कोरोनामुळे गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांनी शिक्षण ऑनलाईन घेतल्याने दहावी बारावीच्या परीक्षाही ऑनलाईनच असल्या पाहिजेत, असं मत व्यक्ती केलं जातंय. तर सरकारानं या परीक्षा ऑफलाईन घ्यायचं ठरवलंय. ३० लाख विद्यार्थ्यांची ऑनलाईन स्वरूपात परीक्षा घेणं शक्य नाही, हे खरंच. अशावेळी विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा घेणं ही खरंतर आपल्यासमोरची परीक्षाच असणार आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्याच शाळा-कनिष्ठ महाविद्यालयात, उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी जादा वेळ, लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक परीक्षा, दहावीसाठी प्रात्यक्षिक परीक्षा गृहपाठ स्वरूपात, जूनमधे विशेष परीक्षेचे पुन्हा आयोजन. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे निर्णय घेऊन दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार हा महाराष्ट्र सरकारचा विचारपूर्वक निर्णय आहे. शिक्षणाचा आणि पर्यायाने विद्यार्थ्यांचा दर्जा राखण्यासाठी परीक्षा व्हायलाच पाहिजेत आणि त्या ऑफलाईनच असाव्यात.
विद्यापीठांच्या परीक्षेच्या बाबतीत शासनाने परीक्षा न घेण्याविषयीचा विचार मांडला होता. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना परीक्षा घेतल्याच पाहिजेत, असा आदेश दिला होता. त्याच वेळी परीक्षा असल्याच पाहिजेत याविषयीची स्पष्टता आली होती.
काही नकारात्मक विचारसरणीच्या लोकांनी यावर्षी परीक्षा नकोत, अशा स्वरूपाचा सूर आळवण्यास सुरुवात केली होती. आजही ते ही भूमिका मांडत आहेत. स्पष्टपणे सांगायचं झाल्यास त्यांना शिक्षणाची प्रक्रियात्मक पद्धती अद्याप समजलेली नाही की काय, असा विचार मनात येतो.
विद्यार्थ्यांची तयारी उत्तम
इयत्ता दहावी आणि बारावी ही विद्यार्थ्यांच्या जीवनातील कारकिर्दीच्या किंवा भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची वर्षे आहेत. त्यामुळे या इयत्तांच्या अभ्यासक्रमाच्या वार्षिक परीक्षा होऊन, त्यामधून मुलांची क्षमता दाखवणं आणि त्यांच्या शैक्षणिक बुद्धिमत्तेचं, आकलनाचं मूल्यमापन केलं जाणं हे समंजसपणाचं लक्षण आहे.
ही मुलं राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर जातील तेव्हा त्यांच्या परीक्षा न घेता त्यांना उत्तीर्ण केलं असेल तर ‘कोरोना विद्यार्थी’ म्हणून त्यांच्यावर ठपका बसेल. त्यामुळे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झालीय.
कोविड-१९ मुळे यावर्षी संपूर्ण वर्ष विद्यार्थ्यांचं ऑनलाईन शिक्षणात गेलं. काही दिवसच दहावीच्या विद्यार्थ्यांचा शाळेशी संपर्क आला. ऑनलाईन क्लासेस असले तरीसुद्धा शिक्षकांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना अत्यंत मनापासून शिक्षण दिलंय. विद्यार्थ्यांनीही दहावीचं वर्ष महत्त्वाचं आहे, हा विचार मनाशी द़ृढ करून स्वयंअध्ययनाने परीक्षेसाठीची उत्तम तयारी केलीय.
प्रत्येक विद्यार्थ्याजवळ दहावीची पाठ्यपुस्तके होती. पाठ्यपुस्तकांचे वाचन करून आकलन करण्याइतके हे विद्यार्थी नववीपर्यंतच्या शिक्षणातून तयार झालेत. केवळ गणित आणि भौतिकशास्त्र याच विषयामधे संबोध समजण्याची गरज आहे. बाकी सगळ्या विषयांची उत्तम तयारी करता येते आणि ती विद्यार्थ्यांनी केलीही आहे.