सहसा तिशी ओलांडल्यानंतर अनेक खेळाडूंच्या शैली, शारीरिक आणि मानसिक क्षमता, चापल्य, लवचिकता वेग यात मर्यादा दिसू लागतात. पण केन विल्यमसन याने आपण अजूनही पूर्वी इतकंच प्रभावी कौशल्य दाखवू शकतो हे सातत्याने अलीकडच्या काळात सिद्ध केलंय. युवा खेळाडूंनी त्याच्याकडून प्रेरणा घेत क्रिकेटच्या सर्व स्वरूपाच्या मॅचमधे स्वतःचा नावलौकिक कसा उंचावता येईल याचा विचार केला पाहिजे.
कितीही मोठं आव्हान समोर असलं तरी आत्मविश्वासाला कष्ट आणि जिद्द याची जोड दिली की आपोआप असाध्य गोष्टही साध्य करता येते हे न्यूझीलंडचा हुकमी बॅट्समन केन विल्यमसन याने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत दाखवून दिलं. शेवटपर्यंत संयम राखत त्याने आपल्या सहकार्यांच्या मदतीने शेवटच्या चेंडूवर ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्याची आणि पर्यायाने न्यूझीलंडची ही कामगिरी सर्वांसाठी धक्कादायकच होती.
तुल्यबळ असलेल्या या दोन टीमबरोबरच इतर देशांमधल्या क्रिकेटच्या चाहत्यांमधे या सामन्यात कोण विजयी होणार याची उत्सुकता निर्माण झाली होती. हा जर सामना श्रीलंकेने जिंकला असता तर भारतीय टीमचं कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतल्या अंतिम फेरीचं स्थान डळमळीत झालं असतं. ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता.
विजयासाठी दुसर्या डावात २८५ धावांचं लक्ष्य न्यूझीलंड समोर होतं. खरंतर त्यांच्याकडे असलेल्या अनुभवी बॅट्समनचा ताफा लक्षात घेतला तर हे आव्हान त्यांच्यासाठी माफक होतं. पण लंकेकडेही द्रुत आणि मध्यम बॉलरचा ताफा होता. हवेतल्या ओलसरपणाचा फायदा घेण्याबद्दल हे बॉलर अतिशय निष्णात मानले जातात.
तसंच त्यांच्याकडे अनुभवी फिरकी बॉलर होते. या बॉलरच्या जोरावर न्यूझीलंडला २८४ धावांमधे गुंडाळण्याचं नियोजन लंकेनं केलं होतं. त्यातच पहिली विकेट झटपट घेतल्यामुळे लंकेच्या विजयाच्या आशा उंचावल्या होत्या. शेवटच्या दिवशी ५२ षटकांमधे २५७ धावा करण्याचं लक्ष्य न्यूझीलंड समोर होतं.
विल्यमसन हा जरी आक्रमक बॅट्समन मानला जात असला तरी टीमला आवश्यक असेल त्याप्रमाणे चिकाटी आणि संयमाने बॅटींग करण्यात तो हुकमी खेळाडू मानला जातो. अनेक वेळेला त्याने जिद्दीच्या जोरावर टीमला पराभवाच्या छायेतून विजय मिळवून दिला आहे.
खेळपट्टीवर टिच्चून बॅटींग करतानाच आवश्यक त्यावेळी आक्रमक फटका मारण्याच्या संधीही तो सोडत नाही हे त्याने आजपर्यंत अनेक वेळा दाखवून दिलंय. लंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत डॅरील मिचेल याच्याबरोबर १४२ धावांची भरभक्कम भागीदारी केल्यानंतर त्याने टीमच्या विजयाची जबाबदारी सर्वार्थाने आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलली. आपल्या टीमचाचा कर्णधार टीम साऊदी याने आपल्यावर टाकलेला विश्वास त्याने सार्थ ठरवला.
हेही वाचाः अपघाताने जन्माला आलेल्या वनडे क्रिकेटची आज पन्नाशी
विल्यमसन याच्याबरोबरच वॅग्नर हाही कौतुकाला पात्र आहे. खरंतर मोठ्या दुखापतीमुळे त्याला हॉस्पिटलमधे दाखल करण्यात आलं होतं. पण आपल्या टीमला आपली गरज आहे हे त्याने ओळखलं आणि तो पूर्णपणे तंदुरुस्त नसतानाही बॅटींगला आला. त्याने विल्यमसन याला योग्य साथ देत टीमला विजयश्री मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला.
विजयी धाव या दोन खेळाडूंनी काढली तेव्हा खरंतर वॅग्नर याची दुखापत आणखी गंभीर होण्याची शक्यता होती पण त्याने आपल्या जीवाची पर्वा न करता विलक्षण मुसंडी मारून विजयी धाव घेतली. दुसर्या टोकाला विल्यमसन याने सूर मारून क्रीजमधे पोचण्यात यश मिळवलं. यावेळी त्याने दाखवलेलं चापल्य खरोखरीच कौतुकास्पद आणि टीकाकारांना चोख उत्तर देणारं होतं.
या मालिकेपूर्वी विल्यमसन याला मीडियाने रिटायरमेंट केव्हा होणार असे प्रश्न विचारले होते. एवढंच नाही तर त्याने रिटायर होऊन युवा खेळाडूसाठी जागा रिकामी करावी असाही सल्ला देण्यात आला होता. पण पहिल्या कसोटीत त्याने केलेली ९४ चेंडूंमधे नाबाद १२१ धावांची खेळी त्याच्याकडे असलेल्या अतुलनीय कौशल्याचं द्योतकच आहे.
कितीही कठीण प्रसंग असला तरी शांतपणे आणि खंबीर मनोधैर्य ठेवत त्याला सामोरं गेलं की आपोआपच सर्व समस्या दूर होऊ शकतात याचं बाळकडू विल्यमसन याला घरातच मिळालं आहे. त्याचे वडील ब्रेट हे स्वतः सतरा वर्षाखालच्या गटात राष्ट्रीय स्तरावर आणि क्लब स्तरावर क्रिकेट खेळले आहेत तर त्याची आई सॅन्ड्रा या स्वतः बास्केटबॉलपटू होत्या विल्यमसन याच्या किली आणि सैफा तसंच जुळा भाऊ लोगान उत्कृष्ट व्हॉलीबॉलपटू आहेत.
घरातच खेळासाठी पोषक वातावरण असल्यामुळे लहानपणीच विल्यमसन याच्या क्रिकेट कारकिर्दीला प्रोत्साहन दिलं गेलं. वयाच्या चौदाव्या वर्षीच तो वरिष्ठ खेळाडूंबरोबर सामने खेळू लागला तर १६ व्या वर्षी त्याने प्रथम श्रेणीच्या सामन्यांच्या करिअरला सुरवात केली.
आंतरराष्ट्रीय कारकीर्दीच्या सुरवातीला त्याला बॅटींगमधे सपशेल अपयश आलं होतं. तेव्हा त्याच्याविषयी प्रसार माध्यमांनी तोंडसुख घेतले होते मात्र या टीकेकडे दुर्लक्ष करीत त्याने चांगले यश मिळवले आणि त्यानंतर सतत यशाचे नवीन टप्पे ओलांडले. त्याच्या बॉलींगच्या शैलीविषयी आक्षेप घेण्यात आले होते.
त्यांच्याजागी दुसरा कोणी खेळाडू असता तर त्याने सततच छान टीकेमुळे खेळाला रामराम ठोकला असता. पण जिगरबाज आणि सतत आव्हानाला सामोरं जाण्याची क्षमता असलेल्या या खेळाडूने आपल्या बॉलींगच्या शैलीत सुधारणा केली. त्यानंतर त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारच्या सामन्यांमधे हुकमी खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवला आहे.
हेही वाचाः क्रिकेटच्या देवानेही विल्यम्सनला कॅप्टन म्हणून निवडलं, कारण
गेल्या सोळा वर्षांच्या कारकिर्दीत त्याने कसोटी सामन्यांमधे जवळजवळ आठ हजार धावा आणि त्यामधे सत्तावीस शतकं आणि तेहतीस अर्धशतकं अशी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. कसोटीमधे ५३.८ धावांची सरासरी आणि ५१.०६ स्ट्रायकिंग रेट ही त्याची कामगिरी खूपच बोलकी आहे.
मर्यादित षटकांच्या सामन्यांबद्दलही तो अतिशय नामांकित खेळाडू मानला जातो. एक दिवसीय सामन्यांमधे तेरा शतकं आणि ४२ अर्धशतकांसह ६५०० पेक्षा अधिक धावा तर टी ट्वेंटी सामन्यांमधे १७ अर्धशतकांसह २४०० हून अधिक धावा करण्याची किमया त्याने साध्य केली आहे.
प्रतिस्पर्धी टीममधल्या द्रुत आणि मध्यम गती बॉलरबरोबरच फिरकी बॉलरचाही खरपूस समाचार घेण्याची शैली त्याच्याकडे आहे हे त्याने वेळोवेळी दाखवून दिलंय. दोन वर्षांपूर्वी आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धांच्या विजेतेपदावर न्यूझीलंडने नाव कोरलं त्यावेळी या टीमचं नेतृत्व विल्यमसन याने केलं होतं.
अंतिम सामन्यात त्यांच्यापेक्षा भारताचं पारडं जड मानलं जात होतं, पण आपल्या सहकार्यांकडून इप्सित ध्येय कसं चांगल्या रीतीने साकार करता येतं हे त्याने दाखवून दिलं. या विजेतेपदाबरोबरच त्याने आपल्या टीमला कसोटी आणि इतर मर्यादित षटकांच्या सामन्यांमधेही देदिप्यमान विजय मिळवून दिला आहे. कर्णधार असो किंवा नसो आपल्या टीमचा भरवशाचा सदस्य म्हणून विजयाची मदार आपल्यावर आहे हे ओळखून वेळोवेळी त्याने या सर्व जबाबदार्या समर्थपणे पार पाडल्यात.
सहसा तिशी ओलांडल्यानंतर अनेक खेळाडूंच्या शैली, शारीरिक आणि मानसिक क्षमता, चापल्य, लवचिकता, वेगाबद्दल मर्यादा दिसू लागतात. पण विल्यमसन याने आपण अजूनही पूर्वी इतकंच प्रभावी कौशल्य दाखवू शकतो हे सातत्याने अलीकडच्या काळात सिद्ध केलं आहे.
क्रिकेटच्या सर्व स्वरूपाच्या सामन्यांमधे आपण टीमसाठी सर्वोत्तम कामगिरी करू शकतो हे त्याच्या खेळात सातत्याने दिसून आलंय. युवा खेळाडूंनी त्याच्याकडून प्रेरणा घेत क्रिकेटच्या सर्व स्वरूपाच्या सामन्यांमधे स्वतःचा नावलौकिक कसा उंचावता येईल याचा विचार केला पाहिजे आणि त्याप्रमाणे जिद्द आणि महत्त्वाकांक्षेला कष्ट आणि त्यागाची जोड दिली पाहिजे.
हेही वाचाः
वेस्ट इंडिजची 'त्रिमूर्ती' टी ट्वेन्टी वर्ल्डकपमधे धडकी भरवणार!
महान क्रिकेटपटूंच्या निवृत्तीचा चीड आणणारा भारतीय इतिहास
स्वर्गातल्या वडलांना येस पप्पा म्हणणाऱ्या जॉनी बिअरस्टोची गोष्ट
शिवाजी पार्कचा श्रेयस अय्यर तर विराटच्या ‘नक्शे कदम पर’ चाललाय!
(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)