय राजकारण, कम्युनिस्ट चळवळ, मजूर पक्षाचं राजकारण, साम्राज्यशाहीचं राजकारण पाहायला मिळालं, नवीन साम्यवादी तत्त्वज्ञान जागतिक पातळीवर श्रमिकांच्या माध्यमातून कसं पसरतंय, हे ही त्यांनी अनुभवलं. त्यामुळे टिळक तिकडे कलले.
त्यामुळे काही लोकांचं असं म्हणणं आहे की टिळक अधिक जगते तर ते कम्युनिस्ट झाले असते. म्हणून तर कॉम्रेड डांगेंना भारतात कम्युनिस्ट चळवळ सुरू करताना टिळकांकडून प्रेरणा घ्यावीशी वाटली. ऑल इंडिया ट्रेड यूनियन काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष टिळक होणार होते. टिळकांचा कामगार चळवळीला पाठिंबाच होता. मंडालेच्या अगोदरही कामगारांना टिळक आपलेच वाटत होते. म्हणून टिळकांना सहा वर्षांची शिक्षा झाली तेव्हा मुंबईतल्या गिरणी कामगारांनी सहा दिवस हरताळ केला. तेव्हा मुंबईत इतक्या दंगली झाल्या की सरकारला लष्कर बोलवावं लागलं. गोळीबारात लोक मेले. त्या कामगारांना चिथावणारा टिळक पक्षाचा कुणी नेता नव्हता. ते उत्स्फूर्तपणे झालं होतं.
टिळकांना त्यांच्या या व्यापक दृष्टिकोनाला प्रॅक्टिकॅलिटीमुळे कधीकधी मुरड घालावी लागली. त्याला त्यांचा नाईलाज नव्हता. पण तो व्यापक दृष्टिकोन त्यांच्या अनुयायांमधे नव्हता. म्हणून पुढचे प्रॉब्लेम आले. संगती संगदोष म्हणतो त्याप्रमाणे अनुयायांचे अवगुण लोक त्यांच्यावरच प्रोजेक्ट करायला लागले. हे प्रतिगामी आहेत म्हणून यांचे गुरूही प्रतिगामीच असणार. असं नसतं लक्षात घ्या. टिळकांना प्रतिगामी शिष्य सांभाळणं भाग पडलं. त्याच्याशिवाय स्वराज्याची चळवळ पुढे जाणार नव्हती. त्यामुळेआपल्याला हे समजून घेतलं पाहिजे,की टिळकांच्या निर्णयांमधला परिस्थितीचा कोणता, दडपणाचा कोणता, त्यांचा स्वतःचा कोणता? त्यानंतर त्यांच्यावर आरोप करावेत.
गांधीजी हे टिळकांच्या पुढे गेले होते. १९२० साली टिळकांनी स्वातंत्र्य चळवळीत समाज जिथपर्यंत आणून ठेवला होता, गांधीजींनी त्याच्या पुढे नेला. टिळकांच्या आधी परिस्थिती काय होती. रानडे, गोखले यांचं राजकारण दिवाणखान्यापुरतं होतं. ड्रॉइंग रूममधलं. मोठमोठ्या लोकांच्या दिवाणखान्यात परिषदा भरायच्या. टिळकांनी ते रस्त्यावर आणलं, हे तर मान्यच करावं लागेल. म्हणून नेमस्त पुढारी त्यांना तेल्या तांबोळ्यांचे नेते म्हणाले. त्यांच्या अनुयायांना ब्रूट फोर्स म्हणजे पाशवी सेना म्हणाले. हे आपल्या लीडरशीपमधलं प्रोग्रेशन होतं. टिळक परिस्थितीचा फीडबॅक घेऊन बदलायची गरज असेल तिथे बदलत होते. ती क्षमता त्यांच्यामधे होती. ती गांधींमधेही होती.
`लोकमान्य ते महात्मा` लिहिल्यानंतर मला असं वाटलं की आपण टिळकांचं स्वतंत्र चरित्रच लिहायला हवं. चरित्र मुद्दामून लिहिण्याचं कारण थोडं वेगळं होतं. लोकमान्यांचा लढा हा स्वातंत्र्यासाठी होता. १९४७ साली आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मिळालं. त्यामुळे त्या लढ्याचं प्रयोजन संपलं. दुसरा प्रश्न सामाजिक समतेचा किंवा न्यायाचा होता, तो अजून संपलेला नाही. तो चालूच आहे. त्यामुळे त्या काळात सामाजिक काम करणाऱ्यांबद्दल आत्ताच्या लोकांना आदर वाटतो. कारण तो प्रश्न अजून जिवंत आहेत. मग ते फुले, शाहू, आंबेडकर असतील किंवा आगरकर असतील. पण स्वातंत्र्याच्या प्रश्न मिटल्याने आपण त्याच्यासाठी लढलेल्यांकडे त्या तीव्रतेने बघत नाही. आज त्यांचं उपयुक्तता मूल्यं संपलंय. त्यामुळे टिळकांचं काम समजून न घेता त्यांच्यावर टीका करताना कुणाला काही वाटत नाही.
धनंजय कीर यांनी टिळकांचं चरित्र लिहिलंय. त्यांनीच फुले, शाहू आणि आंबेडकरांचंही चरित्र लिहिलंय. त्या तिघांचा डिस्कोर्स अजून सुरू आहे. तो वाढतोय. टिळकांचं काय झालं सांगा पुढे? टिळकांचं चरित्र कोणी लिहिलंय का कीर यांच्यानंतर? त्यामुळे एकाच दृष्टिकोनातून मांडणी होत असल्यामुळे टिळकांवर अन्याय होण्याची शक्यता वाढते. मी काही टिळकांचा वकील नाही. पण एक अभ्यासक म्हणून ते त्याचा तटस्थ परिणाम मला जाणवतो.
टिळकांचा खुंटलेला डिस्कोर्स मी नव्याने सुरू केलाय. का केला? तर स्वातंत्र्य लढ्यातलं त्यांचं काम महत्त्वाचं आहे. भले ते स्वातंत्र्य मिळाल्यामुळे एका अर्थाने इतिहासजमा झालंय. फुलेंच्या संदर्भातही मी माझं योगदान दिलंय. पण दर पिढीगणिक आपल्या महापुरुषांची चरित्रं परत लिहिली गेली पाहिजेत. नव्या पिढीची भाषा बदललेली असती. प्रश्न बदलेलेले असतात, जगाकडे बघण्याची दृष्टी बघतलेली असते. पूर्वी समाज गतिमान नसताना हे बदल कमी व्हायचे. आता मात्र बदलाचं प्रमाण वाढलंय.
त्यामुळे येणाऱ्या नव्या पिढीच्या भाषेत, त्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात, त्यांच्या परिस्थितीच्या वाचनाच्या आधारे, आपणाला महापुरुषांची चरित्र पुन्हा पुन्हा लिहावी लागतील. नाहीतर महापुरुष हे इतिहासजमा होतील. ते फॉसिलाइज होतील. एखादा मृत प्राण्याचे अवशेष पोटात दडल्यानंतर त्याच्याभोवती काय काय जमा होतं. त्याचं फॉसिल म्हणजे जीवाश्म होतं. तसं आपल्याला महापुरुषांच्या बाबतीत होऊ द्यायला नको.
त्यामुळे मी टिळकांचं चरित्र लिहिलं. गांधीजींचं का लिहावंसं वाटलं नाही? कारण खूप लोक आहेत त्यासाठी. गांधी हे अलीकडच्या काळातलं चलनी नाणं झालंय. एकेकाळी महाराष्ट्रात टिळक चलनी नाणं होतं.लोकांनी ते त्यावेळेला एक्स्प्लॉइट केलं. मला त्या ट्रॅपमधे जायचं नाही. मी पुण्याच्या गंधर्ववेद प्रकाशनासाठी एक थोडक्यात आणि नंतर सविस्तर अशी दोन टिळकचरित्रं लिहिली. त्यात `कर्मयोगी लोकमान्य` हे साडेचारशे पानांचं चरित्र आहे. त्यातल्या लहान चरित्राची आवृत्ती आता `सकाळ प्रकाशन`ने काढलीय. ती सर्वत्र उपलब्ध आहे.
हेही वाचा :
किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी?
तू देवमाणूस आहेस, की खराखुरा देवच?
संत तुकाराम, महात्मा गांधी आणि कोरोनाची साथ
बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती तीनवेळा का जाळली?
गांधीजींनी न लिहिलेली ही दोन भजनं गांधींच्या नावानं ओळखली जातात