आपल्या शरीरात ७० टक्के पाणी असतं. त्यामुळेच आपण कुठलं पाणी पितो याचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो. इतकंच नाही, तर आपण पाणी कसं पितो, कशातून पितो आणि कधी पितो यानेही आरोग्यावर फरक पडतो. पाणी योग्य पद्धतीने पिलं तर अनेक आजारांपासून सुटका होऊ शकते. म्हणूनच पाणी पिण्याच्या या काही खास टिप्स लक्षात ठेवायला हव्यात.
‘भोजनांते विषंवारी’ म्हणजे जेवणानंतर लगेच पाणी पिणं आयुर्वेदामधे विष पिण्यासारखं मानलं गेलंय. कारण, आपल्याला भूक लागणं म्हणजेच आपली जठराग्नी प्रदीप्त होणं. भूक लागल्यावर आपण जेवतो तेव्हा ही जठराग्नी आहे आपण खाल्लेलं अन्न पचवायच्या कामाला लागते. ही एक प्रकारची अग्नी आहे, त्यात पाणी ओतले तर काय होणार? ही अग्नी विझणार, मंदावणार आणि त्यामुळे आपल्या पचनक्रियेत बाधा निर्माण होणार. म्हणून जेवणासोबत आणि जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये.
फारफार तर चपाती किंवा भाकरी संपल्यावर भात खाण्यापूर्वी एखादा घोट पाणी प्यावं आणि जेवणानंतर चूळ भरण्यापुरतं एखाद-दुसरा घोट पाणी प्यावं. असं जेवताना अगदीच घ्यायचं झालं, तर अर्ध फुलपात्र पाणी प्यायला हरकत नाही. पोटाचे चार भाग केले, म्हणजे अर्धा भाग घन अन्नपदार्थ, पाव भाग द्रव अन्न पदार्थ आणि पाव भाग रिकामा, तर पाणी पिण्याची गरजच भासणार नाही.
आयुर्वेदामधे अगदीच जेवतांना द्रव पदार्थांचे सेवन करायला, पाण्याऐवजी सकाळच्या जेवणासोबत फळांचा ज्यूस, दुपारच्या जेवणासोबत ताक आणि रात्रीच्या जेवणानंतर दोन तासांनी एक ग्लास दूध प्यायला परवानगी आहे. कारण, यामुळे द्रव पदार्थाच्या सेवनाचा आनंद तर मिळतोच; पण आपल्या शरीरातील वात-पित्त-कफ हे त्रिदोष संतुलित राहायला मदत मिळते.
मात्र, जेवणानंतर पाणी पिणं टाळावंच. जेवणानंतर पाणी पिण्यामुळे जठराग्नी मंदावतो आणि खाल्लेले अन्न पचन न होता सडतं. त्यातून अनेक विषारी द्रव्यं तयार होतात आणि तीच विविध आजारांना कारणीभूत असतात. म्हणूनच पोटातून बऱ्याचशा आजारांचं मूळ आहे, असं म्हटलं जातं.
हेही वाचा : लस असतानाही आपल्याला वायरसवरच्या औषधांची गरज पडेल?
पाणी गटागट प्यायचं नाही. गरम द्रव पदार्थ ज्याप्रमाणे आपण सिप-सिप करत घोट-घोट पितो त्याप्रमाणे नेहमी पाणी प्यावं. कारण, आपल्या तोंडात दर मिनिटाला ०.५ मि.ली. लाळ बनत असते. ही लाळ क्षारीय असते, तसेच आपल्या पोटात सतत आम्ल बनत असते. जेव्हा आपण घोट-घोट पाणी पितो तेव्हा पाण्यासोबत ही क्षारीय लाळ आपल्या पोटात जाते आणि ती पोटातील आम्लामधे मिसळते. त्यामुळे पोटातील वातावरण सामान्य राहण्यास मदत होते.
ज्याच्या पोटात जास्त आम्लता नसते त्यांच्या रक्तातही आम्लता असत नाही आणि त्यामुळे वात-पित्त-कफ नियंत्रणात राहून त्यांचा बऱ्याच आजारांपासून बचाव होतो. तसंच वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होतं. शिवाय सिप-सिप करत घोट-घोट पाणी पिण्याने आपला उत्साह वाढतो. ऊर्जा वाढते, चपळता वाढते. कारण, जे प्राणी जिभेने चाटून-चाटून पाणी पितात जसे वाघ, चित्ता, कोल्हा हे फारच चपळ असतात.
मात्र, जर गटागट पाणी पिले, तर जास्तीत जास्त लाळ पोटात जायला पाहिजे ती जात नाही. त्यामुळे पोटातली आम्लता वाढते. परिणामी, रत्तातली आम्लता वाढते आणि विविध प्रकारचे आजार होतात. अशा चुकीच्या पद्धतीने पाणी पिण्यामुळे उत्साह वाटत नाही. ऊर्जा वाढत नाही आणि चपळताही राहत नाही. उलट आळस येतो, जड-जड वाटते.
गटागट पाणी पिण्यामुळे हर्निया म्हणजेच आतड्यांचे उतरणं, आंत्रपुच्छदाह म्हणजेच ऍपेन्डिसायटिस) आणि पन्नाशीनंतर किंवा साठीनंतर पुरुषांमधे अंडवृद्ध तसंच प्रोस्टेटचाही त्रास होतो. त्यामुळे भविष्यात अशा समस्या उद्भवू नये आणि वयानुसार उद्भवल्यास त्याची तीव्रता जास्त राहू नये म्हणून नेहमी सिप-सिप करत घोट-घोट पाणी पिण्याची सवय लावणं उत्तम.
तहान हा सुद्धा एक वेग असतो. हा वेग थांबवायचा नसतो. एक ग्लास पाणी पिले, की तासाभराने तहान लागतेच. त्यामुळे तासातासाला एक-एक ग्लास असे दररोज तीन ते चार लिटर पाणी पिलेच पाहिजे. तेही जेवणापूर्वी अर्धा ते पाऊण तास आधी पिलेले असावे आणि जेवणानंतर एका तासांनी एक ग्लास आणि तिथून पुढे तासातासाला एक-एक ग्लास पाणी पित राहावे.
सकाळी उठल्या-उठल्या मात्र तहान नसली, तरी एका वेळी एक संपूर्ण तांब्या किंवा दोन ग्लास एकत्रितपणे पाणी प्यायला पाहिजे. तेही तोंडसुद्धा न धुता. त्याला ‘उषःपान’ असं म्हणतात.
सकाळची तोंडातील लाळ ही औषधी असते. ही लाळ पाण्याबरोबर पोटात गेल्यावर रात्रभर पाणी न पिल्याने पोटात जी आम्लता वाढलेली असते ती सामान्य होते. दात शक्यतो रात्रीच घासावेत, ज्यायोगे तोंड रात्रभर स्वच्छ असेल आणि त्यामुळे सकाळी उत्तम दर्जाची लाळ तोंडात असेल. शिवाय सकाळी उठल्या-उठल्या पाणी पिण्याने आतड्यांवरही दबाव पडतो आणि त्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते.
हेही वाचा : या आजींनी आत्ता कोरोनाला आणि १०० वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्लूलाही हरवलंय
फ्रिजमधलं अतिथंड पाणी अजिबात पिऊ नये. कारण, फ्रिजमधलं पाणी हे १० अंश सेल्सिअस असतं. बर्फाचे पाणी तर ४ ते ५ अंश सेल्सिअस असतं आणि आपल्या शरीराचं तापमान ३७ अंश सेल्सिअस. त्यामुळे फ्रिजमधलं अतिथंड पाणी पिलं, तर ते पोटात गेल्यावर पोट त्याला थंड करायला लागतं. त्यासाठी ऊर्जा लागते ती रक्तातून मिळत असते. त्यामुळे आपलं रक्ताभिसरण पोटाकडे वळतं. त्यामुळे शरीराच्या इतर अवयवांना रक्तपुरवठा कमी होतो,
त्यामुळे मेंदूमधे रक्तस्त्राव म्हणजेच ब्रेन हमरेज, हृदयविकाराचा झटका, अर्धांगवायूचा झटका तसेच अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नेहमी सामान्य तापमानाचंच पाणी प्यावं. फारफारतर उन्हाळ्यात मडक्यातलं थंड पाणी चालू शकते. कारण, ते नैसर्गिक मार्गाने थंड झालेलं असतं. शिवाय ते सामान्य पाण्याच्या फक्त २ ते ३ अंश सेल्सिअसनं कमी असते. अतिथंड नसते.
उभं राहून कधीच पाणी पिऊ नये. नेहमी बसूनच पाणी प्यावं. कारण, उभं राहून पाणी पिण्यामुळे पचनक्रियेसंबंधित आजार निर्माण होऊ शकतात. सांधेदुखीच्या समस्या निर्माण होऊ शकतात तसंच किडनी विकार होऊ शकतात. महत्त्वाचं म्हणजे, उभं राहून पाणी पिण्यानं तहानही भागत नाही.
पाणी प्यायला नेहमी गोल तांब्याचं भांडं वापरावं. कारण, पाण्याला स्वतःचा असा गुणधर्म नसतो. त्यामुळे ते ज्याच्यात मिसळलं जातं आणि ओतलं जातं त्याचे गुण ते धारण करतं. म्हणूनच फळांच्या ज्यूसमधे आणि ताकामधे जरी पाण्याचं प्रमाण जास्त असलं तरी फळाप्रमाणे पाण्यात गुण येतात आणि ताकामधे दह्याचे गुण येतात.
म्हणूनच सकाळच्या जेवणासोबत ज्यूस पिण्याने आणि दुपारच्या जेवणासोबत ताक पिण्याने त्याचा जठराग्नीवर विपरीत परिणाम होत नाही. उलट अन्नपचन चांगलंच होतं. वात-पित्त-कफ संतुलित राहायला मदतच होते आणि द्रव पदार्थाच्या सेवनाचं समाधान मिळतं. म्हणूनच आयुर्वेदामधे तशी परवानगीही देण्यात आलीय.
ग्लास एकरेखीय असतो आणि तांब्याभांडं गोल असतं. प्रत्येक गोल वस्तूंचा पृष्ठभाग कमी असल्यामुळे त्यांचे पृष्ठभाग ताण कमीच असतं. त्यामुळे तांब्याभांडं गोल असल्यामुळे त्यातील पाण्याचा पृष्ठभाग ताणही कमी असतो. असं पाणी अतिउत्तम. कारण, अशा पृष्ठभाग ताण कमी असणाऱ्या पाण्यामुळे आतड्यांची सफाई चांगल्या प्रकारे होते.
दुधाचे पृष्ठभाग ताण सर्वात कमी असते. त्यामुळे चेहरा स्वच्छ करायला ते वापरतात. त्यामुळे त्वचा खुलते आणि त्यातील छिद्रांमधून मळ बाहेर येतो आणि त्वचा स्वच्छ होते. त्याप्रमाणेच गोल तांब्याभांड्यातला कमी पृष्ठभाग ताण असलेलं पाणी पिल्यामुळे आतडी खुलतात आणि त्यातला मळ बाहेर येऊन आतडी साफ व्हायला मदत होते. त्यामुळे सरळ ग्लासने पाणी पिण्यापेक्षा नेहमी गोल तांब्याभांड्यानेच पाणी पिणं उत्तम.
हेही वाचा :
लाच न देण्याची चैन कुणाला परवडणार?
आरसीबीचा विराट म्हणजे उथळ पाण्याला खळखळाट फार!
आदित्यनाथांचं दुसऱ्या मायानगरीचं स्वप्न पूर्ण होऊ शकेल?
(दैनिक पुढारीतून साभार)