आजही महात्मा गांधीजी कसे खलनायक होते आणि नथुराम कसा नायक होता हे नवीन पिढीच्या मनावर ठसवण्याचे केविलवाणे प्रयत्न केले जातायत. नायक असो की खलनायक तो जगासमोर यायलाच हवा पण जसा तसाच. म्हणजे खर्या स्वरूपात. नथुराम गोडसेवरच्या सिनेमाच्या पार्श्वभूमीवर खोट्या प्रचारांचा बुरखा फाडणारी ही चंद्रकांत झटाले यांची फेसबुक पोस्ट.
महात्मा गांधींची जयंती असो की पुण्यतिथी, याचवेळी मोजक्या लोकांना नथुराम गोडसेबद्दल पुळका येतो. नथुरामच्या उदात्तीकरणासाठीही या गोडसे समर्थकांना गांधी जयंती-पुण्यतिथी हाच मुहूर्त लागतो. नथुराम गोडसेवरच्या सिनेमाची घोषणाही गोडसेच्या मृत्यूदिनाऐवजी गांधी पुण्यतिथीलाच केली जाते. नायक असो की खलनायक तो जगासमोर यायलाच हवा पण जसा आहे तसाच. म्हणजे खर्या स्वरूपात.
गांधींच्या हत्येच्या समर्थनासाठी नथुरामने आपल्यावरच्या आरोपपत्राला उत्तर देताना ८ नोव्हेंबर १९४८ला न्यायालयात जे ९३ पानांचं निवेदन दिलं त्याचा दाखला दिला जातो. आजच्या नवीन पिढीलाही त्याच निवेदनाच्या ऑडिओ टेप ऐकवल्या जातात. त्यातून गांधीजी कसे खलनायक होते आणि नथुराम कसा नायक होता हे नवीन पिढीच्या मनावर ठसवण्याचे केविलवाणे प्रयत्न केले जातात.
यावर्षीही गांधी पुण्यतिथीला सोशल मीडियावर गोडसे समर्थकांनी भरभरून गोडसेच्या समर्थनात खोट्या गोष्टींचा प्रचार केला. खोट्या पोस्ट फिरवल्या. ज्यांनी गांधी आणि गोडसेबद्दल पुस्तकं वाचलीत त्यांना या अपप्रचारानं फरक पडणार नाही, पण ज्यांनी कधीच गांधी आणि गोडसेबद्दल एकही पुस्तक वाचलेलं नाही अशा तटस्थ लोकांना या खोट्या पोस्टवर विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नसतो. बरं या खोट्या पोस्ट फिरवणाऱ्यांनी एकही पुस्तक वाचलेलं नसतं हे विशेष.
नुकताच यावर सिनेमा निघालाय. मी गांधींना का मारलं? नावातच नथुरामाचं उदात्तीकरण आहे. या सिनेमात नथुरामची भूमिका करणार्या डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर भरभरून टीका झाली. काही लोकांनी कलाकाराला भूमिका करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावं अशीही बाजू मांडली.
कलाकाराला निश्चितच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे पण कलाकारानेही आपल्या भूमिकेतून आपण ज्या व्यक्तीची भूमिका करतोय त्या व्यक्तीचं खरं व्यक्तिमत्त्व अधोरेखित होतंय की नाही? त्यातून इतिहासाची मोडतोड तर होत नाही ना? चुकीच्या गोष्टींचं समर्थन तर होत नाही ना या गोष्टी तपासून पाहिल्या पाहिजेत हे ही तितकंच खरं.
उद्या ‘मी पृथ्वीराज चौहानला का मारले?’ असे शीर्षक देत मोहम्मद घोरीचं उदात्तीकरण करणारा सिनेमा आला तर तुम्ही त्यात घोरीची भूमिका कराल का? उद्या छत्रपती संभाजी राजेंच्या हत्येच्या समर्थनार्थ ‘मी संभाजींना का मारले’ असा सिनेमा आला तर त्यात तुम्ही औरंगजेबाची भूमिका करणार का?
कट्टरवाद्यांचा जोर देशात वाढलेला असताना कुणाचीही भीडभाड न ठेवता डॉ. अमोल कोल्हेंनी मालिकेतून छत्रपती संभाजी राजेंचा खरा इतिहास दाखवला. त्यामुळे त्यांच्याकडून खरा नथुराम समोर येणं अपेक्षित होतं. या सिनेमाची शूटिंग जरी २०१७ला झालेली असली तरी तेव्हा नथुरामचा इतिहास काही वेगळा नव्हता. खर्या नथुरामबद्दल जाणून घेण्यासाठी तेव्हाही पुस्तकं उपलब्ध होती आणि आजही आहेत. त्यामुळे डॉ. कोल्हेंनी दिलेली कारणं अत्यंत तकलादू वाटतात.
नथुरामाच्या खोट्या प्रचारांपैकी सगळ्यात मोठा अपप्रचार ‘नथुराम गोडसेने सुनावणीदरम्यान न्यायालयात जे निवेदन दिलं ते जगासमोर आलं नाही, लपवून ठेवण्यात आलं’ असा आहे. ते निवेदन जर लपवून ठेवलं असतं, लोकांसाठी खुलं केलं नसतं तर त्यावर आधारित ‘५५ कोटींचे बळी’ हे पुस्तक गोपाळ गोडसेंनी कशाच्या आधारावर लिहिलं असतं? नथुरामवर जे सिनेमे, नाटकं लिहिली गेलीत ती कशाच्या आधारावर लिहिली असती? गोडसे समर्थक ज्या नथुरामच्या स्पष्टीकरणाच्या पोस्ट फिरवतात, तसंच ज्या ऑडिओ क्लिप फिरवतात, त्या कशाच्या आधारावर फिरवल्या असत्या?
नथुरामने कोर्टात सादर केलेलं ते निवेदन खटला चालला तेव्हापासूनच सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. दुसरी गोष्ट अशी की, नथुरामाने जे निवेदन दिलं ते सगळंच खरं आहे असं कसं काय म्हणता येईल? कोर्टात प्रत्येकच आरोपी स्वतःची सकारात्मक बाजू मांडत असतो म्हणजे तो खरंच बोलत असतो का? कोर्ट ते पडताळून बघणार नाही का?
नथुरामने न्यायालयात सांगितलं की गांधींनी देशाची फाळणी केली आणि ५५ कोटी पाकिस्तानला द्यायला लावले. मुस्लिमांना झुकतं माप दिलं म्हणून मी गांधींना मारलं. पण त्यावेळचे पुरावे तपासले तर नथुरामाचा शब्द न् शब्द धादांत खोटा असल्याचं आपल्या लक्षात येईल. १९३४पासून गांधींवर ५ वेळा हल्ले झालेत. त्यात नथुराम सामील होता.
१९४४मधे देशाची फाळणी झालेली नव्हती, त्यामुळे ५५ कोटी रुपये पाकिस्तानला देण्याचा विषयच नव्हता मग त्यावेळी नथुराम पाचगणीला गांधींवर चाकू घेऊन का धावला? साताऱ्याच्या भिलारे गुरुजींनी नथुरामला पकडून दाबून धरलं होतं. मग त्यावेळी फाळणी आणि ५५ कोटींचा विषय नसताना गांधींवर का हल्ला केला हे तो स्पष्ट करत नाही.
हेही वाचा: महात्मा गांधी म्हणजे आधुनिक काळातले महादेवच!
नथुराम गांधी मुस्लिमधार्जिणे होते म्हणतोय. पण टिळकांनी १९१६च्या लखनऊ करारात मुस्लिमांना लोकसंख्येपेक्षा जास्त आरक्षण दिलं. उर्दू भाषेला विशेष दर्जा दिला. मुस्लिमांच्या स्वतंत्र मतदारसंघाला टिळकांच्या नेतृत्वातल्या काँग्रेसकडून १९१६ला मान्यता देण्यात आली. या कराराचं समर्थन करताना टिळक म्हणाले, ‘आमच्या मुस्लिम बांधवांना आम्ही हिंदूंनी वाजवीपेक्षा झुकतं माप दिलं असं काहींचं म्हणणं आहे. स्वराज्याचे हक्क फक्त मुस्लिम समाजाला दिले तरी मला त्याची पर्वा नाही.’
इथपर्यंत टिळकांचं मुस्लिमांना समर्थन होतं. पण टिळकांबद्दल नथुराम एक शब्दही बोलत नाही. आणि ‘हिंदू धर्म माझा जीव आहे. गीता माझी माता आहे’, असं म्हणणार्या आणि ज्यांच्यामागे या देशातला संपूर्ण हिंदू होता त्या गांधींना मुस्लिमधार्जिणे म्हणतो. गांधींनी कायम मुस्लिमांच्या अवाजवी मागण्यांचा स्वीकार केला असं गोडसे सांगतो पण मुस्लिमांच्या कोणत्या मागण्या गांधींनी स्वीकारल्या याबद्दल कुठलंही स्पष्टीकरण तो देत नाही.
कारण १९१६मधे टिळकांनी लखनऊ करारात मुस्लिमांच्या ज्या मागण्या मान्य केल्या त्यानंतर काँग्रेसने किंवा गांधींनी मुस्लिमांच्या कोणत्याच मागण्या कधीच मान्य केल्या नाहीत. उलट टिळकांनी मुस्लिमांना दिलेले विभक्त मतदारसंघ आणि उर्दू भाषेला दिलेला विशेष दर्जाही स्वातंत्र्यानंतर गांधींनी काढून टाकायला लावला.
आपल्या निवेदनातून स्वतःला देशभक्त सिद्ध करू पाहणार्या गोडसेने स्वातंत्र्यलढ्यात कुठंच सहभाग नोंदवलेला दिसत नाही. अनेकदा देशभक्त गांधींवर हल्ले करणारा गोडसे एकदाही कुठल्या इंग्रजावर हल्ला करताना दिसला नाही. कारण नथुराम भ्याड होता.
गांधींची हत्या केल्यानंतर मी हिंदू आहे हे छातीठोकपणे सांगण्याचीही त्याच्यात हिंमत नव्हती. स्वतंत्र भारतातला पहिला दहशतवादी नथुराम गोडसे हा प्रत्यक्षात भ्याडच होता. त्याच्या भ्याडपणाचा आणखी महत्वाचा पुरावा म्हणून १५ नोव्हेंबर १९४९ला नथुरामला फाशी देत असताना तिथं उपस्थित असलेल्या जस्टीस खोसला यांनी प्रत्यक्ष पाहिलेला प्रसंग आपल्या पुस्तकात दिलाय.
हेही वाचा: नथुरामायणः गांधीजी ज्या देशाचे रहिवाशी होते, तो देश नथुरामचा नव्हता
नथुराम आणि आपटे या दोघांनाही कोठडीतून मागे हात बांधून कोठडीतून बाहेर आणलं गेलं. गोडसे समोर चालत होता. त्याचे पाय फाशीला जाताना अडखळत होते. त्याची चाल त्याची घाबरलेली अवस्था आणि वाटणार्या भीतीची साक्ष देत होती. त्याने बाहेरून मजबूत दाखवण्याचा प्रयत्न करताना अखंड भारताचा नारा दिला. पण त्याचा आवाज फाटत होता.
कोर्टात त्याने दाखवलेला उत्साह ओसरला होता. शेवटच्या दिवसात तो आपल्या कृत्यावर पश्चात्ताप करत होता. तो म्हणत होता की एक संधी जर मला भेटली तर उरलेलं आयुष्य मी शांततेच्या प्रचारात आणि देशाच्या सेवेत लावेल. दोघांना फाशी दिली गेली. दोघांच्याही प्रेतावर तुरुंगातच अंत्यविधी करून त्यांची राख घघ्घर नदीत अनोळखी जागेवर वाहून टाकण्यात आली.
या गोष्टी नथुरामचा उदो-उदो करणारे हे खोटे प्रचारक कधीच सांगत नाहीत. याबद्दल मी ‘मजबुती का नाम महात्मा गांधी’ या पुस्तकात सविस्तर माहिती दिलीय. विशेष म्हणजे घग्गर नदीत एका अनोळखी जागेवर वाहून टाकलेली नथुरामाच्या जळालेल्या शरीराची राख या गोडसे समर्थकांनीं कुठून आणली हे आजही न उलगडलेलं कोडं आहे.
ज्येष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर म्हणतात, गांधींजवळ कोणती ताकद होती? पोलिसांची ताकद होती की सैन्याची ताकद होती? गांधींकडे फक्त या देशातल्या जनतेची, त्या जनतेच्या प्रेमाची ताकद होती. आणि या देशावर, देशातल्या नागरिकांवर प्रेम करणार्या गांधींचा खून करणे म्हणजे या देशातल्या नागरिकांचा, त्यांच्या भावनांचा खून करणे आहे. हे फक्त एक दहशतवादीच करू शकतो.
फाळणीसाठी आणि भारतातल्या दंगलींसाठी मुख्य जबाबदार मुस्लिम लीग, तिचे नेते आणि मुख्यत्वे मोहम्मद अली जीना यांना मारणं तर दूरच, त्यांचा गोडसेने कधी साधा निषेधही केलेला नाही. ‘डायरेक्ट अॅक्शन’चा ठराव घेताना जीना म्हणाले होते, इंग्रजांजवळ भरपूर शस्त्रं आहेत. काँगेसजवळ सत्याग्रह आहे. आमच्याजवळ पिस्तूल आहे आणि त्याचा उपयोग करायची वेळ आलीय.
वायव्य सरहद्द प्रांताचे मुस्लिम लीग नेते अबुलरब निस्तार यांनी ‘रक्ताच्या नद्या वाहिल्याशिवाय पाकिस्तान मिळणार नाही’ अशी प्रक्षोभक वक्तव्ये केली. ‘डायरेक्ट अॅक्शन’ प्लॅन कृतीत आणून देशभरात दंगली घडवणार्या मुस्लिम लीगच्या नेत्यांबद्दल गोडसे एकदाही आपल्या निवेदनातून साधा निषेध व्यक्त करत नाही. त्यांच्यावर हल्ले करत नाही.
या दंगली ज्यावेळी घडत होत्या तेव्हा नौखालीत नव्वद टक्के मुस्लिम आणि दहा टक्के हिंदू असल्याने हिंदुधर्मीय लोक मोठ्या प्रमाणात दंगलीत बळी पडत होते. त्यावेळी गांधी नौखालीत दाखल झाले. दुःखितांचं दुःख निवारण झाल्याशिवाय मी नौखालीतून हलणार नाही, त्यात मला मृत्यू आला तरी चालेल, पण पराभूत होऊन मी परतणार नाही अशी प्रतिज्ञा करून तिथली दंगल शमवली त्या ८० वर्षांच्या म्हातार्या निःशस्त्र गांधींची गोडसे हत्या करतो.
या सर्व गोष्टींची कारणं द्यायला गोडसे बहुतेक विसरला असावा. संपूर्ण आयुष्यभर ब्रिटिशांशी लढलेल्या देशभक्त गांधींवर शेकडो आरोप लावताना स्वतः देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध केलेलं एकही काम नथुराम गोडसे लिहू शकला नाही. फाळणीला जबाबदार मुस्लिम नेत्यांविरुद्ध एकही कारवाई तो लिहू शकला नाही, ही गोष्ट गोडसेचा राष्ट्रद्रोहीपणा आणि खोटेपणा उघड करायला पुरेशी आहे. हा खरा नथुराम जगासमोर आला पाहिजे.
हेही वाचा:
गांधी का मरत नाही: खरा इतिहास बघण्याचा चष्मा!