जागतिक जल दिन : थेंबाथेंबात आहे जीवन!

पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी ७१.९ टक्के भूभाग पाण्याने व्यापला आहे. यातला बहुतांश भाग समुद्राच्या पाण्याचा आहे. जगभरात ४१ इंच पाऊस पडतो. भारतात हे प्रमाण ४३ इंच आहे. महाराष्ट्रात सरासरी ४८ इंच पाऊस पडतो. तरीही महाराष्ट्रात पाण्याची टंचाई का जाणवते? बेजबाबदार पाणी वापरामुळे एक नवं संकट उभं राहिलंय.

अन्न, पाणी आणि हवा या सजीवांच्या मूलभूत गरजा.  त्यातही, सजीव सृष्टीची सुरवात पाण्यातून झाली. त्यामुळेच पाण्याला ‘जीवन’ हे नाव मिळालं. मानवासाठी तर पाणी अत्यंत महत्त्वाचं. मानवाला पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी, शेतीसाठी, पाणी हवं असतं. म्हणूनच मानवी संस्कृतीचा विकास नदीकाठी झाला. नद्यांचं महत्त्व जाणून त्यांना ‘जीवनदायिनी’ अशी ओळख मिळाली.

यातल्या अन्न, पाणी आणि हवा या सर्व गोष्टी निसर्ग पुरवतो. अन्न मिळवण्यासाठी जसे आपल्याला कष्ट घ्यावे लागतात, तसे कष्ट पाणी आणि हवा मिळवण्यासाठी घ्यावे लागत नाहीत. त्यामुळे त्यांचं मोल किंवा महत्त्व लक्षात येत नाही. हवा आणि पाण्याचा वापर मानवाकडून इच्छेनुसार आणि गरजेपेक्षा जास्त केला जातो.

सर्वसामान्यांमधे जलसाक्षरता नाही

एकीकडे पाण्याचा वापर वाढत गेला आणि दुसरीकडे पाणी वापरणारी मानवी लोकसंख्या वाढत गेली. त्यामुळे पाण्याची टंचाई अनेक भागात जाणवू लागली. हे लागणारं पाणी मुलत: पावसापासून मिळतं. पाऊस काही भागात जास्त पडतो, तर काही भागात कमी. त्यामुळे वाढलेली पाण्याची गरज भागवण्यासाठी नद्या आणि पाण्याच्या स्रोताला अडवून कृत्रिम जलसाठे बनवले.

निसर्गात मानवाचा हस्तक्षेप सुरू झाला. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, नद्यांतला वाळू उपसा, नद्याच्या उगमस्थानाजवळ डोंगररांगांची तोडफोड, या सर्व गोष्टीनी पाण्याच्या उपलब्धतेत अडथळे येऊ लागले. त्यातच नागरी वस्त्या, कारखाने, उद्योग व्यवसायात वापरले गेलेले पाणी स्वच्छ पाण्याच्या साठ्यात मिसळू लागले.

याचा परिणाम म्हणून पाण्याची उपलब्धता आणखी कमी झाली. पूर्वी नदीतलं पाणी थेट पिण्यासाठी वापरत. आता बाटलीतलं पाणी पितानाही मन साशंक होतं. ही सर्व परिस्थिती उद्भवली कारण आजही सर्वसामान्यांमधे जलसाक्षरता नसणं हे आहे.

हेही वाचा: जंगलातून मेट्रो धावताना जंगल उरेलच कसं?

डोळस नजरेनं पाहण्याची गरज

हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू यांचे संयुग म्हणजे पाणी. यातला हायड्रोजन तीव्र ज्वालाग्राही मूलद्रव्य; तर, ऑक्सिजन ज्वलनासाठी अत्यावश्यक घटक. हायड्रोजन जळतो आणि पाणी तयार होते. ते रासायनिकदृष्ट्या शुद्ध पाणी असतं. असं पाणी मानवी शरीराला उपयुक्त नसतं. त्यात काही क्षार मिसळतात आणि ते पिण्यायोग्य बनतं. पण बाह्यघटक मानवी शरीराला आवश्यक ते आणि योग्य प्रमाणात असावे लागतात.

पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणत उपलब्ध होत असतं. पण पाण्याचा अमर्याद वापर आणि स्वच्छ पाण्यात घाण किंवा वापरलेलं पाणी मिसळण्याचं वाढतं प्रमाण यातून पाण्याची टंचाई निर्माण होते. ज्या पंचगंगेचं पाणी कोल्हापूर वापरतं, त्याच नदीचं पाणी इचलकरंजीमधे, अवघ्या वीस-पंचवीस किलोमीटरवर वापरायला अयोग्य बनतं. म्हणूनच पाण्याच्या प्रश्नाकडे डोळस नजरेनं पाहण्याची गरज आहे.

मानवाच्या खाण्यापिण्याच्या सवयीपासून, शेती, उद्योग, व्यवसाय, स्वच्छतेच्या सवयींमुळे पाण्याच्या वापरात मोठी वाढ झाली. या वापरलेल्या पाण्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जात नाही. या गोष्टींचा साकल्याने विचार करायला हवा.

पाण्याची टंचाई का जाणवते?

मानवी देहात मोठ्या प्रमाणात पाणी असते. लहान बालकांमधे ७५ टक्के, पुरूषांमधे ६० टक्के, स्त्रियांमधे ५५ टक्के पाणी असतं. मानवी मेंदू आणि हृदयामधे ७३ टक्के, स्नायू आणि मूत्रपिंडामधे ९८ टक्के पाणी असतं. हाडातही ३१ टक्के पाणी असतं. प्रतिमाणसी केवळ १३० लिटर पाण्यामधे स्नानासह सर्व कार्य सुरळीत पार पडतात. पण स्थानिक स्वराज्य संस्था गरजेपेक्षा जास्त पाणी पुरवतात.

शुद्ध प्रक्रिया केलेलं पाणी बागांसाठी, गाड्या धुणं, परिसर स्वच्छतेसाठी वापरलं जातं. नागरी वस्तीसाठी जितकं पाणी वापरलं जातं, जवळपास तितकंच वापरलेलं पाणी तयार होतं. या पाण्यावर पुनर्प्रक्रिया करायला हवी. अनेक गावं आणि शहरं याची कोणतीही व्यवस्था न करता नाल्यातून, नदीपात्रात मिसळू देतात. हळूहळू प्रदूषणाचं प्रमाण वाढतं आणि नदीपात्रातलं शुद्ध पाणी वापरण्यायोग्य राहात नाही.

पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी ७१.९ टक्के भूभाग पाण्याने व्यापला आहे. यातला बहुतांश भाग समुद्राच्या पाण्याचा आहे. समुद्रातलं पाणी पिण्यासाठी वापरता येत नाही. काही सरोवरातले आणि भागातले पाण्याचे साठे खार्‍या पाण्याचे आहेत. तेही वापरता येत नाहीत. जगभरात ४१ इंच पाऊस पडतो. भारतात हे प्रमाण ४३ इंच पडतो. महाराष्ट्रात सरासरी ४८ इंच पाऊस पडतो. तरीही महाराष्ट्रात पाण्याची टंचाई का जाणवते?

हेही वाचा: ‘आरे’ला कारे केल्याने मुंबईतली एक संस्कृती हरवणार आहे!

जमिनीतल्या पाण्याची पातळी घटतेय

बेजबाबदार पाणी वापराबरोबर इतरही कारणं आहेत. महाराष्ट्र भूमीत खाली बेसॉल्ट खडक आहे. यातून जमिनीत पाणी फारच कमी पाझरतं. एकूण पडणार्‍या पावसाच्या पाण्यातलं केवळ १० टक्के पाणी पाझरतं. १७ टक्के पाण्याची वाफ होते. त्यातलं केवळ सहा टक्के पाणी तलावात आणि जलसाठ्यात साठवले जाते. तर ६७ टक्के पाणी नदीपात्रातून वाहून समुद्राला जाऊन मिळतं.

युरोप आणि अमेरिकेत २५० टक्के पाणी साठवण्याची क्षमता आहे. भारतात आणि महाराष्ट्रात हे प्रमाण वाढवण्याची गरज आहे. जे पाणी उपलब्ध आहे, त्यातलं केवळ ११ टक्के पाणी नागरी वस्तीसाठी, १९ टक्के पाणी उद्योग-व्यवसायासाठी, तर ७० टक्के पाणी शेतीसाठी वापरलं जातं.

या ७० टक्के पाण्यातलं बहुतांश पाणी हे विहिरी आणि कुपनलिकांतून म्हणजेच भूगर्भातून उपसलं जातं. त्यामुळे जमिनीतल्या पाण्याची पातळी घटते. त्याचा परिणाम वृक्षराजीवर होतो. दुसरं म्हणजे हे पाणी शेकडो वर्षांपूर्वी तिथं पोचलेलं आहे. उपसलेल्या पाण्याचं पुनर्भरण होत नाही. त्यामुळे जमीन शुष्क होते.

पाणी वापराचं गणित

आपण जे अन्न खातो, त्याचाही विचार करण्याची गरज आहे. एक किलोग्रॅम चॉकलेट तयार होताना १७१९६ लिटर पाणी लागतं. बीफ तयार होताना १५४१५ लिटर पाणी लागतं. बकर्‍याचं एक किलो मटण तयार होताना १०४१२ लिटर पाणी लागतं. एक किलोग्रॅम चिकन तयार होण्यासाठी ४३२५ लिटर पाणी लागतं.

एक किलोग्रॅम तांदूळ पिकवण्यासाठी २४९७ लिटर पाणी लागतं. ११ अंड्यांसाठी ९६ लिटर पाणी लागतं. एक लिटर बीअर बनवण्यासाठी २९६ लिटर पाणी लागतं. तर एक किलोग्रॅम साखर बनवण्यासाठी २५०० लिटर पाणी लागतं.

हेही वाचा: आरेतल्या वृक्षतोडीचा झाडं लावून निषेध करणाऱ्या चिंचणीची भन्नाट गोष्ट!

तर नदी प्रदूषणाचा प्रश्न सुटेल

मुबलक पाण्यामुळे ऊस लावतात. उसासाठी कारखाने. या कारखान्यातून बाहेर पडणारं मळीयुक्त पाणी पुन्हा नदीपात्रात मिसळतं. शेतीमधे खतं, तणनाशकं, किटकनाशकं मोठ्या प्रमाणात वापरतात. त्यातला केवळ अकरा टक्के भाग पिकांच्या उपयोगी पडतो. उर्वरित भाग पावसाच्या पाण्यासोबत वाहून जातो. त्यामुळे नद्यांतल्या पाण्याचं प्रदूषण वाढतं.

कारखान्यातून बाहेर पडणारं, नागरी वस्त्यातलं वापरलेलं पाणी, प्लॅस्टिक आणि घरगुती कचरा, रसायनं पाण्यात मिसळल्यामुळे पाण्याचं प्रदूषण वाढतं. नद्यांतलं पाणी पुढच्या गावांना वापरायला अयोग्य बनतं. आपल्या पाण्याची काळजी आपणच घेत नाही, हे सर्वात मोठं दुर्दैव आहे.

नदीच्या खालच्या बाजूला आपलेच बांधव राहतात. नदीवर त्यांचाही अधिकार आहे आणि त्यांनाही स्वच्छ पाणी मिळायला हवं, याचा विचार नदीपात्राच्या वरच्या बाजूला राहणारी मंडळी करत नाहीत. प्रत्येकाचा नदीवर तितकाच अधिकार आहे, आपल्याला जसं स्वचछ पाणी मिळतं आपण वापरतो, तसं ते त्यांना मिळालं पाहिजे आणि वापरता आलं पाहिजे, हा विचार जेव्हा रूजेल तेव्हा खर्‍या अर्थाने नदी प्रदूषणाचा प्रश्न सुटण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल पडेल.

तरी आपण जलसाक्षर होऊ

पाणी साठवणं, जिरवणं, मुरवणं याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. गावाला हे शक्य आहे. प्रत्येकाला जलसंधारणाचं कार्य करण्याची संधी मिळेलच, असं नाही. पण पाण्याचा वापर काळजीपूर्वक करून आपणही पाण्याच्या कार्यात सहभागी व्हायला हवं.

आपण दररोज ब्रश करतो. ब्रश सुरवातीला भिजवण्यासाठी सुरू केल्यानंतर, शेवटी चूळ भरेपर्यंत तसाच सुरू ठेवला, तर दहा लिटरपर्यंत पाणी वाया जातं. दाढी करताना ब्रश ओला करण्यासाठी नळ सुरू केल्यानंतर, शेवटी खोरे धुवेपर्यंत नळ सुरू राहिला, तर, तीस लिटरपर्यंत पाणी वाया जाते.

अनेकांना ग्लास भरून पाणी घेण्याची, त्यातले दोन घोट पिऊन उरलेलं पाणी टाकून देण्याची सवय असते. दिवसभर असं करत राहणारी माणसं लिटर-दोन लिटर पाणी सहज वाया घालवतात. आपण घरात आवश्यकतेनुसार पाणी वापरायला हवं. एवढं जरी करू शकलो, तरी आपण जलसाक्षर झालो, असं मानता येईल.

हेही वाचा: 

दिल क्यों पुकारे आरे आरे?

शुद्ध हवेसाठी, हॅशटॅग ‘शुद्ध हवा हक हमारा’ कॅम्पेन

‘संवर्धन राखीव वनक्षेत्र’ सगळ्यांसाठी फायद्याची का ठरतात?

0 Shares:
You May Also Like
संपूर्ण लेख

आदिपुरुष : नव्या पिढीचं नवं रामायण

दिग्दर्शक ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा नव्या पिढीला रामायण नव्याने सांगू पाहतोय. या सिनेमाची घोषणा झाली तेव्हा कित्येकांनी…
संपूर्ण लेख

सावधान… भारतावर आदळणारी वादळं वाढतायत!

किनाऱ्यावर आदळलेल्या भयंकर लाटांचे वीडियो तुम्हाला सोशल मीडियावर आले असतील. बिपरजॉय वादळ गुजरातकडे गेल्याचे मेसेजही तुम्हाला आले असतील.…
संपूर्ण लेख

हरवलेल्या कथेच्या शोधात : साध्या शब्दांत उग्र वास्तव मांडणारा कथासंग्रह

लेखक सीताराम सावंत यांचा ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ हा नवा कथासंग्रह गावातलं समाजवास्तव नव्याने सांगू पाहतोय. रयत शिक्षण संस्थेत…
संपूर्ण लेख

महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई हीच क्रिकेटची खरी लवस्टोरी

तो आला, त्याने पाहिलं आणि तो जिंकला. त्याची एक झलक पाहण्यासाठी आजही तरुणाई अक्षरश: आपला जीव ओवाळून टाकते.…
संपूर्ण लेख

करियर करणाऱ्या पोरींसाठी एग फ्रीजिंग ठरतंय वरदान

अभिनेत्री प्रियांका चोप्राने मध्यंतरी आपण वयाच्या तिशीमधे एग फ्रीजिंग केल्याचा खुलासा केला होता. सुपरस्टार रामचरण आणि उद्योजिका असणारी…
संपूर्ण लेख

‘फायर इन द माऊंटन्स’ : सरकारी आश्वासनांचा फसलेला रोडमॅप

सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच ‘फायर इन द माऊंटन्स’ हा नवा सिनेमा रिलीज झालाय. वरवर पाहता, या…