मानवी जीवनाकडे कसं पहायचं हे सांगणारा ‘दिठी’

३१ मे २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


‘दिठी’ या संपूर्ण सिनेमाला एक अनोखी ‘लय’ आहे. सतत दृश्यं एका लयीत सरकत राहतात. सिनेमात अतिशय मोजके संवाद आहेत. तसा यात दृश्यभाषेचा उत्तुंग आविष्कारही आहे.  किशोर कदम आणि सुमित्रा भावे यांनी प्रेक्षकांना सिनेमा कसा पहायचा याच्यासोबतच मानवी जीवनातल्या सुख-दु:खाकडे, जन्म-मरणाकडे कसं पहायचं याची ‘दिठी’ दिलीय. दिठीबद्दलची प्रमोद मुनघाटे यांची फेसबुक पोस्ट इथं देत आहोत.

रात्री ‘दिठी’ पाहिला. पहाटेपर्यंत स्वप्नात-अर्धवट झोपेत सारखी तीच ती दृश्यं दिसत होती. दिवसरात्र निनादणारा पाऊस, रामजीदादा अशी हाक, गायीच्या वेणा, रामजीच्या नवजात नातीचं रडणं, वारीतल्या अभंगाचा नाद आणि रामजीचं ते शून्यात डोळे लावून बसणं. विलक्षण झपाटल्यासारखा अनुभव. 

सुरवातीला कोसळणारा पाऊस पाहून मला ‘राशोमान’चीच आठवण झाली. संतू वाणी, जोशी बुवा आणि गोविंदा तिघे तसेच मुसळधार पाऊस बघत आहेत. रामजीचा तरुण मुलगा नदीतल्या भोवऱ्यात गेल्याने त्याच्या दु:खाने ते व्याकूळ झालेले आहेत.  

‘दिठी’ या संपूर्ण सिनेमाला एक अनोखी ‘लय’ आहे. सतत दृश्यं एका लयीत सरकत राहतात. रात्रीचा काळोख, वाऱ्याच्या झोताने हेलकावणारा पाऊस, अंधारलेल्या गावातल्या नागमोडी वाटा, त्या वाटांवरून डोक्यावर पोत्याची खोळ घेऊन पोथीला निघालेली माणसं.

रामजीच्या घरात हा काळोख आणि निरंतर पावसाचा एक मोठा अजगरच जणू वेटोळं घालून आहे. संपूर्ण सिनेमाभर पावसाच्या धारांचा नाद, मधेच वारीतल्या अभंगांचे सूर, गायीच्या वेदनेनं कासावीस झालेल्या पारूबाईचं ‘रामजी रामजी...’ अशा हाका.

हेही वाचा : इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप

रामजीच्या नातीचं किरकिरणं, माळ्यावर चाललेल्या पोथीतल्या अमृतानुभवाचं वाचन आणि अभंगांचे तालबद्ध सूर; अशा निसर्ग, प्राणी आणि मानवी आवाजाच्या एकमेकांत मिसळलेल्या स्वरांची आवर्तनं, एका लयीत होत राहतात. लयबद्ध दृश्यमालिका, हीच या या सिनेमाचं विलक्षण अनुभव वैशिष्ट्य आहे. एखादी अनवट कविताच जणू दृश्यरूपाने साकार होते डोळ्यांपुढे. 

फ्लॅशबॅकमधे मधूनच येणाऱ्या वारीच्या अनेक दृश्यातून वळणं घेत घेत येणारी सिनेमाची ही लय उत्तरार्धात ‘तू तो माझे मी तो तुझे’ या ज्ञानेश्वरांच्या अभंगातून क्लायमॅक्सला पोचते. सिनेमाच्या एकूणच अनुभवाचा कंद या अभंगातून व्यक्त होतो. दि बा मोकाशींच्या मूळ कथेतलं गाव, ती माणसं, ते जन्ममृत्यूचं गूढ, हे सगळं एका विशाल अनुभूतीत विसर्जित होतं.

संपूर्ण सिनेमाचा भोवरा ज्या एका केंद्राभोवती गरगरत राहतो, ते केंद्र म्हणजे हा अभंग. वारकरी संप्रदायाच्या जीवनमूल्यांचा अन्वयार्थ म्हणजे  ‘तू तो माझे मी तो तुझे’ हा अभंग आहे. अद्वैतवाद. 

पोथीला जाण्याआधी संतू वाणी, जोशी बुवा आणि गोविंदा तिघे हताशपणे प्रलयंकारी पावसाकडे पाहत बोलत असतात. रामजीवर कोसळलेलं दु:ख त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. तेव्हा गोविंदा विचारतो. 'एक माणूस दुसऱ्यासाठी संपूर्णपणे दुखी नसतोच का हो?' त्यावर जोशीबुवा उत्तर देतात, 'क्वचितच'.

पण अद्वैताची परीक्षा या सिनेमात आणखी पुढे आहे. एरवी इतरांना शहाणपण सांगणाऱ्या रामजीसारख्या साध्या कष्टकरी वारकऱ्यालाही आता काही प्रश्न पडतात. 'दिठी साफ असेल तर अल्याडचं पल्याडचं साफ दिसतं; नाहीतर दोन्हीकडं अंधार' असे एकदा रामजी कुणाला तरी बोलला असतो पूर्वी.

आता तरुण पोराच्या मृत्यूने त्याची दिठी अंधारून गेली आहे. म्हणून माझ्याच वाट्याला हे का आलं? माझी तीस वर्षांची वारी कुठे गेली? ते पुण्य कुठं गेलं? आत्मा खरा आणि शरीर खोटं. शरीराला काहीच अर्थ नसतो का? हे दु:ख असं एकेकट्यालाच भोगावं लागतं का? हे असले प्रश्न त्याला सतावू लागतात.

हेही वाचा :  फक्त प्रेम पुरेसं आहे का हो, सर?

संतू वाणी, जोशी बुवा आणि गोविंदा ही माणसं पोथीच्या निमित्ताने जणू अद्वैताच्या कल्पनेची उलटतपासणीच करत आहेत. पण त्यांना अशा शाब्दिक-विद्वचर्चेशी काही घेणं नसतं. कारण ते सगळेच कष्टकरी आहेत. रामजीवर, त्या गावावर,  त्यांच्यावर कोसळलेल्या दु:खातून त्यांच्यापुढे हे प्रश्न निर्माण झालेत. 
              
या प्रश्नांची उत्तरं आहेत का त्या पोथीत, असाही प्रश्न सिनेमा पाहणारा प्रेक्षक स्वतःलाच विचारतो. आणि समजा या प्रश्नांची उत्तरं अद्वैतवादी तत्वज्ञान सांगणाऱ्या पोथीत बद्ध असतीलही, पण प्रत्यक्ष जीवनात या प्रश्नांची उत्तरं कशी सापडत असतील सामान्य माणसाला? आणि कोणत्या रूपात कळत असतील ही उत्तरं?

याच प्रश्नांनी भोवंडून टाकलेल्या या कथेतून दि. बा. मोकाशी वाचकांची सोडवणूक करू पाहतात. इथं रामजीचा अभिनय करणारे किशोर कदम आणि दिग्दर्शक सुमित्रा भावे ती सोडवणूक करू पाहतात. आणि ही सोडवणूक म्हणजे त्या दिवस भरलेल्या, असह्य प्रसूतीवेदनांनी हंबरणाऱ्या सगुणा गायीची सोडवणूक.  

‘दिठी’मधल्या हा गायीच्या सोडवणूकीचा प्रसंग म्हणजे मराठी सिनेमात इतिहास निर्माण करणारा एक क्षण आहे. पोराच्या मृत्यूने सैरभैर झालेला रामजी सगुणाच्या पोटावरून हात फिरवतो आणि तिची समजूत घालतो. तो जणू त्या क्षणी ब्रम्हान्डालाच साद घालतोय. जिथं सुख-दु:ख, जन्म-मरण यांचं द्वैत फिटलंय असा क्षण रामजी अनुभवत आहे, आणि प्रेक्षकही अनुभवत आहेत. 'दिठी साफ असेल तर अल्याडचं पल्याडचं साफ दिसतं' हाच तो क्षण आहे.

‘दिठी’ या सिनेमाचा अनुभव असा केवळ काव्यात्म अनुभव नाही, तो तात्त्विकही आहे. पण कविता,  तत्त्वज्ञान हे शब्दांविना दृश्यरूपात एकजीव होऊन आपल्या पुढे ज्या अनुभवाच्या मुशीत उभे राहतं, ती रामजी आणि इतर सामान्यांच्या जीवनव्यवहाराच्या पातळीवर आहे, ही ‘दिठी’ या सिनेमाची खरी ताकद आहे.

हेही वाचा : ‘जेजुरी’ समजवणाऱ्या एका दुर्लक्षित पुस्तकाची पंचविशी

दि. बा. मोकाशी यांची कथा जशी लौकिकातून अलौकिकाकडे झेप घेते, तशी किशोर कदम यांच्या रामजीच्या भूमिकेतून, त्यांच्या अभिनयाच्या कारकीर्दीतली ही आजवरची मोठी झेप आहे आणि आणि सुमित्रा भावे यांच्या दिग्दर्शनाची ती उंची आहे. एवढंच नाही तर एकूणच मराठी सिनेमाच्या उंचीचं ते दर्शन आहे.

डॉ. मोहन आगाशे, उत्तरा बावकर, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी, अमृता सुभाष, शशांक शेंडे, अंजली पाटील, कैलाश वाघमारे आणि ओंकार गोवर्धन या प्रतिभावंत कलावंतांचा अभिनय एकाचवेळी अनुभवता येणं, हाही या निमित्ताने एक उच्चांकच आहे.

दिग्दर्शक सुमित्रा भावेंनी केलेला सिनेमाच्या दृश्यभाषेचा फार कमालीचा वापर केलाय. कॅमेरा, संकलन आणि संपादन या काही वेगवेगळ्या गोष्टी अस्तित्वात असतील असं वाटतच नाही, इतका हा एकात्म-काव्यात्म अनुभव वाटतो. फारच कमी मराठी सिनेमात दृश्यभाषेचा असा कमाल वापर आपण पाहतो.

‘दिठी’मधे अतिशय मोजके संवाद आहेत. तेही काढून टाकले तर एकूण परिणामात काहीच फरक पडणार नाही, अशी एकूण या सिनेमात दृश्यभाषेचा उत्तुंग आविष्कार झाला आहे. 

सलाम किशोर कदम आणि सलाम सुमित्रा भावे. तुम्ही प्रेक्षकांना सिनेमा कसा पहायचा हीच नाही, तर मानवी जीवनातल्या सुख-दु:खाकडे, जन्म-मरणाकडे कसं पहायचं याची ‘दिठी’ दिली आहे.

हेही वाचा : 

अजय देवगण बड्डे स्पेशलः नैंटीजची लवइष्टोरी

आर्टिकल १५ः डायरेक्टरचा प्रभाव असलेला सिनेमा

आमच्या प्रेमाचा एक तर सैराट होतो नाहीतर काकण!

बॉलिवूडच्या सिनेमात कधी आनंदी दलित पाहिलाय का?

भानूताई सिनेमाच्या काळाचा अभ्यास करून वेशभूषा ठरवायच्या