कोरोनाला रोखण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू असताना आखाती देशातून नवं संकट आलंय. काही आचरट लोकांच्या मुस्लिमद्वेष्ट्या ट्विटमुळे भारताची कोंडी झालीय. तिथल्या सरकारनं धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय. यातून मार्ग काढण्यासाठी खुद्द पंतप्रधानांना ट्विट करावं लागलंय. या साऱ्याचा पंचनामा करणारा चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांचा ताज्या चित्रलेखातला लेख.
सुलतान जर यथास्थित असेल, तर अस्मानी संकटावर मात करता येते. अन्यथा जनतेवर वा एकूण मानव जातीवर आलेले संकट हे अस्मानी आणि सुलतानीही होते. याचा सर्वात मोठा धडा चौदाव्या शतकात 'प्लेग'च्या साथीच्या वेळी जगाने अनुभवला. तेव्हा केवळ युरोपातच अडीच कोटीपेक्षा जास्त लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. हा संदर्भ आज देण्याचं कारण भारत, अमेरिका आणि ब्राझीलचं नेतृत्व आहे. या तीन देशांत मिळून १९१ कोटी लोकसंख्या आहे. पण या तिन्ही देशांचे प्रमुख हे 'कोरोना महामारी'चे संकट 'सुलतानी आणि अस्मानी'ही बनवायला निघालेत.
दिव्य दृष्टीच्या नरेंद्र मोदी यांना 'हा आजार भारतात येणारच नाही,' याची खात्री २० मार्चपर्यंत होती आणि त्यांनी २२ मार्चला देशव्यापी 'लॉकडाऊन' जारी केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फेब्रुवारी महिन्यात भारतात येऊन गेले. ते अमेरिकेत परतेपर्यंत त्यांच्यासाठी 'कोविड १९' हा फक्त आणि फक्त 'चायनीज वायरस' होता. त्यांनी या आजारावर ‘कीटकनाशक टोचून काही इलाज करता येतो का?’ किंवा ‘कोरोना'बाधित व्यक्तीला कीटकनाशक पाजून हा वायरस आतल्या आत मारता येईल का?’ याची शक्यता आजमावण्याचा सल्ला त्यांचे वैद्यकीय सल्लागार डेबोरा बर्क्स यांना दिला होता.
ब्राझीलचे अध्यक्ष बोत्सेनारो यांनी तर राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात, 'कोरोना'ची संभावना 'एक साधारण ताप-थंडी' अशी केली. आज अमेरिका जात्यातून भरडून बाहेर पडत आहे. ब्राझील जात्याच्या घासात प्रवेश करत आहे. तर भारत सुपात आहे. आणखी काही महिने आपल्याला या संकटाला सामोरं जायचंय. पण संकटाचे परिणाम भारताला कुठे नेऊन ठेवणार याची झलक अमेरिका, ब्राझील आणि भारताचे नेतृत्व आणि त्यांचे भक्त दाखवत आहेत.
'कोरोना'च्या परिणाम स्वरूप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष नुकतेच म्हणाले, 'एका अदृश्य शत्रूच्या हल्ल्याच्या कारणामुळे आणि अमेरिकेच्या नागरिकांच्या हिताचा विचार करून, मी एका महत्त्वाच्या प्रस्तावावर लवकरच सही करणार आहे. हा प्रस्ताव 'इमिग्रेशन' या विषयाशी संबंधित आहे किंवा असेल. या प्रस्तावानुसार, 'इमिग्रेशन' अनिश्चित काळासाठी स्थगित केले जाऊ शकते.'
हेही वाचा : नेशन वॉन्ट्स टू नो अर्नब, ये जबां किसकी हैं?
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला हा विचार एका 'ट्विट'द्वारे व्यक्त करताच 'सिलिकॉन वॅली'तल्या 'चिन्मय-तन्मय'च्या पोटात भीतीचा गोळा आलाय. ते अधिक चिंताग्रस्त झाले तर, त्यांचे पार्ले-पुण्यातले आई-बाबा पण हातपाय गाळतील. अशी हवा असतानाच ट्रम्प यांनी आपल्या अधिकारात अन्य देशांतून अमेरिकेत येणाऱ्या प्रवासी, नोकरदारांना तात्पुरती का होईना बंदी घातलीसुद्धा!
ट्रम्प हे त्यांच्या देशातील नागरिकांच्या हिताच्या या प्रस्तावावर सही करत असताना आणि त्याचा भारतावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असताना; आपल्या देशातली भक्त मंडळीसुद्धा उर्वरित देशातल्या अनिवासी भारतीयांच्या गळ्याला फास लावण्यात प्रयत्नांची कोणतीही कसर सोडत नव्हते.
दिल्लीत 'तबलीगीं'नी आयोजित केलेला कार्यक्रम आणि त्या कारणामुळे कमी-अधिक प्रमाणात झालेला 'कोरोना'चा प्रसार आणि त्यासंबंधातील प्रचार सर्वज्ञात आहे. तोपर्यंत धर्म-जातविहीन असणारा 'कोरोना' मरकज-तबलीगींमुळे 'इस्लामी' झाला. काहींच्या 'फेक न्यूज'मुळे तो 'जिहादी'ही झाला. त्या प्रकरणापासून सुरू झालेला प्रचार 'मुसलमान दुकानदारांकडून काहीही माल खरेदी करू नका,' इथपर्यंत पोचला. 'कोरोना'च्या निमित्ताने काही संस्था-संघटनांना आपला मुस्लिमद्वेष टोकाच्या पातळीवर पुढे न्यायचा होता.
भारतातल्या अत्यंत जातीयवादी विचारसरणीच्या लोकांचा हा 'अजेंडा' पाहता पाहता अनिवासी भारतीयांच्या अभिव्यक्तीचा विषय बनला. सौरभ उपाध्याय याचा अरब अमिरातीत मोठा व्यवसाय आहे. त्याचे सर्वस्व अरब देशात आणि अरब देशांवर अवलंबून आहे. त्याने तिथे बसून आपल्या 'ट्विटर अकाउंट'च्या उंटावरून भारतातल्या शेळ्या हाकायला सुरवात केली. त्याचे म्हणणे असे की, 'कुणी हिंदू कुठल्याही आश्रमाचे समर्थन करत नाहीत. तेव्हा तुम्ही मुस्लिमांनीही तबलीगींचा कैवार घेऊ नका. काय उखडायचे ते उखडा.'
अशी 'टीव-टीव' करणारा सौरभ काही एकटाच नाही. आखाती देशातील अनेक भक्त 'सोशल मीडिया'वर सुसाट सुटले होते. त्यांच्या या आगलाव्या उचापतींवर सौदीच्या राजकुमारीने जोरदार आक्षेप घेत, 'तुमच्यासारखे लोक विद्वेष वाढवत आहेत. तुम्ही शिक्षेच्या वाटेवरून या देशाच्या बाहेर जाण्याच्या अवस्थेपर्यंत आला आहात,' असे सुनावले. त्याच वेळी इतर आखाती देशांतील जबाबदार व्यक्तींनी वेगवेगळ्या संदर्भात प्रधानमंत्री मोदी यांना 'ट्वीट-रिट्वीट' केले.
त्यानंतर मोदीजी जागे झाले आणि त्यांनी एक 'धर्मनिरपेक्ष ट्वीट' केले. त्यात त्यांनी भक्तांना सांगितले, 'कोरोना'ला जाती विशेष आणि धर्मसापेक्ष करू नका.' पण तोपर्यंत वातावरण जास्तच तापलं होतं. इक्बाल नावाच्या एका कार्यकर्त्याने 'भारतीय जनता पक्षा'चे बेंगळुरूचे खासदार तेजस्वी सूर्या यांचं एक ट्वीट रिट्वीट केलं. त्यातून भारतातले लोक प्रतिनिधिक स्वरूपात सौदी वा इतर आखाती देशांतल्या लोकांबद्दल काय विचार करतात, ते त्याने 'एक्सपोज' केलं.
तारीक फतेह या कॅनडावासी पत्रकाराच्या सौदीमधील लोकशाहीबाबतच्या विचारांवर प्रतिक्रिया देताना खासदार सूर्या यांनी लिहिलं, 'अरब देशातल्या महिलांनी शेकडो वर्षांत समागमाच्या दरम्यान कामतृप्तीचा अनुभवच घेतलेला नसेल. अशा महिलांची संख्या ९५ टक्क्यांच्या आसपास असावी. ज्या बायांना मुले झाली असतील, जी केवळ शारीरिक संबंधातून, प्रेमळ सहवासातून नक्कीच नाही.'
हे कोरोना स्पेशलही वाचा :
ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?
साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?
कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?
एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?
कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!
सूर्या यांचं हे 'ट्वीट' २०१५ मधलं आहे. पण आताच्या संदर्भात उपयुक्त म्हणून इक्बाल यांनी ते उकरून काढलं. त्यामुळे आखाती देशातली बहुतेक भक्तमंडळी तिथल्या पोलिसांच्या 'रडार'वर आलीत. ज्या मध्यपूर्व देशातून नोकरी व्यवसायाच्या कारणाने मोठे उत्पन्न मिळते, त्याच देशाच्या संवेदनांना ओरखडण्याचे काम तिथे होत असेल, तर गप्प कोण बसेल?
भारतात गेली ६ वर्ष कुणी उदारमतवादी हिंदू किंवा विवेकवादी अल्पसंख्य 'मोदी सरकार'च्या विरोधात काही बोलला, तर 'जा तिकडे पाकिस्तानला,' असं बोलणं सहजसोपं झालंय. आता कट्टरतावादाला, त्याचे प्रतीक बनलेल्या सौरभ उपाध्यायला दुबईतला आपला धंदापाणी बंद करण्याची वेळ आलीय. त्याचे 'ट्विटर आणि फेसबुक' बंद आहेच. पण शिक्षा भोगून, (तिथे असला आचरटपणा गुन्हा आहे) नादार होऊन त्याला भारतात परतावं लागल्यास त्याला पक्ष प्रेम आणि मोदीभक्ती भलतीच महाग पडली म्हणायची!
सौदीच्या राजकुमारी प्रिन्सेस हेल अल कासिमी यांनी, भारतीय आणि जागतिक स्तरावरील 'इस्लामोफोबिया' विरुद्ध भूमिका घेतल्याने आखाती देशात एक जबरदस्त असा दबावच तयार झालाय. हेल अल कासिमी आग्रहाने बोलतात, 'माझ्या देशाच्या भूमीतून मी विद्वेष आणि हिंसा यांचा आधार असणाऱ्या विचारांचा प्रतिकार करणार!' यासाठी त्या महात्मा गांधी, अब्दुल कलाम यांची विधानं अवतरणात देत आहेत.
आखाती देशांतले पोलीस तिथल्या भक्तांचा शोध घेत आहेत. आपल्या राजदूतांना तिथली सरकारं सतर्क करत आहेत. लाखो 'अनिवासी भारतीय' प्रथमच भक्तांच्या या कर्तृत्वामुळे जातीयवादी, विद्वेषी असल्याचे मानले जाऊ लागलेत. भारतात परदेशातून १०० डॉलर येत असतील, तर त्यापैकी ५३ डॉलर्स हे आखाती देशांतल्या अनिवासी भारतीयांकडून येतात.
जगभरातील ४८ देशांत दोन कोटी 'अनिवासी भारतीय' नोकरीधंदा करतात. आपला 'मूळ भारतीय' वंशाचा माणूस आयर्लंड, मॉरिशस, फिजी या देशांत सर्वोच्च पदांपर्यंत पोचलाय. अनेक मोठ्या देशांत 'अनिवासी भारतीय' जबाबदारीच्या पदांचा भार वाहतात. तथापि, केंद्रात सत्ता मिळवण्यासाठी भारतात जे विद्वेषाचे विष सात वर्षांपूर्वी पेरलं, ते आता जगभरात उगवलेलं दिसतं. चार महिन्यांपूर्वी 'मोदी सरकार'ने सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या माध्यमातून जी भूमिका घेतली, तीच आता वेगळ्या स्वरूपात जगभर भारतीयांबद्दल घेतली जाईल, अशी परिस्थिती आहे.
अमेरिकेत 'एच–१बी विसा'मधे काम करणाऱ्यांना आता ६० दिवसांचा 'ले ऑफ' दिलाय. सध्याचं संकट आणखी गडद झालं तर, अमेरिकी अर्थव्यवस्था वाचावी आणि तिथल्या लोकांना रोजगार मिळावा यासाठी 'इमिग्रेशन' कायद्यात बदल होण्याची शक्यता निर्माण झालीय. तेव्हा 'चिन्मय- तन्मय'वर पुन्हा पार्ले - पुण्याला परतायची वेळ येऊ शकते.
भक्तमंडळी नाझीवादाच्या वाटेवरून परत फिरले नाही, तर आखाती देश आपल्या मुसक्या आवळू शकतात. 'इस्लाम'ची स्थापना होण्यापूर्वीपासून हिंदुस्थानचे अरब आणि आखाती देशांशी संबंध आहेत. ते अलीकडेच नामकरण झालेला 'सनातन धर्म'वाद्यांच्या अतिरेकी राष्ट्रवादामुळे बिघडल्यास भारत आर्थिक खाईत अडकू शकतो.
हेही वाचा : कोरोनानंतर दोन मोठी संकटं आपली वाट पाहतायत: नॉम चॉम्स्की
ब्राझीलचा तेलाचा व्यापार घटतोय. म्हणून ब्राझीलने 'इथेनॉल' ऐवजी साखर उत्पादनाकडे लक्ष दिल्यास आणि इतर कृषी उत्पादनं घेण्याकडे शेतकऱ्यांना उद्युक्त केल्यास; भारताच्या साखर आणि कृषी माल उत्पादनांची निर्यात कमालीची घटेल. त्यामुळे ग्रामीण भारताचं कंबरडे मोडू शकतं.
आर्थिक पातळीवरच्या दुबळ्या नेतृत्वाने आरोग्य समस्येबाबत हलगर्जीपणा केला, तर काय होतं याचं अमेरिका हे मूर्तिमंत उदाहरण आहे. भारत आणि भारतीय नेतृत्व अमेरिकेचे पुरस्कर्ते आहेत. त्यांनी आपल्यापुढे आर्थिक आणि आरोग्यविषयक संकट गडद केलंय. 'कोरोना'ग्रस्तांची हळूहळू वाढणारी संख्या काळजी वाढवणारी आहे.
'लॉकडाऊन'ने अनेक प्रश्न कुलूप बंद केलेत. पण किती दिवसांसाठी? गेल्या ३० वर्षांत वाडीवस्तीवरून गावात; गावातून तालुक्याच्या जिल्ह्याच्या गावात; तिथून महानगरात आणि महानगरातून प्रगत देशात आपण गेलो. भक्त, त्यांचे नेते, त्या नेत्यांचे 'बेस्ट फ्रेंड' डोनाल्ड ट्रम्प यांनी 'आपण उलटा तर प्रवास करणार नाही ना?' असं वातावरण गेल्या आठवड्यात नक्की गडद केलंय!
हेही वाचा :
कलयुगातल्या राक्षसांची ओळख करून देणारा 'असूर'
वाचकाचा लेख: माझ्या न्यूड मॉडेलिंगची खरीखुरी गोष्ट
लॉकडाऊनमधे पॉर्न पहातच आहात; तर त्याआधी हे वाचा
आज लेनिनचं भारताशी असलेलं नातं समजून घ्यावंच लागेल
किम जोंग उन गेले, तर उत्तर कोरियाचा वारसदार कोण होणार?
प्लेगला आटोक्यात आणण्यासाठी लोक शेतात राहायला गेले होते!
अर्णब सोनिया गांधींवर टीका करत होते, तेव्हा माझं काळीज रडत होतं
(ज्ञानेश महाराव हे चित्रलेखा साप्ताहिकाचे संपादक असून त्यांचा हा लेख चित्रलेखाच्या ४ मे २०२० च्या अंकात प्रसिद्ध झालाय.)