भारतीय महिला क्रिकेटला संक्रमणाची गरज आहे. पण ते घडवून आणायला बीसीसीआयकडे योजनाबद्ध कार्यक्रमाची आखणी असायला हवी. ज्या पद्धतीने युवा आणि पुरुषांच्या क्रिकेटसाठी नियोजित स्पर्धांचा हंगाम आहे, तसा महिला क्रिकेटसाठी असला पाहिजे. देशात गुणवत्तेला तोटा नाही; पण तोटा आहे तो गुणवत्ता शोधण्यासाठी लागणार्या सूत्रबद्ध कार्यक्रमाचा आणि दूरदृष्टीचा.
भारतीय महिला क्रिकेट टीमचा न्यूझीलंडमधल्या वर्ल्डकपचा प्रवास गेल्या रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत हरल्याने खंडित झाला. भारतीय महिला क्रिकेट टीमचा जागतिक पटलावरचा प्रवास बघितला, तर पहिल्यांदा नजरेत भरणारी कामगिरी होती ती २००५च्या वर्ल्डकपची. तेव्हा ऑस्ट्रेलियाकडून अंतिम सामना हरल्यामुळे आपण उपविजेते ठरलो. पण तेव्हापासून भारतीय महिला क्रिकेट टीमला आपण गंभीरतेने घ्यायला लागलो.
याचीच पुनरावृत्ती गेल्या म्हणजे २०१७च्या वर्ल्डकपमधे झाली. लॉर्ड्सवरचा अंतिम सामना आपण इंग्लंडकडून हरलो, तो मुख्यतः सामन्यात खेळण्याचं दडपण घेतल्यामुळे. पण या दोन उपविजेतेपदांमुळे भारतीय महिला टीम विश्वविजेता होण्याची स्वप्नं आपण बघायला लागलो. या स्वप्नांना तडा गेला तो शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याने.
उपांत्य फेरी गाठायच्या आधीच आपण स्पर्धेतून बाहेर फेकलो गेल्याचं दु:ख, निराशा आहेच; पण भावनांना दूर ठेवून आपण जर डोळसपणे आपल्या कामगिरीकडे बघितलं, तर भारतीय टीम, डावपेचात आणि एकूणच भारतीय महिला क्रिकेटच्या अंगणात बर्याच उणिवा सहजपणे दिसून येतात. वर्ल्डकप जिंकायच्या जवळ जाणं आणि वर्ल्डकप जिंकणं, यातलं अंतर या उणिवा दूर केल्याशिवाय कमी करता येणार नाहीत.
या पराभवाची कारणमीमांसा करायची झाली, तर सुरवात आपल्याला वर्ल्डकपच्या टीम निवडीपासून करावी लागेल. जेमिमा रॉड्रिग्ज, पूनम राऊत आणि शिखा पांडे यांसारख्या अत्यंत गुणवान खेळाडूंना टीममधे स्थान न मिळणं अनाकलनीय होतं. पूनम राऊतने तर २०१७च्या वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध ८६ धावांची खेळी करत भारताला जवळजवळ एकहाती वर्ल्डकप जिंकून दिला होता.
जेमिमा रॉड्रिग्जमधे सातत्याचा अभाव असल्याचा एक आरोप केला जातो. पण इंग्लंडच्या द हंड्रेड आणि ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमधला तिचा तडाखेबंद खेळ तिची गुणवत्ता दाखवायला पुरेसा होता. शिखा पांडेची बॉलिंग ही जमेची गोष्ट ठरली असती; पण भारतीय निवड समितीने अनुभव आणि नवोदित यांचा मिलाफ करण्याच्या प्रयत्नात टीम निवडण्यात गडबड केली, असंच म्हणावं लागेल.
कर्णधार मिथाली राज आणि झुलन गोस्वामी या महिला क्रिकेटमधल्या दिग्गज खेळाडू आहेत, पण दोघी आज अडतीस वर्षांच्या आहेत. भारतीय टीम आणि इतर टीम यांचा विचार केला, तर वर्ल्डकपची टीम निवड, सामन्यासाठी टीममधे केलेले बदल, बॉलिंगमधे वैविध्यतेची कमी आणि तंदुरुस्ती या चार प्रमुख घटकांवर भारतीय टीम फिकी पडली.
भारताने आपल्या बॅटिंगच्या फळीत या वर्ल्डकपदरम्यान वारंवार बदल केले. पहिल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शफाली शर्मा अपयशी ठरल्यावर पुढच्या तीन लढतींसाठी तिला वगळण्यात आलं. यामुळे दीप्ती शर्मा आणि मिताली राज यांना आपल्या बॅटिंगचे क्रम वारंवार बदलावे लागले. बॅटिंगचा क्रम अस्थिर असतो, तेव्हा तो टीमचा असमतोलपणा सहज दाखवून देतो. यामुळे बॅटिंगची जबाबदारी ही प्रामुख्याने स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांच्यावरच होती.
कर्णधार मिताली राजने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात धावा केल्या. पण तिचं वय आता रनिंग बिटवीन द विकेट्सच्या आड येत असल्याचं स्पष्टपणे जाणवत आहे. वास्तविकत:, बीसीसीआयने या वर्ल्डकपच्या आधी भारतीय महिला टीमचं इंग्लंड, ऑस्ट्रेलिया दौरे आयोजित केले होते. जेणेकरून कोरोना काळात सामन्यांचा सराव न मिळाल्याची उणीव भरून काढता येईल. या दौर्यानंतर बॅटिंगचा क्रम आणि बॉलिंगचे पर्याय हे पक्के ठरायला हवे होते.
हेही वाचा: जगातल्या सगळ्यात मोठ्या दुर्गुणाविरुद्ध क्रिकेटनं एका हत्यारासारखं काम केलं
पूनम यादवसारख्या टीमचा एकमेव लेगस्पिनरला आपण फक्त एका सामन्यात खेळवलं. बॉलिंगची प्रमुख मदार आपण निवृत्तीकडे झुकलेल्या झुलन गोस्वामींवर ठेवली होती. झुलन गोस्वामींची कारकिर्द जरी देदीप्यमान असली, तरी उतारवयात टीममधे असलेल्या कपिल देवचं जे आपण बघितलं, तेच आपण झुलन गोस्वामीबद्दल बघत आहोत. तिच्या बॉलिंगचा वेग, धार कमी झाल्याचं स्पष्ट दिसतं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या प्रमुख सामन्यात तर ती पूर्णपणे निष्प्रभ ठरली.
भारताच्या बॉलिंगमधे उठावदार आणि सातत्याने कामगिरी कुणी केली असेल, तर ती राजेश्वरी गायकवाड, स्नेहा राणा आणि पूजा वस्तरकर यांनी. न्यूझीलंडमधे आपल्याला जलदगती बॉलिंग आणि मुख्यत्वे स्विंग करू शकणार्या बॉलिंगची गरज असताना उत्तम आणि फसवा इन स्विंग बॉलिंग करू शकणार्या शिखा पांडेची उणीव नक्कीच जाणवली.
या बॉलिंगमधे वैविध्यतेच्या अभावाने आपण ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिकेच्या विरुद्ध पावणे तीनशे धावा करूनही प्रतिस्पर्ध्यांना रोखू शकलो नाही. भारताच्या या दोन्ही महत्त्वाच्या सामन्यांत आपल्याला कमीत कमी पंचवीस धावा कमी पडल्या. याचं कारण स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांच्यासारखा स्ट्राईक रेट ठेवत धावा करू शकणार्या खेळाडू आपल्याकडे नव्हत्या.
थोडक्यात सांगायचं, तर भारतीय महिला क्रिकेट टीमला आता मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांच्या पलीकडे बघायची वेळ आली आहे. या दोघींनी भारतीय महिला क्रिकेटला एका उंचीवर नेऊन ठेवलं, पण बहुतेक या वर्ल्डकपच्या पराभवानंतर या दोघी पायउतार होतील, असा अंदाज आहे.
आपल्या टीमच्या दोन सिनिअर खेळाडूंचे दोन गट होते आणि त्यामुळेही काही धुसफुस होती, अशा बातम्या होत्या. याबद्दल अधिकृत कधीच समजणार नाही, पण मिताली राजच्या संभाव्य निवृत्तीनंतर कदाचित वातावरण निवळेल.
हेही वाचा: आरसीबीचा विराट म्हणजे उथळ पाण्याला खळखळाट फार!
भारतीय टीमचा सर्व 'सेना' - म्हणजेच दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघांनी पराभव केला. क्रिकेटच्या दुनियेत मग ते पुरुषांचं असो किंवा महिलांचं, जोपर्यंत तुम्ही 'सेने'ला धूळ चारत नाही तोपर्यंत तुम्ही जागतिक अजिंक्यपदाचे दावेदार बनू शकत नाही, हे सत्य आहे. इथं तर आपण हे चारही सामने पराभूत झालो. या सेना - गटाला महत्त्व आहे, ते त्यांच्या व्यावसायिकतेमुळे आणि मुख्यतः फिटनेसमुळे.
ऑस्ट्रेलियाचे उदाहरण घेतलं, तर पहिली बॅटिंग असली तर ते तीनशे धावांचं उद्दिष्ट अगदी लीलया पार करू शकतात कारण त्यांच्या खेळाडूंकडे असलेली तंदुरुस्ती. उपांत्य सामन्यात तर त्यांनी वेस्ट इंडीज विरुद्ध ४५ षटकातच ३०५ धावा ठोकल्या. याउलट भारतीय टीमची एक वेस्ट इंडीजविरुद्धचा सामना सोडला, तर दमछाक होताना दिसली.
स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांच्या जोडीला मधल्या फळीत शेवटच्या षटकात धावांचा वेग वाढवू शकणारी पिंचहिटर आपल्याकडे नाही. ढिसाळ क्षेत्ररक्षण हेही तंदुरुस्तीशीच निगडित आहे.
या वर्ल्डकपमधल्या पराभवाच्या निमित्ताने भारतीय महिला क्रिकेटला संक्रमणाची गरज आहे, हे तर नक्की! पण, ते घडवून आणायला बीसीसीआयकडे योजनाबद्ध कार्यक्रमाची आखणी असायला हवी. ज्या पद्धतीने युवा आणि पुरुषांच्या क्रिकेटसाठी कुचबिहार ते रणजी करंडकासारख्या नियोजित स्पर्धांचा हंगाम आहे, तसा महिला क्रिकेटसाठी असला पाहिजे.
आपल्या देशात गुणवत्तेला तोटा नक्कीच नाही! पण तोटा आहे तो गुणवत्ता शोधण्यासाठी लागणार्या सूत्रबद्ध कार्यक्रमाचा आणि त्यासाठी लागणार्या दूरदृष्टीचा. आज आपण उपलब्ध असलेल्या डेटा आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून घेऊ शकतो. महिला क्रिकेटमधेही आज आपण छोट्या छोट्या गावांतून आलेल्या खेळाडू बघतो. त्यांच्या जिद्दीने त्यांना खडतर प्रवास करूनच इथपर्यंत मजल मारता आली.
महिला क्रिकेटरचा प्रवास हा स्थानिक असोसिएशनचा कॅम्प, राज्य, विभाग, अ टीम आणि भारतीय टीम या मार्गातून होत असला; तरी यात प्रत्येक टप्प्यावर स्पर्धा मर्यादित आहेत, त्याचप्रमाणे काही ठिकाणी तर नोंदणी करायला कॅम्पही नाही.
बीसीसीआय भारतीय महिला क्रिकेटबद्दल गंभीर असल्याचं गेल्या काही वर्षांतल्या प्रयत्नातून दिसलं आहे. पण जोपर्यंत महिला क्रिकेटची आर्थिक उलाढाल वाढत नाही, तोपर्यंत बीसीसीआय पूर्ण गंभीरतेने याकडे बघणार नाही. नुकतीच बीसीसीआयने पुढच्या वर्षीपासून महिला क्रिकेटसाठी आयपीएलची घोषणा केली आहे. आर्थिक उलाढालीचा हा श्रीगणेशा असायला हरकत नाही.
आज महिला क्रिकेट टीमला प्रायोजक आहे, खेळाडूंचे श्रेणीनुसार करार आहेत; पण पुरुषांच्या क्रिकेटच्या मानाने आर्थिक उलाढाल नगण्य आहे. जोपर्यंत महिला क्रिकेटमधे पैसा येणार नाही तोपर्यंत महिला क्रिकेटचा सर्वांगीण विकास हा खुंटलेलाच राहील.
हेही वाचा: कमीत कमी सोयीसुविधा, तरीही अपंगाच्या भारतीय क्रिकेट टीमचं मोठं यश
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटचा आढावा घेतला, तर ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड दरवर्षी १६-१८ खेळाडूंची निवड करून त्यांच्याशी करार करते. त्यांना एक वर्षाच्या त्यांच्या प्रशिक्षण कालावधीत कमीत कमी तीन कॅम्प त्यांच्यासाठी आयोजित केलेले असतात आणि याव्यतिरिक्त त्या खेळाडूंना त्यांच्या प्रातांत विशेष प्रशिक्षणाची सोय केली जाते.
मुख्य प्रशिक्षक हा त्या त्या प्रांतातल्या प्रशिक्षकाशी चर्चा करून प्रत्येक खेळाडूचा प्रशिक्षण कार्यक्रम ठरवतो. मुख्य प्रशिक्षक हा वेळोवेळी स्थानिक प्रशिक्षकाकडून या खेळाडूच्या प्रगतीचा आढावा घेत असतो. हा आढावा कधी प्रत्यक्ष भेटीतून, कधी प्रशिक्षण नोंदवहीतून, तर कधी दूरचित्रप्रणालीमार्फत होत असतो.
इथूनच पुढे या खेळडूंची अ टीममधे निवड होते आणि ते राष्ट्रीय टीममधे येतात. भारतीय आणि ऑस्ट्रेलियन टीमच्या खेळाडूंचा प्रवास बघितला, तर वरकरणी टप्पे तेच दिसत असले तरी गुणवत्ता हेरणं, प्रशिक्षण पद्धती आणि खेळाडूंचा सर्वांगीण विकास यातला फरक दिसून येतो.
भारतीय महिला क्रिकेट टीम आज नक्कीच नावारूपाला आलेला आहे. वनडे आणि ट्वेन्टी - २०मधे आयसीसी क्रमवारीत आपण चौथ्या स्थानावर आहोत. आयसीसीच्या खेळाडूंच्या क्रमवारीत बॅटिंग मिताली राज, स्मृती मानधना, बॉलिंग झुलन गोस्वामी; तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत दीप्ती शर्मा आणि झुलन गोस्वामी या पहिल्या दहा स्थानात आहेत.
पण यातून हेच अधोरेखित होतं ते भारतीय टीमला आता मिताली राज आणि झुलन गोस्वामींच्या नंतरचा भारतीय टीम बांधायला विशेष परिश्रम घ्यावे लागणार आहेत. विश्वविजेतेपदाला गवसणी घालायची असेल, तर योजनाबद्ध कार्यक्रमाशिवाय पर्याय नाही, हे आपण ऑस्ट्रेलियाकडून शिकायला हवं.
हेही वाचा:
कॉमेंट्रीटर असे अतिशहाण्यांसारखे का वागतात?
टीम इंडियाच्या पराभवाला भारतीय चाहतेही जबाबदार
स्वर्गातल्या वडलांना येस पप्पा म्हणणाऱ्या जॉनी बिअरस्टोची गोष्ट
(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)