लॉकडाऊनमुळे सध्या आपल्याला घरात थांबण्याचं एवढं टेंशन का येतंय, माहितीय का? असं नेमकं काय घडतंय की ज्यामुळे आपल्याला सतत बाहेर जावंच लागतंय? सरकारने इतके कडक आदेश देऊनही आपल्यापैकी अनेकजण घरी थांबण्याचं बंधन झुगारून लावताहेत. हे करताना आपल्या मनात नेमकं काय घडत असतं, जाणून घ्यायचंय?
स्टॅण्डफोर्ड युनिवर्सिटीमधले विद्वान मानसशास्त्रज्ञ वॉल्टर मिशेल यांनी १९७२च्या सुमारास एक महत्वपूर्ण संशोधन केलं. लोक गोंधळाच्या क्षणी एवढे अगतिक का होतात? गोंधळातही स्वतःला थांबवून ठेवून आधी ठरवल्याप्रमाणेच काम करणारे लोक कोण असतात?
वॉल्टर मिशेलने या गोष्टीचे उत्तर शोधण्यासाठी माणसाच्या विकास प्रकियेच्या खूप मुळापर्यंत जायचं ठरवलं. मुळापर्यंत म्हणजे कुठपर्यंत? तर अगदी बालपणापर्यंत. म्हणून त्याने काही लहान मुलांवर संशोधन केलं.
मिशेलने एका रूममधे काही लहान मुलांना बसायला लावलं. त्याने या मुलांना एक छोटा मार्शमेलो दिला. मार्शमेलो ही एक प्रकारची मिठाई असते. त्याने सांगितलं, तुम्ही हा मार्शमेलो खाऊ शकता. पण तुम्ही आणखी पंधरा मिनिटं मार्शमेलो न खाता थांबलात, तर मी तुम्हाला दोन मोठे मार्शमेलो देईल.
आणि तो त्या रूमबाहेर निघून गेला. या रूममधे कॅमेरे लावले असल्यामुळे आतमधे चालणाऱ्या मुलांच्या हालचाली बारकाईने नोंदवल्या जात होत्या. १५ मिनिटानंतर तो रूममधे परत आला, तेव्हा त्याला असं आढळून आलं की बऱ्याच मुलांनी ते मार्शमेलो अर्धे खाल्लं होतं. काहींनी त्याला पूर्ण खाऊन टाकलं होतं.
हेही वाचा : पीएम फंड असताना पीएम-केअर्सची नवी भानगड कशाला?
तर काही मुलांनी त्याला चाटून चाटून पार ओलं करून टाकलं होतं. पण खाल्लं नव्हतं. कारण या मुलांना वाटत होतं की जीभ लावणं म्हणजे खाणं नाही. हे न करणारी काही मोजकीच मुलं होती. ती १५ मिनिटं मार्शमेलोकडे सतत बघत होती. पण त्यांनी त्याला खाल्लं नाही आणि हातही लावला नाही.
मार्शमेलो न खाणाऱ्या सगळ्या मुलांना नियमाप्रमाणे दोन मोठे मार्शमेलो दिले गेले. हे तिन्ही मार्शमेलो त्यांनी एका शांत ठिकाणी बसून खाल्ले. वॉल्टर मिशेलने या मार्शमेलो प्रयोगावरून वरून काही महत्वाचे निष्कर्ष काढले. ते आपल्या प्रत्येकासाठी आयुष्यातल्या निर्णायक घटनांमधल्या महत्वाच्या क्षणांचं विश्लेषण करायला उपयुक्त ठरू शकतात.
या प्रयोगासाठी रूममधे बंद असलेल्या मुलांवर ५ ते १० वर्षांच्या अंतराने नेहमी नजर ठेवण्यात आली. त्यातून या मुलांच्या विकासाबाबत काही नोंदीही केल्या गेल्या. या नोंदींमुळे प्रत्येक व्यक्तीचे प्रतिकूल परिस्थितीत व्यक्त होण्याचे आणि त्यातून मोठ्या लक्ष्यासाठी स्वतःला धरून ठेवण्याचे काही महत्वपूर्ण गुण याविषयी काही निष्कर्ष काढता आले.
मार्शमेलोची चव घेतलेली मुलं शाळा कॉलेजच्या वातावरणात आणि कौटुंबिक जीवनातही गोंधळलेली होती. जे हवंय त्याच्या मागे काही विचार न करता पटकन पळणारी होती. ही मुलं अत्यंत सामान्य ध्येयं निवडून धोका नसलेली आयुष्य जगताना दिसून आली.
याउलट ज्या मुलांनी दिलेल्या वेळेत स्वतःला होल्ड करून दोन मार्शमेलो मिळवली, ती मुलं मात्र शैक्षणिक जीवनात जास्तीत जास्त केंद्रित होती. ती कौटुंबिक जीवनात संयमित होती. ती आपल्या कुवतीपेक्षाही मोठं ध्येय ठेवून त्याचा पाठलाग करण्यासाठी नियोजन करताना दिसून आली.
हेही वाचा : तबलीगने भारतात कोरोना पसरण्याचा कट केलाय का?
अर्थात मिशेलने या मुलांच्या आयुष्याच्या पुढच्या टप्प्यांपर्यंतही ऑबझर्वेशन केलंय आणि त्यातून अतिशय भन्नाट अशा नोंदी केल्यात. या सर्व प्रक्रियेला डिलेड ग्रॅटिफिकेशन असं म्हणण्यात आलंय.
दोन मार्शमेलो मिळवणाऱ्या मुलांच्या सर्व प्रक्रियेत आपल्या समाधानाला जेवढं लांबवता येईल तेवढं लांबवलं जातं. ते छोटे छोटे आनंद घेण्याचं टाळून अधिकाधिक मोठा रिझल्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात.
अशा व्यक्ती आपल्याला हवं ते मिळालं नाही, तरी चिडत नाहीत. त्यांचे प्लॅन अनपेक्षितपणे बदलले तरी ते तक्रार करत नाहीत. कुठलीही मजा मस्ती करण्यापूर्वी आपली ठरवलेली कामंच आधी करताना दिसून येतात.
या सगळ्या संदर्भात आपली कोरोनानंतरच्या लॉकडाऊनची मानसिक परिस्थिती समजून घ्यायला हवी. आपल्याला एका जागेवर बसायला सांगितलं गेलंय. म्हणजेच आपणच ठरवलेल्या गोष्टीच्या विरोधात आपल्याला वर्तन करायचं असतं. ते स्वतःच्या सहनशक्तीसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान असतं.
आपल्याला येणाऱ्या महिन्यात कुणाला भेटायचंय, त्यांच्याशी काय व्यवहार करायचेत, कुठले महत्वाचे कौटुंबिक कार्यक्रम आहेत, आपली प्रतिष्ठा वाढवणारे कोणते महत्वाकांक्षी प्रकल्प आहेत, आपण कोणाला कोणत्या कमिटमेंट केल्यात, त्या पूर्ण करण्याची आपली भावनिक आणि व्यावहारिक गरज आहे, हे सारं अनपेक्षितपणे पुढे ढकललं जाणं, हे आपल्या इतक्या वर्षांत तैय्यार झालेल्या महत्वाकांक्षी आणि हट्टी स्वभावाला एकदम विरोध करणारं असतं.
त्यामुळे हे सगळं टाळून घरात शांत बसणं म्हणजे गॅसवर बसल्यासारखाच फील आपल्यापैकी बऱ्याच जणांना येत असेल. काही तरी महत्त्वपूर्ण गोष्ट आपल्या हातातून निघून जातंय, आता ते आपल्याला परत मिळणार नाही, त्यामुळे आपण काहीतरी हालचाल केलीच पाहिजे, असं आपल्याला सतत वाटत असतं.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
एखाद्या वायरसचं बारसं कसं केलं जातं?
महाराष्ट्राचे एक मंत्री कोरोना संशयित बनतात तेव्हा
आपण आधीच दिवे लावलेत, आतातरी डोकं लावूया
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?
कोरोनाचा आर्थिक फटका भारताला बसणार नाही, असं यूएन का म्हणतंय?
काही वेळेला तर उगाच बाहेर फिरून आलंच पाहिजे, ही आपली मानसिक गरज बनते. ती पूर्ण करण्यासाठी आपण बाहेर पडतो. त्यात एक लक्षात घ्यावं लागेल की हे युद्धच असतं. आपण स्वतःमधे निर्माण केलेल्या गरजा आणि सवयीच्या विरुद्ध युद्ध सुरू असतं, तेव्हा आपल्या आतल्या नियमांच्या पुनर्बांधणीची गरज सर्वोच्च असते. अशा वेळेस संयमी लोकच विजयाचे शिल्पकार बनून काळाला आकार देऊ शकतात.
बऱ्याच वेळेला आयुष्यात काही न करणं आणि शांत बसून वेळेची वाट पाहणं किंवा वेळ जाऊ देणं, हे आपल्यालाच नाही, तर सगळया मानवजातीलाच संकटातून बाहेर खेचण्यासारखंच असतं. ज्यांना मार्शमेलो लगेच खायचा असतो, त्यांना ते काय गमवणार याची माहिती असते, पण जाणीव नसते. अशांच्या आयुष्यातून काहीतरी महत्त्वपूर्ण असं निघून जाण्याची तयारी करत असतं, हेच सत्य असतं. फक्त ते गेलंय हे कळायला काही दिवस, महिने किंवा वर्षं लागतात एवढंच.
नेहमीच्या जगण्यातल्या आपल्या धावपळीमुळे तयार झालेल्या सवयींविरुद्ध आता आपल्याला स्वतःलाच लढायचं आहे. अनेक वर्षांपासून आपण आपल्या समाधानासाठी स्वतःमधे निर्माण केलेल्या विविध गरजा आणि त्यातून नकळत निर्माण झालेल्या सवयींना अशा परिस्थितीमधे थांबवायचं आहे. बऱ्याच जणांना त्या थांबवणं शक्य होताना दिसत नाही. कारण त्यांना समाधान मिळणं बंद होतं.
आणि त्या छोट्या छोट्या समाधानासाठी आपण निसर्गाने दिलेली एक नवीन ऑफर नाकारण्याचीही शक्यता आहे. ही नवीन ऑफर म्हणजे एका ठिकाणीच थांबा, आतापर्यंत घेत आलेले सर्व फायदे घेणं काही काळासाठी थांबवा आणि नवीन एक्सटेण्डेड आयुष्याचा लाभ घ्या. नाही तर आहे तसं जगणं चालू ठेवा. नेहमीच्या छोट्या समाधानासाठी थांबू नका आणि निसर्गाकडून मिळणारं वाढीव आयुष्य नाकारा.
आपल्यासमोर निसर्गाने एक पेच उभा केलाय. त्यातून आपल्याला आपल्या आयुष्यात हव्या असणाऱ्या सर्व घटना अनिश्चित काळासाठी अचानक एक अटीवर पुढे ढकलण्यासाठी बाध्य केलंय. आपल्यासमोर पहिला पर्याय आहे की नेहमीप्रमाणे आपलं आयुष्य, कृती, घटना चालू ठेवा, तुमच्या सवयीनुसार सगळ्या गोष्टी करा. दुसरा पर्याय आहे की काही विशिष्ट काळापर्यंत स्वतःला होल्ड करा, स्वतःला थांबवा आणि वाढीव आयुष्याचा, त्यातून येणाऱ्या मोठ्या उद्दिष्टांच्या पाठीमागे धावण्याचा अनुभव घ्या. भविष्यातील वाढीव आनंदासाठी स्वतःला तयार करा.
आता आपणच ठरवाचंय, मार्शमेलो आता खायचाय की थोडा वेळ थांबून पाहायचंय?
हेही वाचा :
रामायण, महाभारताचं स्वागत करायला काय हरकत?
पंतप्रधान कोरोना पॅकेजनंतरही गरीब फाटकाच राहणार आहे
दिवेलावणीवरील फेबु-वॉट्सपगिरीः वाचा, हसा, विचारही करा
कोरोनानं कांद्याचा बाजार बंद झाला, मग शेअर बाजार बंद का होत नाही?
(लेखक मॅनजमेण्ट कॉर्पोरेट कोच आहेत. त्यांच्या ताज्या ब्लॉगवरून संपादित लेख.)